Tuesday, October 7, 2014

सुरेशच्या काही आठवणी



सुरेशच्या न सांगण्यासारख्या गोष्टी खूपच. सांगण्यासारख्याही आहेत. त्याच्या घरी, म्हणजे वरळीच्या बीडीडी चाळीत गेलो असताना एक गणिताचं पुस्तक दिसलं. लहानसं होतं. त्यात गणिताचे विविध प्रकार समजावून सांगितले होते. मी चाळलं. आणि हरखून गेलो. सुरेश बघत होता. हसला, म्हणाला, ने वाचायला. मी घेऊन आलो. ताबडतोब वाचलं. पुन्हा पुन्हा वाचलं. आपल्याला अंकगणितापलिकडे ऑल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिगनॉमेट्री, को-ऑर्डिनेट जॉमेट्री, डिफरंशिअयल-इंटिग्रल कॅल्क्युलस, मेट्रायसेस-डिटर्मिनंट्स (च्यायला, यादी करत गेलो, तर बरेच प्रकार आठवले की!) असे मोजके प्रकार माहीत. त्या पुस्तकात काय काय होतं. सगळं एका फटक्यात पचणारं नव्हतं. मी विचार केला, सुरेशपेक्षा आपल्याच जवळ ते पुस्तक असणं बरोबर आहे. सहा महिन्यांनी सुरेशने पुस्तक मागितलं. म्हणाला, साल्या, मी विसरीन असं वाटलं काय? मला काय त्याची किंमत कळत नाही?

सतीश तांबे म्हणतो, ते शंभर टक्के खरं. सुरेशशी त्याच्या जातीबद्दल पूर्ण मोकळेपणाने बोलता यायचं. खरं तर आमच्या सर्वांबद्दल हे म्हणता येईल. त्यामुळे सुरेशलाही आमच्यात जास्त मोकळं वाटत असावं.

सुरेशला भन्नाट कल्पना सुचत. एकदा म्हणाला, मुंबईत घरांचा इतका प्रॉब्लेम. मी एक लहान बोट विकत घेणार आहे. वर्सोव्याच्या किनार्‍यावर लावायची. सकाळी समुद्रातून नरिमन पॉइंटला न्यायची. ऑफीस सुटलं, की बोटीत बसून परत वर्सोवा. बोट हेच घर. किती सोयीचं होईल.

पद्मा कौटुंबिक होती. काही वर्षं ते माझ्या जवळ रहात. पद्मा घरी बोलवायची. मीही दोनेकदा गेलो. माझ्या बिल्डिंगमध्ये पद्माची एक कलीग रहायची. त्यांच्याकडे गणपतीला आली, की पद्मा माझ्या घरी येत असे. एकदा स्टेशनमधून बाहेर पडत असताना एका भरघोस दाढीधारी दांडगट माणसाने माझ्या वाटेत आडवा हात घातला आणि मला रोखलं. सुरेश! पुष्कळ वर्षांनी भेटलो. गप्पा मारल्या. त्याच्याकडे नेहमी सांगण्यासारखं खूप असायचं. सांगून, ऐकून झालं; बरं वाटलं. पण "घरी येतोस?" किंवा "चल, तुझ्या घरी जाऊ" असं कोणीच म्हणाला नाही!

काही वर्षं सुरेश जव्हार शाखेत होता. तो भाग मी तोवर पाहिला नव्हता. म्हणाला, ये. मी असेपर्यंत आलास तर फिरू. जाणं झालं नाही.

एकदा भेटला, तेव्हा हात बँडेजमध्ये होता. पण काय झालं सांगितलं नाही.

जाऊदे. न सांगता गेला, हे काही त्याने बरोबर केलं नाही. आणि मी लिहीत राहिलो, तर नको ते लिहीन. तो शेवटचा केव्हा भेटला, आठवतही नाही. पण त्याचा काय़ संबंध? कधीही भेटला, तरी जवळचा मित्रच होता. सुरेश आणि पद्मा. काय जोडी होती!


Friday, October 3, 2014

मोदींमुळे .... अमेरिकन एनाराय


मोदींचा अमेरिका दौरा कसा यशस्वी झाला, यावर भरभरून लिहिलं जात आहे. त्यात अमेरिकन सरकारने मोदींना कोणती ठोस आश्वासनं दिली, यावर भर नाही; तर मोदींमुळे तिथे भारताबद्दल, भारतीयांबद्दल एक विशेष भावना निर्माण झाली, यावर आहे. तरीही एका गोष्टीला द्यायला हवं तितकं महत्त्व दिलं जात नाही आहे.

अमेरिकेत, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशामध्ये सर्वात जास्त आर्थिक ताकद असलेला ’एथ्निक’ गट म्हणजे ज्यूइश लोक. हे लोक केवळ पैशाने सामर्थ्यवान आहेत, असं नाही; तर राजकीय दृष्ट्यासुद्धा जागरूक आहेत. इतके, की सार्‍या जगात कितीही टीका झाली, तरी अमेरिका इस्रायलची तळी उचलल्याशिवाय रहात नाही. अलिकडल्या काळात इस्रायलने पॅलेस्टाइनवर बॉम्बफेक करून हजारो निरपराध जीवांची हत्या केली. रुग्णालयांवर बॉम्ब टाकले. सामान्य लोकवस्तीवर टाकले. जगभर याच्या विरोधात निदर्शनं झाली. अमेरिकेतही झाली. पण अमेरिकेने इस्रायलला आवरण्यासाठी काहीही कृती केली नाही. अमेरिका सतत सर्व बर्‍यावाईट बाबतीत इस्रायलची पाठराखण करते, याला एकमेव कारण म्हणजे अमेरिकेतील ज्यूइश लॉबी.

अमेरिकेत ज्यू लोकांच्या खालोखाल श्रीमंत असलेला एथ्निक गट कोण ठाउक आहे? भारतीय. इंडियन्स. भारतीय लोक तिथे तुलनेने कष्टाळू मानले जातात. एकमेकांना धरून ठेवणारे, कौटुंबिक नातेसंबंधांमधून अत्यंत उपयुक्‍त असा मानसिक आधार पुरवण्याची रीत असलेले मानले जातात. सॉफ्टवेअर उद्योगात भारतीयांना विशेष गती आहे, असंही आता मानलं जातं. व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी होते आणि केविन स्टेसी लुंगी डान्स करतो, ते आपोआप नाही.

