Sunday, March 22, 2015

शाहीर साबळे आणि माझा पिंड

शाहीर साबळे यांच्याविषयी दोन शब्द लिहिणं भाग आहे.
मला कान तसा उशीरा आला, मी सतरा वर्षांचा होऊन गेलो, तेव्हा. कान आला आणि मी लतामध्ये आख्खाच्या आख्खा बुडून गेलो. रोग म्हणावं इतका. त्यातून बाहेर यायला वीसेक वर्षं लागली असतील. जास्तच. बाहेर आलो तेव्हा मला स्वतःच्या आवडीनिवडींकडे, अभिरुचीकडे चौकसपणे निरखून बघता येऊ लागलं. मला गजल आणि गजले आवडत नाहीत. कानाला सहनच होत नाहीत. मला वाटायचं, लताचा अपवादात्मक सुरेलपणा माझ्या कानात जाऊन बसला आहे आणि म्हणून गजल्यांचं कणसुरं गायन मला  खटकतं. नीट मोकळेपणाने गातच नाहीत!  अगदी एखाद्‌दुसरा अपवाद सोडला, तर मला गजल ऐकताना ताबडतोब कंटाळा येतो. अर्थात, तलत नाही. कारण तलत कणसुरा गात नाही.

सतराव्या वर्षानंतर आपण बर्‍यापैकी ’जागे’ झालेलो असतो. बुद्धी काम करू लागलेली असते, भावनेचे लगाम सांभाळू लागलेली असते. ज्याला पिंड असं म्हणतात, तो याअगोदरच बनतो आणि त्याचा आणि बुद्धीचा संबंध नसतो आणि तो तयार होण्यात बुद्धी फारशी भाग घेत नाही. गजल आवडणे, हा माझा जर पिंडच नसेल, तर ही नावड नक्कीच सतराव्या वर्षाअगोदर विकसित झाली असणार. (लता आवडण्याचा संबंधसुद्धा बुद्धीशी लावता येणारच. पण लता मला वामनाच्या तीनही पावलांमिळून इतकी मोठी वाटते, कसला पिंड आणि कसली बुद्धी!) संगीत असं काहीतरी जगात आहे आणि त्याचा आपला फार निकटचा संबंध आहे, हे कळणं म्हणजे कान आल्याची जाणीव. हे जरी सतराव्या वर्षानंतर झालं असलं, तरी त्याअगोदर मला गाणी ऐकू येत होती. ऐकू येत होती आणि मेंदूत शिरून संस्कारसुद्धा करत होती. वेगळे शब्द वापरायचे, तर पिंड घडवत होती.

त्यामुळे मला गजले - म्हणजे गजल गाणारे - न आवडण्याचं कारण लता हे आहे, असं आता मी म्हणत नाही. ते ’श्रेय’ मी शाहीर साबळे यांना देतो. कारण मी शाळकरी वयापासून शाहिरांची गाणी ऐकत आलो आहे. काय त्यांचा दाणेदार आवाज. तेजस्वी. गोळीबंद. कुठल्या सुरात कंगोरा, खडबडीतपणा नाही. बद्दू मऊपणा नाही. माझं बालपण नायगावात, कामगारवस्तीत गेलं. सणासुदीला ठणठणीत आवाजात लाउडस्पीकरवर गाणी वाजवणे, हा तिथला शिरस्ता. तेव्हा घराघरात रेडिओ नव्हता. कानात हेडफोन (इयरफोन आणि हेडफोन यांच्यात फरक काय? की एकच ते? एक छोटा आणि दुसरा मोठा?) घालून भोवतालाला (यात ’ताल’ का आहे?) वजा करून टाकण्याची तेव्हा सोय नव्हती, रीत असण्याची तर गोष्टच नाही. जे वाजतंय ते ऐकावं लागायचं. माझी आई काम करताना सतत मोठ्याने गायची. तिच्या गाण्यात अमरशेख यायचा, कारण अमरशेख तिच्या तारुण्याचा साक्षीदार होता. अमरशेखची गाणी कधी मधी मुंबई ब वर लागायची कामगार सभेत, वगैरे. (मुंबई ब हे रेडिओ स्टेशन आहे, कामगार सभा हा त्या रेडिओ स्टेशनवरचा एक गाण्यांचा कार्यक्रम. च्यायला, हे आता सांगायला पाहिजे, नाही का!) अमरशेखच्या आवाजातला पहाडीपणा मला थरारून टाकायचा. पण त्याचमुळे मला शाहीर साबळ्यांचा आवाज पहाडी वाटला नाही. टणटणीत गोळीबंद वाटला. एकेक सूर परिपूर्ण!

