Wednesday, December 18, 2013

आमचा नीरो



’लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा बहुधा मी पाहिलेला पहिला सेव्हंटी एम एम चित्रपट. मुंबईतल्या ग्रँट रोडच्या नॉव्हेल्टी थिएटरातल्या अजस्त्र स्क्रीनवर ते वाळवंटी नाट्य पहाताना मी थरारून गेलो होतो. त्यातले काही सीन्स अजून आठवतात. पीटर ओटूल आणि एक जण वाळवंटातल्या विहिरीतून पाणी काढत असतात आणि दूरवरून एक ठिपका येताना दिसतो. त्या ठिपक्याची क्षितिजावर काळी ज्योत होते. ज्योतीतून घोडेस्वाराची आकृती उपजते. पीटर ओटूलचा सोबती घाईघाईत बंदूक उचलतो. गोळी झाडल्याचा आवाज येतो. पण येणार्‍या घोडेस्वाराची गोळी सोबत्याला लागून तो मेलेला असतो. ही चित्रपटातली ओमर शरीफची एण्ट्री.
आणखीही आठवतं. ’मला लढाई (की हिंसा?) आवडू लागली आहे,’ असं अत्यंत चिंताग्रस्त होऊन सांगणारा ओटूल आणि ते ऐकताना करमणूक होत असल्यासारखे दिसणारे ब्रिटिश सेनाधिकारी. ’यू आर मीयरअली अ जनरल; आय मस्ट बी द किंग’ असं शक्‍तिमान ब्रिटिश सेनाधिकार्‍याला ऐकवणार्‍या नामधारी अरब राजाच्या भूमिकेतला अलेक गिनेस. नेहमीप्रमाणे रासवट असणारा अँथनी क्विन. त्या लढाया, ते मृत्यू, तो लहानशा भूमिकेतला आय एस जोहर. आणि ह्या भव्य आणि दीर्घ चित्रपटात स्त्रीच नाही, स्त्रीचा एकही चेहरा कधी दिसत नाही, याचं तेव्हा मनोमन वाटलेलं आश्चर्य.

चित्रपटाचा दिग्दर्शक डेव्हिड लीन आणि नायक पीटर ओटूल यांची ओळखही तेव्हाच झाली. मग मी दोघांचे जे येतील ते चित्रपट पहात गेलो. पीटर ओटूलचा फॅन झालो. ’लॉर्ड जिम’ मला आठवतही नाही. काही तरी आफ्रिकेत घडणारी स्टोरी आहे आणि ओटूल तिथल्या लोकांसाठी लढू पहाणार्‍या एका दारुड्या / अपयशी / कन्फ्यूज्ड माणसाच्या भूमिकेत आहे, असं अंधुक आठवतं. ’लायन इन विंटर’ मधली त्याची आणि कॅथरीन हेप्‌बर्नची जुगलबंदी आठवते. पण ’बेकेट’मधली त्याची आणि रिचर्ड बर्टनची टक्कर मात्र अजिबात आठवत नाही. खरं तर ते वय कौतुकाने इंग्रजी चित्रपट बघण्याचं होतं. बोललेलं फारसं समजत नव्हतं आणि तेव्हा सबटायटल्स नसायची. टीव्ही तर नव्हताच. वाचत होतो खूप. ओटूल आणि बर्टन, दोघेही रंगभूमीवरून आलेले, दोघांचीही उत्तम अभिनेते म्हणून कीर्ती आणि दोघांनाही ऑस्कर नाही; हे मात्र नीट आठवतं.


आज जसा रॉबर्ट द नीरो मला निर्विवादपणे सर्वात मोठा वाटतो, तसा तेव्हा पीटर ओटूल वाटायचा. त्याच्या भूमिकांमधलं वैविध्य मोहून टाकायचं. आज विचार करताना ’नाइट ऑफ द जनरल्स’ हा चित्रपट अतिनाट्यमय वाटतो; पण तेव्हा त्यातल्या थंड आणि विकृत जनरल तांझच्या भूमिकेतल्या पीटर ओटूलचं कोण कौतुक वाटलं होतं. आणि या सगळ्या इन्टेन्स, गुंतागुंतीच्या व्यक्‍तिरेखा पाहिल्यावर आला हलका फुलका ’हाऊ टू स्टील अ मिलियन’. त्यात ह्यू ग्रिफिथ आणि एली वाला(च) यांनी धमाल केली होती. आणि पीटर ओटूलबरोबर होती, चक्क ऑड्रे हेप्‌बर्न. तीनेक वेळा पाहिला मी हा चित्रपट. एकट्या ओटूलने हेप्‌बर्नची जुजबी मदत घेत केलेल्या एका फ्रॉड शिल्पाच्या चोरीची गोष्ट बघायला मजा यायची. अजूनही येईल. आता तो गेल्यावर कदाचित लागेल हा चित्रपट कुठेतरी.




पीटर ओटूलचं शेवटचं दर्शन झालं ते (डेव्हिड लीनच्याच) ’द लास्ट एम्परर’मध्ये. राजकुमाराच्या शिक्षकाच्या लहानशा भूमिकेत तो होता. तोच उंच, किडकिडीत आणि तरीही वजनदार व्यक्‍तिमत्त्वाचा पीटर ओटूल. पण आता खूप म्हातारा. बरं नाही वाटलं. तो गेल्याची बातमी वाचताना दुःख हे झालं, की मला, माझ्या पिढीतल्या अनेकांना आपल्या संस्कारक्षम वयातला एक दुवा निखळल्यासारखं होत असताना आजच्या जगाला त्याचा काही सीरियसनेसच नाही! पीटर ओटूल गेला, तर येत्या रविवारी (बहुधा) लेख येतीलच; पण आम्हाला काय होतंय, हे त्यातून कोणाला किती समजेल? तो आमचा नीरो होता, असं सांगितलं तर समजेल?

Saturday, December 14, 2013

महोत्सवी चित्रपट म्हणजे काय?

’लोकप्रभा’मध्ये छापून आलेला हा लेख. त्यात अर्थातच पुष्कळ भर घालण्याची इच्छा आहे. फोटो पण टाकायचेत. पण तोपर्यंत ...

चव्वेचाळीसावा ’इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ पणजी येथे २० ते ३० नोव्हेंबर या काळात पार पडला. गोव्यात स्थिरावल्यापासून नववा. मुंबई, दिल्ली,कोलकाता, चेन्नई, बंगलोर यांसारख्या मोठ्या शहरात एकापेक्षा जास्त ठिकाणच्या थिएटरांमध्ये असल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवातले चित्रपट दाखवायचं झालं, तर चोखंदळ प्रेक्षकांची चांगलीच धावपळ होईल. विचार करा, मुंबईत मेट्रो किंवा लिबर्टी सारख्या दक्षिण मुंबईतल्या थिएटरमधला चित्रपट पाहून एखाद्याला पुढच्या चित्रपटासाठी अंधेरी किंवा भक्ती पार्कसारख्या ठिकाणी जायचं असेल, तर ’कला नको पण दगदग आवर’ म्हणण्याची पाळी येणार नाही का? पणजीत जिथे महोत्सवातले चित्रपट दाखवले जातात, ती सर्व थिएटर्स एकमेकांपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. आणि तरीही आयनॉक्स ते कला अकादमी, अशा फेर्‍या घालणार्‍या ऑटोरिक्षा महोत्सववाल्यांसाठी (फुकट) उपलब्ध आहेतच.

ही सोय कितीही मोलाची असली, तरी गोव्याचं मुख्य आकर्षण वेगळं आहे, हे सांगायला नको. ऐन फेस्टिवलच्या जागी टिनात आणि नळातून (महाराष्ट्राच्या तुलनेत फारच स्वस्तात) मिळणारी बियर आणि गावात अनेक जागी सर्वांच्या खिशाला परवडणार्‍या दरात फिश करी राइस. शिवाय समुद्रकिनारे.  आणि या सार्‍याचा मनावर परिणाम होऊन ’आपण गोव्यात आहोत,’ या भावनेने मिळणारी सुखसंवेदना. भारतातूनच कशाला, जगातल्या कुठल्याही भागातून फेस्टिवलच्या निमित्ताने नुसतं गोव्यात येणे, हेच आनंददायक ठरतं. तेव्हा, इंडियाच्या फिल्म फेस्टिवलसाठी गोवा, हीच जागा योग्य. जेवढ्या लवकर हा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला जाईल, तेवढं बरं. कारण, सध्या दर वर्षी उद्‍घाटन आणि समारोप, या समारंभांसाठी एक अवाढव्य एअर कण्डिशण्ड शामियाना उभारला जातो आणि फेस्टिवल संपल्यावर उतरवला जातो. मनीश तिवारींनी या अर्थाचं आश्वासन या वर्षी दिलंय. बघू. देशी-परदेशी फिल्म स्टार्सच्या खांद्याला खांदा लावून वावरण्याचं सुख हक्काने मिळवण्याचा अधिकार असा सहजासहजी कुणी सोडून देईल का?

हे झालं मखराबद्दल. फेस्टिवलमध्ये दाखवले जाणारे चित्रपट यांना मखरातल्या मूर्तीचं महत्त्व. इंटरनॅशनल काँपिटिशन, सिनेमा ऑफ द वर्ल्ड, मास्टरस्ट्रोक्स आणि फेस्टिवल कलायडोस्कोप अशा विविध नावांखाली देशोदेशीचे उत्तमोत्तम चित्रपट. जपानी आणि ग्रीक चित्रपटांचे खास विभाग. एक विभाग ऍनिमेशन फिल्म्सचा. अग्नियेस्का हॉलंड या पोलिश दिग्दर्शिकेचा रिट्रोस्पेक्टिव. याशिवाय सोल ऑफ आशिया, डॉक्युमेंटर्‍या, इंडियन पॅनोरमा, ईशान्य भारतातल्या चित्रपटांवर ’फोकस’, दादासाहेब फाळके सन्मान प्राप्‍त झालेल्यांना ’ट्रिब्यूट’, सत्यजित राय क्लासिक्स, स्टुडंट्स फिल्म्स, वगैरे, वगैरे. शिवाय जुन्या-नव्या मेनस्ट्रीम सिनेमाचा विभाग आहेच. तुम्ही भारतीय असा, की अभारतीय, तुम्हाला इथली माहिती असो वा नसो, तुम्हाला ’अभिरूचीपूर्ण’ चित्रपट पहायचे असोत की इथल्या धंदेवाईक चित्रपटांची झलक पहायची असो, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारं असं या महोत्सवाचं स्वरूप असतं.

