Saturday, May 9, 2015

पराचा कावळा




खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खूपच. नोकरी लागली होती आणि लग्न झालं नव्हतं, त्या काळातली. खिशात पैसे असायचे आणि डोक्यावर जबाबदारीची जाणीव नव्हती, तेव्हाची. पैसे खर्च करायला शिकल्यानंतरची. तेव्हा आम्ही जवळ जवळ दर शनिवारी दुपारी बियर प्यायचो. त्रिकोण करत. म्हणजे, एक नंतर तीन. कोणी चौथी मागवली, की एकूण सहा बाटल्या संपवाव्या लागायच्या. एक, दोन-एक, तीन-दोन-एक, मग चार-तीन-दोन-एक; बाटल्या त्रिकोणात मांडता आल्या पाहिजेत. कोरम मोठा असायचा. जमवायचो त्रिकोणाचं. माज होता.

एकदा पिऊन काळोख पडल्यावर फिरत फिरत फोर्टातून मरीन ड्राइव्हवर गेलो. चालत चौपाटी. बांधावरून चालताना माझा तोल गेला आणि मी वाळूच्या दिशेने कलंडलो. की उतरलो वाळूकडे, आठवत नाही. टाइट नव्हतो; पण हल्लक होतो आणि मस्त वाटत होतं.

तर ती जागा होती मफतलाल स्विमिंग पूलच्या दक्षिणेला जो वाळूचा तुकडा वेगळा झालाय, ती. पडताना मला कळलं, की मी वाळूत पडत नसून एका तंबूच्या कॅन्व्हासवर पडतो आहे. बांधाला लागून तिरका आडोसा केला होता कुण्या बेघराने. त्या तंबूवर माझा पाय पडला आणि तंबू फाटला किंवा गाठ सुटली. मी आत. धडपडत. कसातरी तोल सावरत.

आत मिणमिणता उजेड. मी जिथे लँड झालो तिथे शेजारी एक बाळ झोपलेलं. त्याच्या जवळ बाळाची आई. ती किंचाळून उठली. पुरुष धावत आला. माझी घाबरगुंडी उडाली. त्यांचीसुद्धा उडाली. "ही काय तंबू बांधून झोपायची जागा आहे?" असं काहीतरी उसन्या अवसानाने गुरकावत मी बाहेर पडलो आणि मित्रांबरोबर शक्य तेवढा तिथून लांब गेलो. माझ्या मागे कुणीही आलं नाही आणि प्रसंग तिथेच संपला. मी विसरूनही गेलो.

काल आठवलं.

काय केलं असतं मी, जर माझं वजन त्या बाळावर पडलं असतं, तर? किंवा त्या बाईवर पडलं असतं तर? तिथे बर्‍यापैकी अंधार होता आणि मला ते कापड अजिबात दिसलं नाही. मी काय जाणून बुजून निर्दाळला नाही तो बुटका, गरीबडा तंबू! अपघातच होता तो.

तरी पण काय केलं असतं मी जर काही भलतं घडलं असतं तर? मला सांगता येत नाही. विचारच करता येत नाही. कल्पनाशक्‍ती लुळी पडते. चित्र रंगवण्यापर्यंत रेटता येत नाही. काय केलं असतं मी, या प्रश्नाला नुसती थिऑरिटिकल उत्तरं. मला आतून पटेल, असं एकही उत्तर नाही. अशी वेळ कोणावरही येऊ नये, की आपलं आपल्यालाच सांगता येत नाही, आपण नक्की काय केलं असतं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असं मी स्वतःविषयी म्हणतो. बहुधा नीट, शहाणा वागलो असतो, असं नंतरच्या जगण्याचा दाखला देऊन म्हणू शकतो; पण ते खरं नाही. एका क्षणावर जेव्हा निर्णय तोललेला असतो, तेव्हा काय होईल हे नाही येत सांगता. त्या वेळी तंबू सोडून निघूनच गेलो होतो, थांबलो नव्हतो!