पण ज्यू आणि भारतीय यांच्यात एक महत्त्वाचा, भला मोठा फरक आहे. ज्यूईश लोक जितके इस्रायलबद्दल हळवे, कडवे असतात; तितके भारतीय भारताबद्दल नसतात. तिथल्या एनाराय लोकांना भारतात ढवळाढवळ करण्याची अपार हौस; पण अमेरिकेत भारताच्या हितसंबंधांना पुष्टी देण्यासाठी फार काही करवत नाही. सॉफ्टवेअर इंजीनियरना व्हिसा देण्याची मागणी करणे म्हणजे भारतातून अमेरिकेत जाणार्‍यांचं हितरक्षण; भारताचं हितरक्षण नव्हे.

आणखी एक फरक असा, की अजून तिथल्या भारतीयांनी स्वतःचा ’क्लाउट’ एकजुटीने वापरलेला नाही. एका अर्थी, अमेरिकन राज्यकर्त्यांना भारतीयांच्या वजनदारपणाची जेवढी जाणीव आहे, तेवढी खुद्द भारतीयांना नाही!

यात फरक पडत चालल्याच्या काही खुणा दिसू लागल्या आहेत. एक म्हणजे अमेरिकेतले बहुसंख्य भारतीय ’हिंदू’ होत चालले आहेत. तिथे मोठमोठी देवळं बांधली जात आहेत. पूजा घातल्या जात आहेत. भिक्षुकी हा एक भरपूर पैसा मिळवून देणारा व्यवसाय होऊ लागला आहे! भारतात हिंदुत्ववाद्यांची ताकद जेवढ्या प्रमाणात वाढत गेली, तेवढ्या प्रमाणात तिथे हा बदल होत गेला. सध्या अमेरिकन एनाराय हा विश्व हिंदु परिषदेपासून संघाच्या सर्व संघटनांसाठी निधीचा सर्वात मोठा स्रोत बनला आहे.

परवाच्या मॅडिसन स्क्वेअर ग्राउंडमधल्या समारंभात इवेंट मॅनेजमेंटचा भाग मोठा असला; तरी त्यातून भारतीयांच्यात मोठ्या प्रंमाणात
एकसंधता येऊ लागल्याचा संदेश प्रक्षेपित झाला, हे नक्की. यातून एक ’इंडियन लॉबी’ जन्माला येईल का? अमेरिकेच्या राजकारणावर, परराष्ट्र धोरणावर, अमेरिकन गुंतवणुकीवर प्रभाव टाकणारी, भारताच्या वतीने प्रभाव टाकणारी एक शक्‍ती यातून आकार घेईल का?
असं होण्याला जे अडथळे आहेत, त्यात एक अडथळा अमेरिकन धार्मिकता, हा आहे. त्यांना ज्यू असणं समजतं पण हिंदू असणं ’एक्झॉटिक’ वाटतं. एक्झॉटिक प्राणी न्याहाळायला बरा; पण राज्य करायला कसा चालेल? धर्माने ख्रिस्ती असणे याला राजकारणात अपार महत्त्व आहे. परिणामी भारतीय वंशाचे जे कोणी तिथे राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगतात, ते ’आपण चर्चला जातो, ख्रिस्ताला मानतो,’ असं आवर्जून बोलून दाखवत असतात. त्यात चटकन बदल होणे कठीण आहे.

दुसरी अडचण खास भारतीय आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आणि तिथल्या स्थानिक लोकांसाठी ’इंडियन’ हीच आपली ओळख असली, तरी आपल्याला अंतर्यामी तेवढं पुरत नाही. आपण पंजाबी असतो, ब्राह्मण असतो, द्रविडियन असतो आणि बंगाली असतो. असल्या भेदांच्यात एकी होणं अशक्य आहे. आणि याचा सुगावा अमेरिकनांना लागल्याशिवाय रहाणार नाही. कारण आपणच अभिमानाने स्वतःचं श्रेष्ठत्व सांगण्याच्या भरात हे सांगून टाकणार. भाषा, वर्ण, जात यांना ओलांडून भारतीयांच्यात एकी घडवून आणण्यासाठी प्रभावी व्यक्‍तिमत्वाच्या प्रतिभावान माणसाची गरज आहे.

इंडियन लॉबी निर्माण होणं म्हणजे देशी भारतीयांसाठी गुड न्यूजच असेल, असं मानण्याचं कारण नाही, हेसुद्धा स्पष्ट केलं पाहिजे. आपल्याकडला सॉफ्टवेअर उद्योग म्हणजे तिथल्या उद्योगाला मिळणारी एक स्वस्तातली सेवा आहे. कॉल सेंटर या उद्योगातही किती प्रतिष्ठा आहे, हे सर्व जाणतात. इथल्या महत्त्वाकांक्षी युवकाला या पातळीवरच सुरुवात करण्याला पर्याय नाही आणि नसेल. दुसरं असं की आजच एनाराय जेव्हा इथे त्यांच्या ठेवी ठेवायला येतात, तेव्हा सवलती मागतात. त्यांना गुंतवणूक करताना स्पेशल ट्रीटमेंट हवी असते. त्यांच्या स्टार्टअपला शासकीय परवाने झटपट मिळावेत, अशी त्यांची अपेक्षा असते. यात बदल होणार नाही. त्यांनी काढलेले उद्योग इथल्या जनतेच्या जीवनात व्हॅल्यू ऍडिशन करण्याची शक्यता कमी. अमेरिकन एनाराय पक्के इंटरनॅशनल नागरीक झाले आहेत. त्यांचा ग्राहकवर्गही बाहेरचाच असेल. भारतात स्वस्तात मिळणारं कौशल्य वापरून फायदा वाढवणे, हाच त्यांचा उद्देश राहील; स्वदेशाचं कल्याण हा नव्हे.