याचा एक अर्थ असाही होतो, की महोत्सवातले सर्व, किंवा महत्त्वाचे सर्व चित्रपट पहाणं शक्य नसतं. थोडं बुजुर्गांचा सल्ला घेऊन, थोडं स्वतःच कानोसा घेऊन ठरवावं लागतं. काही चित्रपट दोनदोनदा असतात, त्यांचा निर्णय पहिला शो पहाणार्‍यांचं ऐकून घेता येतो. बाकी चांगले असून चुकणारे चित्रपट नंतरच्या फेस्टिवलवर सोडावे लागतात. पण दिवसाला तीन, चार, पाच चित्रपट पहाणे ही एक नशा असते. एका बाजूने डोळे शिणतात, तर दुसरीकडे मनाला सणसणीत पौष्टिक खुराक मिळत असतो. मजा येते. बघताना, मग जोराजोरात चर्चा करताना आणि अनुभवी, जाणत्या ज्येष्ठांची मतं ऐकताना. दहा दिवसात पन्नास चित्रपट पहाणार्‍यांची संख्या कमी नसते. आणि हे अजिबात सोपं, सहज नसतं.

फेस्टिवलवाले चित्रपट आणि एरवी आपल्याला पहायला मिळणारे चित्रपट यांच्यात फरक काय? एक फरक असा की एरवी आपण बॉलिवुड आणि हॉलिवुड इथे बनलेले चित्रपट पहातो; पण चित्रपट जगभर सर्वत्र बनत असतात. इतरत्र बनणारे चित्रपट आपल्याला फेस्टिवलमध्ये सापडतात. हेच वेगळ्या पद्धतीने सांगायचं, तर एक धंदा म्हणून काढलेले चित्रपट आपण एरवी बघतो; तर चित्र, संगीत, साहित्य यांसारखं एक कला माध्यम, म्हणून घडवलेले चित्रपट फेस्टिवलमध्ये असतात. 
म्हणजे, धंदेवाईक चित्रपट वाईट आणि कलात्मक चित्रपट चांगले, असं मुळीच नाही. पण धंदा करणार्‍या एका यशस्वी चित्रपटामागे तसल्याच प्रकारच्या चित्रपटांची जशी रांग लागते, तसं कलावाल्या चित्रपटांचं होत नाही. उलट, स्वतःला शहाणा समजणारा/री प्रत्येक दिग्दर्शक आपलं वेगळेपण जपू बघतो/ते. स्वतःची चित्रपटीय भाषा विकसित करू बघतो/ते. त्यामुळे फेस्टिवलमध्ये खूप जास्त वैविध्य सापडतं. आपल्या ग्रहणक्षमतेचं चौरस पोषण होतं. ही मजा तर फारच थोर. मनाला एकदम तरुण करून टाकणारी.

फेस्टिवलमधल्या चित्रपटांत आणखी एका प्रकारचं वेगळेपण असतं. ते म्हणजे ’बिटवीन द लाइन्स’. दिग्दर्शकाने काहीही कसंही सांगो, हा वेगळेपणा दिसतोच. उदाहरणार्थ, ’मिस अँड द डॉक्टर्स’ मध्ये जुडिथ आणि दोघे डॉक्टर भाऊ, यांच्या नातेसंबंधाविषयी दिग्दर्शक काहीतरी सांगतेच; पण स्वतःच्या डायाबिटिक लहान मुलीला घरी ठेवून कामाला जाणारी घटस्फोटित जुडिथ बारमेड असते, तर तिला ही गोष्ट लपवून ठेवावीशी वाटत नाही; डॉक्टरने तिच्या प्रेमात पडून लग्नाची मागणी घालणे, ही गोष्ट क्रांतिकारक असत नाही; यावरून फ्रान्स, या देशात, किमान पॅरिस या शहरात बाईने आकर्षकपणा लेऊन पुरुषांना दारूचे ग्लास भरून देण्याची नोकरी करण्यात कमीपणा मानला जात नाही, हेसुद्धा आपल्याला कळतंच. ’डिस्‌मँटलिंग’ मधला मुलींना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगता यावं, यासाठी जमीन, घर, सर्वस्व विकणारा बाप ’इथे येऊन रहा, मी पोसतो तुला,’ असं मुलीला म्हणतो; पण मुलगी काही बापाला घरी न्यायचं नाव काढत नाही! दुसरी मुलगी बापाबद्दल सहानुभूती जरूर दाखवते, पैशांची अपेक्षा ठेवत नाही; पण तीसुद्धा त्याला घरी नेत नाही. म्हणजे कॅनडात तरुण मंडळी - मुलगा असो वा मुलगी - एकटेच रहातात. मोकळ्या, विस्तीर्ण फार्मवर आयुष्य गेलेल्या बापावर कोंदट अपार्टमेंटमध्ये रहाण्याची पाळी आली, तरी त्याला स्वतःकडे न बोलावण्यात कोणीच काहीच वावगं मानत नाही. म्हणजे, आपल्याकडे वृद्ध आईबापांची काळजी घेण्याला जितकं महत्त्व आहे, तितकंच तिथे तरुण माणसाने स्वतंत्र होण्याला, रहाण्याला आहे.

’वी आर व्हॉट वी आर’ नामक अमेरिकन चित्रपटात माणसांना मारून त्यांचं मांस शिजवून खाण्याची परंपरा जपणार्‍या एका कुटुंबाची गोष्ट आहे. ते धार्मिक आहेत. जेवणाअगोदर देवाची प्रार्थना करतात, उपासतापास करतात, नैसर्गिक आपत्तीत देवाचा आदेशही शोधतात. त्यांचं चित्रण अजिबात विकृत नाही. दीर्घकाळ नरमांसभक्षण केल्यामुळे त्यांना विशिष्ट रोगही होतो; पण त्यांच्या वर्तनात या ’वेगळेपणा’ची खूण सापडत नाही. यावरून ’अमेरिकेत नरमांसभक्षण करण्याची परंपरा असलेले लोक आहेत’ किंवा ’काही धार्मिक ख्रिस्ती लोक नरमांसभक्षण करतात’ असल्या प्रकारचं अनुमान काढणं अर्थातच चुकीचं ठरेल. पण मग या दिग्दर्शकाला म्हणायचं तरी काय आहे, हा प्रश्न उरतोच. याचं उत्तर असं, की या चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या जिम मिकलची ख्याती हॉरर फिल्म बनवणे, ही आहे. ही हॉरर फिल्म आहे. ते माणूस मारण्याची, कापण्याची, रक्‍ताचे पाट वाहण्याची दृश्यं हॉरर निर्माण करण्यासाठी आहेत. म्हणूनच चित्रपटात एकदा थेट या कुटुंबाच्या कर्मकांडाप्रमाणे एक फीमेल हात लिपस्टिक बाहेर काढतो; पण त्या लिपस्टिकने मुडद्यावर लाल रेषा न मारता ओठ रंगवतो! आहे ना हॉरर! असह्य भीती वाटून घेण्यातही काही जणांना सुख मिळतं, हे लक्षात घेता असले चित्रपट बनवण्यामागची प्रेरणा कळते; पण यात कला कुठे आली, हे कळत नाही. अमेरिकन दिग्दर्शक हॉरर निर्माण करण्यासाठी नरमांसभक्षण करणारी ’नॉर्मल’ फॅमिली दाखवण्याच्या थरालाही जातील, हा यातला वेगळेपणा होय, असं म्हणण्याचा मात्र मोह होतो.

पण विकृतीची नॉर्मल अवस्था, हेच दर्शन घडवणारा एक प्रत्ययकारी चित्रपटही या महोत्सवात बघायला मिळाला: ’सारा प्रिफर्स तू रन’. साराला धावण्याचं वेड आहे. आपल्या गावात पहिली आल्यावर साराला दूर, माँट्रियलला कॉलेजात प्रवेश मिळतो, धावण्याचं कौशल्य जोपासण्यासाठी. साराची फी, तिच्या रहाण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च, तिला लागणारे खास बूट, वगैरे गोष्टी, तिच्या प्रशिक्षणाचा खर्च, हे सगळं उचलण्याइतकी साराच्या घरची परिस्थिती नसते. मग सारा जवळ रहाणार्‍या एका तरुणाची मदत घेते. त्यालाही माँट्रियलला जायचं असतं. सरकारकडून अनुदान मिळावं यासाठी, त्याच्याच सूचनेवरून ती त्याच्याशी चक्क लग्न करते. अनेक मुली त्याच्या मागे असल्या तरी तो बिचारा हिच्यावर जीव लावतो, तिची काळजी घेतो. मग ती त्याच्याशी सेक्स करते, पण तिचं शरीर जराही प्रतिसाद देत नाही. तिला त्यात सुखच लाभत नाही. तिला आपल्यात शून्य रस आहे, हे जाणून तो डिव्होर्स मागतो. त्यासाठी एकमेव कारण म्हणून वेगळा रहाण्याचा प्रस्ताव मांडतो. वेगळं राहूनही मी या खोलीचं भाडं भरत राहीन, असं तिला सांगतो. या सर्व प्रकारात तिची प्रतिक्रिया काय असते? काहीच नसते! ती निर्विकार, थंड रहात नाही. त्याला तोडत नाही. त्याला त्रास देण्यात विकृत आनंद घेत नाही. तिच्या वागण्यात खोटच काढता येत नाही. पण एक धावणे सोडलं, तर तिला अन्य कशातही आणि कोणातही काडीचा रस नसतो. प्रेक्षकाला सारा विकृत वाटत नाही. नॉर्मल वाटते. पण हे दिग्दर्शिकेचं यश आहे. पटकथेचं, साराची भूमिका करणार्‍या सोफी देस्मारेचं यश आहे. आणि हे नक्कीच ठसठशीत वेगळेपण आहे.