कुठली गाणी? अर्थात लोकगीतं. ’सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा हा डोंगर, अडवा हा डोंगरह तयाला माजा नमस्कार’ हे गाणं मी प्रथम ऐकलं, तेव्हा वाच्यार्थ आणि लक्षणार्थ हा फरक मला माहीत नव्हता. मला ही कल्पना फॅसिनेटिंग वाटली. डोंगर आडवा येतो आणि काय होतं? तर ’अगगगगग विंचू चावला!’ केवढा? तुझ्याएवढा! मजाच. हे गाणं कधीही सुरू झालं की त्याची उंच सुरुवात पुरी होऊन ते ’अगगगगग’ वर येईपर्यंत मी लक्ष देऊन ऐकायचो. काय तो जोश, काय सुस्पष्ट उच्चार. आणि काय लोकगीताचा लहेजा!

’या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो’ हे बहुधा मी पाठ केलेलं - किंवा मला पाठ झालेलं - पहिलं गाणं असावं. ते मी कधी विसरलोच नाही. आत्ता दोन चार वर्षांपूर्वी कामवालीला म्हणून दाखवलं, तर ती खूष. "आमचं गाणं हे. तुम्हाला कसं ठाऊक?" तिने कौतुकाने विचारलं. अत्यंत चित्रमय गाणं. शब्दात असलेलं सगळं दिसतं. शेवटी ’उडविले दारूगोले!!!’ कसं खटक्यात वर चढतं! त्या लहान वयातही मला जाणवलं होतं, हे गाणं असंच, एक्साइट होऊन संपणार. नाहीतर नुसतं विरून गेलं असतं न संपता.

पुढे केव्हातरी ’नवरा दांड्यावरून म्हणजे कुठून येतो आणि तिथून का येतो,’ या विषयावर एक गंभीर निबंध वाचनात आलेला आठवतो.

त्या काळात सेवंटीएट आरपीएमच्या रेकॉर्ड्स असत. या गाण्याच्या मागे ’रुणझुण वाजंत्री’ होतं. ही दोन गाणी एकामागोमाग एक वाजायची. ’या गो दांड्यावरना’ इतकं दुसरं फटाकडं वाटलं नाही; पण नवरा नवरीपाशी येईपर्यंतचं वर्णन खास लोकगीतांच्या ढंगात आहे. शिवाय या दोन गाण्यातला कोरस. त्या वयात मला ’कोरस असतो आपला गाण्याला दागदागिने चढवायला’ असं सुचलं नाही. मला मनापासून त्यात आशय ऐकू यायचा. शाहिरांच्या आवाजाला तो किरटा बायकी कोरस वेगळाच काँट्रास्ट द्यायचा.

किती गाणी. पह्यलं नमन, आरे क्रिश्ना आरे कान्हा, आई माझी कोनाला पावली, .... या गाण्यांनी माझा पिंड घडवला! कसा मी ऐकणार गजल! मस्त तापलेल्या ढोलकीवर टण्ण बोल वाजावा, तसा शाहीर साबळ्यांचा आवाज. शिवाय मोकळा ढाकळा. कृत्रिमतेचा लवलेश नाही. हृदय दुःखाने भरून आल्याचा आव नाही. आणि कितीही वेगात जोशात गायलं तरी शब्द आणि शब्दांमधला आशय पोचणारच. ’काट्याच्या अणीवर वसले तीन गाव’ हे गाणं मला वेडा करून गेलं. हे लिहिणारे ज्ञानेश्वर? बरा माणूस असणार! ’आठशे खिडक्या नऊशे दारं’ हे गाणं जगात सगळ्यांना माहीत आहेच, असं मानून मी एकदा आमच्या ’अबब हत्ती’ या लहान मुलांच्या मासिकात अंककोड्यात सुगावा म्हणून वापरलं होतं. अनेकांना ते माहीत नाही, हे कळून आश्चर्य वाटलं होतं. शाहीर साबळे हा महाराष्ट्राचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे, हे काय सिद्ध करण्याचं विधान आहे? ते तर स्वयंसिद्ध आहे! शाहीर साबळे यांना महाराष्ट्राच्या अमुक एका भागापुरतं मर्यादितदेखील करता येत नाही. ते सगळीकडचे!