पण एक विषय आहे, जिथे ज्यूईश आणि हे अमेरिकन नवहिंदू यांच्या धारणा एकत्र येतात; तो म्हणजे मुसलमान विरोध. क्लॅश ऑफ सिविलायझेशन्स, ही मांडणी इथल्या हिंदुत्ववाद्यांनी जोरदारपणे उचलून धरली होती. पराकोटीचा मुस्लिमद्वेष, हा हिंदुत्ववादी विचाराचा मूलाधार आहे. इस्रायलला हे निश्चित पसंत पडेल. अमेरिकेतल्या ज्यूईश लॉबीचाही याला पाठिंबाच असेल. मग यातून कोणती कृतियोजना आकार घेईल? पाकिस्तानचं काय होईल? काश्मीर प्रश्नाविषयी अमेरिकेची भूमिका बदलेल का? या सगळ्यावर चीनचं काय म्हणणं असेल? आणि अमेरिका चीनच्या म्हणण्याची कशी दखल घेईल?

स्थिती विचार करण्यासारखी आहे. अमेरिका आणि अमेरिकेतले भारतीय, यांचे प्राधान्यक्रम काय आहेत आणि ते कुठे एकत्र येतात, कुठे एकमेकांना छेद देतात, यावर पुढचं अवलंबून आहे.


Friday, September 12, 2014

पक्षी निरीक्षण


माझं रायटिंग टेबल खिडकीला लागून आहे. खिडकीबाहेर रस्ता नाही, आमच्या सोसायटीचं आवार आहे. बांबू, सुरू, सिल्व्हर ओक, रातराणी, चाफा, रॉयल पाम, विविध प्रकारच्या लिल्या, माड अशी झाडं खिडकीबाहेर दिसतात. मला नुसती मान वळवावी लागते.


अगदी माझ्या खिडकीला लागून एक ख्रिसमस ट्री आहे. इथे रहायला आलो, तेव्हा तो लहान होता. त्याचा शेंडा खिडकीपर्यंत आला नव्हता. तेव्हा त्याच्या अगदी शेंड्यावरच्या बेचक्यात फुलचुखीसारख्या पक्ष्यांच्या जोडीने घर केलं होतं. नर-मादीपैकी एक राखी, एक ठिपक्याठिपक्यांचा. किंवा ची. आता झाडाचा शेंडा पार दुसर्‍या मजल्याच्याही वर गेला आहे. (आम्ही श्रीमंत आहोत. सोसायटीच्या एकूण सात बिल्डिंगांपैकी चार ग्राउंड प्लस तीन आणि तीन बिल्डिंगा ग्राउंड प्लस दोन, अशा आहेत. माझी ग्राउंड प्लस दोन आहे. मी पहिल्या मजल्यावर. उंच टॉवरमध्ये रहाणं मला महानगरी बिचारेपण, गरिबीचं लक्षण वाटतं. आम्ही श्रीमंत आहोत.) तर ख्रिसमस ट्री. आमच्या बिल्डिंगमध्ये शिरताना जी कमान केली आहे, तिच्यावर एक वेल चढवली आहे. तिला निळी, गारवेलीसारखी फुलं येतात. तिची वाढ राक्षसी आहे. खिडकीच्या ग्रिलवर चढली आणि दोन दिवस दुर्लक्ष झालं की ती दोन चार वेटोळे घालून पक्की झालेली असते. तिच्या मागोमाग आणखी एक तरी कोंब खिडकीच्या दिशेने उगारलेला असतो. ही वेल नित्यनेमाने कमानीवरून झेप घेऊन ख्रिसमस ट्रीवर चढते आणि भराभरा त्याच्या आडव्या फांद्य़ांवरून सर्वत्र पसरत वर चढत जाते. एकदा वेलीच्या इतक्या दोर्‍या झाडावर चढल्या की बिचारा ख्रिसमस ट्री कलला. वेलीने जोर लावणं कमी केलं नाहीच, उलट तिची खेचाखेची वाढत गेली. झाड जास्त जास्त कलत गेलं. बायकोने माळ्याला सांगून वेलीच्या झाडावर चढलेल्या सगळ्या दोर्‍या कापून घेतल्या नसत्या, तर वेलीने तो ट्री नक्की आडवा केला असता. आता माळीच लक्ष ठेवतो. वेलीच्या पकडी वाढू लागल्या, की तो कापून टाकतो. मग झाडावर चढलेल्या वेलीच्या दोर्‍यांवरची पानं सुकत जातात. दोर्‍यांमधला जोम कमी होत जातो. आणि केव्हातरी वाळका गुंता जमिनीवर पडून दुसर्‍या दिवशी झाडला जातो.


ख्रिसमस ट्रीवर चिमण्या, बुलबुल, साळुंख्या, फुलचुख्या बसतात. कावळ्यांना मज्जाव आहे. कावळा बसलाच, तर इतर पक्षी कावळा जाईपर्यंत आवाज करत रहातात. हे मला बसल्या बसल्या काम करता करता आपोआप कळलं. तसंच मुद्दाम लक्ष न देता मला चिमण्याची चिवचिव ऐकता आली. रोज रोज ऐकून त्या चिवचिव करण्यात मला पॅटर्न्स जाणवले. चिव चिव चिव चिव .. असं अनेक शब्दांचं वाक्य चिमणा उच्चारतो. चिमणी एक तर ’चीव’ असं, ’हो’, बरोबर’, ’कबूल’ असा एका शब्दाचा प्रतिसाद देते; नाहीतर चिवचिवाटात ’र’ घालते. हे लिहिता येत नाही; पण हा उच्चार अलग अलग शब्दांचा नसतो. ’कुर्रर्रर्रर्र’ कसं असतं? तसंच हे चिर्रर्रर्र असतं.