विकृती हा शब्द जोरकस आहे. आणि त्याचा जोरकसपणा निगेटिव आहे. धावण्यासारख्या व्यायामाच्या क्रियेला तो लावला की खटकतं. पण प्रेम, वासना, अगदी वात्सल्य यांना लावला, की अर्थपूर्ण ठरतो. ’जॉय’ या चित्रपटात एकटी रहाणारी एक बाई हॉस्पिटलातून तान्हं मूल पळवते आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. मुलाला अपाय होण्याची शक्यता दिसून येताक्षणी चंडिकेचा अवतार धारण करून एकाची हत्याही करते. पण मुलाच्या आईने याबद्दल कृतज्ञ रहावं का? आपलं तान्हं मूल हिने नेलं आणि त्याचा पूर्ण ताबा घेण्याचा प्रयत्न केला, वेड लागल्याप्रमाणे मुलाचे लाड केले, तर त्या आईने हसावं की घाबरून अर्धमेलं व्हावं? पळवणार्‍या बाईला मात्र मुलाविना एकटं जीवन की आजन्म तुरुंगवास, यात निवड करताना काहीच अडचण येत नाही. ही अतिरेकी वात्सल्यभावना विकृत नव्हे काय?

’इन हायडिंग’ या पोलिश चित्रपटातली मुलगी दबलेली असते. अशोभनीय उद्‍गार काढल्याबद्दल बापाकडून थोबाडीत खाते. (तरी बिथरत नाही. पूर्व युरोप या बाबतीत आशियाच्या, आपल्याप्रकारच्या नातेसंबंधांच्या जास्त जवळ आहे, हे यावरून लक्षात येतं. तिच्यावर उत्स्फूर्तपणे हात उगारणारा बाप तिचा छळ करत नसतो. स्वतःचा अधिकार शाबीत करत असतो. आणि हे तिलाही मान्य असतं. तरीही ’थप्पड खाऊन निमूट रहाणारी’ असं तिचं व्यक्‍तिमत्त्व चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्या स्मृतिपटलावर नोंदलं जातं.) कमी बोलणारी, मोकळेपणा नसलेली, स्वतःच्या शरिराला जसं ती घट्ट बांधून ठेवत असते, तशीच मन आवळून धरलेली अशी ही तरुण मुलगी पार बदलताना दिसते. तिच्या घरात लपलेल्या ज्यूइश मुलीच्या सान्निध्यात आणि तिच्याच प्रेरणेने हिला शरीरसुख म्हणजे काय हे कळतं. ते देणार्‍या, चित्तवृत्ती मोकळ्या करणार्‍या, एक प्रकारे तिच्या घरात बंदी असलेल्या मुलीचा सहवास गमावण्याची शक्यता तिला मुळीच मान्य नसते. मग तिच्या हातून खून होतात. धडधडीत असत्य जोपासलं जातं आणि शेवटी स्वतःच्या बापाचा मृत्यू तिला बघावा लागतो.

ही तर सरळ सरळ विकृती. सुखाच्या अनावर ओढीपायी एका साध्याशा मुलीचं होणारं घोर अधःपतन. या भूमिकेसाठी मॅग्दालेना बोक्झार्स्का सर्वोत्तम अभिनेत्रीचं बक्षीस घेऊन गेली. पण या चित्रपटाला ’एका विकृतीचं चित्रण’ यापेक्षा जास्त पैलू होते. कोण मुक्‍त कोण बंदी, कोण जुलमी कोण बळी, कोण सरळ कोण चंचल, असल्या विरोधी गुणविशेषांची नाजुक गुंतागुंत दाखवत मनुष्याच्या बाबतीत अंतिम विधान करता येत नाही, असं या चित्रपटाने सुचवलं.

सगळ्या ’चांगल्या’ चित्रपटांची दखल इथे घेणं शक्य नाही. मी पाहिलेल्यांपैकी उल्लेखनीय अनुभव थोडक्यात सांगतो. आन्द्रे वायदा या थोर पोलिश दिग्दर्शकाची फिल्म ’वालेसा, मॅन ऑफ होप’ अर्थात लेक वालेसावर होती. वायदा सौंदर्य टिपण्यात रमत नाही. त्याचा फोकस विचलित होत नाही. ओरियाना फलाची हिने (हीसुद्धा जगप्रसिद्ध मुलाखतकर्ती) घेतलेल्या वालेसाच्या मुलाखतीतून वालेसाचा यूनियनच्या साध्या नेत्यापासून राष्ट्रप्रमुखापर्यंत होणारा प्रवास आपल्याला दिसतो. त्यातून वालेसाचं कष्टकरी मुळं दिसतात तशीच त्याची परिस्थितीचा अंदाज चटकन घेऊन त्वरित निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा दिसते. वालेसाचा आणि त्याच्या बायकोचा मानसिक छळ करणार्‍यांचा सूड तो घेतो की नाही असल्या, मुद्यापलिकडल्या तपशिलांमध्ये वायदा क्षणभरही अडकत नाही की वालेसाचं कौटुंबिक जीवन दाखवताना सेक्सची झलक पेश करण्याच्या मोहात पडत नाही. चित्रपट अजिबात रेंगाळत नाही आणि आपल्याला झालेली वालेसा या ’माणसा’ची ओळख कायमची आपल्यासोबत रहाते. (आपल्याकडे होणार्‍या चरित्रात्मक चित्रपटांची तुलनाच काय, त्यांचा  उल्लेखही इथे करवत नाही. इथे सगळे परमेश्वराचे अवतार!)

माझ्यासाठी सर्वात प्रभावी चित्रपट ठरला तो ’मारुसिया’. एक आई. मुलीच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची सर्वतोपरी काळजी घेणारी आई. ’मी कशी नोकरी करू? मला मारुसियाकडे बघायचं आहे,’ असं म्हणत ही बाई प्रस्थापित व्यवस्थेचे नियम पाळायला साफ नकार देते. रोज नवा दिवस, नवं साहस. आज काय खाणार, कुठे झोपणार, काय करणार हे रोज नव्याने ठरणार. हेच जणू तिचं रूटीन. तिच्या खणखणीत अनार्किस्ट भूमिकेमुळे तिला फ्रान्सच्या सरकारकडून मदत मिळू शकत नाही. बाई सुसंस्कृत. कला, साहित्य या विषयांची नीट माहिती असलेली. पण कोणीही तिला नांदवू बघत नाही. ’मी पूर्णवेळ आई आहे आणि मला पैसे कमावण्यासाठी काहीही कां करायचं नाही की कशाला वा कोणाला बांधून घ्यायचं नाही.’ असं प्रत्यक्ष जगणं कमालीचं अवघड असणार. आणि बाई खरी आहे, मारुसियाची भूमिका मारुसियानेच केली आहे, हे कळल्यावर तर हादरायला होतं. चित्रपटाची निर्माती शेवटी प्रश्नांना उत्तरं द्यायला हजर होती. मारुसियाच्या आईला जगरहाटीबद्दल नक्की काय म्हणायचं आहे, हे तिला बरोबर माहीत होतं. प्रश्न विचारणारे अस्वस्थ होते, उत्तर देताना ती अजिबात विचलित झाली नाही.

अश्गर फरहदीचा ’द पास्ट’ हा आणखी एक अप्रतिम चित्रपट. दुसर्‍या नवर्‍यापासून घटस्फोट घेऊन तिसर्‍याशी सोयरीक करू पहाणार्‍या बाईचं जगणं. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ’हे असं का?’ या प्रश्नाला उत्तर मिळतं ते टप्प्याटप्प्याने. एक उलगडा होतो न होतो तर त्याखाली आणखी एक पदर असल्याचं उघड होतं. कोणीच दुष्ट नाही, योगायोगाने काही होत नाही. एकेकाचं दुसर्‍याबद्दल मार्मिक निरीक्षण. प्रत्येक जण भूतकाळाचं ओझं बाळगतो. सत्याच्या दिशेने पायर्‍या चढताना शेवटी आपल्या लक्षात येतं की याला अंत नाही. कशी रचली असेल याची पटकथा? आणि यातलं कोणीच अभिनय करताना ’सापडत’ नाही.

’द अमेझिंग कॅटफिश’ मध्ये बापाविना तीन मुली एक मुलगा यांना वाढवणारी आई. तिला एड्स. हे सर्व मुलांना माहीत. प्रत्येक जण आपापल्या जगण्यात मग्न. एकमेकांवर इतका विश्वास की सोडूनच दिलेलं. अशात एका तरुण मुलीला ते घरात घेतात. घेतात म्हणजे, गिळंकृतच करतात. ती दोन वर्षांची असल्यापासून जगात एकटी! निरोगी जगणं म्हणजे काय, याचा वस्तुपाठ देणारा चित्रपट. एड्स झालेल्या सिंगल मदरच्या माध्यमातून! मग यात किती बारीक तपशील, घटना, व्यक्‍तिचित्रण आणि काय काय.

मुलगा सहा वर्षांचा झाल्यावर कळलं की तो जन्मतःच बदलला आहे, खरा मुलगा अमुक घरी वाढतो आहे, तर काय होईल, हा विषय ’लाइक फादर लाइक सन’ या जपानी चित्रपटाने मांडला. मांडणी जरी भावनिक अंगाने असली तरी एक घर गरीब एक श्रीमंत, एक घर चोराचं एक शिपायाचं इतक्या ढोबळ पातळीवर चित्रपट उतरला नाही. सहा वर्षांची भावनिक गुंतवणूक रक्‍ताच्या नात्यासाठी सोडून देता येत नाही, हे पटवताना ’मला हा खरा आपला असलेला मुलगा आवडू लागला आहे आणि यात ’त्या’ मुलाशी आपण बेइमानी करत आहोत, या विचाराने मला रडू येत आहे,’ असं एक आई म्हणते. एकूणच या समस्येकडे आया बापांपेक्षा वेगळ्या पद्धतीने बघतात! यातल्या भावनिकतेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकून गेला.

