Saturday, April 27, 2013

शमशाद: ’हिला पटवून धन्य व्हावं!’


मला कान तसा उशीरा आला आणि जसा आला, तसा मी लताच्या आवाजात पूर्ण बुडालो. तेव्हा नाकातोंडात गेलेलं पाणी अजून नीटसं निघालेलं नाही. परिणामी मला कायम वाटत आलं आहे की वेडा होऊन गाणी ऐकण्याच्या काळात मी आशा, गीता, शमशाद यांना समरसून एन्जॉय करू शकलो नाही. थोडा अपवाद नूरजहानचा. शमशादला तर नायिकेचा आवाज म्हणून स्वीकारणं जडच गेलं. त्यात शमशाद सुरुवातीला ऐकली, ती नौशादची. ’बैजू बावरा’ आणि ’दीदार’. दूर कोई गाये आणि बचपनके दिन भुला न देना. दोन्ही लता-शमशाद ड्युएट्स. काय काय सुचायचं. ’बचपनके दिन भुला न देना’ हे गाणं बालवयातले नर्गिस आणि दिलीप कुमार गातात. घोड्यावर बसलेले तबस्सुम आणि परिक्षित सहानी. मोठी झाल्यावर नर्गिसचा आवाज फुटतो आणि लताऐवजी ती शमशादच्या आवाजात गाऊ लागते. दिलीप कुमारचाही आवाज फुटतो आणि शमशादचं रूपांतर रफीमध्ये होतं!

या संस्काराला ’किस्मत’मधल्या कजरा मुहबतवालाने हातभार लावला. या गाण्यात बबिता पुरुषाच्या वेषात आणि विश्वजित बाईच्या वेषात आहे. बबिताच्या तोंडचे शब्द जरी पुरूषाचे असले तरी तिला आवाज दिला आहे आशाने. आणि बाईच्या भावना व्यक्‍त करणारा विश्वजित गातो शमशादच्या आवाजात. संगीतकार जणू सांगतो आहे, आशाचा आवाज बघा कसा स्त्रीला शोभेसा नाजुक, लाडिक आहे; तर शमशादचा आवाज मर्दानी आहे. स्त्रीवेषातल्या पुरुषाला शोभेलसा आहे.

ओ पी नय्यरला खरंच असं वाटत होतं का? मुळीच नाही. ’किस्मत’ १९६८ चा. त्याच्या दहा वर्षं अगोदर आलेल्या ’नया दौर’मध्ये सुद्धा शमशाद-आशा यांचं द्वंद्वगीत आहे, रेशमी सलवार कुरता जालीका. या गाण्यातले शब्दही बाईचे आणि बुवाचे आहेत. मात्र चित्रपटात नाचणार्‍या दोन्ही बायाच आहेत. आणि पुरुषाच्या वेषात नाचणारी बाई आशाच्या आवाजात, तर बाईच्या वेषात नाचणारी बाई शमशादच्या आवाजात गातात. दोन्हींपैकी एकही नायिका नसताना. म्हणजे, दहा वर्षात ओ पी लतामुळे निर्माण झालेल्या धारेला लागला! कारण बाईचा आवाज किनरा हवा, हा संस्कार निःसंशय लताचाच.

म्हणून तर शमशादला नायिकेचा आवाज म्हणून स्वीकारायला जड गेलं. आणि ओ पी नय्यरने जणू या विचाराला फूस लावली. कभी आर कभी पार हे ’आरपार’मधलं टायटल साँग असेल शमशादने गायलेलं; पण ते नायिका श्यामाच्या तोंडी नाही. कहींपे निगाहें कहींपे निशाना हे नाही. ’सीआयडी’तलं बूझ मेरा क्या नाम रे नाही. लेके पहला पहला प्यारमधला शमशादचा आवाज नायिका शकीलाला नाही. शकीला तोंड उघडते, तेव्हा आशाचा आवाज ऐकू येतो.