अगदी आत्ता मला आणखी एक आवाज ओळखू यायला लागला आहे. हा आवाज चिमणा करतो. ’च’ला कशी धार असते; तशी या उच्चाराला नसते. जणू स्वरयंत्राच्या तारा ढिल्या पडाव्यात. हा ’च’ ’स’कडे झुकलेला असतो. एरवीची चिवचिव कशी जाहीर घोषणाबाजी असते? तसं हे नसतं. इथे चोचीवाटे उच्चार जणू अनैच्छिकपणे बाहेर पडत असतो. रोज रोज कानात मधेच हा आवाज शिरू लागल्यामुळे मला ’चिमणीच ती; हे असं कधी बोलते? यत काही नियम, काही पॅटर्न आहे का?’ असं कुतूहल उत्पन्न झालं. म्हणून मी तसा आवाज आल्याबरोबर बाहेर बघितलं. तर अद्‌भुत! साली जोडी सेक्स करत होती. दोन्ही पायांवर टुणटुण करत चिमणा चिमणीच्या जवळ यायचा आणि चढायचा. लगेच उतरायचा. जरा बाजूला सरकून पुन्हा टुणटुण करत जवळ जायचा. पुन्हा चढायचा. हे करताना तोंडाने तो, हल्लीच ओळखू आलेला ’च’ला ’स’च्या जवळ नेणारा आवाज. चिमणी गप्प. ज्या ज्या वेळी हा आवाज आला, त्या त्या वेळी मी खिडकीबाहेर नजर टाकली आणि प्रत्येक वेळी त्यांचं हेच चालू होतं.

सुरुवातीला मी सकाळी टेबलाजवळ किंवा खिडकीजवळ आलो असताना मधेच हा आवाज यायचा. मग एकदा दुपारी आला. एकदा संध्याकाळीसुद्धा आला. मग मनात आलं, ती कबुतरं दिवसभर घुटुर्रघूं करत दिवसभर एकमेव उद्योग म्हणून सेक्स करत असतात, हे पाहून त्यांना मी फुलटायमर म्हणू लागलो; तर या चिमण्यांचं तरी काय वेगळं आहे! अगदी कबुतराइतक्या त्या फोकस्ड नसतील; पण कबुतरं पॅरापेटवर बसून ऐन उघड्यावर करतात म्हणून दिसतात. या चिमण्या पानांच्या दाटीत स्वतःला झाकत करतात.

आता पुढचं वाटतं. सर्वच प्राण्यांचा हा धर्म नसेल, कशावरून? आहार, निद्रा, भय आणि मैथुन ... पहिल्या तिनांना प्राधान्य, हे खरं; पण त्यात न गुंतलेला उरला सगळा वेळ ...

पण नाही; असं नसेल. (माणूस सोडून इतर) प्राण्यांमध्ये माजावर येणे, विणीचा हंगाम, अशा गोष्टी असतात. कुत्र्यांच्या बाबतीत नाही का आपण भाद्रपदाचा उद्धार करत? पक्ष्यांच्या बाबतीत तसं असतं की नसतं? कावळे दर वर्षी पावसाळ्याअगोदर नवं घरटं बांधतात. सुगरणीसुद्धा. आणि पक्षी घरटं बांधतात, ते ऊन-पावसापासून निवारा म्हणून नव्हे; अंडी घालायला सुरक्षित जागा म्हणून. म्हणजे कावळे आणि सुगरणी, यांचा विणीचा हंगाम, म्हणजेच सेक्स करण्याचा हंगाम पावसाळा, हा आहे. पुढच्या पावसाळ्यात लक्ष द्या; कावळ्याच्या पिल्लांचे कोवळे आवाज पावसाळ्यातच ऐकू येतात.
इतर पक्षी? मागे एकदा दुसरीकडे रहात असताना आमच्या गॅलरीत कबुतरांनी घर केलं. कळेपर्यंत त्यात अंडी आली होती. वाईट वास पसरला होता. पण अंडी आहेत; त्यातून पिल्लं बाहेर येऊन ती उडाली, की घरटं मोडून टाकू, असं ठरवलं. तर काय. एक पिल्लू मोठं होईपर्यंत नवीन अंडं. कंटिन्युअस प्रॉडक्शन. फुल टायमर. म्हणजेच, कबुतरांमध्ये विणीचा हंगाम नसतो, असं झालं ना.

अर्थात, मी काही सहा महिने कबुतरांच्या घरट्याचं निरीक्षण करत बसलो नाही. चिमण्यांच्या बाबतीतही आणखी काळ गेल्यावर निष्कर्षांमध्ये कदाचित बदल करावा लागेल, कदाचित भर घालावी लागेल ... पण त्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही. हे असं काही बाही लिहिता लिहिता तेही होऊन जाईल.

Friday, June 27, 2014

अपयशाची कबुली




याच वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मराठा जातीसाठी आरक्षण जाहीर केलं आहे, असा आरोप होतो आहे. मराठा जातीला १६ टक्के आरक्षण देणे अगदीच एकांगी वाटू नये म्हणून मग मुसलमानांना ५ टक्के आरक्षण देऊन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचाही आरोप आहे. मला वाटतं, हा प्रश्न यापेक्षा जास्त गंभीर आहे. त्यासाठी थोड्या वेगळ्या कोनातून पाहण्याची गरज आहे.

फुटबॉल विश्वचषकाची पहिली फेरी संपली. बत्तीसपैकी सोळा संघ दुसर्‍या फेरीत दाखल झाले. सोळा बाद झाले. दर चार वर्षांनी भरणार्‍या या स्पर्धेला येणारा प्रत्येक संघ जिंकण्याच्या, किमान बाद फेरीत जाण्याच्या ईर्षेनेच येत असतो. त्यामुळे पहिली फेरी पार करण्यातलं अपयश फार मनाला लावून घेतलं जातं. फुटबॉलमधले खेळाडू जरी ’स्टार’ असले तरी या सांघिक खेळात संघाचा भाग्यविधाता ही भूमिका प्रशिक्षक पार पाडत असतो. यशाचं श्रेय जसं त्याचं असतं, तसाच पराभवाला जबाबदारही त्यालाच ठरवलं जातं.