महोत्सवातला सर्वात गाजलेला चित्रपट होता, ’ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर’. गाजण्याचं कारण होतं, त्यातल्या दोन तरुणींच्या लेस्बियन संबंधांचं उघड, तपशीलवार आणि विलंबित चित्रण. ही होती एका मुलीच्या प्रेमाची शोकांतिका. या शोकांतिकेला एकापेक्षा अधिक परिमाणं होती. तिच्या पंधराव्या वर्षी गोष्ट सुरू होते आणि ती पंचवीस वर्षांची होईपर्यंत चालते. तिचं प्रेम दुसर्‍या मुलीवर असतं, अन्य कोणाचा विचारही ती करू शकत नाही, त्या मुलीच्या सहवासासाठी, स्पर्शासाठी ती तडफडत रहाते, हे बघताना लेस्बियन शरीरसंबंध चित्रणाची आठवण पुसट होते. केवळ पूर्ण नग्न स्त्री शरिरांचं निकट, स्पष्ट सेक्स दाखवणे, या पेक्षा जास्त अर्थांनी हा चित्रपट ’बोल्ड’ होता. प्रेम म्हणजे काय, प्रेमपूर्ती म्हणजे काय, शरिराची ओढ म्हणजे वासना का, अशा अनेक प्रश्नांना नवे फाटे फोडत गेला. आणि अदील एक्सार्शोपुलास हिचं काम अशक्य कोटीतलं होतं. हिचा जो सापडेल तो चित्रपट पाहिलाच पाहिजे, अशी संवेदनाशीलता तिच्या चेहर्‍यात आहे.

खरं तर ओपनिंग फिल्मचा मान मिळालेल्या ’डॉन वॉन्स’ या चित्रपटाचा अपवाद सोडल्यास मी पाहिलेल्या एकजात सर्व परदेशी चित्रपटांमध्ये पात्रयोजना अचाट होती. हे कलावंत याच भूमिकांसाठी जन्माला आलेत, असं निःशंकपणे म्हणावं. हे श्रेय अर्थात नटनट्यांबरोबर दिग्दर्शक, मेकपमन आणि इतर तंत्रज्ञ यांचंही आहे. मी इथे घेतलेला आढावा केवळ चित्रपटांच्या आशयाशी संबंधित आहे. त्या आशयनिर्मितीला संगीत, प्रकाश, कॅमेरा, एडिटिंग यांनी कसा हातभार लावला, याबद्दल मी काहीच म्हटलेलं नाही. चित्रपट ही एकूणच अनेकांनी मिळून घडणारी, व्यामिश्र कला आहे. हे करायचं तर त्यासाठी सगळे चित्रपट पुन्हा बघावे लागतील!

एवढं गुणगान केल्यावर अपेक्षाभंगाची उदाहरणं देणं भाग आहे. एकच देतो. ऋतुपर्ण घोष यांच्याबद्दल इतकं ऐकलं की त्यांचा शेवटचा चित्रपट’ सत्यान्वेषी’ मोठ्या अपेक्षेने पाहिला. अगदीच टुकार निघाला. एखाद्या चित्रपटाने उडीच छोटी मारायची ठरवली आणि छोटीच मारली, तर त्याला चूक म्हणता येत नाही. ’सत्यान्वेषी’ आव मोठ्या संवेदनाशील, चतुर, रहस्यमय गोष्टीचा आणतो आणि यातलं काही एक करत नाही. पंधरा मिनिटांची कथा ताणून दोन तासांत सांगतो. यातलं रहस्य शाळकरी आहे. यातल्या पात्ररचनेत सुसंगती नाही. यातलं संगीत कानाला त्रास देतं. रंग तेवढे नेत्रसुखद आहेत. नेमका हा चित्रपट भारतीय निघावा, हे वाईट आहे; पण खरं आहे. ऋतुपर्ण घोष यांचे इतर चित्रपट बघायची इच्छा उरली नाही.
गेल्या वर्षीसुद्धा ’एलार चार अध्याय’ हा बंगालीच चित्रपट सर्वात भिकार निघाला होता!


Thursday, November 14, 2013

मन्ना डे: एक सगळ्यांचा एक माझा

मन्ना डे गेला.

बातमी कळल्यावर लगेच लिहिण्याची ऊर्मी आली नाही, हे कबूल करायला हवं. पण इतके दिवस गेल्यावर हेसुद्धा कबूल करायला हवं की नाही लिहिलं, तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. एका कर्तव्याला चुकलो, असं खुटखुटत राहील. तेव्हा लिहिणं भाग आहे.

इंटरनेटच्या जमान्यात माहिती यूँ मिळते. मन्ना डे १९४२ पासून गातो आहे. म्हणजे तो रफी, मुकेश, तलत, किशोर या सगळ्यांना बर्‍यापैकी सीनियर आहे. मन्ना डेची अर्ध्याहून अधिक गाणी धार्मिक-आध्यात्मिक-भाष्यकारक; हिंदी सिनेमाच्या परिभाषेत सांगायचं तर ’भिकार्‍याची गाणी’ आहेत. पण मला इथे मन्ना डेच्या एकूण कारकीर्दीचा आढावा घ्यायचा नाही आहे. (तरी, तलत-रफी-मुकेश जसे शेवटी शेवटी बेसूर, अमधुर होऊ लागले, तसं मन्ना डेचं झालं नाही. तो जोपर्यंत गायला, तोपर्यंत गाण्याला न्याय देत राहिला, हे आवर्जून नोंदवावंसं वाटतं.) मला मन्ना डे - म्हणजे मन्ना डेचा आवाज - कोण होता, हे चाचपडून बघायचं आहे. ’तरुण नसलेला आवाज’ हे त्याचं ब्रँडिंग का झालं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे.

आपण पार्श्वगायकांची चर्चा करत आहोत. पडद्यावर नायक - किंवा आणखी कोणी - तोंड हलवतो आणि त्याला मागून आवाज पुरवतो, तो पार्श्वगायक. असं जरी असलं, तरी आवाजाला काहीतरी व्यक्‍तिमत्त्व असतंच. म्हणजे, ’ये जिंदगीके मेले’, ’आयेभी अकेला’ आणि ’चल अकेला’ या तीनही गाण्यांची जात एकच असली तरी गायक वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांचा भावही बदलतो. कसा? तर रफीला ’ये जिंदगीके मेले’ (मेला - नौशाद) गाताना ऐकताना ’जगण्याविषयी इतकं कडवट होण्याइतकं वाईट या रगेल पुरुषाला काय भोगावं लागलं असेल?’ असा प्रश्न सुचतो. ’या हळव्या जिवाला असं म्हणायची पाळी आली, यात काय आश्चर्य?’ हा प्रश्न तलतचं ’आयेभी अकेला’ (दोस्त - हंसराज बहल) ऐकताना सुचेल. आणि ’खरंच; कित्ती खरं सांगतो आहे हा!’ असा समरस भाव मुकेशच्या आवाजातलं ’चल अकेला’ (संबंध - ओ पी नय्यर) ऐकताना मनात उमटेल.

मन्ना डेचं ’कालका पहिया घूमे भैया लाख तरहे इन्सान चले, लेके चले बारात कभी तो कभी बिना सामान चले’ (चंदा और बिजली - शंकर जयकिशन) ऐकताना काय वाटतं?

असं वाटतं, हे शब्द याच आवाजासाठी घडले. हा आवाज या, असल्या शब्दांचीच वाट पहात होता.

शास्त्रीय संगीतातली गाणी सगळ्यांनी गायली. तलतचं ’मैं पागल मेरा मनवा पागल’ (आशियाना - मदन मोहन) हे गाणं केदार रागातलं आहे, हे कळल्यावर वाटतं, ’असेना. नायकाची व्याकुळता किती प्रत्ययकारी झाली आहे या गाण्यात!’ रफीचं ’नाचे मन मोरा’ (मेरी सूरत तेरी आँखे - सचिन देव बर्मन) हे कसं तेजस्वी आहे! भैरवी खूप आहे हिंदी सिनेमात; पण भैरवीत असलं तेज विरळा. मुकेशचं ’आँसू भरी है ये जीवनकी राहें’ (परवरिश - दत्ताराम) हे गाणं कल्याण रागातलं आहे, हे कळून काय फरक पडतो? नेमस्त मुकेशचं टिपिकल हरलेपण. किशोरचं ’वो शाम कुछ अजीब थी’ (खामोशी - हेमंत कुमार) हे गाणंसुद्धा कल्याण रागातलंच आहे. शर्ट धुवून त्यावरचा मळ काढून टाकावा, तसा एरवीचा छचोरपणा दूर करून कशी मनातली हुरहूर व्यक्‍त करतो आहे किशोर!

मन्ना डेचं रागेश्रीमधलं ’कौन आया मेरे मनके द्वारे’ (देख कबीरा रोया - मदन मोहन) ऐकताना काय होतं?

असं वाटतं, हे खरं शास्त्रीय गायन. या आवाजामुळे ही सतार, ही आरोह-अवरोहात फिरणारी चाल, यांना किंमत प्राप्‍त होते आहे.

रफी रगेल आहे, जेव्हा दुःख, प्रेम, देशभक्‍ती, मैत्री असलं काहीही रफीच्या आवाजात व्यक्‍त होतं, तेव्हा ते एका तगड्या पुरुषाचं दुःख, प्रेम, वगैरे असतं. मुकेशच्या बाबतीत ते एका सरळ, सत्यवचनी माणसाचं असतं. तलत हळवा, व्याकुळ आहे. आणि किशोर उपरोधिक, जगण्याकडे एक खेळ म्हणून बघणारा. अर्थात यातल्या प्रत्येकाच्या बाबतीत अपवाद आहेत (म्हणूनच ते थोर आहेत); पण त्यांची नॉर्मल प्रकृती ही अशी आहे. मन्ना डेने ’देख कबीरा रोया’त ’कौन आया’ गायलंय, ते मुळी एका नायकाला गायक ठरवण्यासाठीच. या सिनेमात  आणखी एक जण असतो शायर. तो गातो, ’हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया’. ही चालसुद्धा शास्त्रीयच आहे आणि गोड, सुरेल आहे. पण ते गाणं तलत गातो. आणि त्या गाण्याचे शब्द उर्दू वळणाचे आहेत. परिणामी गाणं शायरी म्हणून ऐकू येतं. ’कौन आया मेरे मनके द्वारे’चे शब्द देशी तर आहेतच, त्यांच्यात प्रेम असलं तरी विरह, व्याकुळता, असलं काही नाही. ते ठळकपणे शास्त्रीय संगीत ठरतं.