असं करता करता जेव्हा ’जुन्या’ गाण्यांच्या विश्वात आत आत गेलो आणि मागचे संदर्भ सुटले, तसे कान मोकळे झाले आणि अमीरबाई, जोहराबाईपासून एकेका आवाजाची आपापली वेगळी लज्जत घेताना मजा येऊ लागली. मग खुर्शीदचं घटा घनघोर अत्यंत आवडतं झालं. इतकं की पावसाळ्याच्या सुरुवातीला सिलोनवर ते ऐकायला उतावळा होऊ लागलो. कभी न बिगडे किसीकी मोटर रस्तेमें मधली धापा टाकणारी सुरैया गुदगुल्या करू लागली. दूर कोई गाये हे गाणं लताचं नसून शमशादचं आहे, असं मनात आलं. मनके अंदर हो प्यारकी अग्नी या तिच्या कडव्यात शमशाद जी उफाड्याने गाते, अभीसे है ये हालच्या आगेमागे जे वळसे घेते, ते कानात साठू लागले. त्या पार्श्वभूमीवर त्यातलं लताचं मेरे अंगना लाजका पहरा मिळमिळीत भासलं. ’अंदाज’मध्ये लता नौशादसाठी प्रथम गायली. तेव्हाच्या रीतीप्रमाणे लतानेही ’अंदाज’मध्ये जाड आवाज काढला आहे. तेव्हा त्यातल्या डरना मोहबत करलेमध्ये शमशादच्या सफाईसमोर लताची सुप्‍त ताकद तेवढी जाणवून घ्यावी. लता झाली तरी ती विष्णूचा अवतार नव्हे की जन्मापासूनच तिला स्वसामर्थ्याची पूर्ण जाणीव असावी. ’अंदाज’च काय, नौशादच्याच पुढच्या ’बाबुल’मध्ये सुद्धा तिचा नवोदितपणा गेलेला नाही. पंछी बनमेंमध्ये मंदबुद्धी हातवारे करणार्‍या नर्गिसला तिचा सखी हाथोंसे हॉय म्हणणारा आवाज एकदम जुळतो. आणि किसीके दिलमें रहना था म्हणताना पातळ, किनर्‍या आवाजाला वजन येतं. या गाण्यात बसायी थी कोई मेहेफिल मधला लताचा ’ह’ खणखणीत आहे, शमशादचा गुळगुळीत आहे!

’बाबुल’ची नायिका नर्गिस की मुनव्वर सुलताना? नौशादचं काही कळत नाही. ’बाबुल’मध्ये नर्गिस लताच्या आणि मुनव्वर सुलताना शमशादच्या आवाजात गातात; तर ’दीदार’मध्ये नर्गिसला शमशादचा आणि निम्मीला लताचा आवाज आहे. ’दीदार’ची नायिका काय निम्मी? कदाचित नर्गिसचा आवाज लहानपणी लताचा होता आणि नंतर फुटला, असं ठरल्यावर नौशादचा इलाज राहिला नसेल. पण त्याचमुळे शमशादच्या उंच चढलेल्या खणखणीत आवाजात चमनमें रहके वीराना ऐकताना समोर नर्गिस दिसते. शमशाद आणि नायिका एकत्र पहाण्याचा सर्वात स्ट्राँग संस्कार या गाण्याने केला.

ओपी नय्यरचं जे झालं, ते इतर संगीतकारांचं खूप अगोदर झालं. उदाहरणार्थ नौशाद. ’बाबुल’, ’दीदार’ अशा चित्रपटांमध्ये दोन नायिकांना दोन आवाज देताना नौशादने लता आणि शमशाद यांच्यात कोणाला वर-खाली लेखलं नाही. पण ’जादू’मध्ये? एकाच नलिनी जयवंतला दोन आवाज. लो प्यारकी हो गयी जीत गाताना लता आणि जब नैन मिले नैनोंसेरूपकी दुष्मन पापी दुनिया गाताना शमशाद. आणि पुढे ’अमर’मध्ये मधुबाला आणि निम्मी, दोघींनाही लताचाच आवाज. कसा प्रवास आहे! ’जादू’ हा नलिनी जयवंतचा उत्सव आहे. आणि ’जादू’तली गाणी उडती, पश्चिमी ढंगाची आहेत. लो प्यारकी हो गयी जीत गाणं चांगलं आहे; पण रूपकी दुष्मनची बेहोषी त्यात नाही. मारे अखियाँ हे शब्द एकदा खाली आणि एकदा वर, ही शमशादची खमंग गंमत ऐकूनच कळेल. इथल्या नलिनी जयवंतच्या मनमोकळ्या देहबोलीला शमशाद न्याय देते; लता नाही. लताच्या बाबतीत नौशादचा एकूणच प्रॉब्लेम असावा. चावट चालींची, उच्छृंखल गाणी काय त्याने दिली नाहीत? पण लताच्या आवाजातलं एक आठवत नाही. नौशादची लता कायम साफ, शुद्ध, सरळ. लो प्यारकी हो गयी जीतच्या पुढे त्याची मजल जात नाही. अनिल विश्वासला बरं जमलं नाचे रे गोरी जिंगू सारख्या गाण्यांमध्ये.

