Saturday, January 28, 2023

वाळवी: ‘उद्याचा’ चित्रपट?

 १.

वाळवी आवडला. अगदीच. परेश मोकाशी अपेक्षाभंग करणार नाही, असं वाटत होतं; नाही झाला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ जसे लक्ष घालून काढलेले चित्रपट होते, तसाच हासुद्धा आहे.

चार पात्रांचा चित्रपट आहे. आणखी पात्रं आहेत, पण गोष्ट त्यांची नाही. गोष्ट चार पात्रांची. एक पात्र सोडून बाकी तीन ‘नॉर्मल’ वागतात, बोलतात. चौथं पात्र काहीसं तऱ्हेवाईक आहे. तीन नॉर्मल पात्रांच्या आयुष्यात असं काहीतरी होतं ज्यामुळे त्यांना वेगळं, ॲब्नॉर्मल वागावं लागतं. पण तो एक संदर्भ सोडल्यास जगण्यातल्या सर्व प्रसंगी त्यांचे प्रतिसाद नॉर्मलच आहेत. परंतु पाय घसरावा आणि घसरण थांबवता येऊ नये, असं त्यांचं होतं. प्रॉब्लेम असा आहे की चारांपैकी कोणाशीही समरस होऊन चित्रपट बघत पुढे सरकणाऱ्या कथानकात सामील होणं प्रेक्षकाला शक्य होत नाही. तटस्थ राहून, घडणाऱ्या घटनांपासून लांब रहात त्रयस्थपणे चित्रपट बघणं अपरिहार्य ठरतं. हे बहुसंख्यांच्या पचनी पडत नसावं. कोणीतरी हिरो असतो, कोणी हिरॉइन असते (किंवा एखादं तिसरं पात्र आडून निवेदकाची भूमिका बजावतं) आणि त्याच्या वा तिच्या जागी स्वत:ला कल्पून गोष्ट छान एन्जॉय करता येते, अशी सोयीस्कर रचना ‘वाळवी’ची नाही. सर्वसाधारण प्रेक्षकासाठी ही मोठीच अडचण ठरत असावी.

चित्रपटात हिंसा आहे. पण आशयाचा भर हिंसा दाखवण्यावर नसून पात्रांच्या वर्तनावर आहे. ज्यांनी टॅरान्टिनोचे चित्रपट पाहिले असतील, त्यांना सहज होऊन जाणारी हिंसा बघताना अडचण येऊ नये. चित्रपट महोत्सवामध्ये पहायला मिळणारे चिनी, कोरियन चित्रपट तर भडक हिंसा चवीचवीने दाखवत रहातात. तसं ‘वाळवी’त काही नाही. खरं तर आजकालच्या गुन्हेगारी चित्रपटांमध्ये किंवा युद्धपटांमध्ये खूप माणसं मरत असतात. त्यांचे मृत्यू ‘घटना’ नसतात. ती मरत रहातात आणि चित्रपट पुढे सरकत रहातो. हे लक्षात घेता ‘वाळवी’मधल्या हिंसेला किमान भावनिक आक्षेप असू नये.

पण मारधाड सिनेमातली हिंसा खटकत नाही, ती करणाऱ्याविषयी प्रेक्षकाच्या मनात अढी निर्माण होत नाही, याला सज्जड कारण आहे. जेव्हा मारणारा ‘आपल्या बाजूचा’ असतो आणि तो शत्रूपक्षातल्यांचं निर्दाळण करत असतो, तेव्हा ती हिंसा क्षम्यच नाही, समर्थनीयसुद्धा असते. दसऱ्याला रावण जाळतात, त्याला हिंसेचा उत्सव कुणी म्हणत नाही! मरणारे अगदी रावण नसून नुसते चेहरा नसलेले सैनिक असतील, तरी चालतं. मग तर एका मशीनगनने डझनावारी मृत्यू घडवले तरी भावना दुखावत नाहीत. व्हीडिओ गेममध्ये हेच तर असतं. याच्या उलट प्रकारदेखील चालतो. म्हणजे खलनायकाने, त्याच्या साथीदारांनी नायकपक्षातल्या कोणाला मारणे, छळणे, इजा करणे. इथे त्या हिंसेमुळे प्रक्षोभ निर्माण होतो; पण त्या ‘अन्याया’चं क्षालन करण्याच्या निमित्ताने पुढे जी हिंसा उसळणार असते, त्यासाठी केलेली ती प्रेक्षकाच्या मनाची तयारी असते. चमत्कारिक वाटेल; पण ही हिंसा प्रक्षोभ निर्माण करत असली, तरी नैतिक पातळीवर अस्वस्थ करत नाही!