आणि ते गाणं मन्ना डे गातो.

मन्ना डेमुळे ते ’शास्त्रीय’ म्हणून डिफाइन होतं. तलतच्या आवाजामुळे शायरीला उठाव येत असेल; पण तलत ’शायरपणा’चं व्यवच्छेदक लक्षण नाही. मन्ना डे शास्त्रीयतेचं आहे.

नौशादने जवळपास सगळी गाणी शास्त्रीय संगीतात दिली आणि नौशादने मन्ना डेचा आवाज क्वचित वापरला, यावरून मन्ना डे आणि शास्त्रीय संगीत यांचं समीकरण नाही, असं म्हणावं का? नाही! कारण एकदा चाल शास्त्रीय संगीतात बसवली, की गाण्यातले भाव व्यक्‍त करायला रफी जास्त उपयुक्‍त ठरतो! उलट, शब्द काही असोत, शास्त्रीय गायन अशी ओळख स्पष्ट व्हायला मन्ना डे बरा पडतो.

आणखी एक तुलना करून बघूया. आता तलत बाहेर. विनोदी, बहुधा आचरट गाणी. ’सर जो तेरा चकराये’ (प्यासा - एस डी बर्मन) हे गाणं जॉनी वॉकरच्या तोंडी असलं आणि त्यात खास त्याच्या तोंडचे ’मालीश, चंपी मालीश’ असे उद्‍गार असले तरी ते गाणं साहीरने लिहिलेलं, जनता जनार्दनाची मानसिकता व्यक्‍त करणारं गाणं आहे. रफीनेही ते मोकळेपणाने गायलं आहे, आचरटपणा करत नाही. अर्थात, रफीनेही ’हम काले हैं तो क्या’ (गुमनाम - शंकर जयकिशन) सारखी वाकडे तिकडे हेल काढणारी गाणं म्हटली आहेतच. ’डॅनी केप्रमाणे यॉडलिंग करणार्‍या किशोर कुमारने फारच लवकर एक विदुषक, सर्कशीतला जोकर, अशी स्वतःची प्रतिमा बनवून जोपासल्यामुळे त्याने असंख्य आचरट ढंगाची गाणी म्हटली (त्यातल्या काहींना ’गायली’ म्हणावंसं वाटत नाही). तसल्याच प्रकारच्या सिनेमात त्याने कामंही केली. पण त्याने तसलं प्लेबॅक क्वचित दिलं असेल. आणि मन्ना डे? ’किसने चिलमनसे मारा’ (बात एक रातकी - एस डी बर्मन), ’प्यारकी आगमें तन बदन जल गया’ (जिद्दी - एस डी बर्मन), ’फुल गेंदवा न मारो’ (दूजका चांद - रोशन), ’गोरी तोरी बाँकी’ (आधी रातके बाद - चित्रगुप्‍त), ’मेरे भैंसको डंडा क्यूं मारा’ (पगला कहींका - शंकर जयकिशन) असली तद्दन आचरट गाणी त्याने जॉनी वॉकर, मेहमूद, आगा आणि वेड लागलेला शम्मी कपूर यांच्यासाठी गायली आहेत. एका बाजूने ही शास्त्रीय संगीतातली गाणी आहेत; तर दुसरीकडून बालबुद्धी पब्लिकला वेडगळ चाळे दाखवून हसवणारी गाणी आहेत. एकदा धंद्याला बसलं, की निवड करायला फारसा वाव नसतो, तरी ही गाणी मन्ना डेच्या कीर्तीत भर घालत नाहीत, हे नक्की.

त्रास होतो. रफी, किशोर यांनी असला आचरटपणा केला तर त्रास होत नाही कारण त्यांच्या आक्रमक, आगाऊ प्रतिमेत त्याला जागा आहे. नायकाला रफीचा आवाज दिला म्हणून सोबत कॉमेडी करणार्‍या मेहमूदला मन्ना डेचा आवाज दिला, हे काही पटत नाही. नायकपणात कमी पडत असला तरी मन्ना डेला रुबाब नाही, असं मुळीच नाही. मन्ना डेच्या रुबाबाचं बेस्ट उदाहरण म्हणजे ’ना तो कारवाँकी तलाश है’ (बरसातकी रात - रोशन). ही कव्वाली सुरू करणारा तो मस्त मिशावाला नट आहे; काय रुबाब आहे त्याला! तसल्या रुबाबदार कव्वालाला हरवताना रफीच्या आवाजात दणदणीत शब्द आणि चाल पेश करणं रोशनला भागच होतं. ’तलाश’ (एस डी बर्मन) मधल्या ’तेरे नैना तलाश करे जिसे’ या गाण्याला चेहरा दिलाय शाहू मोडकने. सिनेमात या गाण्याचं
प्लेसिंग खास आहे. त्या खासपणाचं चीज मन्ना डे आणि शाहू मोडक, दोघेही करतात. ’तीसरी कसम’ (शंकर जयकिशन) मध्ये राज कपूरची गाणी जरी मुकेश गात असला तरी क्रिशन धवनच्या तोंडच्या ’चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजडेवाली मुनिया’ची मजा और आहे. ’बुढ्ढा मिल गया’तल्या (राहुल देव बर्मन) ’आयो कहाँसे घनश्याम’ची गंमत? (या आरडीने तर ’भूत बंगला’ या मेहमूदच्या चित्रपटात ’आओ ट्विस्ट करे’ हे त्या काळातलं ट्रेण्डी गाणं मन्ना डेला दिलं. आणि माझ्या आठवणीनुसार त्या वर्षी ते वार्षिक बिनाका गीतमालेत आखरी पायदानवर गेलं होतं! मन्ना डेचं आणखी कुठलं गाणं गेलं?)

तर मन्ना डेच्या वजनदारपणाचा फायदा संगीतकारांनी उचलला आहे. त्याच संगीतकारांनी त्याला पोरकटपणा करायला लावण्यामागे सिनेमावाल्यांची कोणती कम्पल्शन्स असतील कोण जाणे. तशी ’आकाशवाणी’वाली किंवा जीवनावर भाष्य करणारी गाणी मन्ना डेने उदंड म्हटली आहेत. ’निरबलसे लडाई बलवानकी’ (तूफान और दिया - वसंत देसाई), ’कस्मे वादे प्यार वफा’ (उपकार - कल्याणजी आनंदजी), ’इन्सानका इन्सानसे हो भाईचारा’ (पैगाम - सी रामचंद्र), ’जिंदगी कैसी है पहेली’ (आनंद - सलील चौधरी) ही काही उदाहरणं. (यात मराठीसुद्धा आहे. ’कालचक्र हे अविरत फिरते’ हे ’दोन घडीचा डाव’मधलं गाणं मन्ना डेने अस्खलित मराठीत म्हटलं आहे. त्याचे मराठी उच्चार एकदम साफ. ’अ आ आई म म मका’ आठवतं?)

सलील चौधरी आणि मन्ना डे ही एक बरी जोडी आहे. ’हरियाल सावन ढोल बजाता आया’ आणि ’धरती कहे पुकारके’ ही लताबरोबरची ’दो बिघा जमीन’मधली दोन ग्रेट  द्वंद्वगीतं. ’ऐ मेरे प्यारे वतन’ हे काबुलीवालातलं पठाणी बाजाचं चटका लावणारं गाणं. ’जा तोसे नही बोलू कन्हैया’ ही ’परिवार’मधली करकरीत मन्ना डे आणि मखमली लता यांची अफलातून जुगलबंदी. वा!

पण एक मुद्दा उरतो. सुरेलपणापलिकडे मन्ना डे गाण्यात काय घालत होता? त्याचे उच्चार स्पष्ट होते. ’सुर ना सजे’ (बसंत बहार - शंकर जयकिशन) मध्ये तो ’स्वरकी साधना’च्या पुढे नीट ’परमेश्वरकी’ म्हणतो. पण हिंदी सिनेमाच्या नायकात जसं आपोआप डोळ्यांना दिसणारं काही तरी झेड एलिमेंट असावं लागतं, तसंच प्लेबॅक सिंगरच्या आवाजात जादा काही तरी लागतं. आणि ते मन्ना डेकडे नव्हतं.

आणि आता उरला मुद्दाम शेवटी ठेवलेला बेस्ट मन्ना डे. शास्त्रीय संगीत आणि भिकार्‍यांची गाणी यात दादा असलेल्या मन्ना डेला जर कोणी नायक, रोमँटिक नायक बनवलं असेल, तर ते - अहो आश्चर्यम्‌ - शंकर जयकिशनने. एक काळ होता जेव्हा मला जर कोणी विचारलं असतं, ’हिंदी सिनेमाच्या अथांग सागरात सर्वात जास्त आवडत्या अशा कुठल्या एका गाण्याचं नाव तू घेऊ शकशील?’ तर एक क्षणही न थांबता मी उत्तरलो असतो, "होय. ’ये रात भीगी भीगी’ हे ते गाणं." आजही ’ये रात भीगी
भीगी’ (चोरी चोरी - शंकर जयकिशन) मला आवडतंच; पण तेव्हा मला ते परिपूर्ण वाटायचं. ती घुमणारे टोल वाजत होणारी सुरुवात, मग ते उचंबळणारे व्हायोलिनचे सूर, त्यात वरच्या पट्टीत घुसणारा मन्ना डेचा आवाज आणि मग या अद्‍भुत वातावरणाला कापत जाणारी लताची तान! यापेक्षा भारी काही असूच शकत नाही जणू! रात्र आहे, सोबत आहे, हुरहूर आहे, उद्याच्या इच्छापूर्तीची अंधुक आशा आहे, या सगळ्यावर संयमाचा नाजुक पण सध्या पक्का, असा पदर आहे -- आणि या स्वप्नवास्तवाला जिवंत करणारे शैलेंद्रचे शब्द आहेत. तो राज कपूर आणि त्याची ती उद्धट देहबोलीची मनमोकळी नर्गिस. मी ’चोरी चोरी’ पाचेक वेळा पाहिला. हे गाणं गोची करायचं. राज कपूर पहायचाय, नर्गिसवर नजर  लावून बसायचंय आणि असं असताना ’ये रात भीगी भीगी’चे सूर वाजले की माझे डोळेच मिटायचे. असं वाटायचं, सगळी संपूर्ण इन्द्रियगोचरता केवळ कानांच्यात एकवटावी आणि ’ये रात भीगी भीगी’च्या सुरांनी सगळा काळ-अवकाश भरून जावा.