त्या, एकोणीसशे पन्नासच्या आगे मागे काळात शमशादचं अपील सणसणीत असावं. ’परदेस’मधलं मेरे घुंगरवाले बाल (गुलाम महम्मद) आणि ’आवारा’तलं एक दो तीन (शंकर जयकिशन), दोन्ही गाणी पडद्यावर कक्कू गाते. आवाज शमशादचा. तोच बेहोष, मनमुक्‍त भाव. या गाण्यांमधले, विशेषतः घुंगरवाले बालमधले, सूर कमी ऐकू येतात; त्यातली अनावर उच्छृंखलता कानातून थेट हृदयात शिरते. चाल गाता गाता पलिकडे कुठल्याकुठे फिरायला जाऊन, ज्याला जिप्सी म्हणावं असं भावदर्शन शमशाद लीलया घडवते. असं वाटतं, तिची आणि फॉर्मातल्या किशोरची जोडी बरी जमली असती. पण किशोर फॉर्मात आला तेव्हा कुणी या दोघांना एकत्र आणलं नाही. किशोर-शमशादचं बेस्ट ड्युएट अर्थात ’नया अंदाज’मधलं मेरे नींदोंमें तुम. पुन्हा हे गाणं किशोरपेक्षा शमशादचंच. किशोरला तेव्हा वजन आलं नव्हतं. आणि ’नया अंदाज’मध्ये शमशादच्या आवाजात मीनाकुमारी गाते हे चालून गेलं. याला एक कारण म्हणजे मेरे नींदोंमें तुम हे गाणं दिसतं त्यापेक्षा जास्त ऐकू येतं. किशोर दिसतो आणि ऐकूही येतो; पण गाण्याच्या मालकी हक्काचे शेअर्स मीनाकुमारीकडे किरकोळ आहेत, शमशादकडे जास्त.

आणि ओपीकडे सर्वात जास्त. शमशादची गोडी ओपीनेच लावली. नौशाद तसा चालवाला माणूस. ओपी किंवा अनिल विश्वासबरोबर जसं गाणार्‍याचं अंतरंग खुलून येतं, तसं नौशादबरोबर होत नाही. शमशादचा रगेलपणा ओपीच्या एकेका गाण्यात कसा उचंबळून येतो. बूझ मेरा क्या नाव रे गाताना त्या रे ला ती काय मस्त आत वळवते. हे शमशाद लीलया करते. करताना जराही योजून केल्यासारखं होत नाही. कजरा मोहबतवालामध्ये नाही का हाय रे मैं तेरी कुरबान मधला शेवटचा कसा तिच्या आवाजात फडफडून जिवंत होतो! लेके पहला पहला प्यार या गाण्यात रफी, शमशाद आणि आशा, तिघे आहेत. तुमनेभी देखा होगा उसको सितारों, आओ आओ मेरे संग
मिलके पुकारो, अशा विरहिणीच्या शब्दांना साजेसा आवाज आशा लावते; पण तेव्हाच्या लतामय वातावरणात आग लावून देणार्‍या ओ पी नय्यरच्या जादूचं रहस्य ज्या रसरशीत ताजेपणात होतं, तो विरहभावामध्ये नव्हता. तो होता, मुखडेपे डाले हुवे जुल्फोंकी बदली, चली बलखाती कहाँ रुक जाओ पगली अशा अवखळपणात. तो जसा रफीत जागा होत होता, तसाच शमशादमध्ये जिवंत होत होता. ओपी-शमशाद हे एक प्रकरणच आहे.

’बहार’.’जुनी’ वैजयंतीमाला शिंकली तरी ती नाचातली मुद्रा असते, इतकी ती नृत्यमय आहे.  नाचणे म्हणजे आनंद, नाच हेच जीवन, हे जणू तिचं जगण्याचं पहिलं तत्त्व असावं. आणि तिला ’बहार’मध्ये आवाज कोणाचा, तर आत्मनिर्भरतेचा प्रत्यय देणार्‍या शमशादचा. पण ’बहार’मधल्या वैजयंतीला स्वतःतल्या जादूचा साक्षात्कार झालेला नव्हता. त्यामुळे सैंया दिलमें आना रे, दुनियाका मजा लेलो, या गाण्यांमध्ये शमशादने तिचं काम चोख केलेलं असलं तरी पडद्यावर गाणी अपेक्षेइतकी रंगत नाहीत. म्हणजे, वैजयंती नाचते, छान दिसते, ठीक; पण या दोघींच्या रसायनाकडून अपेक्षाच जास्त निर्माण होतात, त्याचं काय? ’बहार’वाल्या एसडीचंच ’शबनम’मधलं गाणं ये दुनिया रूपकी चोर वैजयंतीला मिळायला हवं होतं. कामिनी कौशल नाही पटत. बंगाली, गुजराती, मराठी, अशा पॅन इंडियन भाषांमधल्या या गाण्यात वैजयंतीने काय धमाल केली असती.