शाहिरांनी माझ्यावर मोठेच उपकार केले. आई गाणी म्हणायची आणि रेडिओवर ’आपली आवड’ लावायची. भावगीतांचा भरीव संस्कार त्यामुळे माझ्या कानांवर झालेला आहे. ती बहुतेक आवडतातच; पण गीतातला भाव म्हणजे तोच भावगीतांमधला; काव्य म्हणजे तेच, कोमटी, मचूळ चवीच्या भावना व्यक्‍त करणारं; या मानसिकतेतून मी बुद्धीच्या सहाय्याने मुक्‍त झालोच असतो; पण शाहीर साबळ्यांचे उपकार की तो झगडा मला करावा लागला नाही. एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर असे संतकवी आणि त्यांच्या आणि इतरांच्या अस्सल मराठी मातीतल्या रचना शाहीर साबळे यांच्यामुळे माझ्या आत जाऊन बसल्या. ’महाराष्ट्राची लोकधारा’ हे त्यांचं लोकोत्तर काम आहे.

इतकं लिहिलं तरी त्यांची लोकनाट्यं राहिलीच. ’यमराज्यात एक रात्र’ आलं तेव्हा मी फार लहान होतो. ’आंधळं दळतंय’ पाहिलेलं आणि आवडलेलं आठवतंय. मुंबईतल्या मराठी माणसाची परवड त्यांनी त्यात मांडली होती. शाहिरांसारखा इथल्या मातीतला माणूस इतर मराठी नागर गायनसंस्कृतीपासून लांब आणि शिवसेनेच्या जवळ जाणं अटळ होतं. पण शिवसेनेचा प्रचारक होऊन जाण्याइतके ते लहानही नव्हते. त्यामुळे यथावकाश बाळासाहेबांपासून ते लांबही गेलेच. त्यांची कला काही राजकारणातून जन्मली नव्हती की राजकारणासाठी घडलेली नव्हती.

असो. ते गेले आणि त्यांचं ‌ऋण व्यक्‍त करायचं राहून गेलं आहे, हे आठवलं.

Saturday, March 21, 2015

हिंदु नववर्ष नामक विनोद

हॅपी गुढीपाडवा!

पण हॅपी न्यू इयर नाही.

तीनेक वर्षांपूर्वी माझ्या परिचयाच्या एका तरुण माणसाने गुढीपाडव्याला शुभेच्छा देणारा संदेश पाठवला: हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा! तोपर्यंत त्याच्याशी माझा जो संबंध आला होता, त्यावरून माझं त्याच्याबद्दल बरं मत झालं होतं. म्हणून मी त्याला थोडं समजावलं, की हिंदु नववर्ष असं काही नसतं, गुढीपाडवा हा मराठी सण आहे, बाहेर फारसा साजरा होत नाही, वगैरे. पण त्याला ते किती पटलं आणि पुढच्या पाडव्याला मला नववर्षाच्या शुभेच्छा नाही दिल्या, तरी इतरांना दिल्या की नाहीत, याची मला शंका आहे. हे खूळ दर वर्षी वाढतच चाललं आहे. सनातन संस्थावाले अर्धवट अकलेचे लोक तशी पोस्टरं लावतात, हे ठीक; पण त्याची लागण इतरांच्यात का होत चालली आहे? हिंदु नववर्ष म्हणे!