’चोरी चोरी’त राज कपूरला फक्‍त मन्ना डेचा आवाज आहे. तीन मस्त ड्यूएट्स आहेत. (आणि ’हिल्लोरी’!) सोलो मात्र नाही. सोलो आहे, ते फक्‍त ’श्री ४२०’ मध्ये (विषय राज कपूरपुरता आहे सध्या). ते ’दिलका हाल सुने दिलवाला’ बडबडगीतासारखं आहे. गाणंभर त्या ठेक्यावर मन्ना डेचा आवाज असा काही फिरलाय नाचलाय की पटतं, इथे हाच. मुकेशला नसतं जमलं हे. (’मेरा नाम जोकर’मध्ये मुकेशचं ’जाने कहाँ गये वो दिन’ जुन्या शंकर जयकिशनची आठवण करून देत असलं, तरी मन्ना डेचं ’ए भाय जरा देखके चलो’ हेसुद्धा नसतंच जमलं मुकेशला.) ’प्यार हुवा इकरार हुवा’ तर इतिहासात अमर झालेलं गाणं. त्यावरही मन्ना डेचा स्टँप. त्या अगोदर आवारा. त्यात लताच्या पातळ पातळ तीक्ष्ण तीक्ष्ण आवाजातल्या ’तेरे बिना आग ये चांदनी’ मध्ये अनेक वाद्यांच्या धुडगुसात वाजणारा मन्ना डेचा आवाज. मग ’सीमा’. ’तू प्यारका सागर है’ मधला तो संथ, जड, गंभीर, बलराज सहानीला शोभणारा आवाज. पुढे ’उजाला’. ’अब कहाँ जाये हम’. शंकर जयकिशनमध्ये मन्ना डे बहरलाय. लताबरोबर त्याची द्वंद्वगीतं तर गोळीबंद आहेतच; आणि ’मुड मुडके ना देख’चं काय? नादिराच्या तिखटपणाला फिट बसणारा आशाचा आवाज आणि तिच्याबरोबर तितक्याच आक्रमकपणे गाणारा मन्ना डे.

केवढं ऋण आहे त्याचं माझ्यावर! कसं नाही लिहायचं त्याच्यावर? तरी ’बसंत बहार’, बूट पॉलिश’ राहिले. ’देवदास’मधलं ’आन मिलो’ राहिलं. ’परिणीता’मधलं ’चली राधे रानी’ राहिलं. दत्तारामची मन्ना डे-लता द्वंद्वगीतं राहिली. ’चुंदरिया कटती जाये रे’ राहिलं. आणि सगळ्यात मोठं असं ’ऐ मेरी जोहरा जबीं’ (वक्‍त - रवी) कसं राहिलं? थोडा मध्यमवयाकडे झुकलेला बलराज सहानी कसा फिट्ट बसतो नाही, मन्ना डेच्या आवाजाला!


असो. रफीसारखा पुरुषी, तलतप्रमाणे उत्कट, मुकेशसारखा सत्यवचनी, किशोरसारखा उत्फुल्ल, वात्रट नसला तरी मन्ना डे काही एका लेखात आख्खा मावणारा गायक नव्हताच.

Sunday, September 15, 2013

एका देवाची उत्क्रांती

गणपती हा माझा आवडता देव होता. गणपती येण्याच्या आदल्या दिवशी मी, माझा भाऊ, माझा काका आणि एखाद्दुसरा मित्र, असे रात्री उशीरापर्यंत जागूनडेकोरेशनकरायचो. आमच्या दहा बाय दहाच्या खोलीतली पुष्कळ जागा त्या डेकोरेशनमध्ये जात असे. रमणकाकाला डेकोरेशनची भारी हौस होती. डेकोरेशन हा शब्द त्याचाच. तो ठरवायचा त्याप्रमाणे आम्ही करायचो. गणपतीच्या चेहर्‍यावर उजेड पडेल असा फोकस, वरून दोन्ही बाजूंनी येणार्‍या विविध आकाराच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मागे कधी फिरतं चक्र, कधी आरसा, असा सारा थाट असायचा. चाळीच्या दुसर्‍या माळ्यावर आमच्याच गणपतीचं डेकोरेशन सर्वात भारी असायचं. अर्थात, खालच्या कर्णिकांचं आमच्यापेक्षाही भारी असायचं. पण त्यांचा गणपतीच मोठा, दहा दिवसांचा असायचा. आमचा गौरीबरोबर जाणारा. श्रावण महिन्यात केव्हातरी रणदिव्यांचं पोस्टकार्ड यायचं. जोडकार्ड. दादा उत्तर पाठवायचे. गणपती आणायला दादांबरोबर अनेकदा मीच जात असे. सोबत प्रधानांकडल्या विश्राम, धोंडू, गोविंदा, लक्ष्मण यांपैकी एक गडी. हे मजल्यावर बर्‍याच घरी काम करत असले, तरी ते प्रधानांचे गडी यात त्यांच्यासकट कोणाला शंका नव्हती.





गणेशचतुर्थीला दादांबरोबर पलिकडल्या दादरच्या खांडके बिल्डिंगमधल्या रणदिव्यांच्या दुकानात गेलो, की तिथे नाक्यापासूनच लोकांची झुंबड असायची. कोपर्‍यावर ताशेवाल्यांचे दोन चार गट दणादण टिपर्‍या हाणत स्वतःची जाहिरात करत उभे असायचे. त्यांच्यामुळे कानात तोंड घालून बोललं तरी ऐकू जाणार नाही, इतका आवाज आसमंतात भरलेला असायचा. आम्ही कधी ताशेवाले घेतले नाहीत. हातातल्या झांजा जोरजोरात वाजवत आणि तोंडाने ’बाप्पा मोरया’च्या घोषणा देत आम्ही घरी यायचो. आमच्या घरी लहानमोठ्या झांजांचे तीनेक जोड होते. आणि एक जोडी टाळांची. टाळांचा ठणठणाट थोरच पण त्या खोलीत एकाऐवजी टाळांचे दोन जोड वाजू लागले की कान किटत. आरतीतले शब्द ऐकू येईनासे होत. ते मला आवडत नसे. पण टाळ-झांजांचा गजर, आरत्यांचा आरडाओरडा, खांडके बिल्डिंगपाशी असणारा कानाचे पडदे फाटतील असा आवाज, हे सारं मला प्रिय होतं. फारच.

गणपती दिसायला नितांत सुंदर. प्रसन्न. चाळीत, आसपास, नातेवाइकांकडे, असा मी अनेक गणपती पहात होतो. नुसता नमस्कार करून प्रसाद घेत नव्हतो, मूर्तीचं निरीक्षण करत होतो. मला आमच्या घरची मूर्तीच सर्वात सुंदर वाटत असे. दुपारी कोणी आलेलं नसलं, की मी पलंगावर बसून गणपतीकडे पहात रहायचो. गणपतीचं रूप मला इतकं प्रिय होतं, की पुढे इंटरसायन्सला असताना एका मित्राच्या पाखंडी बडबडीमुळे विचारात पडून जेव्हा देवबीव आपल्याच मनाचे खेळ आहेत, हा साक्षात्कार मला झाला; तेव्हा स्वतःच्या नास्तिकतेची ’सीटी’ (confirmatory test. ही केमिस्ट्री प्रॅक्टिकलमध्ये असायची.) घेणं मला गरजेचं झालं आणि ’गणपतीची मूर्ती बघूनही आपल्या मनात श्रद्धा जागली नाही, तर आपला देवावरचा विश्वास नक्की उडाला’ असं मी ठरवलं. त्यानंतरही मी डेकोरेशन करण्यात काकाला मदत करत राहिलो, गणपती मला सुंदर दिसत राहिला, आवडतही राहिला; पण या सोंडवाल्या ढेरपोट्या देवाच्या आकर्षणाचं हे काय रहस्य आहे, असं कुतूहलही उत्पन्न झालं.

त्यानंतर आजतागायत मला कधीही देवाची गरज भासलेली नाही. कोणत्याही प्रकारच्या कठीण प्रसंगी देवाचा धावा करावासा वाटलेला नाही. कुठल्याही कूट प्रश्नासमोर जाताना किंवा अनवट उत्तराचा थांग लावताना कधीही देवाचा भोज्या करावासा वाटलेला नाही. कुणाला गाणं येतं, कुणी डावरा असतो, तसा मी पूर्ण नास्तिक आहे.

पण याने सांस्कृतिक अडचणी सुटत नाहीत. आता मला देवाच्या नावाने दुसर्‍यांना त्रास देणे अजिबात चूक, गुन्हेगारी कृत्य वाटतं. पण मग लहानपणी मलाच गल्लीत हनुमान जयंतीच्या वा नवरात्राच्या निमित्ताने लागणारा लाउडस्पीकर हवासा होता त्याचं काय, असा प्रश्न उभा होतो. मग सुचतं, ’पण मी वाढलो की नंतर. वय वाढल्यावर माणसाची समज वाढायला हवी की नको?’ परवा मामाकडे गेलो असताना शेजारच्या गुजरात्यांनी प्रथमच गणपती आणला. ताशांचा प्रचंड गजर करत. रीतभात विचारावी तसं त्या बाईने मामीला काळजीने विचारलं, आता रात्रभर हे ताशे वाजवत ठेवायचे ना? नशीब विचारलं. ठेवले असते वाजवत, तर? पलिकडल्या सुधारित झोपडपट्टीवाल्यांनी पहाटे चार ते पाच ’खबरदार कुणी झोपेल तर’ असा पण केल्यासारखी गाणी वाजवली, तेव्हा कुठे विचारलं?

