Tuesday, August 2, 2016

कोण मुबारक बेगम?





लता गायला लागेपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या गायिका होऊन गेल्या, त्यांना सर्वांना स्वतःचं स्थान आहे. त्यांच्या करियरचा स्वतःचा असा काही ग्राफ आहे. त्यात नूरजहान, सुरैया, खुर्शीद सारख्या गाणार्‍या नट्या होत्या तशाच जोहराबाई, अमीरबाई, शमशाद यांसारख्या फक्‍त आवाज देणार्‍या गायिकासुद्धा होत्या. यातल्या प्रत्येकीची गायकी स्वतंत्र आहे आणि कोणाच्याही गाण्यांची, गायकीची चर्चा करताना लताचा संदर्भ न घेता करता येते. किमान, ज्यांचे कान लताच्या गायकीने एकारून टाकले नाहीत, त्यांना नूरजहानचं ’बैठी हूँ तेरी याद का लेकर के सहारा’ किंवा शमशादचं ’न आँखों में आँसू न होठों पे आहे’; किंवा सुरैयाचं ’दूर पपीहा बोला’ किंवा खुर्शीदचं ’घटा घनघोर’ ऐकताना लता आठवत नाही. त्या गाण्यांमध्ये कमी जास्ती ठरवताना लताला मधे आणावं लागत नाही.

यांच्यातली शेवटची गायिका गीता दत्त. ’घूंघटके पट खोल’ किंवा ’मेरा सुंदर सपना’ असली गाणी तिला मिळाली आणि पुढेही सुरुवातीला ओ पी नय्यर आणि काही प्रमाणात (गुरुदत्तमुळे?) एस डी बर्मन य़ांनी तिला गाणी दिली. पण सूर्य उगवल्यावर तारे दिसेनासे व्हावेत, तशा गीतासकट सगळ्याच गायिका गायब (संदर्भ गायब होण्याचा आहे; गुणवत्तेचा नाही) झाल्या. आशासकट ज्या कोणी उरल्या, त्यांना लताच्या पुढे दुय्यम स्थानच स्वीकारावं लागलं. आता, लता-आशा या बहिणींचं स्थान भक्कम झाल्यावर त्यांनी दुसर्‍या कुणाला उभंच राहू दिलं नाही, असं म्हटलं जातं. त्यात तथ्य असो वा नसो, लताच्या गायकीला न अनुसरता कुणी नवी गाणारी गातेय, असं होण्याची शक्यता उरली नाही, हे खरं. त्यासाठी लताचं गाणं थांबावं लागलं; इतकंच नाही, लताची छाया असलेल्या अलका याज्ञिकच्या गाण्याने कान किटून थेट फ्यूजन संगीताचा वेगळा बाज आणणार्‍या रेहमानचं आगमन व्हावं लागलं.

यांच्यात मुबारक बेगम कुठे बसते? प्रामाणिक उत्तर द्यायचं तर बसत नाही. तिचा आवाज असा, की तो लताच्या गायकीचं अनुकरण करू शकत नाही. जीवनाची मजा वैविध्यात असते, असं किती जरी म्हटलं; तरी लता-आशा यांच्यातल्या वैविध्यात इथल्या संगीतकारांची आणि श्रोत्यांची हौस जणू पूर्णपणे फिटली. इतर गायिकांच्या एखाद्‍ दुसर्‍या गाण्यामुळे या विधानाला बाधा येत नाही. तरी असं होतंच की एखादं गाणं त्या वेळच्या प्रसंगामुळे, त्यातल्या शब्दांमुळे, चालीमुळे मनात अडकून पडतं आणि आपोआप गाण्याच्या आवाजाची स्मृतीसुद्धा मनात एक खास स्थान धरून बसते.

याचं ऑल टाइम थोर उदाहरण म्हणजे ’कभी तनहाइयोंमें हमारी याद आयेगी’. या गाण्याच्या थोरवीबद्दल नवीन काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही; ऐकावं आणि मान झुकवावी. (वा झुकवू नये. मान झुकवणं मान्य नसल्यास पुढचं वाचू नये! कारण ते जगाला मान्य आहे, असं गृहीत धरून पुढचं लिहिलं आहे). भुताटकीचं गाणं आहे. ’ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनिया; न फिर तू जी सकेगा और न तुझको मौत आयेगी’ या भयंकर शापवाणीला इतकी अनुरूप चाल लावणार्‍या स्नेहल भाटकरला वंदन असो. असं वाटतं, मुबारक बेगमने काय वेगळं गायलंय हे गाणं? या गाण्यातली खास तिची काँट्रिब्यूशन म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे ’ये बिजली राख कर जायेगी’ म्हटल्यावर ’तेरे’ म्हणताना तिचा आवाज फाटल्यासारखा होतो. वाटतं, शाप देणारीला काय पराकोटीच्या वेदना होताहेत शाप देताना! शापाचा एक हिस्सा तिने स्वतःच्या दिशेनेदेखील रोखला आहे! मुबारक बेगमचा आवाज या तिखट तळतळाटाला एकदम फिट बसला आहे. तिची निवड करणार्‍या स्नेहल भाटकरला धन्यवाद द्यायला हवेत. या गाण्यावर मुबारक बेगमचाच स्टॅम्प आहे. (असतो. प्रत्येक गाण्यावर एकेकाचा स्टॅम्प असतो. ते कधीतरी नंतर) ही चाल आणि तिचा आवाज एकमेकांना भेटण्यासाठीच जन्माला आले जणू. (https://www.youtube.com/watch?v=rpYFab53aqM)

पण मग कुठेतरी वाचायला मिळतं, की स्नेहल भाटकरला हे गाणं लताकडूनच गाऊन घ्यायचं होतं; पण योग आला नाही. मग वाटतं, धन्यवाद लताला द्यायला हवेत की तिने हे गाणं सोडलं! असेना लता थोर; हे गाणं लता गाते आहे, अशी कल्पना करताच येत नाही.