आज हे का आठवलं, याचा खुलासा करण्याची गरज नसावी. असले अनुभव बोलती बंद करतात. वडाची साल पिंपळाला लागते आणि पराचे कावळे होतात. दगड उचलण्याचा अधिकार मला नाही, एवढं मात्र नक्की कळतं. इतरांचं माहीत नाही. पण चाललेल्या गदारोळात हे सांगून टाकणं भाग आहे.

Sunday, May 3, 2015

महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे



बाबासाहेब पुरंदर्‍यांशी माझी ओळख पु ल देशपांड्यांनी करून दिली. ’गणगोत’मधून. पु लंच्या ’गणगोत’मध्ये बाबासाहेबांचं व्यक्‍तिचित्र आहे. वाचून अनेक वर्षं लोटली; पण दिनेश, ऋग्वेदी, रावसाहेब ही व्यक्‍तिचित्रं नीट आठवतात. तसेच बाबासाहेब. ते वाचून मला कळलं, बळवंत मोरेश्वर पुरंदरे तरुणपणातच ’बाबासाहेब’ झाले. वयपरत्वे नाही.

त्या वेळी दादरच्या अमर हिंद मंडळात वसंत व्याख्यानमाला होत असे. तिथे केव्हातरी बाबासाहेबांना शिवाजीवर बोलताना ऐकलं. इम्प्रेस झालो. मग त्यांची शिवचरित्राची व्याख्यानं ऐकणं भाग होतं. दहाएक व्याख्यानं ओळीत असत. सगळी ऐकली. एकापेक्षा जास्त वेळा ऐकली. शिवाजी माझ्या प्रेमाचा विषय. (अजून आहे.) बाबासाहेब ज्या रसाळ शैलीत धडाधड तारखा, नावं आणि स्थळं यांचे तपशील फेकत; त्याचं अपार कौतुक वाटे. त्यांच्या तोंडून शिवाजी ऐकताना अंगावर रोमांच उठत. आपल्यातला एक जण उठतो आणि स्वराज्याची स्वप्नवत्‌ संकल्पना नुसती मांडत नाही; तर प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा जागवतो; कसं झालं असेल शिवाजीच्या सोबत्यांना! तानाजी, बाजी प्रभू, मुरारबाजी यांसारखे लोक कसे स्वतःच्या जिवावर उदार झाले असतील, याचं चित्र माझ्या मनात रंगू लागे. शिवाजीचा भक्‍त मी होतोच; बाबासाहेबांबद्दलही प्रेम निर्माण झालं.

मग ’राजा शिवछत्रपति’ विकत घेणं भागच झालं. चांगले हार्ड बाउंड दोन जाडजूड खंड. त्याची पारायणं केली. शिवाजीचं चरित्र मला पाठ झालं. शाळकरी वय, पौगंडावस्था ओलांडली तरी शिवाजीबद्दल वाचत राहिलो. जे वाचायला मिळालं, त्यातून या राजाबद्दल आदर वाढत गेला. त्याच्या लढाया, त्याचे डावपेच, त्याचा मुत्सद्दीपणा, त्याची दूरदृष्टी, त्याची न्यायबुद्धी, त्याचा मनसबदारीला असलेला विरोध, प्रजेच्या हितासाठी त्याने वेळोवेळी प्रसृत केलेले आदेश ... माझ्या मुलखात शिवाजीसारखा एक लोकनेता होऊन गेला, याचा मला प्रचंड अभिमान वाटत असे. नंतर कितीतरी वर्षं कुणी अमराठी भेटला, गप्पा झाल्या की मी त्याला शिवाजीचं अचाट कर्तृत्व सांगण्याचा प्रयत्न करत असे. पुढे देशभर कुठे कुठे हिंडताना शोध लागला की शिवाजी आणि आंबेडकर, या दोन मराठी माणसांचे पुतळे भारतभरच्या गावागावात आहेत. सारा देश त्यांना ओळखतो.