देव अमान्य झाल्यावर फक्‍त वर वर सोपं होतं. आता, मामाच्या शेजारच्या सुधारित झोपडीवाल्यांचीच गोष्ट. "जय देवी जय देवी महिषासुरमथिनी हो धैषासुरमथिनी ..." हा धैषासुर कोण? पुढे. "आरती ओवाळू भारती ओवाळू .." ही भारती कोण? "जय मंगलमूर्ती"च्या पुढे "श्री मंगलमूर्ती" किंवा "जय श्री शंकरा"च्या पुढे "स्वामी शंकरा" कुठल्या आरती संग्रहात आहे? एकदा श्रद्धा सोडली, की बुद्धीतून उत्तर शोधणं आलंच. सुचतं असं की आपली तर थोर मौखिक संस्कृती. लिहिलेलं सोडून मुखाचा शब्द अनुसरणारी. खरं तर ’शब्द’ नाहीच; ध्वनी अनुसरणारी. भटजी म्हणतो, करतो, सांगतो, त्याला ’होय महाराजा’ म्हणत जाणारी. आणि हा अडाणचोटपणा ही झोपडीवाल्यांची मक्‍तेदारी मुळीच नाही.
या करवादण्यातून प्रश्न सुटतो का? तर, मुळीच नाही. लोकांनी आवाज करू नये, आरतीच्या नावाखाली अर्थशून्य बकवास करू नये, यासाठी काय करावं? त्यांचं लोकशिक्षण करावं, हे मला मुळीच मंजूर नाही. एक तर हे सगळं श्रद्धेत येतं. त्यात कसलं आलंय शिक्षण? नास्तिकाला विचाराल, तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक शून्य. दोन्ही विवेकाला नाकारणार्‍या. आपली ती श्रद्धा, दुसर्‍याची अंधश्रद्धा. - आणि यात लबाडी नाही की सिनिसिझम नाही. हे खरंच आहे.

सुचणं नंबर दोन: श्रद्धा तेवढी खरी, कृती दुय्यम. एक जण कचर्‍यापासून काहीही हातून सोडताना ’गंगार्पणमस्तु’ म्हणत असे, तर तो मेल्यावर स्वर्गाला गेला, अशी एक कहाणी आहे. का गेला? तर तो काय देतो, यापेक्षा त्याची भावना मोठी. ती शंभर टक्के निर्मळ असल्याने त्याच्या कृतीला पुण्याचं मोल आलं आणि त्याला स्वर्गप्राप्‍ती झाली. मग तशाच निर्मळ भावनेने म्हटलेल्या चुकीच्या आरत्या फळ देऊन जाणारच.

यावर मला सुचणारं प्रत्युत्तर वाकड्यात जाणारं आहे. कोणी तरी लिहिलेल्या आरत्या उत्क्रांत होत शब्दापलिकडे गेल्या, ’श्रद्धामय’ झाल्या; असं जर असेल, तर गणपती हा विद्येचा देव उत्क्रांत होत आवाजाचा, सार्वजनिक वर्गणीचा, चाळीस आणि पन्नास फुटी धूड मुर्त्यांचा, डान्सिंग लाइट्सच्या बटबटीत मखराचा आणि हजारो रुपयांचा क्षणात धूर आणि कचरा करून टाकणार्‍या फटाक्यांचा मठ्ठ देव झालेला आहे. त्याच्याशी मला काहीही सांस्कृतिक देणंघेणं नाही. गणपतीवरून असलेले श्लील अश्लील विनोद मी इथे सांगणार नाही; पण मांडव उभारण्यासाठी रस्त्याला भोकं पाडायला प्रवृत्त करणार्‍या, बहुजनांच्या भक्‍तिभावनेला अतिआक्रमक बनवून काही जणांच्या मानसिक शांततेला नष्ट करायला कारणीभूत होणार्‍या, एरवी कामाच्या धावपळीत असलेल्या या शहराच्या वाहतुकीला पांगळं बनवणार्‍या या तथाकथित देवाला मनात घाण घाण शिव्या घालण्यापासून मला कोणी अडवलंय?

पण तरीही प्रश्न सुटला असं झालं का? जो मुळातच नाही, त्या देवाला घातलेल्या शिव्या नुसत्या माझ्या मनाच्या अंतराळात भटकणार. माझ्या त्राग्याचं प्रतीक, एवढं सोडून त्यांना काहीच अर्थ प्राप्‍त होणार नाही. कधी वाटतं, हे टिळकांचं पाप. ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्या घरीच असायला हवा. गावोगावी जत्रा आणि उरूस भरतात, ते परंपरेने. ती बरीवाईट परंपरा किमान धार्मिक नाही. साथ आल्यासारखे जे गणपती वाढत चाललेत; तसं उरूस, जत्रांचं होत नाही. समूहाचं रूपांतर जमावात करून त्यांच्यात धर्मवेडाचा उन्माद ठासून भरण्यात उरूस, जत्रा कमी पडतात.


काय माहीत? कदाचित गणपतीच्या कटकटींनी गांजलेल्या माझ्या मनाच्या या वाह्यात वावड्या असतील. पण कधी हे गणपती विसर्जित होतात आणि माझ्या शहराचं चलनवलन नॉर्मलपदी परततं, असं मला होत आहे.

Wednesday, July 17, 2013

पूर्व किनार्‍यावरचा ओदिशा



ओदिशा. मराठीत अजून ओरिसा. ही ब्रिटिशांची देणगी. मीरत, पूना, बॉम्बेप्रमाणे. पण ओरिसाचं ओदिशा करायला या लोकांनी खूप वेळ लावला. इथल्या बहुतेक गाड्यांचे नंबर OR ने सुरू होतात. OD ने सुरू होणार्‍या गाड्या कमी दिसतात.

इथे एकूण गाड्याच कमी दिसतात. दोनचाक्या जास्त. कोणार्कहून चिलिका लेकला जाताना जी काही वाहनं दिसली – आडवी आली; त्यात दोनचाक्यांची संख्या सर्वात जास्त. मग तीन चाकी (ज्यांना इथेही ऑटोरिक्षा म्हणतात, उत्तरेप्रमाणे नुसतं आटो, आटो म्हणत नाहीत; जरी इथे फुटकळ सायकलरिक्षा दिसत असल्या तरी) आणि मग चार चाकी. त्या चार चाकी वाहनांच्यात बहुतेक सगळ्या पिवळ्या नंबर प्लेटच्या प्रायव्हेट टॅक्स्या. खाजगी तुरळक. निष्कर्ष: ओदिशात गाडीधारी सुखवस्तूंची संख्या कमी आहे. इथे गरिबी आहे.

या निष्कर्षाला एका बाजूने गावागावात दिसणारे खांद्यावर पंचा वा उपरणं टाकून उघडे फिरणारे पुरुष जरी दुजोरा देत असले, तरी संपूर्ण ओदिशा मुक्कामात मोजून एकही बैलगाडी दिसलेली नाही, त्याचं काय?

असो, असो. हे मी उड्या मारत चाललो. सुरुवातीपासून सुरू करू.

हा आपला अगाध, अफाट भारत देश, इथे जन्म घेणे ही साजरी करण्यासारखी गोष्ट. कारण हिमाच्छादित शिखरं, हत्ती लपेल इतकं उंच गवत, वाळवंट, समुद्रातून उगवणारा आणि समुद्रात मावळणारा सूर्य, चहा-कॉफीचे मळे, पर्जन्यवृक्षांची सदाहरित जंगलं, पलिकडला तीर क्षितिजापार असणार्‍या नद्या यातलं काहीही याचि देही याचि डोळां बघण्यासाठी भारतीय नागरिकाला व्हिसा लागत नाही! हे असं मनात निनादत असताना आपण अजून समुद्रातून उगवणारा सूर्य बघितलेला नाही, हे डाचत होतं. एकदा चेन्नईला गेलो पण मरीना बीचवर पोचेपर्यंत अंधार पडला आणि रात्रीची गाडी पकडायची होती. ओदिशाला जाताना हे मनात जास्त होतं. जरी जगन्नाथाची यात्रा हे निमित्त करून गेलो तरी. मी जगन्नाथाची यात्रा बघायला पुरीला जाणार आहे, हे कळल्यावर बहुतेकांनी मला नाउमेद करायलाच सुरुवात केली.

“फार गर्दी असते.”

हो ना. दहा लाख लोक जमतात आणि रथ ओढतात, हेच तर बघण्यासारखं आहे!

“उन्हाळा असतो, उकाडतं, घाम येतो.”

याचं मुंबईकराला काय?

“लांब आहे. ओरिसा मागास आहे, तिथे सोयी नसतील.”

हे काय भलतंच? गडचिरोलीसुद्धा ’मागास’ आहे. दोन वर्षं सुखात घालवली मी तिथे.

तर निघालो. सोबत एक भाऊ. जाताना अर्थातच ट्रेनने. कारण देश बघत बघत जायचं. जमीन बदलते, भाषा बदलते, लोकांचे पेहेराव, 
घरांची रचना, डोंगरांचे आकार बदलतात. मस्त वाटतं. किती गोष्टी आपण गृहीत धरून चालत असतो, हे कळत जातं. जग किती मोठं आहे, आपल्यापुरता विचार किती छोटा आहे, हे उमजत जातं.

हे जर प्रवासवर्णन असेल, तर वर्ण्य घटनांची सुरुवात मुंबई सोडण्याअगोदर, लोटिटला झाली. रात्री सव्वाबाराची गाडी. इकडच्या तिकडच्या तारखेचा घोळ न करता सर्व सामानासहित, पावसात न भिजता आम्ही सव्वा अकराच्या सुमारास कुर्ला टर्मिनस ऊर्फ लोटिटला हजर झालो. इ-तिकीट काढल्यावर रेल्वे एसएमएस पाठवते. तिकीट वेटिंग किंवा आरेसी असेल, तर चार्ट बनल्यावर एसेमेसने बोगी नं, सीट नं कळवते; पण गाडी वेळेवर सुटणार की नाही, हे कळवत नाही. आमची गाडी ’लेट’ नव्हती; ’रिशेड्यूल’ झाली होती. सव्वाबाराच्या ऐवजी पहाटे चारला सुटणार होती. म्हणजे, झोपेचं पार खोबरं व्हायचं होतं. यात मनाची समजूत घालणारा एक मुद्दा होता: समजा, कळलं असतं की गाडी चार तास उशीराने सुटणार आहे. तर काय तीन बीन वाजता निघणार होतो की काय? आणखी फार तर तासभर उशीर केला असता.