एवढं झाल्यावर सांगावं लागतं की शमशादला चेहेरा कुणी दिला असेल, तर तो निगार सुलतानाने. ’नमूना’तल्या टमटमसे झाको ना रानीजी ची मजा सी रामचंद्रची आहे. पतंगामधल्या मेरे पिया गये रंगूनवरही त्याची छाप आहेच. (शमशादबरोबर आवाजच मुळी ’चितळकर’ आहे!) पण इथली निगार ’दिसते’. शमशादच्या भरदार आवाजापुढे झाकोळून जात नाही. आणि खटकतही नाही. निगार काही थोराड, पुरुषी नाही. नीट बाई आहे. पण तिच्यात विलक्षण तोरा आहे. जो नर्गिसमध्येसुद्धा सापडतो. थोडासा गीताबालीत दिसतो. सुचित्रा सेनमध्ये तो भरपूर आहे. प्रत्येकीचा वेगळा आहे, निगारचा तोरा ’शमशादी’ आहे! आणि शमशादच्या आवाजातली लखलखीत धार नजरेत उतरवणारी तेजस्वी निगार बघायची असेल, तर अर्थात ’मोगले आझम’. तेरी मेहेफिलमे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे हे गाणं कोणाकरता बघावं? कोणाकोणाकरता बघावं! दिलीपचा मुघल राजपुत्राचा रुबाब, स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वाला
प्रियकरावर ओवाळून टाकलेल्या प्रेमिकेचा अप्रतिम अभिनय करणारी मधुबाला आणि प्रेम, मैत्री, कशाहीपेक्षा अस्मिता जास्त प्रिय असल्याचं शब्दांविना जाणवून देणारी निगार. गाणं लीजण्ड होतं, ते असं. मोगले आझममध्ये ग्रेट गाणी आहेत; श्रवणीय आहेत, प्रेक्षणीय आहेत. पण मला तेरी मेहेफिलमें पुन्हा पुन्हा बघताना, ऐकताना जास्त आनंद मिळालेला आहे.

शमशादच्या आवाजाचं, गायकीचं हे वैशिष्ट्य म्हणावं का? आत्मविश्वासातून आलेला मोकळेपणा. शरीर फोडून बाहेर उसळणारा उत्साह. जिचं मन जिंकणं हे एक आव्हान आहे आणि जो पुरुष तिचं मन जिंकेल, त्याचा स्वतःवरचा विश्वास उदंड वाढेल; अशा स्त्रीत्त्वाचं प्रतीक. आपल्या संस्कृतीतल्या बाईत, मुलीत हे – किमान त्या काळात – कमीच असल्यामुळे या आवाजाला नंतरच्या, लता-आशाच्या काळात आक्रमकपणाचं लेबल चिकटलं. एक गोष्ट खरी, बडी मुशकिलसे दिलकी बेकरारीको करार आया, के जिस जालिमने तडपाया उसीपर मुझको प्यार आया (’नगमा’ – नाशाद) या शब्दांना शमशादच्या गळ्यातून बाहेर येताना वरकड आशय प्राप्‍त होतो. हे जे काही प्यार आया प्रकरण आहे, ते सहजासहजी घडलेलं नाही. आणि तो जो कोण जालिम आहे, त्याने हे सीरियसली घेतलं नाही, तर गंभीर प्रसंग ओढवेल, असं सुचत रहातं.

लता आडवी आल्यामुळे आज शमशादचा विचार ’एका आत्मनिर्भर स्त्रीचा बेगुमान उद्‌गार’ असा होत नाही. पण ते तसं जाणवत रहात असणारच. म्हणून त्याचं वर्तमान इंटरप्रिटेशन काही तरी भलतंच होतं. आणि दुसर्‍या कुठल्याही गायिकेपेक्षा शमशादने गायलेल्या गाण्यांची उत्तान रिमिक्स रूपं अवतरत रहातात. समाजाच्या कानांवरचा लताचा फिल्टर विरत जाईल, तशी शमशाद नव्याने मोठी होईल!

Monday, April 15, 2013

निमित्त: प्राण




















प्राण हा माझ्या नॉस्टाल्जियाचा भाग आहे.

