Monday, April 21, 2014

तथाकथित धर्मनिरपेक्षवादि - बुद्धिवादी - प्रगतीवादी - वगैरे


काय दिवस आलेत! ब्लॉगवर काहीतरी चर्चा, विश्लेषण, रसग्रहण असायला हवं. हे करताना "माझ्या ब्लॉगवर मी कितीही वेळा ’मी’ म्हणीन!" असा पोरकटपणा करण्याची मोकळीक हवी. पण हे असलं काही तरी टाकावं लागतं.

एक मेल आली. साताठ मुसलमान पुढार्‍यांची आक्रस्ताळी आणि सवंग वक्‍तव्यं अटॅच करून
"भारतीय मुसलमानांची बाजू घेणाऱ्या  तथाकथित धर्मनिरपेक्षवादिंना या विषयी काय म्हणावयाचे आहे ?"
असा भयंकर गंभीर प्रश्न विचारणारी. कोणाला तरी विचारून मला माहितीसाठी पाठवलेली नव्हती ही मेल. फक्‍त मलाच होती. म्हणजे, तसं तिचं रूप होतं. दहा राजकीय / सामाजिक व्यक्‍तींना विचारून मला त्याची कॉपी पाठवली असती, तर मी कंटाळून दुर्लक्ष केलं असतं. पण मी सोडून आणखी कोणाचं नावच नाही! हे खोडी काढणं झालं. म्हणून त्याला उत्तर दिलं. ते हे असं:

मी स्वतःला ढोबळ अर्थाने मानवतावादी मानतो आणि मानवतावादाचा एक भाग म्हणून धर्मनिरपेक्ष असणे कर्तव्य समजतो. तेव्हा तथाकथितधर्मनिरपेक्षवादींना (हा दीदीर्घ हवा; पण होते चूक घाईघाईत किंवा कसल्याशा आवेगात. आणि ते नसलं माहीत, तरी बिघडत नाही.) केलेलं आवाहन मला लागू पडत नाही. शिवाय हे आवाहन "मुसलमानांची बाजू घेणार्‍या धर्मनिरपेक्षवादिंना" उद्देशून आहे. हा तर मी नव्हेच. तरीपण दिवसेदिवस अधिकाधिक उर्मट, उद्धट होत चाललेल्या सर्व धर्मरक्षकांना पण माझ्या दृष्टीने धर्मलंडांना (हा शब्द माझा नव्हे. माहीत नसेल, तर शब्दकोश पहावा.) काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. (वास्तविक याचा काही उपयोग नाही, कारण तेच तेच असत्य वारंवार बोलत रहाणे, या तंत्रावर उत्तरं आणि खुलासे, यांचा परिणाम होत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे: Call a dog mad and shoot him. मुद्दा shoot him असतो. त्यासाठी कुत्र्याला वेडा ठरवणं क्रमप्राप्‍त असतं. मग तो वेडा असो वा नसो. ही पुन्हा पुन्हा केली जाणारी तथाकथितवगैरे काव काव त्या माथेफिरू हिंसेचीच तयारी असते.)

१. हिंदू आणि मुसलमान, दोन्हींमधले धर्मवेडे एकमेकांचे हितसंबंध सांभाळत असतात. हिंदू धर्मवेड्यांनी डरकाळ्या फोडल्या, की सर्वसामान्य मुसलमान घाबरून एकगठ्ठा त्यांच्या धार्मिक पुढार्‍यांकडे जातात - कारण हा शिंपी आहे, की कारकून की मराठी की उंच की गोरा की स्त्री की पुरुष की गरीब की श्रीमंत या सगळ्या भेदांना बाजूला सारून त्याची एकच एक ओळख ठरवली जाते: मुसलमान. तेच उलट. कुणी धर्मवेडा मुसलमान मौलवी काही बरळला; की सर्वसामान्य हिंदूला न होता शिवाजी, तो होती सुंता सबकीअशी आचरट आणि धडधडीत खोटी भीती दाखवता येते.

२. जवाहरलाल नेहरू कधीही देवळात जात नसत. त्यांनी कुठल्याही धर्माच्या पुढार्‍याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं टाळलं. हे इंदिरा गांधींनी सुरू केलं. ते चूक होतं. राजीव गांधींनी अयोध्येच्या विवादात अडकलेल्या मंदिराचं दशकानुदशकं बंद असलेलं कुलूप उघडलं, हे सुद्धा चूक. शहाबानो खटल्याच्या निकालानंतर केलेली कायदादुरुस्ती चूकच.
हिंदू नसलेल्या कोणालाही समान नागरिकत्व मिळू नये, असं म्हणणारे गोळवलकर गुरुजी चूक की बरोबर? ते चूक नसतील, तर "सत्ता प्राप्‍त झाल्यावर आम्ही त्या आशयाची घटनादुरुस्ती करू" असं स्वच्छ न सांगणे हा भ्याडपणा नव्हे का? मग असल्या भ्याडांना "तथाकथित हिंदुत्ववादी" म्हणावं का? असल्या भ्याड कुत्र्यांची स्थिती आज ना उद्या "न घरका ना घाटका" अशी होण्याची शक्यता नाही का? (इथे "कुत्रा" हा शब्दप्रयोग म्हणीला अनुलक्षून आहे. त्या भ्याडांच्या वृत्तीला अनुलक्षून नव्हे.)