पण ही गाडी मस्त आहे. सुटल्यावर पहिला हॉल्ट मनमाड! नाशिकसुद्धा नाही. मग भुसावळ, मग बहुधा बडनेरा आणि चौथं स्टेशन नागपूर. इथपर्यंत मी अनेकदा आलेलो आहे. पुढे माझ्यासाठी ’अबुझ माड’ – अज्ञात प्रदेश! तर जाणिवेचं क्षेत्र विस्तारणारी पहिली थप्पड इथेच बसली. अहमदाबाद, बडोद्यापासून बहुतेक सर्व मोठ्या स्टेशनांच्या अगोदर एक ’पायरी’वजा स्टेशन येतं, हे लक्षात आलेलं होतं. त्यामुळे नागपूरअगोदर अजनी येतं, हे पटलं होतं. पण नागपूरनंतर इतवारी येतं हे माहीत नव्हतं! मग सुचलं, नागपूर’नंतर’ हा काय प्रकार? नागपूरकडे प्रवास मुंबईहून, नागपूरच्या पश्चिमेकडून सुरू व्हावा, असा निसर्गनियम आहे की काय? कोलकात्याहून निघाल्यास नागपूरच्या अगोदरचं छोटं स्टेशन इतवारी ठरलं असतं, नाही का! कसे मुंबईकेंद्रित विचार करत होतो आपण! अमेरिकनांना अमेरिकेबाहेरचं जग माहीत नसतं, याला का नावं ठेवायची मग?

लवकरच महाराष्ट्र सोडून आम्ही छत्तीसगडात प्रवेश केला.  रायपूर आलं. एसीतून बाहेर येऊन प्लॅटफॉर्मवर उतरलो. तर एक वास आला. वास अमुक किंवा तमुक वस्तूचा, पदार्थाचा नव्हता. वास हवेचा होता. आसमंतात भरून राहिलेला होता. गाईच्या शेणामुतासारखा होता. पण  ओंगळ नव्हता. मी मुंबईत खूप फिरलो आहे. कुर्ल्याहून चालत जोगेश्वरीला गेलो आहे. मला ओंगळ  वासाचं काय? कानपुरात रस्ता चुकून एका अशा ठिकाणी गेलो, की मी मधून चालत होतो आणि दोन्ही बाजूला नुकतीच सोललेली, अजून रक्‍ताचे लाल ओघळ न सुकलेली कातडी टांगलेली होती. कानपूरची गंगा तर अत्यंत घाण होती. तिथे  माझ्या मनात विचार आला होता, कानपूरपेक्षा वाईट वासाचं, गलिच्छ ठिकाण कुठलं असेल? आणि उत्तरही लगेच सापडलं: मुंबई. तीसेक वर्षांपूर्वी मी फतेगडहून मुंबईला घरी येताना माझी गाडी पहाटे पाच साडेपाचला दादरला पोचत असे. तेव्हा सकाळच्या मुंबईची ओळख रेल्वेलाइनशेजारी प्रातर्विधीला बसलेले लोक, अशी होती. माझ्या परिचयाचा एक जण या एका कारणासाठी गोव्याहून मुंबईला अजूनही बसने येतो. सकाळी मुंबईत शिरताना नाकात शिरणारा तो भयानक वास नको म्हणून. रायपूरच्या वासाला नाक मुरडणारा मी कोण?

एक कळलं नाही; IRCTC वर तिकिटं मिळाली, ती एक आरेसी आणि एक वेटिंग, अशी होती. आमच्या सहा बर्थच्या भागात रायपूर गेलं तरी आम्ही दोघेच! अपरात्री केव्हा तरी बाकीच्या चार बर्थवर चौघे येऊन झोपले. सकाळी मला जाग आली, तर बाकी सगळे डाराडूर. मग मी मस्तपैकी दाढीबिढी केली आणि सहा वाजता चहा प्यायला. बरोबर थोडं काम नेलं होतं, ते टायपिंग करत बसलो. लेट सुटलेली गाडी वेळेवर चाललेल्या स्थानिक गाड्यांना रस्ता देत रेंगाळत चालली होती. चार तासांपैकी दीडेक तास मेकअप केला होता, तो गमावून आणखी थोडी लेट झाली. भुवनेश्वर येईपर्यंत माझं काम संपलं आणि ते लगेच मेलही करून टाकलं. माझे वडील हातात ट्रान्झिस्टर धरून उलटा सुलटा करताना मला आठवतात. अचंबा व्यक्‍त करत मला म्हणाले, कुठे काही जोडलेलं नाही आणि लांब कुठे वाजत असलेली गाणी ऐकवतो, बातम्या देतो! त्यांना ट्रान्झिस्टरचं नवल, मला डेटा कार्डचं. मला तेव्हा ट्रान्झिस्टर सामान्य वाटत होता, आजची तरुण पिढी मलाही हसत असेल.


रेल्वे प्रवास संपला.

Sunday, June 2, 2013

एकुलती एक


’एकुलती एक’ हा चित्रपट पाहिला.

तो आवडला की नाही, हे इथे सांगायचं नाही, की त्याचं परीक्षण करायचं नाही. ’एकुलती एक’ मधल्या काही गोष्टी खास वाटल्या, त्या सांगायच्या आहेत.

हा चित्रपट सचिन पिळगावकरने निर्माण केला आहे. चित्रपट एक बाप आणि त्याची मुलगी, यांच्या भोवती फिरतो. बापाची भूमिका सचिनने, तर मुलीची भूमिका सचिनची मुलगी श्रीया हिने केली आहे. श्रीयाचा हा पहिलाच चित्रपट म्हटल्यावर बापाने मुलीला लाँच करण्यासाठी चित्रपट काढला, असं म्हणणं वावगं ठरू नये. यात काही विशेष नसून हा चित्रपटसृष्टीचा नियमच आहे.

या चित्रपटाचा वेगळेपणा असा, की ही मुलगी ’मी सुंदर नाही,’ असं म्हणते! गंमतीत नाही, तर गंभीरपणे, मनापासून म्हणते! असं कधी झालेलंच नाही. प्रत्येक पुत्र वा पुत्री सर्वगुणसंपन्न, अत्यंत सुंदर, सर्वात लोकप्रिय असाच असतो वा अशीच असते. चित्रपटातली सर्व पात्रं त्याच्या वा तिच्या नुसत्या दर्शनाने घायाळ होत असतात. किंवा भारावून जात असतात. किंवा मंत्रमुग्ध होत असतात. आणि ही मुलगी म्हणते, मी सुंदर नाही! हे कसं काय?

गंमत अशी, की ती सुंदर असणे – नसणे हा चित्रपटाचा मुद्दाच नाही. त्यामुळे ती सुंदर नसून काहीच बिघडत नाही. कथानकाला कसलं वळण मिळत नाही की कोणाच्या वर्तनात ती सुंदर नसण्याने फरक पडत नाही.

पण म्हणूनच या विधानामुळे ती मुलगी - आणि हा चित्रपट - मॅचुअर वाटतात ना! जो परिणाम साधण्यासाठी त्याला वा तिला कुठून कुठून ग्लॅमर चिकटवण्याचा, बहुतेकदा आचरट म्हणावा असा प्रयत्न होत असतो, तसल्या प्रकारचा परिणाम असा सहज घडून येतो. माझ्यासारखा प्रेक्षक आपोआप तिच्या - आणि चित्रपटाच्या - बाजूचा होऊन जातो! (जब we मेट’ मध्ये करीना चित्रपटात शिरते, तीच ’इतनीभी सुंदर नही हूँ मैं’ असं म्हणत. तिथेच चित्रपटाने माझा गळा पकडला!)

आणि ही मुलगी, जिच्या बापाने तिला लाँच करण्यासाठी तिच्याभोवती फिरणारा चित्रपट बनवला, ती इतकी सहज वावरते, साधी वाटते; की ’ही नाचतेय, अभिनय करून दाखवतेय, तर्‍हेतर्‍हेचे कपडे घालून मिरवतेय,’ असं मनात येतच नाही. श्रीयाचा वावर पूर्ण सराईत आहे. आणि अजिबात आगाऊ नाही. (आता हा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी तिचा पुढचा चित्रपट बघणं भाग आहे.)

पुढे. चित्रपटाला सांगण्यासारखं काही कथानकच नाही. मुख्य पात्रांची ओळख करून दिल्यानंतर त्यांच्यात काही गैरसमज, संकट, संघर्ष, स्पर्धा, असलं काहीही होत नाही. चित्रपटाला व्हिलन नाही की व्हँप नाही. आणि तरीही तो रटाळ होत नाही! पात्रांच्यातल्या तणावाने सीन उचलून धरला आहे, असं मोजून एकदा होतं. इतर वेळी तसं नसूनदेखील बोअर होत नाही.

संवादांची भाषा एकदम आजची आहे. आणि सहज आहे. चांगल्या म्हणवलेल्या मराठी चित्रपटांचं एडिटिंग मार खातं. त्यामुळे चित्रपटाच्या प्रवाहात गचके बसत रहातात. तसं इथे होत नाही. एडिटिंग नावाचा प्रकार असतो, हे जाणवूही नये, इतकं ते शांत आणि सफाईदार आहे.

आवर्जून सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट. अशोक सराफचं काम उत्तम आहे, यात काय सांगायचं? सांगायचंय ते सुप्रियाबद्दल. तिला फार थोडं फूटेज आहे. चित्रपटात तिची एंट्रीसुद्धा उशीरा आहे. पण तिने असं काही बेअरिंग पकडलंय, की तिचं पात्र चित्रपटातलं महत्त्वाचं पात्र आहे, असं प्रेक्षकाच्या मनावर ठसतं. इतक्या थोडक्या स्पेसमध्ये असा परिणाम साधणे, हे अभिनयकौशल्य थोरच होय.

पुरे. आणखी लिहीत गेलो, तर परीक्षण होईल. तेवढा काही हा चित्रपट लक्षणीय नाही.