हे दोन्ही नसेल तेव्हा मात्र गोची होते. ओळखीच्या पात्राची हत्या दुसऱ्या ओळखीच्याच पात्राने केली आणि दोघांपैकी कुणीच दुष्ट, समाजकंटक, विकृत नसलं की कसा प्रतिसाद द्यायचा, हे कळत नाही. यासाठी एकतर चित्रपटासारखी कलाकृती आस्वादताना पूर्ण तटस्थ होणं जमलं पाहिजे किंवा हिंसा या मानवी कृतीकडे चिकित्सक नजरेने बघता आलं पाहिजे. या नैतिक पेचावर मात करता आली तर ‘वाळवी’ हा चित्रपट धमाल आहे. (मी पाहिला तेव्हा थिएटरात पन्नासेक प्रेक्षक होते आणि त्यातले बहुसंख्य वेळोवेळी खदाखदा हसत होते.)

चित्रपटाचं नाव अगदी यथार्थ आहे, असं चित्रपट संपताना अवश्य वाटतं; पण हे बरोबर आहे का? संपताना काय वाटतं, याचा उपयोग काय? पुस्तकाचं मुखपृष्ठ, बातमीचा मथळा यांनी वाचकाचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. तसं झालं तरच बातमी, पुस्तक वाचलं जाणार. आणि वाचून झाल्यावर त्याबद्दल बरंवाईट मत बनणार. ‘वाळवी’ या नावामधून प्रेक्षक आकर्षिला जात असेल, असं वाटत नाही.

२.

‘वाळवी’ बघताना ‘अंदाधुन’ची आठवण आली. एकामागोमाग एक घटना घडत जातात आणि एक नाट्य वेगाने उलगडताना गुंतागुंत वाढत जाते. ‘अंदाधुन’ इतकी गुंतागुंत ‘वाळवी’त नाही. ‘वाळवी’ ची पटकथासुद्धा ‘अंदाधुन’ इतकी वेगवान नाही. पण घटना पटापट समोर मांडत त्यांच्यात प्रेक्षकाला खिळवून पुढे काय होणार, या प्रश्नाच्या गुंत्यात त्याला अडकवण्याचं तत्त्व तेच आहे. अशा वेळी ‘अमुक ठिकाणी तपशील चोख नाही, तमुक बारकावा चुकीचा आहे’; असे आक्षेप इथेही घेणं बरोबर नाही. दिग्दर्शक जे मांडतो आहेत, त्यानुसार पुढे जात गोष्टीची मजा घेण्यातच सिनेमाची गंमत आहे. ‘वाळवी’ची पटकथा ‘वॉटरटाइट’ नाही. काढायचीच तर खुसपटं काढता येतील. पण ते मुद्याला सोडून असेल. गोष्ट रहस्याची नाही, गोष्ट प्रेमाची नाही, नवशिक्या गुन्हेगारांची नाही. गोष्ट एका कृतीमुळे अटळ घटनांच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणसांची आहे. ती जर गंभीरपणे मांडली असती, तर सगळे तपशील, बारकावे महत्त्वाचे ठरले असते आणि त्यांच्या सूक्ष्म तपासणीला सामोरं जाणं चित्रपटाला भाग पडलं असतं. पण जे नाही, त्याची बळजबरी कशाला? चित्रपटाची मांडणी खास परेशटाइप क्रेझी ह्यूमरची आहे. इथे त्या ह्यूमरचा रंग गडद आहे, एवढंच. जे आहे तेच बघावं आणि त्यातच चित्रपटाचं गमक शोधावं.