३. एखाद्या बलिष्ठ विरोधकाच्या वा प्रतिस्पर्ध्याच्या दहशतीने वा दडपणाखाली संघटना वा टोळी बांधली जाते. टोळीचा नायक सोडून टोळीतल्या सर्वांच्यात सामायिक काय असेल, तर विरोधी बळाची भीती. नायकाचे हेतू अर्थात वेगळे असू शकतात. कामगार संघटना ते शिवसेना यात मोडतात. या न्यायाने हिंदूंमधल्या काही माथेफिरूंच्या आक्रमक अविर्भावाला घाबरून काही मुसलमानांनी टोळी / संघटना बांधण्याचा प्रयत्न केला, तर ते निदान तर्काला धरून असेल; पण ८०% पेक्षा जास्त संख्या असताना सर्व हिंदूंची एक टोळी बांधण्याचं प्रयोजन काय? त्यांना घाबरवून सोडण्याचे प्रयत्न करण्याचं कारण काय? नायकाचे अंतस्थ हेतू? की नायकच paranoia चा पेशंट असणे? सा‍र्‍या हिंदूंचे हितसंबंध मुळीच एक नाहीत, हे तर (डोक्यात paranoia ने थैमान न घातलेल्या) कोणालाच अमान्य होणार नाही.

४. गेल्या कित्येक वर्षांपासून नुसता मुजराहा शब्दप्रयोग मराठी भाषेच्या बाहेर फेकला गेला आहे. तो एक तर त्रिवार मुजराअसावा लागतो नाही तर मानाचा मुजरा’. तसंच हे तथाकथित धर्मनिरपेक्षवादीअसावं. हा शब्दप्रयोग करणारे जर पोपटपंची करत नसून त्यांना खरंच नुसते धर्मनिरपेक्षवादी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी यात काही फरक अभिप्रेत असेल, तर कृपया तथाकथित नसलेले धर्मनिरपेक्षवादी कोणाला म्हणावं, हे स्पष्ट होईल का? ही प्रामाणिक विनंती आहे. तिचं समाधान अपेक्षित आहे. नाही तर हिंदुत्ववाद्यांच्यात केवळ तथाकथित बुद्धिवादीच असतात, असं म्हणावं लागेल.

५. येवढं झाल्यावरही "पण यात या मुसलमानी वक्‍तव्यांचा निषेध कुठे आहे?" असा तथाकथित चतुर अविर्भाव घेता येतो. तर एक कायमची दवंडी पिटतो: तोंडी तलाक, बुरखा, एका पुरुषाला चार बायका करण्याची मुभा, वगैरे मागास प्रथा आहेत. त्यांचा संबंध प्रेषिताशी लावणे, ही लबाडी आहे. अस्पृश्यता, सती, केशवपन, अल्पवयीन मुलीशी विवाह, विधवाविवाह, पैतृक संपत्तीवर मुलीचा हक्क असणे, स्त्रीशिक्षण, वगैरे वगैरे सर्व संदर्भात रूढी मोडताना आणि प्रगतीशील कायदे करताना त्या त्या काळच्या हिंदुत्ववाद्यांनी जोरदार विरोधच केला होता. म्हणजे जे कोणी हिंदुत्ववादी स्वतःला प्रगतीशील म्हणवतात, ते इतिहासाच्या साक्षीनुसार तथाकथित प्रगतीशीलच असतात, हे काही अ-प्रगतीशील व असहिष्णू मुसलमानांच्या वक्‍तव्यांवर आक्षेप घेणार्‍यांना सांगावंसं वाटतं.

५. हे शेवटचं. मेल कुणाला तरी असते. मग तिची कॉपी आणखी कुणाला तरी असते. त्यानंतर मग हा पत्रव्यवहार कुणाच्या तरी माहितीसाठी BCC केला जातो. एकालाही न संबोधता सगळी डिलिव्हरी थेट BCC करण्याची आयडिया मला अलिकडेच कळली. हा मजकूर ज्याला ज्याला पाठवला, त्यापैकी कोणालाही तो आणखी कोणाला पाठवला, हे कळू नये, हा यामागचा उद्देश असतो. आता, हा तथाकथित वाला आक्षेप मी सोडून कोणाकोणाच्या कानावर घातला हे माझ्यापासून लपवण्याचं कारण कळू शकेल काय? इथे मात्र उत्तराची अपेक्षा नाही. न कळवण्यामागे काही तरी न सांगण्याजोगी - किंवा लपवण्याजोगी - अडचण असेल, हे मी समजून घेईन. मला मात्र यात काही खाजगी, वैयक्‍तिक दिसत नाही. उलट, स्वतःची भूमिका सार्वजनिकपणे मांडण्याची संधी दिसते. तर मुळातली मेल आणि हे माझं उत्तर, दोन्ही मी फेसबुकावर आणि माझ्या ब्लॉगवर टाकत आहे.