मुबारक बेगमचा आवाज गरतीपणापेक्षा बैठकीला जवळचा आहे. तरी त्या आवाजात एक निरागस हरलेपणाचा भावसुद्धा आहे. ’तुम्हारा दिल मेरे दिलके बराबर हो नही सकता, वो शीशा हो नही सकता, ये पथ्थर हो नही सकता; हम हाले दिल सुनायेंगे, सुनिये के न सुनिये’ या गाण्यात सामान्य गणिकेच्या आवाजाला असाव्यात तशा मर्यादा तिला असल्यासारखं वाटत गाण्याची सुरुवात होते. पण त्यामुळे गाणं खाली येत नाही; ती मर्यादा त्या गाण्याच्या, त्या वेळच्या प्रसंगाच्या आशयाचा भागच असल्यासारखं वाटतं. म्हणजे पुन्हा संगीतकार सलील चौधरीचेच मार्क वाढतात! गाणं ’हम-’ वर थबकतं आणि लगेच ’हाले दिल सुनायेंगे’ हे शब्द येताना वाजणारा ढोलक आवाजाला मागे सारतो. चित्रपटातल्या बाकी सर्व (बाईच्या) गाण्यात लता. तीसुद्धा कुठली लता, तर ’बिछुआ’ आणि ’जुल्मी संग आँख लडी’ वाली! त्या मस्तवाल उग्रनारायणसिंहाच्या मैफिलीतलं मुबारक बेगमचं गाणं पूर्णदेखील होत नाही, इतकं ते कमी दखलपात्र. पण तिचा आवाज या सगळ्या माहोलात नेमका बसतो आणि गाणं मनात जागा बनवतं. (https://www.youtube.com/watch?v=Fv6-VaS3oGs)

’देवदास’मधलं तिचं गाणं - ’वो न आयेंगे पलटकर’ हे याला पूर्ण न होण्याच्या गुणधर्मामुळे एका परीने समांतर; पण इफेक्ट वेगळा. चंद्रमुखीचा निरोप घेऊन देवदास कायमचा सोडून चालला आहे आणि पार्श्वभूमीवर मुबारकच्या आवाजातलं हे गाणं अंधुक ऐकू येतं आहे: "नाही येणार तो!" नीट लक्ष दिलं नाही, तर गाण्याचे शब्द धड ऐकूही येणार नाहीत. आणि ऐकू आले नाहीत तरी प्रसंग पुरेसा बोलका आहे. शब्द ऐकू आले तर चंद्रमुखी नव्हे; तिच्यासारख्या नाच-गाणी करणारींचा, वेश्यांच्या मनचा दर्दच जागतो. त्यांच्याकडे इतके येतात आणि जातात. काही पुन्हा पुन्हा देखील येतात. पण नातं असतं ते तेवढ्यापुरतंच. येणारा नाच बघायला, गाणं ऐकायला, मन रिझवायला, शरिराची भूक भागवायला येतो. त्यापलिकडे त्याने यावं, अशी आस मनी उपजल्यास हेच उत्तर - वो न आयेंगे पलटकर उन्हे लाख हम बुलाये! समाजातल्या खालच्या स्तरातलीची आस ही अशी मुबारक बेगमच्या आवाजातच व्यक्‍त व्हावी जणू. (https://www.youtube.com/watch?v=0uOD04nHurA)

मुबारक बेगम एक नंबरची गायिका नाही, तिचा आवाज मेनस्ट्रीम नायिकेला शोभत नाही; या सर्वमान्य विधानाला एकच अपवाद. आश्चर्य म्हणजे तो अपवाद कोणाचा; तर चित्रपटातल्या तीन वेगळ्या बायकांना एकच आवाज देणार्‍या, लताचे जवळपास गुलाम होऊन गेलेल्या शंकर-जयकिशनचा. हे कसं घडलं, योजून घडलं की योग आला; माहीत नाही. पण ’मुझको अपने गले लगालो’ हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीमधलं मेनस्ट्रीम गाणंच आहे. महम्मद रफीबरोबर गाताना मुबारक बेगमचा आवाज जराही बिचकत नाही, दुय्यम ठरत नाही, त्याच्या मागे मागे जात नाही. त्या आवाजात लाडिकपणा सापडतो, सेक्सीपणा सापडतो आणि शंकरजयकिशनी स्मार्टपणा तर सापडतोच सापडतो. त्यात हे गाणं ठेक्याचं, उडतं नाही; ते नीट मेलडीवालं आहे. चटकदार आहे; गोडही आहे. (https://www.youtube.com/watch?v=D7vA3gKYIvA)

राहून राहून आश्चर्य वाटतं, हे कसं झालं असेल? शंकरजयकिशनला मुबारक बेगम मेनस्ट्रीमसाठी आवश्यक अशा बरोब्बर नेमक्या सुरात, भावनेत कशी वाजवता आली? जे बाकी कोणीच केलं नाही? ग्रेट! त्या काळात काही कारणांमुळे लता रफीवर रागावली होती आणि त्याच्या बरोबर गात नव्हती. पण तिच्या दुर्दैवाने तो काळ फारच नायकप्रधान मांडणीचा, शम्मी कपूरवाला होता. लता रफी एकत्र न गाण्याने रफीचं काहीएक नुकसान झालं नाही; उलट इतर गायिकांना संधी मिळू लागली. त्यातलंच हे एक गाणं. कधी कधी वाटतं, भांडण थोडं लांबायला हवं होतं! आपल्या कानांचं थोडं भलं झालं असतं! शंकरजयकिशनने नंतर मुबारक बेगमला घेतल्याचं माहीत नाही!