चित्रपटातले संवाद विशेष लक्षणीय आहेत. म्हणजे, एखाद्या प्रसंगातलं नाट्य अधोरेखित करणारे आहेत. या चटपटीत संवादांविना प्रसंग कदाचित उठावदार झाले नसते. शब्दांमुळे नाट्याला धार येते! आणि असं असूनही हा ‘बोलपट’ नाही. बडबड करत नाही. एडिटिंगसुद्धा सीन रेंगाळू देत नाही. पटकथा खुलासे करत बसत नाही. यामुळे काही प्रेक्षकांचा आकलनाचा गोंधळ उडून नेमकं काय चाललं आहे, हेच कळत नाही, असं होऊ शकतं. पण त्यामुळे आस्वादाला बाधा येत नाही. (फार तर चित्रपट पुन्हा बघण्याची इच्छा होईल. ते चांगलंच की!)

चित्रपटात गाणं नाही, हे थिएटरमधून बाहेर पडताना आठवतं. म्हणजेच गाणं असतं, तर व्यत्यय आला असता! पार्श्वसंगीतसुद्धा प्रसंगांना उठाव देण्यापुरतं आहे. चित्रपटाची ‘थीम सांगण्या’चा अविर्भाव त्यात नाही. पार्श्वसंगीताची पट्टीदेखील वरची लागलेली नाही आणि संगीतामुळे घटना, संवाद यांच्यापासून लक्ष विचलित होत नाही.

अभिनय हे ‘वाळवी’चं खास अंग. चित्रपटात जरी एकही प्रसंग वास्तवाशी, संभाव्यतेशी फारकत घेणारा नसला तरी कथानकाचे पाय सर्ववेळ जमिनीला लागलेले नाहीत. अशा वेळी अभिनयाची जातकुळी निश्चित करण्याला महत्त्व येतं. यात शिवानी सुर्वे हिने रंगवलेलं पात्र सर्वात ‘स्मार्ट’ आहे, लेखनातच तिला लक्षवेधी वन लायनर देण्यात आले आहेत.  तिचा वावर, तिची नजर आणि सर्वात भारी तिचे उद्‌गार, यांनी एकेक प्रसंग जिवंत होतात. कथानक पुढे नेण्याला या पात्राचा सर्वात मोठा हातभार लागतो. हिच्या खालोखाल अनिता दाते. जे घडतं, त्याला हीसुद्धा कारणीभूत आहे. पण अनिताचे सीन्स तुकड्या तुकड्यात येतात. पण त्या तुकड्यांमध्ये तिच्याशी संबंध येणाऱ्यांच्या जगण्याला वळण देण्याची तिची क्षमता लक्षात येते. शिवानीचं पात्र आणि अनिताचं पात्र, हे या चित्रपटाल्या पटकथेतले दोन ध्रुव आहेत. किंवा दोन चाकं आहेत. बिचारे दोन पुरुष त्या चाकांच्या बेलगाम गतीत भिरभिरत जातात.

चित्रपट बघताना हसू येत असलं तरी तो काही लॉरेल-हार्डीचा निरागस विनोद नाही. तो चार्ली चाप्लिनचा कारुण्याची खोली असलेला विनोदही नाही. किंवा आचरट अविर्भाव आणि पडापड यांमधून रंगणारी स्लॅपस्टिक कॉमेडीसुद्धा नाही. जे समोर येतं, त्यातली भीषणता ‘एका थ्रिलरमधला थरार’ यात गुंडाळली जाऊ नये; ती भीषणता समोर येणाऱ्या घटनांमध्ये नसून तुमच्या आमच्या सारख्या माणसांच्या मनात आहे, हे ठसवण्यासाठी योजलेलं माध्यम म्हणून तो विनोद आहे. स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे यांनी त्यांच्या भूमिकांचं बेअरिंग चांगलं सांभाळलं आहे. स्वप्निलची चाल आणि सुबोधचा एकूण वावर पात्रांचा नॉर्मलपणा ठसवत रहातो. घटना गंभीर पण माणसं सर्वसाधारण, या विरोधाचं भान स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे या दोघांच्या वावरात आहे. याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शकाचं!