आणि हे प्रशिक्षकाला मान्य असतं. म्हणून दुसर्‍या फेरीत न जाता आल्याची जबाबदारी घेत इटली, आयव्हरी कोस्ट, होंडुरास आणि जपान या देशाच्या संघांच्या प्रशिक्षकांनी राजिनामे दिले आहेत. "माझ्यावर सोपवलेलं काम पार पाडण्यात मी असमर्थ ठरलो, या पदावर रहाण्यास मी नालायक आहे," अशी प्रामाणिक कबुली या प्रशिक्षकांच्या राजीनाम्यात दिसते.

अगदी तशीच कबुली मराठा या जातीला आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयात दिसते. गेल्या पन्नासपेक्षा जास्त वर्षांपासून या जातीचे पुढारी महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभुत्व गाजवत आहेत. महाराष्ट्राची अर्थनीती, विकासनीती तेच ठरवत आले आहेत. एकूण सत्तेच्या नाड्या हातात ठेवताना या पुढार्‍यांनी ’बहुजन समाज’ या नावाखाली राज्याच्या जवळपास प्रत्येक सार्वजनिक क्षेत्रात आपल्या, राज्यात संख्येने सर्वात मोठी असलेल्या, जातीतील सदस्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आपल्या जातीचं वर्चस्व असलेल्या भौगोलिक क्षेत्राकडे निधी वळवलेला दिसतो.

१९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून शिवसेना-भाजप युतीच्या एका टर्मचा अपवाद वगळता सर्व वेळी या जातीच्या पुढार्‍यांनी एक तर सिंहासन भूषवलं आहे, नाही तर पडद्याआडच्या सूत्रधाराची भूमिका बजावली आहे. आणि युतीच्या राजवटीत पहिली चार वर्षं जरी ब्राह्मण मुख्यमंत्री असला, तरी त्या सत्तेला ज्या बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याच्या कुबड्या घ्याव्या लागल्या होत्या, ती ’तैनाती फौज’ कुठली होती?

चोपन्न वर्षात किती पिढ्या झाल्या? इतक्या मोठ्या काळात या जातीच्या पुढार्‍यांना स्वतःच्या जातीचं उत्थान घडवून आणता आलं नाही, म्हणून अखेरीस निरुपायाने संपूर्ण जातीला मागास जाहीर करणे भाग पडलं आहे. तरी या जातीच्या पुढार्‍यांच्या निरपवाद जात-जाणिवेबद्दल शंका घेता येत नाही. मग आता फुटबॉलच्या प्रशिक्षकांप्रमाणे यांनी जावं का?

तरीही असं का झालं, हा प्रश्न राहतो. आधुनिक लोकशाही व्यवस्थेत जेवढं शक्य आहे, तेवढ्या प्रमाणात सत्ता राबवूनही जात मागास राहिली याची ढोबळपणे दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे आजवर सत्ता जातीकडे नव्हती, तर काही मोजक्या कुटुंबांकडे होती. आणि त्यांनी आपापल्या कुटुंबाचं उत्थान घडवून आणलं पण जातकल्याणाकडे लक्ष दिलं नाही. हे शक्य आहे. मुख्यमंत्रीपदाची दिवास्वप्नं बघणारा अजित पवारांसारखा पुढारी जेव्हा ’तुमच्या धरणात पाणी नाही, तर मी येऊन मुतू का?’ असं सोलापूर जिल्ह्याला उद्देशून म्हणतो, तेव्हा तो त्याची संकुचित दृष्टी दाखवत असतो. इथे त्यांच्या भाषेला आक्षेप घेण्याचं कारण नाही. त्यांची भाषा त्यांच्या वैयक्‍तिक संस्कृतीचा प्रश्न आहे. यात ’तुमच्या धरणात’ हा भाग खटकणारा आहे. पुण्यातल्या अजितदादांना सोलापूर आपलं वाटत नाही! हे कसे संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री होणार? त्यापेक्षा बारामतीच्या वा पिंपरी-चिंचवडच्या नगराध्यक्षाला मुख्यमंत्री म्हणण्यात येईल, अशी एक लहानशी घटनादुरुस्ती करून त्यांना त्या पदावर बसवून त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करावी. राज्य नव्हे, जात नव्हे; जिल्ह्याच्या बाहेरही पाहू न शकण्याचं हे एक उदाहरण. असले पुढारी कसे जातीचं भलं करतील?

जात मागास राहण्याच्या दुसर्‍या कारणात दोन पोटकारणं येतात. एक म्हणजे या जातीतले लोक ’ठेविले अनंते तैसेचि रहावे’ या वृत्तीचे असावेत. त्यांना स्वतःच्या उत्थानासाठी हातपाय हलवायचेच नाहीत. शासकांनी केलेले सर्व प्रयत्न त्यामुळे फोल ठरले. किंवा ’साडेतीन टक्केवाले’ असं ज्यांना हिणवण्यात येतं ते उच्चवर्णीय इतके पाताळयंत्री आहेत, की त्यांच्या कितीही नाड्या आवळा; ते इतरांना ’वर’ येऊ न देण्यात यशस्वी होतातच.

जातीचा अभिमान बाळगू नये, लाजही बाळगू नये, जातिभेद तर अजिबात पाळू नये; हे जरी खरं असलं, तरी जात या वास्तवाकडे डोळेझाक करता येत नाही. म्हणून मराठा आरक्षणाने समोर आणलेली ही वस्तुस्थिती अभ्यासनीय आहे, असं वाटतं.

Wednesday, June 11, 2014

विभूतीपूजेचा रोग




सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी कँपाकोला या बेकायदेशीर मजले असलेल्या गृहसंकुलातील रहिवाशांना सहानुभूती दाखवली म्हणून पेपरांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र त्यांच्यावर टीका होते आहे. मागे काही प्रसंगी कसं त्यांचं वागणं चुकीचं होतं याच्या आठवणी काढल्या जात आहेत. त्यांना भारत सरकारने ’भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी गौरवाने सन्मानित केलं असल्यामुळे त्यांचं वागणं, बोलणं जास्त जबाबदारीने व्हायला हवं अशी अपेक्षाही व्यक्‍त होताना दिसते. या निमित्ताने समाजातला वर्तमानपत्र वाचणारा आणि फेसबुकावर वावरणारा एक वर्ग कसा कँपाकोलावासियांच्या सहानुभूती-प्रचार मोहिमेच्या विरोधी आहे, हे उघड होत असलं तरी एकूण टीकेचा रोख बरोबर नाही. लताबाईंचं समर्थन होऊ शकत नसलं तरी त्यांच्यावरची टीकासुद्धा चूकच आहे.