Friday, July 1, 2016

माझे ’अलौकिक’ अनुभव

सतीश तांबेने साक्षात्काराची कळ लावली आणि पुढे घनघोर चर्चा झाली. त्याचा एकूण अविर्भाव आणि अधल्या मधल्या कॉमेंटींना उत्तर देतानाची शब्दयोजना; यांच्यामुळे चर्चा रुळावर राहिली, पांचटपणाकडे घसरली नाही. मीसुद्धा हात धुवून घेतले. ’हात धुवून घेतले’ असं म्हणायचं कारण, मला असल्या विषयावरच्या चर्चा पूर्ण फिजूल, वांझ वाटतात. तरीपण काहीतरी लिहावंसं वाटलं. आणि चर्चा थिल्लर नसल्याने संयमपूर्वक लिहावं लागलं.

असो. पण यामुळे मलाच आलेले काही अनुभव आठवले! त्यातला एक मला स्वतःला साक्षात्कारी वाटतो. तो शेवटी सांगतो. अगोदरचे दोन जास्त इंटरेस्टिंग आहेत.

गोष्ट जुनी आहे, लग्नाअगोदरची. चरस घेण्यात अप्रूप राहिलं नव्हतं पण त्या दिवशी मला लागला. उभं रहाणं सोडा, डोळे उघडे ठेवणं अशक्य झालं. दुपारी लंचटाइममध्ये केलेले उद्योग. माझ्या सांगण्यावरून मला बागेत आडवा सोडून मित्र निघून गेला. मी पडून.

आपली शुद्ध हरपली होती, हे मला शुद्ध येऊ लागल्यावर कळलं. काय तो अनुभव! सुरुवात झाली ती एका संपूर्ण nothingness मधून. प्रकाश नाही, ध्वनी नाही, काही नाही. ज्ञानेद्रियाद्वारे कसल्या अनुभूतीचं ग्रहणच नाही. अर्थात अस्तित्वाची जाणीवही नाही. शून्य.

मग मला त्वचेवर अगदी अस्पष्ट, हळुवार, सुखद झुळूक जाणवू लागली. वार्‍याची झुळूक. अस्पष्ट. सुखद गारवा. तोपर्यंत मी ’मी’ नव्हतो. मी असं काही नव्हतं. त्या झुळुकीने मला अस्तित्व दिलं. तरी ते तेवढंच होतं. मला मन नव्हतं, शरीर नव्हतं, इच्छा-वासना नव्हत्या. त्या मंद, सुखद गार, अधून मधून येणार्‍या झुळुकीचा अनुभव घेत मी नुसता होतो.

मग तशाच प्रकारे गुपचुप आवाज आले. संगीत. अनाहत संगीत. अमुक असं कुठलं वाद्य नाही. पण पक्ष्यांचे आवाज होते. तेसुद्धा अस्फुट. दुरून येणारी चिवचिव जशी. कोकिळा अजिबात नाही.

मग प्रकाश आला. रंग आले. हिरवळ आली. निळं, ढगाळ आकाश आलं. मी त्या अवकाशात होतो; पण खाली किंवा वर असा काही नव्हतो. आणि तिथे मनुष्यप्राणी नव्हता. प्राणीच नव्हता. गंधाचं काय ते आता आठवत नाही. पण हे असं चालू राहिलं आणि कुठल्यातरी क्षणी मला आवाज ओळखू आले. तेव्हा कुठे त्या अनुभवात पहिल्यांदा शब्द आले. मग मात्र भराभर माझी जाणीव जागी होत गेली आणि मी डोळे उघडले.

गवतात आडवा होतो. डोळ्यांजवळ गवताची पाती होती. अतीव आनंदाचा अनुभव घेतल्याची भावना होत होती. तो अनुभव संपला, आपण पुन्हा जगण्याच्या जाणिवेत आलो, याचं दुःख होत होतं.

माझा अनुभव मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो शतांशानेही आलेला नाही. त्या अनुभवात तपशील, असं काही नव्हतं; त्यामुळे ते आठवण्याचा प्रश्न नाही. पण ती अस्तित्वशून्य शांतता मला पक्की आठवते.

काय़ अर्थ लावावा याचा? सोपं उत्तर म्हणजे मला स्वप्न पडलं. मी माझ्याशी म्हणतो की मी मेलो आणि परत आलो. माझ्या स्वतःसाठी ती अनुभूती इतकी प्रत्ययकारी होती की माझ्यापुरती मला काहीही शंका नाही. आणि म्हणून मला चक्क माहीत आहे की मला स्पर्श, ध्वनी आणि प्रकाश यांच्यामधून जे स्वर्गीय सुंदर वातावरण जाणवलं, ते म्हणजे मेल्यानंतरचा स्वर्ग नव्हे. ते मृत्यूच्या अलिकडचं आहे. मृत्यू म्हणजे पूर्ण शांतता. मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता. मृत्यू म्हणजे विश्व नामक अस्तित्वात संपूर्णपणे विलीन होणे. न-असणे.