 

‘वाळवी’ हा चित्रपट इतिहासात स्थान बनवून बसणारा चित्रपट नाही. त्यात तांत्रिक कमकुवतपणा आहे, प्रेक्षकाला अंतर्मुख करून टाकणारा, हादरवून टाकणारा अनुभव नाही, पात्रांपासून दूर नेताना कुठल्या दाहक सत्याचं निकटदर्शन देण्याचा अविर्भाव नाही. पण जे नाही, त्यापेक्षा जे आहे, त्याकडे बघता ‘वाळवी’ हा चित्रपट नि:संशय लक्षणीय आहे. परेश मोकाशी या दिग्दर्शकाच्या एकूण कलानिर्मितीत सकारात्मक भर टाकणारा आहे. तो बघितला तर उद्या कितीतरी निमित्ताने होणाऱ्या चर्चेत त्याचा उल्लेख करता येईल, त्यातले प्रसंग आठवून सांगावेसे वाटतील.

३.

आता थोडं या लिखाणाच्या शीर्षकाविषयी.

याला ‘उद्याचा सिनेमा’ असं का म्हणायचं?

स्वानुभवापासून सुरुवात करतो. आमच्या जुन्या घरी ज्या सुताराने उपलब्ध जागेबरहुकूम फर्निचर बनवून दिलं; तो अगदी नम्र, हळू आवाजात बोलणारा, लाजाळू म्हणावा असा तरुण पुरुष होता. आमच्या घराबरोबर त्याने  परिचयातल्या कितीतरी घरी असंच फर्निचर बनवून दिलं. पूर्ण विश्वासू माणूस. त्याच्यावर घर सोपवून बाहेर जायला कोणाला काही वाटलं नाही. त्यामुळे त्याने त्याच्या बायकोचा खून केला, ही गोष्ट पचवायला सर्वांना जड गेलं. बायकोचा खून करून त्याने तिचा मुडदा स्वयंपाकघरातल्या ओट्याच्या खाली लपवण्याचा प्रयत्न केला. पण ते उघडकीला आलं आणि तो काही वर्षं तुरुंगात गेला. आमच्यातला एक जण त्याला अगोदर खटला चालू असताना आणि नंतर तुरुंगात भेटूनही आला. त्याचा चेहरा डोळ्यांसमोर आणला; त्याचा वावर, त्याचं बोलणं यांची आठवण काढली की हा माणूस खून करू शकेल, हे खरंच वाटत नाही. पण खून तर त्याने केलाच. त्याचा साधाभोळा चेहरा आणि त्याने रागाच्या भरात केलेला बायकोचा खून या दोन गोष्टी एकत्र आणताना मानवी मनाच्या आकलनाच्या कल्पना थोड्या ताणाव्या लागल्या.

तो तुरुंगातून बाहेर आला आणि गावी गेला याला आता खूप वर्षं झाली. आता खून करून प्रेताचे तुकडे करून बॅगेत भरले आणि दूर जंगलात टाकून दिले (किंवा तंदूरमध्ये जाळून टाकले, किंवा आणखी काही) अशा बातम्या पेपरात वाचण्याची नजरेला सवय झाली. असं करणारे भाषा, धर्म, शिक्षण, कमाई असल्या कुठल्याच रकान्यात सोयीस्करपणे मावत आहेत, असं नाही. (मारणारा मुसलमान असल्यावर घटनेला धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी वापरण्याचं हिडीस राजकारण सोडून देऊ.) मागे मुंबईत असा प्रकार झाला तेव्हा माझ्या संपर्कातले काही जण त्यांना ओळखणारे निघाले. ते हादरले होते. नीट नोकरी, व्यवसाय करणारे, सर्व विषयांवर आपल्यासारख्याच प्रतिक्रिया देणारे, आपल्यासारखेच दिसणारे वागणारे हे लोक असलं काही कसं करू शकतात, हे त्यांना उमजत नव्हतं.