लताबाईंचा गायनातला अधिकार वादातीत आहे. त्यामुळे त्या संदर्भात त्यांच्या शब्दाला निश्चित वजन आहे. उद्या कुण्या एकाचं वा एकीचं गाणं किंवा एकूणच गाण्यांच्या बदलत्या चाली वा पद्धती यासंबंधी त्या काही म्हणाल्या आणि ते पटलं नाही; तर त्यावर टीका करणे, त्यांच्या म्हणण्याचा कीस काढणे, याला अर्थ असेल. पण बाकी कशाहीबद्दल त्यांचे उद्‌गार आणि कुणाही सोम्यागोम्याचे उद्‌गार यांत फरक काय? त्यांचं म्हणण्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याचं कारण काय? बहुतेक सर्व जनता त्यांचा शब्द झेलायला अतिउत्सुक असते, म्हणून त्या बोलतात आणि एकूण प्रसिद्धीमाध्यमं त्याची बातमी करतात. उद्या समजा एखाद्या सिव्हिल इंजीनियरला त्या बांधकामाविषयी सल्ला देऊ लागल्या; तर तो श्रद्धेने, भाविकतेने ऐकून घेईल काय? ’तुम्हाला काय कळतं यातलं?’ अशी त्याची सहजप्रतिक्रिया होईल.

खूप वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर (कर्तृत्वाने मोठाच, पण) वयाने लहान असताना त्याने एका निवडणुकीत एका विशिष्ट उमेदवाराला मत देण्याचं आवाहन केल्याचं आठवतं. त्या उमेदवाराला सचिनचा जाहीर पाठिंबा घ्यावासा वाटला कारण सचिन या महान क्रिकेटपटूचे चाहते असलेले काही मतदार या बाबतीतही त्याच्या शब्दाला मान देतील आणि आपली मतं वाढतील, असा विश्वास त्या उमेदवाराला वाटला. तो उमेदवार आणि आज लताबाईंवर टीका करणारे यांची मानसिकता एकच आहे. समाज तोच आहे. लोक आपलं फारच ऐकतात, असं आढळल्यावर भल्याभल्यांचा तोल ढासळू शकतो. त्या मानाने सचिन आणि लताबाई यांचा तोल कमीच गेला आहे.

आपल्या समाजमनातच गफलत आहे. कोणत्याही प्रकारच्या कौशल्यात एखाद्याने विशेष यश प्राप्‍त केलं की त्याला/तिला सर्वांगपरिपूर्ण ठरवण्याची आपल्याला घाई होते. मग सायना नेहवालचा शांपू आपल्याला भावतो आणि माधुरी दिक्षितच्या हातातली भांडी घासायची पावडर. शाहरुख खान आपल्याला पेप्सी प्यायचा आग्रह करतो कारण तसा आग्रह करण्याचे त्याला भरपूर पैसे मिळत असतात. एखादाच पुलेला गोपीचंद असतो, जो असल्या शीतपेयाची जाहिरात करण्यासाठी मिळणारे कोटी रुपये नाकारतो. बाकी सगळे तुमच्याआमच्यासारखे! एक प्रकारे वडाची साल पिंपळाला लावणारे.

एवढा थोर राम, मग त्याने सीतेला का टाकली, या प्रश्नाला एक उत्तर असं आहे, की रावणाला मारल्यावर रामाचं अवतारकार्य संपलं. त्याच्यातला देवाचा अंश निघून गेला. उरला तो एक स्खलनशील मानव. देवाला लावण्याची फूटपट्टी त्याच्या वर्तनाला लावणं बरोबर नाही. तसंच, क्रिकेटच्या मैदानावर महापराक्रम गाजवणार्‍या सचिन तेंडुलकरकडून तसाच पराक्रम जीवनातल्या सगळ्या क्षेत्रात व्हावा, ही अपेक्षा त्याच्यावर अन्याय करणारी आहे. लताबाईंचा फ्लॅट कँपाकोलात आहे, म्हणून त्या कँपाकोलाची बाजू घेतात, या आरोपात तथ्य असेल नसेल; पण ’एक महान गायिका असं कसं बोलू शकते?’ हा सवाल अन्यायकारक आहे.

सांगण्यासारखी गोष्ट अशी की आपल्या नागर समाजात बोकाळलेला हा विभूतीपूजेचा रोग आदिवासींमध्ये नाही. गडचिरोलीत असताना त्यांच्या पुजार्‍याची ते कशी टिंगलटवाळी करतात, हे मी पाहिलं होतं. पण देवाची पूजा करण्याची, कर्मकांड पार पाडण्याची वेळ आली की त्याच पुजार्‍यासमोर गावातला प्रत्येक जण नतमस्तक होतो, हेसुद्धा मला पहायला मिळालं. उत्तराखंडमध्ये जोशीमठजवळ ट्रेकिंगला गेलो असताना आमचा एक मोलाने वजन उचलण्यासाठी सोबत घेतलेला सोबती असाच पुजारी होता. तेव्हा देखील एका देवीची पूजा त्याच्या हातून करवून घेताना इतर सर्व स्थानिक बोजे उचलणारे त्याच्याशी नम्रपणे वागत होते. तेवढं झालं की पुन्हा तो आणि इतर एका पातळीवरचे होऊन जात होते. पद वा स्थान यांना असणारं महत्त्व ते पद वा स्थान धारण करणार्‍याला देऊ नये, ही यातून दिसणारी प्रगल्भता. जोपर्यंत एखादी व्यक्‍ती मोठ्या पदावर आहे, तोपर्यंत तिला त्या पदाचा मान मिळेल, अधिकार गाजवता येईल; तिथून उतरल्यावर ती व्यक्‍ती पुन्हा इतरेजनांपैकी होऊन जाईल, हे आपल्या अंगवळणी का पडत नाही?