एक तर शिवसेनेसकट सर्व मराठी माणसांना हे मान्य आहे की मराठी भाषा हिंदीची, मराठी संस्कृती उत्तर भारतीय संस्कृतीची आणि महाराष्ट्र उत्तर भारताची - दिल्लीची म्हणूया हवं तर - बटीक आहे. उदाहरणार्थ, मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक माँसाहेब म्हणतात. उच्चार मासाहेब, असा करतात. मराठीत ’मॉ’चा उच्चार मॉल, मॉड असा होतो. त्यात त्या अर्धचंद्रात अनुस्वार आला, तर माँजिनी, माँटेक, यातला होतो. म्हणजे तो अर्धचंद्र आणि त्यावरची बिंदी अर्थातच त्यांनी हिंदीवरून उचलली आहे. साक्षात बाळासाहेबांच्या पत्नीच्या उपाधीत जर सरसकटपणे मराठीपेक्षा हिंदी रीत मानली जात असेल, तर त्यातून या दोन भाषांमधलं नातं स्पष्ट होतंच की.

मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे, की ज्याला आपण निर्विवादपणे श्रेष्ठ मानतो, आपल्यावरचं स्थान देतो, त्या उत्तर भारतीय संस्कृतीत ’हिंदु’ नववर्ष सुरू होऊन पंधरवडा लोटला देखील. तिथे पौर्णिमेला महिना संपतो. होळीलाच वर्ष संपलं आणि होळीच्या दुसर्‍या दिवशी - धुळवडीला (ज्या प्रतिपदेला आता रंग’पंचमी’ म्हटलं जातं) - नवीन वर्ष सुरू झालं. ’हिंदु नववर्ष’ असं जर काही साजरं करायचं असेल, तर महाराष्ट्राने गुढी पाडवा विसरून धुळवडीला केशरी / भगवे फेटे घालून तुतार्‍या वाजवाव्यात.

पण त्यातही गडबड आहे. मारवाडी, व्यापारी लोकांची. यात गुजराती किती प्रमाणात येतात, माहीत नाही; पण असतील, तर आता त्यांच्या नववर्षाचा वरचष्मा दिल्लीतही सुरू होऊ शकतो. हे लोक विक्रम संवत पाळतात. त्य़ांचं नवं वर्ष दिवाळीत, बलिप्रतिपदेला सुरू होतं. वह्या बदलणे, नव्या वर्षाच्या बोहनीचे वायदे करणे, वगैरे प्रकार तेव्हा होतात. मोठ्या गाजावाजाने होतात. तेव्हा ते एकमेकांना, त्यांच्या गिर्‍हाइकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, भेटीदेखील देतात. तशी कार्डं पाठवतात. बँकेतला कुणीही याची साक्ष देईल, कारण मुंबईतल्या बँकांच्या शाखांमधले नोकरदार कुणीही असोत, बहुसंख्य कस्टमर्स - म्हणजे बँकेला पैसे देणारे, बँकेकडून कर्ज घेणारे कस्टमर्स - गुजराती असतात. परिणामी मुंबईत धंद्याची भाषा गुजराती आहे. मी ज्या बँकेत नोकरी करत होतो, तिथले काही फॉर्म्स एके काळी इंग्रजी आणि गुजराती, या दोनच भाषांमध्ये असत. 

सध्या सर्व भारतीयांना हिंदु मानण्याची चलती आहे. म्हणून आपण मुसलमान आणि पारशी (सर्वच हिंदु तर हे कोण, असं विचारू नये.) नवीन वर्षं सोडून देऊ. पण धार्मिक, सांस्कृतिक परंपरा सोडल्या, तर एक जानेवारी हा न्यू इयर डे असतोच. नवीन वर्षाचे संकल्प गुढीपाडव्याला किंवा बलिप्रतिपदेला सोडल्याचं उदाहरण मला माहीत नाही. तो मान एक जानेवारीचाच. शिवाय त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता. त्याहूनही भारी म्हणजे टीव्ही वाहिन्यांची मान्यता. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं इतर देश ऐकतील ही स्थिती; ज्या प्रकारे आपण सर्व शोधांसाठी, तंत्रज्ञानासाठी इतरांवर अवलंबून असतो ते पाहता;  तुमच्या आमच्या आयुष्यात येणं कठीण. म्हणून किमान टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत तरी गुढीपाडव्याच्या प्रतिष्ठापनेसाठी चळवळ व्हायला हवी. प्रॉब्लेम असा, की तिथे मराठी भाषेला कोणी धूप घालत नाही. गुढी पाडव्याची डाळ तिथे शिजेल, ही शक्यता नाही. मराठी अनाउन्सर आणि अँकर नथी आणि गुढघ्यापर्यंत शेरवान्या घालतात, ते आपण गोड मानून घ्यावं.