पण त्या अनुभवाने जरी मी थक्क झालो, मला निखळ, आशयशून्य आनंदाचा दुथडी भरून अनुभव जरी मिळाला, तरी मी एक टक्कासुद्धा जास्त शहाणा झालो नाही. मला काय झालं हे मी मित्राला सांगायचा प्रयत्न केला. काय सांगू, किती सांगू असं झालं आणि काहीच सांगता येत नाही, असंही झालं. आज मला त्याची आठवण अशी येत नाही. कारण ’हे असं काही तरी असतं,’ या सदैव जागृत ज्ञानासह मी जगत आलो आहे.


दुसरा अनुभव इतका नाट्यपूर्ण नाही. मध्ये बरीच वर्षं गेली. माझा गडचिरोलीचा मुक्काम संपत आला आणि मला जाणवलं की मी आसपासचा परिसर अजिबात बघितलेला नाही. मग मी एकदा हेमलकसाला जाऊन आलो. आणि मग जुजबी चौकशा करून थोडक्या अंतरावरची राज्याची सीमा ओलांडून मध्य प्रदेशात (आता छत्तीसगड) जायचं ठरवलं. राजनंदगाव. त्याच्याजवळचं डोंगरगाव. तिथली देवी.

गेलो. राजनंदगावला पोचलो. गडचिरोलीतले रस्ते गुळगुळीत होते. सीमा ओलांडल्याबरोबर ते एकदम बेकार झाले. माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेळ लागला. डोंगरगावला ट्रेन जात होती. मला एक गाडी मिळू शकत होती. तिला खूप वेळ होता म्हणून मी बीयर प्यायचं ठरवलं. गडचिरोलीत दारूबंदी. राजनंदगावात नाही. चला, साजरं करूया.

एका बारमध्ये गेलो. किंग फिशर ही एकच बीयर होती. पण स्ट्राँग होती. मला स्ट्राँग मुळीच नको होती. मी बार बदलला. तिथेही तेच! तिसर्‍यांदा तसं झाल्यावर विचारणा केली. तर कळलं की तिथे स्ट्राँग बीयरची फॅक्टरी आहे म्हणून ती मुबलक मिळते; पण फक्‍त तीच मिळते.

आलिया भोगासी ... असं म्हणत स्ट्राँग मागवली. पण च्यायला उभ्या हयातीत कधी बियरच्या एका बाटलीवर थांबू शकलेलो नाही, ते तिथेही शकलो नाहीच. परिणामी शेवटची गाडी गेली. दोन स्ट्राँग बीयर मला चढली. एकट्याने प्यायलो म्हणून असेल किंवा पुष्कळ दिवसांचा उपास सोडला म्हणून असेल पण मला धड चालता येईना. जेवतो कसला, स्टेशनच्या आवारातल्या एका झाडाच्या पारावर आडवा झालो तो झोपच लागली.

सकाळी जाग आली तेव्हा मनाशी चडफडत होतो. ’आता गाडी उशीरा, ती पकडून वर जाऊन हिंडून फिरून परत येऊन गडचिरोली गाठणं शक्य नाही, आणि परत तर जायलाच पाहिजे, हे काय झालं, बीयर नडली,’ वगैरे. तोंडावर पाणी मारून चहा प्यावा म्हणून उभा झालो.

आणि कल्पनातीत थक्क झालो. मी चक्क डोंगरगाव स्टेशनात होतो!

कसा आलो? ट्रेन पकडली? कुठली? ट्रेनमध्ये कसा चढलो? खिशात तिकीट बिकीट मुळीच नव्हतं. मला नीट आठवत होतं की मी खालच्या स्टेशनच्या आवारात एका झाडाखाली बसून ’आता काय करावं?’ असा विचार करत होतो. नकळत आडवा झालो आणि पुढची जाणीव ही आत्ता सकाळी उठल्याची.

मग वर कसा आलो? एकटाच तर आहे. दुसर्‍या कोणी आणलं असणं शक्य नाही. खूप डोक्याला ताण दिला. काहीही आठवलं नाही. नाही, हे बरोबर नाही. नीट आठवलं की आपण खालच्या स्टेशनवरच बसल्या बसल्या आडवं होऊन झोपलो.

आता हे काय आक्रीत?

चहा प्यायलो आणि देवळाकडे गेलो. परिसर बरा होता. देवळात देवीच्या दर्शनाला मोठ्ठी रांग होती. तिथपर्यंत जात असताना मनात आलं की देवीने आपल्याला वर आणलं. हा काही तरी संकेत आहे. आता देवीचं दर्शन घेणं भाग आहे.

पण खरं सांगतो, ती लाईन बघून माझा मूड गेला. एवढी होती देवीची इच्छा तर तिने मला देवळात लवकर प्रवेश मिळवून देण्याचीदेखील व्यवस्था करायला हवी होती, असं म्हणून मी देवळात न शिरताच परतलो.

पुढे काही नाही. हे इतकंच.


तिसरा अनुभव थेट साक्षात्काराचा. पण या दोन अनुभवांच्या तुलनेत अगदी मिळमिळीत. तो क्षण मला अगदी नीट आठवतो. वरच्या दोन अनुभवांच्या मधला काळ. नोकरी सोडली होती आणि काहीच करायचं ठरवलं नव्हतं. पूर्ण अनिश्चित. बायकोभरोसे (ती नोकरी करत होती). तर मी मुतारीत शिरलो आणि चक्क सू करताना मला लख्ख लक्षात आलं की पैसे मिळवण्याचा आणि अक्कल असण्याचा, अंगी हुन्नर असण्याचा, कष्ट करण्याचा काही एक संबंध नाही. दुनियेला जे हवं आहे, ते दिलं की दुनिया पैसे देते. लता मंगेशकरला देते आणि सिगारेट कंपनीलाही देते. या पलिकडे कसलंही गणित नाही. काही चांगलं वाईट नाही. उगीच अन्याय बिन्याय असलं काही चिकटवू नये. ’त्याच्या बुद्धीचं चीज झालं नाही,’ म्हणू नये. आणि अर्थात पैसे मिळवण्यावरून जगात कोणाचीही किंमत करू नये.