हा रोग इतका दुर्धर आहे की गेली हजारो वर्षं तो या समाजात ठाण मांडून बसलेला आहे. जगात देव मानण्याच्या दोन ढोबळ पद्धती आहेत. एकेश्वर पद्धती, जिथे एकच सर्वशक्‍तिमान देव जीवनाच्या सर्व अंगांवर अधिकार गाजवतो. दुसर्‍या पद्धतीत वेगवेगळ्या कार्यांसाठी वेगवेगळे देव असतात. पावसाचा देव वेगळा, समृद्धीचा वेगळा, झाडांचा वेगळा आणि प्रजननाचा वेगळा. भारतात तिसरीच पद्धती! इथे ढीगभर देव आणि प्रत्येक सर्वश्रेष्ठ. ब्रहदेवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. वनस्पती आणि प्राणीच काय, बाकीचे देवही ब्रह्मदेवानेच निर्माण केले. मग तो सर्वश्रेष्ठ यात काय शंका? विष्णू सार्‍या सृष्टीचा रक्षक. संकट आलं की तोच अवतार घेतो आणि धर्माचं रक्षण करतो. ब्रह्मदेवसुद्धा त्याच्या बेंबीतून उगवलेला. मग विष्णू श्रेष्ठ नाही तर कोण? शंकर? तो तर महादेव, देवांचा देव. इंद्राची गोष्टच काढू नका. तो सर्व देवांचा राजा. तरी सर्व देवांच्यात पहिला नंबर गणपतीचा, बरं का! कुठलाच देव त्याच्या क्षेत्रापुरता मोठा नाही. प्रत्येक जण इतर सर्वांहून श्रेष्ठ!

असा हा गोंधळ. किंवा सावळागोंधळ. अजून त्याच मठ्ठ उत्साहाने चालू आहे.

Wednesday, June 4, 2014

मोदी सरकार - २



मोदी सरकारच्या राज्यात समान नागरी कायदा होण्याची दाट शक्यता आहे. तसं झालं, तर आज नाही तरी उद्या मुसलमान स्त्रिया त्यांच्यावरच्या अन्यायाला आळा घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मोदी सरकारला दुवा देतील. समान नागरी कायद्याला मुलायम सिंगांचा समाजवादी पक्ष विरोध करेल; खुद्द काँग्रेस काही करेल, असं वाटत नाही. समान नागरी कायदा होण्यात मुसलमानांचं भलंच असलं (पुरुष हे मनुष्यप्राणी असून स्त्री ही मनुष्याच्या सुखासाठी आणि प्रजननासाठी निर्माण केलेली मस्त मस्त चीज आहे, असं मत असणार्‍यांची गोष्ट वेगळी) तरी मागास, अडाणी मुसलमानांमध्ये ’समान नागरी कायदा म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा संकोच होय,’ असा समज काही प्रमाणात पसरणार. आपल्याला दुय्यम नागरीक बनवण्याचाच हा एक भाग आहे अनेकांना वाटणार.
पण मुसलमानांना दुय्यम नागरीक होऊन रहावं लागेल, हे तर नक्की. गुजरातमधल्या २००२ सालच्या शिरकाणापासून ते मुझफ्फरनगर दंगलीपर्यंत मोदी मुसलमानांची विचारपूस करायला गेले नाहीत, बाकीच्यांच्या टोप्या घातल्या तरी मुसलमानी टोपी घालायला नकार दिला, ज्या उत्तर प्रदेशात मुसलमानांची टक्केवारी मोठी आहे, तिथे एकही मुसलमान उमेदवार भाजपने उभा केला नाही;  वगैरे पुरावे या भाकिताला आधार म्हणून देता येतील. यापेक्षा बडोदा-अमदाबादेतल्या मुसलमानांची, मुसलमान वस्त्यांची स्थिती पाहिली तर शंकाच वाटणार नाही.

आणखी पुढे जाऊ. आदिवासी आणि भटके-विमुक्‍त सोडले, तर देशातल्या या सर्वात मोठ्या अल्पसंख्यांक समूहाची सर्वसाधारण स्थिती सर्वात तळाला आजच आहे. त्यापेक्षा खाली तर ते जाऊ शकत नाहीत. बडोदा-अमदाबादेत मुसलमान व्यक्‍तीला बिगरमुसलमान वस्तीत पेइंग गेस्ट म्हणून, पोट भाडेकरू म्हणून जागा मिळणं पूर्ण अशक्य असलं; तरी महाराष्ट्रातल्या किती मराठी हिंदू घरांमध्ये (मराठी वा अमराठी) मुसलमान असे रहातात? नोकर्‍या सहजी मिळत नाहीत म्हणून त्यांना किडुक मिडुक धंदा करावा लागतो. मुसलमान वस्त्या दरिद्री, बकाल असतात. म्हणजे, आजच काही बाबतीत मुसलमान दुय्यम नागरीक आहेत. नात्य़ातून, वस्तीतून, ज्यांच्यात आपला वावर जास्त असतो, त्या आप्‍तस्वकीयांकडून येणार्‍या दबावाला धीटपणे तोंड देऊन जे कोणी मुसलमान liberal – उदारमतवादी भूमिका - बाळगतात; त्यांचीही या भेदभावापासून सुटका नसते.