आणखी एक नवं वर्ष आहे. वित्तीय वर्ष एकतीस मार्चला का संपतं, याला नक्कीच सज्जड कारण असेल. पण संपतं हे खरं. कंपन्या, सोसायट्या आपापले अकाउंट्स बनवतात आणि कर भरतात. मुख्य म्हणजे कर भरतात. करासाठी एक एप्रिल ते एकतीस मार्च हे वर्ष धरल जात असल्यामुळे काय काय होतं. मार्च महिन्यात गाडी खरेदी करून घसारा ऊर्फ डिप्रिसिएशनची किंवा घर घेऊन हप्त्याची वजावट मिळवण्यासाठी धडपड होते आणि म्हणून गाड्या, घरंवाले स्किमासुद्धा जाहीर करतात. हे नवं वर्ष पैशाशी संबंधित, म्हणून त्याला मोजणं आवश्यक. आणि आता ’उदारीकरणा’नंतर वीस वर्षांनी आणखी अच्छे दिन येऊ घातल्यावर जास्त आवश्यक झालं आहे. 

त्यापेक्षा मी आपला माझ्यापुरता जून महिना, हाच नवीन वर्षाचा पहिला महिना, असं मानून चालतो. एक कारण, जूनमध्ये पाऊस सुरू होतो. केरळात तो मेमध्ये येत असेल, उत्तरेत जुलै उजाडत असेल; माझ्या मुंबईत तो जूनमध्ये अवतरतो आणि जीवनसातत्याची, आणखी एका वर्षाची शाश्वती देतो. म्हणून तो वर्षाचा पहिला महिना. दुसरं कारण जुनं झालं, पण संपलं नाही: सर्व शाळाकॉलेजं जूनमध्ये सुरू होतात. नवी पुस्तकं, नवा वर्ग, नवे शिक्षक! आणखी काय हवं नवं?

तरुणपणी मी पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पहात असे. तसं डोंगरात कधीही जावं फिरायला; पण पाऊस आला की हाइकचा मोसम ऑफिशियली आला! तो वारा, तो चौफेर झोडपणारा वर्षाव, ते पायांना अडवणारं गवत, ते खळाळ झरे, ती हिरवाई, तो तृप्‍त दिसणारा निसर्ग! सौंदर्याचा, आनंदाचा, देहभान विसरण्याचा, देव मानण्याच्या अगदी जवळ जाण्याचा य़ापेक्षा उत्कट अनुभव मला माहीत नाही. माझ्यासाठी तेच नवं वर्ष. गुढीचा अर्थ लिंगपूजेतून लावायचा की आणखी कसा लावायचा, याच्याशी मला देणंघेणं नाही. 

तरीपण ते ’हिंदु’ नववर्ष म्हटलं की हसू येतंच. या चित्रविचित्र चालीरीतींच्या देशात सर्वांना एका गाठोड्यात बांधायचा कशाला हा फुकाचा आटापिटा! देशातल्या सगळ्यांना हिंदू म्हणायचं असेल, तर हिंदुपणाची एकमेव ओळख संघप्रणित ’विश्वहिंदु’ हीच आहे, असं घोषित करून बाकीच्यांना धर्माबाहेर काढावं लागेल. नाहीतर हिंदू असा काही एकसंध धर्म नाही, त्यात सत्रा ते सत्राशे पंथ, रीती आणि परंपरा आहेत, हे मान्य करून ’हिंदु नववर्ष’ ही संकल्पना मोडीत काढावी लागेल. दोन्ही चालणार नाही.