याचं लॉजिक मी नंतर रचलं. पण जेव्हा हे कळलं, ते आतून कळल्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी अजिबात शंका नव्हती. ज्ञान होणं आणि माहिती असणं यातला फरक इथे असतो. माहिती विसरते, कमी जास्त होते, ज्ञान एकदा झालं की भागच होतं अस्तित्वाचा. सायकल शिकल्यासारखं. पण हे ज्ञान असं घट्ट ठसल्याचा परिणाम पुढे अनेक वर्षांनी जेव्हा जाहिराती, मार्केट यांची ओळख झाली तेव्हा जाणवला. हे हरामी गरज मॅन्युफॅक्चर करतात! आणि ती पुरवून पैसे करतात. याचा मला भयंकर राग आला. निसर्गाला धंद्याला लावण्याइतकं हे बेकार वाटलं.

पण ते पुढचं. साक्षात्कार तो तेवढाच. त्याला इंट्यूशन म्हणयची मुभा तुम्हाला आहेच. मनाच्या आत चालू असलेल्या मंथनाचं नवनीत अचानक उसळलं आणि मी त्याला साक्षात्कार म्हणालो.

असेल. तसंही असेल. सगळ्या साक्षात्कारांचंसुद्धा तसंच असेल.

Wednesday, June 15, 2016

मधुमेहावर शस्त्रिक्रियेचा इलाज!



१५ जूनच्या इंडियन एक्स्प्रेसच्या पान ४ वर एक महान बातमी आहे: पोटाचा सुटलेपणा कमी करण्यासाठी असलेल्या ’gastric bariatric शस्त्रक्रियेमुळे मधुमेह आटोक्यात येऊ शकतो! अशी शस्त्रक्रिया झालेल्यांचा अभ्यास केल्यावर त्यातल्या १०० टक्के लोकांमध्ये सुधारणा दिसून आली; ६५ टक्के लोकांना मधुमेहावरच्या औषधांची गरज उरली नाही आणि ते ’नॉर्मल’ प्रमाणात साखर खाऊ शकतील. शस्त्रक्रिया न करता नियमित औषध घेणारे, व्यायाम करणारे व डॉक्टरांनी शिफारस केलेली जीवनशैली अंगिकारणारे यांच्या गटातील ७५ टक्के लोकांमध्ये सुधारणा दिसली. हे ग्रेट आहे!

मधुमेह बरा होतो, असा दावा असल्याने ही बातमी महान आहे, असं मुळीच नाही. बातमी महान असण्याची कारणं अशी:
       अमेरिकन डायाबिटिस असोसिएशनच्या परिषदेत या अभ्यासासाठी ज्यांचा गौरव करण्यात आला, त्या डॉ        शशांक शहा यांनी निष्कर्ष सादर करण्याअगोदर शस्त्रिक्रिया झालेले आणि इतर इलाज करणारे, असे 
       स्पष्ट दोन गट करून ४ वर्षं अभ्यास केला.
       निष्कर्ष जाहीर झाला, गौरवही झाला; संपला अभ्यास, असं म्हणून ते मोकळे झाले नाहीत. बर्‍या झालेल्या        मधुमेह्यांवर लक्ष ठेवून ते परत रोगग्रस्त होतात का, हे तपासण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
       भारत आणि पश्चिमेतले देश, इथल्या लोकांच्या रोगग्रस्ततेमध्ये फरक असतो, असं एक भलं मोठं 
       विधान त्यांनी केलं. (आपल्या अभ्यासक्रमातली सर्व पुस्तकं तिथल्या डॉक्टरांनी, तिथल्या रोग्यांचा 
       अभ्यास करून लिहिलेली असतात आणि आपण बैलाप्रमाणे त्यांना अनुसरून निदान करत असतो, 
       औषधांचं प्रमाण ठरवत असतो आणि समाजातील विविध रोगांचा फैलाव ठरवत असतो. अलिकडच्या 
       काळात दोन वेळा भारतातल्या लोकसंख्येमधील मधुमेह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं. दोन्ही वेळा  
          WHO ने मधुमेहाची व्याख्या बदलली आणि ती आपण स्वीकारली, या एकमेव कारणामुळे! 
       अर्थात मधुमेहावरील औषधांचा खप दोन्ही वेळा प्रचंड वाढला, हे सांगायला नको.)

या बातमीमधून जशी वैज्ञानिक शिस्त दिसते, तसाच विज्ञानाचा नम्रपणासुद्धा दिसतो. या तुलनेत मोदीराज्यात ऊत आलेली आणि whatsapp वर फिरत असलेली ’तुळशीमुळे भूकंप होत नाहीत’ आणि ’गाईच्या मुतात एड्सप्रतिबंधक गुण असतात’, असल्या छापाची विधानं किती भंपक, मूर्ख, उद्धट आणि बेपर्वा वाटतात.

एक्स्प्रेसला बातमीदारी कळते. एक्स्प्रेसची पत्रकारिता वेगळी आहे.

(http://indianexpress.com/article/lifestyle/health/gastric-bariatric-surgery-may-help-diabetics-shows-study-mumbai-2853386/)

Thursday, June 9, 2016

बिग ब्रदर इज वॉचिंग यू!

आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक गूढ बातमी आहे. पान १७ वर. न्यूयॉर्क टाइम्सवरून घेतलेली. बातमी अशी: मायक्रोसॉफ्टच्या शास्त्रज्ञांनी एक पेपर प्रसिद्ध केला, ज्यात त्यांनी पांक्रियाच्या - स्वादुपिंडाच्या - कॅन्सरचं निदान इंटरनेटवर केलेल्या सर्चेसवरून करता येण्याची शक्यता वर्तवली आहे.

http://epaper.indianexpress.com/…/Indian-Exp…/09-June,-2016…

स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं निदान हमखास उशीरा होतं आणि निदान झाल्यानंतर केवळ ३ टक्के रोगी पाच वर्षं जगतात. हे प्रमाण लवकर निदान झाल्यास ५ ते ७ टक्क्यांपर्यंत नेता येईल, असा दावादेखील मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासकांनी केला आहे.

माझ्या एका जवळच्या मित्राला स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याचं निदान उशीरा झालं आणि त्यानंतर दोनेक महिन्यांत तो गेला. म्हणून ही बातमी उत्सुकतेने वाचली. पण जे सांगितलंय, ते पचत नाही. उलट, भलभलते संशय येतात.

एक म्हणजे, इंटरनेटवर कोण काय सर्च करतो आहे, याची आकडेवारी गोळा करताना मायक्रोसॉफ्टच्या तथाकथित शास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं नाही. त्यांच्या व्यवहारांची चिकित्सा करताना त्यांची परवानगी घेतली नाही. हे मुळात बरोबर नाही.

यावर कुणी म्हणेल, इंटरनेटवर सर्च करणे, ही सार्वजनिक क्रिया आहे. तिची नोंद घेतली तर तो गुन्हा नाही. गुन्हा नसणारच. मायक्रोसॉफ्ट गुन्हा करून त्याला अशी उघड प्रसिद्धी देणं अशक्य आहे. पण मुळात मायक्रोसॉफ्टकडे कॅन्सर बिन्सरवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ असण्याचं कारण काय? याचं उत्तर बातमीत सापडतं. डॉ होर्वित्झ नावाची ही व्यक्‍ती मेडिकल डॉक्टर आहे आणि काँप्युटर सायंटिस्टसुद्धा आहे.

दुसरं असं की इंटरनेट सर्च इंजीन वापरणार्‍यांनी घेतलेले शोध आणि त्यांना असलेल्या व्याधी, यांचा संबंध जुळवण्याचं का कुणाला सुचलं? तर, मायक्रोसॉफ्टवाल्यांनी ’हेल्थ अँड वेलनेस डिव्हिजन’ नावाचा एक विभाग अलिकडे बनवला असून त्यात ’चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर ऑफ हेल्थ इंटेलिजन्स’ अशी एक पोस्ट असल्याचंही बातमी वाचून कळतं.

मायक्रोसॉफ्टला हेल्थ अँड वेलनेस विभाग काढून नेट वापरणार्‍यांच्या आरोग्याची उठाठेव करण्याचं कारण? काँप्युटरसमोर बसून डोळे, तंगड्यांचे स्नायू, पाठीच्या कण्याचा खालचा भाग, यांना इजा पोहोचते, इकडे का लक्ष देत नाहीत ते? ते ;वेलनेस’मध्ये येत नाही?

’इंटेलिजन्स’चा अर्थ गुप्‍त(पणे जमवलेली) माहिती. आता, मला तरी स्वच्छ जाणवतं की सर्च इंजीन चालवणार्‍यांनी सर्च इंजीन वापरणार्‍यांविषयी ’इंटेलिजन्स’ जमा करायचं ठरवलं तर ते हेल्थवरून सुरुवात करणार नाहीत. ते इकनॉमिक वा समाजशास्त्रीय वा सर्च करणार्‍याचं सामाजिक प्रोफायलिंग करणारी माहिती अगोदर जमा करतील. जी माहिती जगातल्या सर्व शासनकर्त्यांना आणि मार्केटिंगवाल्यांना आणि मल्टिनॅशनल कंपन्यांना आणि कोणत्याही कारणाने ब्लॅकमेलिंग करणार्‍यांना हवी असते. ’आपल्याकडची माहिती आपण अमेरिकन सरकारला दाखवतो,’ अशी कबुली मायक्रोसॉफ्टच काय, गूगलनेही दिली आहे. आणि यात काहीही गूढ, धक्कादायक नाही. चार वेळा नवीन घरांचा शोध घ्या; तुमच्या इमेल अकाउंटशेजारी बिल्डर लोकांच्या जाहिराती आपोआप येऊ लागतील. टूरिस्ट सर्च करा, टूरिझमवाल्यांच्या जाहिराती येतील. सर्वरवाले आपले सर्चेस पहात असल्याशिवाय हे शक्य नाही.

मग अचानक हेल्थचा पुळका कशाला? याचं उत्तर सोपं आहे. प्रकृतीची चौकशी केली की बरं वाटतं. बाकीच्या चौकशांची संभावना नसत्या गोष्टीत नाक खुपसणे, अशी होते!

आता विचार करा. तुम्ही कशाकशाचा सर्च करता. सर्च तपासता येतो, तर मेल तपासणं अशक्य नाही. तुम्ही कुणाकुणाला मेल करता, मेलमध्ये काय लिहिता, स्वतःच्या कोणत्या गोष्टी उघड करता, याचा विचार करा. त्यातल्या कशाकशावरून तुम्हाला ब्लॅकमेल करणं शक्य आहे, याचाही विचार करा.