भारतात (’हिंदुस्तानात’ म्हटलं तर लवकर कळेल!) मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व मिळण्याचा विषय काढला की तात्काळ उत्तर असं येतं की एक तुर्कस्तान हा देश सोडला (आणि इंडोनेशिया आणि मलेशिया आणि इजिप्‍त आणि ...मुद्दा तो नाही, मुद्दा लोकांच्या मनातल्या पक्का झालेल्या पूर्वग्रहाचा आहे) तर सगळ्या मुसलमान देशांत इतर धर्मियांना समान नागरिकत्व नाहीच! मग इथल्या मुसलमानांना काय अधिकार आहे तक्रार करण्याचा? इथली राज्यव्यवस्था निधर्मी आहे, घटनेने सवांना समान लेखलं आहे; असा वकिली वाद घालायचा असेल, तर पाकिस्तान आणि सर्व अरब राष्ट्रांमधल्या उघड भेदभावावर उघडपणे टीका करावी आणि मग भारतातल्या तथाकथित दुय्यम नागरिकत्वावर बोलावं. आणि घटनेने प्रदान केलेल्या समान प्रतिष्ठेचा लाभ हवा असेल, तर तोच तर्क पुढे चालवून समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यावा.

हे असे बिनतोड सवाल केले जाणार. अशा सवालांमागचा जोर वाढत जाणार. हा दुय्यम नागरिकत्वाचाच एक आविष्कार आहे.  दुय्यम नागरिकत्व म्हणजे रांगेत नंबर शेवटी लागणे आणि बसमध्ये सगळे ’प्रथम’ नागरीक बसल्यावर मग बसायला मिळणे नव्हे. दुय्यम नागरिकाला उद्धट, अरेरावी असण्याचा अधिकार नाकारला जातो! शहरात जिथे अपरिचित माणसं एकमेकांच्या निकट वावरतात, एकमेकांशी संबंध ठेवतात, तिथे एका पुरुषाने एका मुलीची छेड काढणे, ह गुन्हाच मानला जातो; पण तो गुन्हा बाई आणि बुवा यांच्या संबंधातला गुन्हा असेल. पुरुष – वा टीनेजर मुलगा – जर मुसलमान निघाला, तर तो संपलाच. जागच्या जागी ’न्यायनाट’ होईल. यालादेखील दुय्यम नागरिकत्वच म्हणतात!

सामाजिक भेदभावसुद्धा कसा जाचक असतो, कसा मनाच्या उभारीला ठेचतो, हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. “मी इथला, या मातीतला; मला काय करायचं आहे पाकिस्तानात आणि सौदी अरेबियात काय चालतं त्याच्याशी? ते थोडेच माझे देश आहेत? माझा देश हा, भारत! हा हिंदुस्तान!” ही भावना बहुसंख्य मुसलमानांच्या मनी वसते. म्हणून दुय्यम वागणूक मिळण्याने ते दुखावतात. या भेदभावात वाढ झाली, तर मुसलमानांच्यात बंडखोरीचं, दहशतवादाचं प्रमाण वाढेल?

तसं वाटत नाही. भवसागरात गटांगळ्या खाताना अस्मिता महत्त्वाची नसते. रोजगाराची, पोट भरण्याची हमी मिळाली, तर अस्मितेची ऐशी तैशी. हेपतुल्लाबाईंनी जर शिक्षण, रोजगार आणि यांसाठी अर्थसहाय्य, या संदर्भात कालच्यापेक्षा उजवी कामगिरी केली, तरी सर्वसामान्य मुसलमान मोदी सरकारला दुवा देईल. आणि ही शक्यता आहे. मोदी मंदिरात जातात, याला कुठला मुसलमान आक्षेप घेणार नाही; खर्‍या धार्मिक माणसाला दुसर्‍या धर्मातल्या धार्मिक माणसाचा राग येत नाही. धार्मिक माणसाचं हाडवैर धर्म न मानणार्‍याशी असतं. आता, मशिदीवरच्या भोंग्यांपेक्षा देवळातल्या आरत्या-भजनांचे आवाज जास्त वर चढतील हे नक्की. कडव्या हिंदू धार्मिकतेचं, ’विश्वहिंदू’ या नव्या कोर्‍या जातीचं वागणं कसं होईल, हा वेगळा विषय आहे.

काँग्रेसच्या राज्यात एक गैरसमज होता की भारतात जर मुसलमानांना वाईट वागणूक मिळू लागली, तर अरब देश नाराज होतील. अजिबात नाही. अरब देशांच्या राज्यकर्त्यांना इथले मुसलमान मुळीच जवळचे वाटत नाहीत. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात असलं काही नसतं. नाही तर सौदी अरेबिया आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे देश कसे काय मित्र असते? पाकिस्तानची गोष्ट वेगळी. एक तर चिकटलेल्या जुळ्यांना वेगळं करावं, तसा पाकिस्तान आपल्यापासून वेगळा झाला. त्यामुळे त्यांचं बरचंसं धोरण भारताला प्रतिक्रिया, अशा दिशेने ठरतं. आणि ’मुसलमान हे वेगळं राष्ट्र आहे,’ याच मुद्यावर फाळणी झालेली असल्याने इथल्या मुसलमानांविषयी खरी खोटी कळकळ दाखवणे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना भाग आहे.

थोडक्यात, आजपर्यंत जे कृतीत होतं पण उक्‍तीत नव्हतं आणि म्हणून मानभावीपणे नाकारलं जात होतं, ते आता उघडपणे होईल: मुसलमानांना दुय्यम नागरीक म्हणून वागवणे. मात्र, तसं ऑफिशियल धोरण जाहीर होणार नाही. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. पण हिंदू सण ’राष्ट्रीय’ सण बनण्याची क्रिया सुरू होईल. हिंदू सणांना राजमान्यता मिळायला झपाट्याने सुरुवात होईल. मात्र, ’हिंदू’ ही एक संकल्पना असली, तरी अठरापगड जातींमधल्या विभाजनामुळे तशी काही प्रॅक्टिकल आयडेंटिटी नाही. ती आयडेंटिटी घडवणे, या अल्टिमेट प्रोजेक्टचा पहिला पाठ लवकरात लवकर आळवला जाईल.

 समान नागरी कायदा, मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व या विषयांचा आणि काश्मीर-३७० कलम यांचा केवळ धर्माच्या धाग्यावरून संबंध लावणे साफ चूक आहे आणि ३७० कलम हा एका बाजूने लोकमताचा आणि दुसरीकडून व्यापारीकरणाचा मुद्दा असल्यामुळे त्याची चर्चा नंतर.