आहमध्ये राज कपूरला हाँ, तुम्हे टीबी हुवा है,” सांगणारा प्राण. (मग राज कपूर त्याला सांगतो, तू नर्गिसशी लग्न कर!) कश्मीरकी कलीत चालत्या लॉरीत शम्मी कपूरशी मारामारी करणारा प्राण. (काय त्याची विडी!) मधुमतीत वैजयंतीमालाला पाहून तो ये है आपकी कल्पना,” असं दिलीप कुमारला (की तिलाच?) बोलणारा प्राण. (दिलीप कुमारने काढलेल्या चित्रात वैजयंतीमालाचा मुखडा बघून त्याने विचारलेलं असतं, ’कोणाचं हे चित्र?’ दिलीप उत्तर देतो कल्पनेतून काढलं!) जॉनी मेरा नाममध्ये सोहन देव आनंदचा लहानपणी बिछडलेला भाऊ मोहन प्राण. (बॉक्सिंगच्या प्रेमातून एकमेकांची ओळख पटते!) चोरी चोरीत नुसताच असूनही पुरेसा व्हिलन वाटणारा प्राण. (करोडपती बाप ऐकत नाही म्हणून नर्गिस कोणासाठी बोटीतून उडी घेते? प्राणसाठी!) राजकुमारमधला दुष्ट सेनापती नरबत; (नरबत, मेरा बेटा खूनी नही; तुम खूनी हो,” असं पृथ्विराज कपूर गरजतो, तेव्हा त्याचं उद्दाम हसणं बघून घ्यावं.) नंतर कस्मे वादे प्यार वफापासून हम बोलेगा तोआणि दो बेचारे बिना सहारेपर्यंत चक्क गाणी म्हणणारा प्राण. जोपर्यंत प्राणला व्हिलन म्हणूनच पहात होतो, तोपर्यंत तो कधी गाईल, असं चुकूनही वाटलं नव्हतं. अगदी स्वतःच्याच आवाजात रेकत मुनिमजीमध्ये त्याने पडद्यावर देव आनंद आणि नलिनी जयवंतबरोबर; तर गाण्यात हेमंत कुमार आणि गीता दत्तबरोबर दिलकी उमंगे हैं जवाँम्हटलेलं असलं तरी. हे एस डी बर्मनने बरोबर नाही केलं. काय मस्त आवाज लागलाय हेमंत कुमारचा. गीता तर सदैव फ्रेश. आणि त्यात प्राणचं रेकणं. आख्खं गाणं नासून जातं.

च्यायला. सदाबहार म्हणून देव आनंदचं कोण कौतुक झालं. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर प्राणने बावीस चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तो आणि चक्क नूरजहान, दोघांनी प्रमुख भूमिका केलेला, १९४२ साली आलेला, पहिला चित्रपट एकच. प्राण देव आनंदला किती तरी सीनियर. १९७० साली आलेल्या जॉनी मेरा नाममध्ये दोघे भाऊ भाऊ! पुढे जंजीरमध्येसुद्धा प्राण. कसौटीत अमिताभचा मित्र; तर अमर अकबर अँथनीत बाप. गीता बाली आणि कल्पना कार्तिक कोण, हे आजच्या कॉलेजकुमारांना सांगायला किती बोलावं लागतं; प्राण कोण, हे त्यांना माहीत असतं! अर्थात, ते नूरजहानचं मलाही माहीत नव्हतं. प्राण इतका थोर असेल, वाटलं नव्हतं.

कॉलेजला आलो आणि मॅटिनीची चटक लागली. त्या अर्ध्या वयात बाहेरचं आणि आतलं, दोन्हीकडचं जग विस्तारत होतं. घरापेक्षा पायरी आणि कॉलेज जास्त प्रिय होतं. नात्यापेक्षा मैत्री जवळची वाटत होती. नवे आधार, नवे संदर्भ शोधावेसे वाटत होते. मॅटिनी हा त्या शोधाचाच एक भाग होता. तलत आणि लता, राज आणि नर्गिस, देवदास आणि प्यासा यांच्यात काय काय सापडत होतं. या सगळ्याची मिळून जी एक चौकट होती, तिच्यातला एक जवळचा माणूस होता प्राण. प्राणमुळे हिरोला उठाव येत होता. व्हिलनचं ते कामच असतं, हे मान्य केलं तरी प्राण हे काम काय रुबाबात करत होता. त्यात त्याच्या एकेक स्टाइली. त्याच्या एंट्रीतच ओळख पटायची आणि मग हा काय करतो यापेक्षा कसं करतो, याकडे लक्ष रहायचं. तो हिरोला फसवणार किंवा हिरॉइनला पळवणार किंवा गैरसमजाचं विष कालवून त्यांना अलग करणार; त्यात काही नाविन्य नव्हतं. गाणी ऐकायला गेलं असताना स्टोरीत इंटरेस्ट तरी कोणाला होता? पण प्राणची चाल, त्याची संवादफेक, त्याची तीक्ष्ण नजर; थोडा पैसा यातसुद्धा वसूल होत असे.