पण हे नवीन नाही. वेब सर्चचे लॉग्ज तपासून फ्लूच्या साथीचा शोध लवकर कसा लावता येईल, यावरचा एक पेपर गूगलने तर २००९ मध्येच प्रसिद्ध केला होता. पण त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नव्हतं (ही माहिती याच बातमीत आहे). मला तर वाटतं, हेल्थ इंटेलिजन्स हे थोतांड आहे, आपल्या ’सॉफ्ट’ व्यवहारांची तपासणी करण्याचा तो एक बहाणा आहे. "आम्ही तुमचे सगळे (सॉफ्ट) व्यवहार डोळ्यांत तेल घालून तपासू, कारण त्यामधून आम्हाला तुमच्या आरोग्यासंबंधी लवकर निदान करता येईल." कुणाला Xत्या बनवतात!

’The data used by the researchers was anonymised, meaning it did not carry identifying markers like a user name, so the individuals conducting the searches could not be contacted.' असं एक विधान बातमीत आहे. ’संशोधकांनी वापरलेल्या माहितीमधून ओळख पटवणारे तपशील काढून टाकण्यात आले होते, त्यामुळे प्रत्यक्ष सर्च करणार्‍यांशी संपर्क साधता आला नाही.’ माहिती गोळा झाली तेव्हा तपशील होते. नंतर काढून टाकले. कोणी काढले? मायक्रोसॉफ्टनेच काढले. पण काढल्यामुळे तोटा असा झाला की सर्च करणार्‍यांशी थेट बोलून आणखी काही आरोग्यासंबंधित गोष्टी स्पष्ट करून घेता आल्या नाहीत! बारीक सूचन असं की मायक्रोसॉफ्टचं सर्च इंजीन (बिंग) वापरा कारण ते तुम्हाला गंभीर आजार होणार असल्याची पूर्वसूचना डॉक्टरांच्या अगोदरच देऊ शकतील. आणि तुमच्या इंटरनेटवापरावर बारीक लक्ष ठेवणार्‍यांना तुमचा नावपत्ता माहीत असण्याची मुभा द्या!

मायक्रोसॉफ्ट (वा अन्य कुणी) नेटवापराच्या संशोधनाची व्याप्‍ती केवळ आरोग्यावर लक्ष ठेवण्यापुरतीच राखतील, याची गॅरंटी कोण देणार? माझा मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्सवर विश्वास नाही. माझा जगड्व्याळ बहुराष्ट्रीय कंपन्यांवर विश्वास नाही. माझा अमेरिकन सिस्टीमवर विश्वास नाही. सोशल मीडियामुळे एका बाजूने आपल्याला पंख फुटत असले तरी त्या पंखांमधून एक वेसण घातली आहे, जिच्या नाड्या अदृश्य पण खर्‍या शक्‍तीच्या हाती आहेत आणि ही शक्‍ती सदासर्वदा कनवाळू रहाण्याची काहीही शाश्वती नाही, असं मात्र मला खात्रीने वाटतं.

अधिक प्रकाश पडायला हवा असेल तर नंदा खरेंची ताजी कादंबरी ’उद्या’ वाचा!

Read the full newspaper online, on your smartphone and tablet
epaper.indianexpress.com

Monday, February 29, 2016

ही तर जेमतेम अक्षरओळख!

ग्रॅव्हिटी वेव्ह्ज ही तर सुरुवात आहे. जेमतेम अक्षरओळख आहे. त्या अक्षरांचे शब्द होतील, विधानं होतील त्यातून कविता-कादंबर्‍याही घडतील! जणू एका पोकळीतून विज्ञान बाहेर पडून मोकळं झालं आहे and now the sky is the limit!


फुटलेला फुगा घ्या. सगळ्या बाजूंनी ताणून धरा. एक ताणलेला पृष्ठभाग तयार होईल. आता त्यावर एक गोटी ठेवा. काचेची, दगडी, शिशाची, कसलीही. सायकलचं बॉल बेअरिंगही चालेल. गोटीचं वजन असं हवं की ताणलेल्या पृष्ठभागावर गोटी आहे तिथे खळगा तयार होईल. (वजन इतकं नको, की पृष्ठभाग फाटेल.)

आता कल्पना करा, पृष्ठभागाऐवजी अवकाशच असा ताणलेला आहे. पृष्ठभागावर गोटी ठेवली, की पृष्ठभाग खालच्या बाजूला वळतो, हे दिसतं. अगदी तसाच अवकाशही वळतो, असं मनात धरा. तो कुठल्या दिशेला वळतो, हे विचारू नका; ती दिशा आकळण्याची क्षमता मनुष्याच्या ज्ञानेंद्रियांमध्ये नाही.

पण मनुष्याच्या बुद्धीमध्ये जरूर आहे! मनुष्याच्या बुद्धीने जन्माला घातलेल्या गणितात तर आहेच आहे. माझ्या संवेदनांनासुद्धा हे आकळत नाही; पण मी बुद्धीमधून स्वीकारू शकतो. गणितात हे निश्चित मांडता येतं, हे मला माहीत आहे. तर आपल्या अस्तित्वाला वेढून राहिलेला कालावकाश (या उदाहरणापुरता) त्या ताणलेल्या पृष्ठभागासारखा आहे. सूर्य, तारे, ग्रह किंवा इतर काहीही लहान मोठी वस्तू म्हणजे त्या पृष्ठभागावरच्या गोट्या. एक पटकन कळतं, की गोटीचं वजन जितकं जास्त, तितका पृष्ठभागावरचा खळगा खोल; म्हणजेच पृष्ठभाग सरळ असण्याऐवजी वळलेला असण्याचं प्रमाण जास्त. अगदी हेच नातं अवकाशातल्या वस्तूमधलं द्रव्य आणि त्या वस्तूमुळे तिच्या परिसरातल्या अवकाशावर (खरं तर कालावकाशावर, काळ आणि अवकाश, या दोन्हींवर) होणारा परिणाम, यांच्यामध्ये असतं.