शिवाजीचं नाव ठाउक नाही, तो मराठीच नव्हे. पण मला शिवाजीच्या लोकोत्तर व्यक्‍तिमत्वाची नीट ओळख करून दिल्याबद्दल मी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा कायमचा ऋणी राहीन. अर्थात मी शिवाजीची भजनं गात समाधान पावणार्‍यातला नव्हतो. एक शिवाजी घेऊन बसायचं आणि त्याचा उदो उदो करायचा; तर तसं कालच्या आजच्या कुणाही गावगुंडाबद्दल करता येईल! महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या इतिहासात होऊन गेलेल्या इतर थोर व्यक्‍तींची माहिती करून घेऊन मग त्यांच्या संदर्भात शिवाजी किती, कसा थोर, हे ठरवलं पाहिजे. नाही तर मी म्हणणार, शिवाजी थोर; समोरचा म्हणणार, अलेक्झांडर थोर. किंवा हनिबाल थोर. किंवा रोमेल थोर. मला ते नाव माहीत नाही, त्याला शिवाजी माहीत नाही. हा वाद नाही आणि संवादही नाही.

वाचन वाढत गेलं, तसे बाबासाहेब मात्र दूर होत गेले. त्यांचं काही काही खटकू लागलं. उदाहरणार्थ, ’राजा शिवछत्रपति’ची सुरुवात होते राम दंडकारण्यात येतो, तिथपासून. तिथेच ते एक प्रकारे ’ही शाहिरी आहे, हा इतिहास नव्हे,’ असं बजावतात. पुढे प्रकरण येतं ’साडेतीनशे वर्षांची काळरात्र’. देवगिरीच्या यादवांचा पराभव करून अगोदर अल्लाउद्दिन खिलजी आणि नंतर त्याचा सेनापती मलिक कफूर यांनी दक्षिणेत मुसलमानी सत्ता स्थापन केली, तिथून सुरू होते ही ’साडेतीनशे वर्षांची काळरात्र’. तोपर्यंत इतिहास म्हणजे लढाया आणि राजघराणी नव्हे आणि राजाचा धर्म काय यावरून प्रजेचं सुखदुःख ठरत नाही, हे समजण्याइतकी अक्कल मला आली होती. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं यांचा छळ वाईट म्हणायचा आणि ज्या काळात तो छळ झाला, ते यादवराज्य चांगलं म्हणायचं, यातला विरोध मला जाणवू लागला होता. मी शिवाजीचा भक्‍त होतो म्हणून शिवाजीची हरेक गोष्ट मला थोर वाटत होती, असं नव्हतं. शिवाजी जरा अतीच थोर होता म्हणून तो मला इतका प्रिय झाला. बाबासाहेबांची शाहिरी पुढच्या वयात मला भावेनाशी झाली. जसं ’गर्जा महाराष्ट्र माझा’ ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे रहायचे थांबले, तसंच.

ते असो. स्वतः बाबासाहेबांनी कधी स्वतःला इतिहासकार म्हटलं नाही. त्यांची प्रसिद्धी शिवशाहीर म्हणून. आता शाहीर पोवाडेच गाणार! तसंच बाबासाहेब शिवाजीचे पोवाडे गात. त्यांची स्टेजवर हत्तीघोडे नाचवणारी ’जाणता राजा’ नावाची सर्कस बघण्याची इच्छा मला झाली नाही. पुढे त्यांनी कोल्हापूरजवळ शिवकाल जिवंत करायचा महाप्रकल्प जाहीर केला. तिथे शिवकालीन समाजजीवन प्रत्यक्ष बघायला मिळणार होतं. शालिनीताई पाटीलही त्या प्रकल्पाशी संबंधित होत्या. त्याचं पुढे काहीच झालं नाही.

आपल्याकडे बहुतेक पुरस्कार हे उतारवयात एकूण कारकीर्दीचा गौरव म्हणून दिले जातात. त्यांना विशिष्ट फोकस असा नसतो. राजकीय गणितं मात्र असू शकतात. ’महाराष्ट्रभूषण’सुद्धा याला अपवाद नाही. तेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांना ’महाराष्ट्रभूषण’ हा सन्मान देऊन महाराष्ट्र सरकारने काही वावगं, विसंगत केलं असं मला मुळीच वाटत नाही. उलट, या संधीचा लाभ घेऊन मी त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्‍त करतो.