आता गंमत वाटते. तरानाचं कथानक एक ओळ आठवत नाही. आठवते ती दिलीप आणि मधुबाला यांच्या नुसत्या एकमेकांकडे बघण्यातून व्यक्‍त होणारी एकमेकांबद्दलची ओढ. प्रेम म्हणजे काय, याची शब्दातीत व्याख्या. कालापानीतला सर्वात लक्षणीय क्षण कुठला? तर वर्तमानपत्राच्या कचेरीत हिरोने कोणा रिपोर्टर बाईच्या पाठमोर्‍या आकृतीचं लक्ष वेधायचा बराच वेळ प्रयत्न केल्यावर ती बाई गर्रकन वळते आणि - मधुबाला आणि देव आनंद यांची नजरानजर होते. अलौकिक रूपदर्शनाने दोघे अवाक्‍!तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबाम्हणणार्‍या शेखरच्या कळवळून जीव टाकण्याने देहभान विसरून त्याच्या प्रेमात पडणारी आखरी दावमधली नूतन. ’बाझी’त ’तदबीरसे बिगडी हुई तकदीर बनाले’ च्यापुढे ’अपनेपे भरोसा है तो इक दाव लगाले’तल्या ’दाव’वर चाबूक मान उडवणारी गीताबाली. तुम हो कौन? तुम्हारी हैसियत क्या है? चंद घंटोंके लिये तुम्हे एक नयी जिंदगी दिखायी, तो मारी बराबरी करने लगे?” असे शब्दांचे चाबूक लगावून राज कपूरला घायाळ करणारी श्री ४२०मधली नादिरा. हा महाप्राणोच्चार तिनेच करावा!

मुद्दा मधुबाला किंवा नूतन किंवा नादिरा यांचा नाही. मुद्दा असा आहे, की आम्ही असे एकेक क्षण टिपत होतो. सिनेमाच्या स्टोरीशी आम्हाला फारसं देणं घेणं नव्हतं. कॅरेक्टर किती विश्वसनीय आहे, याच्याशीसुद्धा नव्हतं.आम्ही मुळी सिनेमे बघत होतो ते क्रिटिकल ऍप्रिसिएशन करण्यासाठी नव्हतंच. बिमल रॉय मोठा दिग्दर्शक होताच. पण परखमध्ये ओ सजनाच्या वेळी गळणार्‍या पागोळ्या किंवा त्याच सिनेमात लायब्ररी बडी होनी चाहियेम्हटल्यावर बडी म्हणजे नेमकं काय, हे न सुचून हात रुंदावणारा आणि मग ओशाळून सॉरी म्हणणारा जयंत, याचं जास्त कौतुक होतं. क्षण! प्यासाथोर का? तर त्यात कैसे हो?’ ला उत्तर म्हणून जिन्दा हूँअसले कितीतरी क्षण होते. जिस देशमें गंगा बहती हैमधला लक्षणीय क्षण कुठला? तर आपल्याला पोलिसांनी घेरलं आहे, असं जेव्हा शरण येणार्‍या दरोडेखोरांना कळतं, तेव्हा दाटून येणारं मळभ. आणि शरण जायला शेवटपर्यंत विरोध करूनही शेवटी खांदे पाडून सर्वांच्या मागून यावं लागणारा प्राण. आणि हो, ते प्राणचं गाणं! त्याला शोभणारं! पुढे त्या गाण्याचं काही होवो; पण हातात पलिता घेतलेल्या प्राणच्या है आग हमारी सीनेमें हम आगसे खेले जाते हैंया शब्दांनीच ते सुरू होतं. मुगले आझममधलं मला सगळ्यात जास्त काय भावतं? ’इस मेहेरबानीपे मैं तुम्हे मेरा खून मुआफ करती हूँ’ (किंवा तत्सम) असं साक्षात अकबराला म्हणणारी अनारकली मधुबाला. खुदा निगेहेबान हो तुम्हाराम्हणतानाचा तिचा कडू चेहेरा. अंदाजमध्ये दिलीपला मारल्यानंतरचा नर्गिसचा तसाच दगडी चेहेरा. परिणीतामध्ये शेवटी गच्चीवरच्या अंधार्‍या खोलीत वाळलेल्या फुलांचा हार घेऊन बसलेल्या मीना कुमारीच्या निरागस चेहर्‍यावरचा सर्वस्व गमावल्याचा मूक भाव. किंवा अगोदर चली राधे रानीऐकतानाची तिच्या चेहर्‍यावरची तशीच निरागस प्रेमभावना. बंदिनीआत्महत्या नही, हत्या!म्हणून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देणारी नूतन. साहिब बिबी और गुलाममध्ये छोटी बहूच्या तेजःपुंज सौंदर्याला नजरच न देऊ शकणारा, बोलताना खाली मान घालणारा भूतनाथ गुरुदत्त. किंवा साकिया आज मुझे नींद नही आयेगीया नाचाच्या वेळी सतत होत रहाणारी एका सडत चाललेल्या संस्कृतीची जाणीव. एकेक क्षण! तीच आमची दौलत होती. ते क्षण जमवून आमचं भावविश्व श्रीमंत होत होतं.