आता विचार करा. एक वस्तू त्या पृष्ठभागावर प्रवासाला निघाली. जोपर्यंत गोटीमुळे झालेला खळगा वाटेत येत नाही, तोपर्यंत वस्तूचा प्रवास सरळपणे, एका गतीने होत राहील. खळगा आला, की ही भटकी वस्तू खळग्यात खेचली जाईल. (खळग्यातली गोटी भटक्या वस्तूपेक्षा खूप मोठी आहे, असं धरा.) जर तिचा वेग जास्त असेल, तर ती थोडी खाली घसरून पुन्हा वर येईल आणि प्रवास चालू ठेवेल. तिचा वेग जर खळगा पार करण्याइतका नसेल तर काय होईल?

ती भटकी वस्तू खळग्यात गोल गोल फिरत खाली जाऊ लागेल! मग तिचा वेग आणि खळग्याची खोली यांच्यात एक शर्यत तयार होईल. वेग जिंकला, तर वस्तू खळग्यात फिरेल, फेरे घालेल आणि वर येऊन (आता वेगळ्या दिशेने) निसटून जाईल. वेग हरला (म्हणजेच गोटी जिंकली) तर गोल गोल फिरत वस्तू गोटीला जाऊन मिळेल!

सूर्य, त्याच्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांच्याही भोवती फिरणारे उपग्रह यांच्या चलनाचं हे वर्णन आहे. ज्याला ’वस्तुमानामुळे निर्माण होणारं गुरुत्वाकर्षण म्हणतात,’ असं आपल्याला न्यूटनने शिकवलं, त्याचा हा वेगळा खुलासा आइन्स्टाइनने केला. संपूर्ण विश्व अशा गोट्यांनी भरलेलं आहे आणि प्रत्येकच गोटी (इतर गोट्यांच्या मध्ये) भटकते आहे आणि प्रत्येक गोटीने स्वतःभोवतीच्या कालावकाशात खळगा तयार केलेला आहे आणि ते खळगे सोबत घेऊनच गोट्या फिरत आहेत आणि लहान मोठ्या गोट्या कधी जवळही येत आहेत आणि त्यांच्या आकारानुसार कधी ग्रहमाला तयार होताहेत, कधी अब्जावधी तारे बाळगणार्‍या दीर्घिकांची टक्कर होते आहे, कधी दोन तारे जवळ येऊन एकमेकांभोवती गरागरा फिरत आहेत ...

प्रचंड वजनाच्या दोन वस्तू या ताणलेल्या पृष्ठभागासारख्या कालावकाशात एकमेकांभोवती वेगाने फिरू लागल्या, तर काय होईल?

जे पृष्ठभागावर होईल, तेच होईल. कालावकाशात तरंग निर्माण होतील. हे तरंग सर्व दिशांनी दूर दूर जात रहातील.

याच तरंगांना आइन्स्टाइन गुरुत्वीय तरंग - ग्रॅव्हिटी वेव्हज म्हणतो. एकाच ठिकाणाहून निघालेल्या असल्या वेव्ह्ज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांमध्ये मिसळल्या, तर विशिष्ट स्वरूपाची नोंद मिळेल. पदवीच्याही अगोदरचं फिजिक्स शिकणार्‍यांना monochromatic light waves मधला interference pattern माहीत असतो, पडद्यावर तो बघताही येतो. तेच, तसंच. आइन्स्टाइनने त्याच्या गणितातून भाकीत वर्तवल्यानंतर बरोबर शंभर वर्षांनी हा अतिसूक्ष्म पॅटर्न टिपण्याची क्षमता मानवी उपकरणांना प्राप्‍त झाली.

आणि ग्रॅव्हिटी वेव्ह्ज टिपण्यात यश मिळाल्याची घोषणा झाली!

दोन भाकितं. काचेतून आवाज जात नाही. भिंतीतून प्रकाश जात नाही. पण गुरुत्वाकर्षण जातं. गुरुत्वाकर्षणाला अडवता येत नाही. म्हणजेच गुरुत्वीय तरंगांना अडवता येत नाही. विश्वाच्या पसार्‍यात कुठून कुठून येणारे हे तरंग जर टिपता आले, वाचता आले, त्यांच्या तीव्रतेचं मोजमाप करता आलं, तर विश्वाच्या आरपार ’बघता’ येईल! आजवर आवाक्याबाहेर असलेलं माहीत करून घेता येईल.

ही तर सुरुवात आहे. जेमतेम अक्षरओळख आहे. त्या अक्षरांचे शब्द होतील, विधानं होतील आणि त्यातून कविता-कादंबर्‍याही घडतील! जणू एका पोकळीतून विज्ञान बाहेर पडून मोकळं झालं आहे and now the sky is the limit!

किती रोमांचक आहे हे. किती आश्वासक, किती सुंदर. यापेक्षा सुंदर काही असेल का?

दुसरं भाकीत कोणतं? या शोधाला नोबेल न देण्याइतकी नोबेल प्राइज कमिटी दळिद्री असेल असं वाटत नाही! फारतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी वर्ष दोन वर्षं थांबतील. पण या शोधावर नोबेलचं नाव लिहून झालेलं आहे.