याची दुसरी बाजू जास्त महत्त्वाची आहे. क्षण जमवणे आम्ही करत होतो, म्हणून ते क्षण आणि त्या क्षणांनी सजलेले ते चित्रपट आणि त्यातले ते कलाकार मोठे, असं नाही. तो आमचा नॉस्टाल्जिया असेल; पण म्हणून तो नॉस्टाल्जिया, हेच त्या काळातल्या सिनेमाचं मूल्य; असं नाही. त्या सिनेमाचं कल्चरच ते होतं. सिनेमाला मास मीडिया म्हणतात. नाटक जसं प्रेक्षकांविना सिद्धच होऊ शकत नाही; तसंच, मला वाटतं, सिनेमा प्रेक्षकांच्या समूहाविना सिद्ध होऊ शकत नाही. मोठ्या समूहाशिवाय. (यात आपण एक कलम असं घालू शकतो, की हा मोठा समूह एका वेळी एका ठिकाणी असायला पाहिजे, असं नाही.) चित्रपटनिर्मितीमधल्या गुंतवणुकीचं गणितही हेच सांगतं. त्यामुळे चित्रपट बनवणारे मोठ्या समूहाच्या आवडीनिवडीचा लसावि शोधत रहातात. पण त्याचवेळी हेसुद्धा खरं की एकेक क्षण टिपण्याचं मूल्य त्यात कोणालाही सापडतंच! ऍक्टर आणि स्टार, यातल्या फरकाचा मागही यातून काढता येईल. किंवा अभिनयात अमुक श्रेष्ठ वाटतो/ते; पण आवडतो/ते तमुक; यातल्या रहस्याचासुद्धा. नसीर सरळ सरळ थोर अभिनेता; पण अमिताभने जसे भावविश्व श्रीमंत करणारे क्षणदिले, तसे आणि तितके नसीरने कुठे दिले!

परत, अमिताभ आणि नसीर यांच्यात श्रेष्ठ कोण, हा मुद्दा नाही. मुद्दा सद्यकालीन संस्कृतीची मागणी काय आहे, हा आहे. प्राण त्या कल्चरचा भाग होता. प्रेक्षकांचं भावविश्व समृद्ध करण्यात त्याचाही हातभार लागत होता. त्याच्या अभिनयाची जास्त नीट मांडायचं तर, त्याच्या सिनेमातल्या वावराची धाटणी त्या कल्चरमधूनच जन्माला आली होती. या कल्चरमध्ये सहजतेपेक्षा एका विशिष्ट प्रकारची कृत्रिमता जास्त फिट बसते. नैसर्गिक हालचालींपेक्षा स्टाइलाइज्ड वावर जास्त पटतो. प्राण पूर्ण स्टाइलाइज्ड होता. त्याने कन्हैयालाल, याकूब, के एन सिंग, वगैरे खलनायकी भूमिका करणार्‍या इतरांप्रमाणे स्वतःची अशी एक स्टाइल होऊ दिली नाही. प्राणने हाफ टिकटपासून अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकादेखील केल्या; पण तिथेही तो जॉनी वॉकरसारखा एकसुरी झाला नाही. अनेक चित्रपटांमध्ये व्हिलनगिरी करताना त्याने अनेक प्रकारच्या लकबी वापरून वैविध्य आणलं. खानदानमध्ये (हा नंतरचा खानदान. सुनील दत्त आणि नूतनचा.) तो तोंड वाकडं करतो. जिस देशमें..मध्ये गळ्याभोवती हात आवळतो. कधी विशिष्ट शब्द वारंवार वापरतो. कधी भुवया जाड करतो. कधी भरघोस दाढीमिशा बाळगतो. कधी त्या दाढीमिशा पांढर्‍या करतो. हे सगळं सरळ सरळ बाहेरचं आहे. अंतर्यामीचं नाही. प्राण हा परेश रावळ नाही. पण म्हणूनच तो परेश रावळपेक्षा मेनस्ट्रीमला जास्त जवळचा आहे. व्हिलनने व्हिलनगिरी अशी करावी, की अगदी बालबुद्धी प्रेक्षकाकडूनही त्यातून वेगळा अर्थ निघू नये. हिंदी सिनेमातलं वेषांतर कसं असतं? सिनेमातल्या लोकांना ते कळत नाही; पण अगदी बालबुद्धी प्रेक्षकालाही कळतं; तसंच. नेमकं तसंच.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही कृत्रिमता म्हणजे खोटेपणा नव्हे. किंवा बेगडीपणा, खालच्या पातळीवरचा अभिनय नव्हे. ते कल्चरच असं आहे की तिथे सहजतेपेक्षा ती विशिष्ट कृत्रिमताच जास्त सुसंगत ठरते. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे आपल्या सिनेमातली गाणी. फार कमी चित्रपट म्युझिकलम्हणवण्याच्या जवळ जातात; पण प्रत्येकच चित्रपटात गाणी असतात. ही गाणी म्हणजे सर्व वेळी मनीचे भाव नसतात. बर्‍याचदा त्यांचा उच्चार कथानक सरकण्यासाठी निर्णायक महत्त्वाचा असतो.

आपल्या चित्रपटातली गाणी हा एक गहन विषय आहे. तितकाच गहन विषय कृत्रिमतेचा आहे. थोडक्यात, हिंदी सिनेमाच्या कल्चरच्या संदर्भात प्राण उत्तम अभिनेता होता. इतका, की साठेक वर्षं त्याची कारकीर्द चालू राहिली. तो घिसापीटा ठरून बाजूला कधीच फेकला गेला नाही. अनेक वर्षं अत्यंत अपेक्षित चाकोरीतली व्हिलनगिरी करूनदेखील. आणि त्याने नाचगाणीसुद्धा  तितक्याच सफाईदारपणे पेलली. हाफ टिकटमध्ये एका गाण्यात त्याला किशोरचा खरा आवाज आहे आणि किशोरला खोटा! (म्हणजे काय हे स्वतः बघा.) किशोरसारख्या अस्सल विदुषकाबरोबर नाचताना तो कमी पडत नाही. हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हैआणि फिर ना कहना मायकल दारू पीके दंगा करता हैही तर यारी है ईमान मेराया गाण्यातून त्याचा दुसर्‍यांदा पुनर्जन्म झाल्यानंतरची. (कस्मे वादे प्यार वफावाली उपकारमधली भूमिका हा त्याचा पहिला पुनर्जन्म.)

प्राणच्या यशाचं चिकित्सक मूल्यमापन व्हायला पाहिजे. मी इथे फक्‍त विषयाला तोंड फोडतो आहे. व्हिलन भरीव, रसरशीत नसतोच असं नाही. बॅटमॅनचा वैरी जोकर हे एक ताजं आणि विलक्षण प्रत्ययकारी उदाहरण. तसाच ओंकारातला लंगडा त्यागी. जोकर ही संकल्पना इतकी भारी, की जॅक निकोलसनसारख्या तगड्या अभिनेत्याला जोकरमधून बाहेर पडायला त्रास झाला आणि दुसरा जोकर हीथ लेजर मेलाच. आपल्या सिनेमाचा असल्या सखोल संकल्पनात्मक खलनायकांशी संबंध नाही, म्हटलं तरी चालेल. लंगडा त्यागी मात्र हाडामांसाचा माणूस. प्राणने तसला व्हिलन केल्याचं माहीत नाही. (मधुमतीतला उग्रनारायणसुद्धा अपवाद नाही. जिस देशमें..तला राका असेल थोडासा अपवाद, कारण आरके फिल्म्समधली पात्रं नायक, नायिका, खलनायक, सगळे - एकसुरी नसतात. ज्यात एकसुरीपणा आहे, तो बॉबीहे एक आरपार विडंबन आहे, असं माझं मत आहे. प्रेम, प्रेम चोप्रा कहते हैं मुझे!असं प्रेम चोप्राच म्हणतो!) मग वर्षानुवर्षं ठरीव व्हिलनगिरीचं दुकान प्राण कसा काय चालवू शकला? मेकप-गेटप आणि स्टाइलवर? की ज्याप्रमाणे बेटात माधुरी भावते याला अर्ध्याहून अधिक कारण माधुरी जिच्याशी टक्कर घेते, ती अरुणा इराणीची तगडी सासू आहे; तसं प्राणच्या प्रभावी व्हिलनगिरीमुळे हिरोला (मग ते काम करणारा बरा अभिनेता असो वा नसो) उठाव येत होता? की पौराणिक चित्रपटातला नारद हा जीवनच हवा; तसं काहीसं एकूण सिनेमातल्या खलनायकाचं झालं? की वय, रूप, असलं काही निर्णायकपणे आड न आल्यास, व्हिलन म्हणजे प्राणच? नाहीतरी आत्ताआत्तापर्यंत आपला मेनस्ट्रीम सिनेमा मायथॉलॉजीचंच विस्तारित रूप होता.

तर, पुन्हा एकदा म्हणतो, प्राणचं चिकित्सक मूल्यमापन करताना एकूण आपल्या सिनेमाच्या पोटात शिरण्याचा रस्ता सापडू शकेल. हिंदी सिनेमा हे प्रकरण हसण्यावारी नेण्याच्या लायकीचं मुळातच नाही. एकदा वाटतं, आपल्याला तर कळतंच आहे हे रहस्य. मग शब्दात पकडायला गेलं की फे फे उडते. संस्कृती ही गोष्ट जेवढी समजायला सोपी, तेवढीच समजवायला कठीण. आणि सिनेमा आणि संगीत, यापेक्षा जास्त जवळचं दुसरं काय आहे आपल्या सांस्कृतिक परंपरेला?