‘वाळवी’मध्येसुद्धा एकेका पात्राच्या स्वभावातली सामान्य वैशिष्ट्यं जेव्हा निस्संकोच व्यक्त होतात तेव्हा त्यातून क्षणिक हसू आलं तरी लगेच दचकायला होतं. प्रसंग काय आणि हे आपले नॉर्मल वागताहेत! अशा भयंकर वेळी सगळी सगळी अवधानं विसरली जायला हवीत. अंगावर येऊन कोसळलेल्या दारुण संकटानेच मन भरून जायला हवं. थरकाप उडायला हवा. पण त्या पात्रांचं तसं काहीच होत नाही. ते अस्वस्थ होतात, संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करतात; पण ते करताना त्यांची डोकी ठिकाणावर असतात. त्यांच्या विचारप्रक्रियेतलं लॉजिक डळमळीत होत नाही. चित्रपटाच्या प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं नाही आणि सारासार विवेक जागा ठेवला, तर चित्रपटाचा आस्वाद कठीण होईल.

पण अगदी नॉर्मल भासणारे असलं कृत्य करतात, हे तर वास्तव आहे! इतकंच नाही, गर्दीचं रूपांतर झुंडीत करून त्यांना घाऊक हिंसा करण्यासाठी उत्तेजन मिळताना आपण पहातो आहोत. अमेरिकेत कुणीतरी माथेफिरू उठतो आणि ऑटोमॅटिक बंदूक चालवून डझनभर निष्पाप जीवांची हत्या करतो आणि अशा घटना तिथे अपवादात्मक म्हणता येणार नाहीत, इतक्या सातत्याने घडत असतात. आपल्या देशाची स्थिती फार वेगळी नाही. झुंडींनी केलेली हिंसा तर आपल्याला आता धक्कादायकसुद्धा वाटत नाही. आणि मग भीती वाटू लागते की सामाजिक हिंसेला तर मान्यता मिळते आहे; मग त्याच प्रकारची हिंसा व्यक्तिगत पातळीवर होण्याकडे प्रवृत्ती व्हायला अजून किती वेळ आहे? 

चित्रपट ही आधुनिक लोककला आहे. समाजात जे घडतं, त्याचे पडसाद चित्रपटात लगेच पडतात. ‘वाळवी’ बघून जर मराठी प्रेक्षकाला अस्वस्थ वाटत असेल, ‘हे असलं तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्यात इतक्या सहजतेने होताना दाखवता कामा नये,’ अशी प्रतिक्रिया त्याच्या मनात उमटत असेल; तर हा चित्रपट सामाजिक भावस्थितीचं प्रतिबिंब दाखवत नाही, असं म्हणणं भाग आहे. पण तेवढंच नाही. तो भविष्याची चाहूल घेतो आहे का? आज सामाजिक हिंसा आपण मान्य केली आहे; उद्या तशीच हिंसा वैयक्तिक पातळीवर होऊ लागली तर आपण त्या स्थितीचा असाच सहज स्वीकार करू का? त्या ‘उद्या’चा आरसा तर ‘वाळवी’ आपल्यासमोर धरत नाही? वाळवी समाजवास्तूलाच तर लागलेली नाही?

 

‘वाळवी’ या चित्रपटाचा रोख हे प्रश्न प्रेक्षकापुढे उभे करण्याकडे आहे, असं जाणवत नाही. पण सध्याच्या सामाजिक वातावरणाकडे काळजीने बघणाऱ्याची या प्रश्नांपासून सुटका नाही.

Tuesday, November 15, 2022

राहुल गांधीं यांची भारत जोडो यात्रा. कशासाठी? कोणासाठी?

 देशात यापूर्वी दोन मोठ्या पदयात्रा झाल्या. गांधींनी केलेली दांडीयात्रा आणि विनोबांची भूदान यात्रा. या दोन्ही यात्रांमागे स्पष्ट उद्देश होता. गांधींना मिठावर लावलेल्या कराचा निषेध करायचा होता. विनोबा दानात जमिनी मिळवून भूमीहीनांमध्ये त्यांचं वाटप करण्यासाठी चालले होते. राहुल गांधींच्या पदयात्रेमागे असलं काही स्पष्ट उद्दिष्ट-मागणी-अपेक्षा नाही.

राहुल गांधीं यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात, म्हणजे नांदेड जिल्ह्यात शिरली. ही पदयात्रा आहे. राहुल गांधींनी कन्याकुमारीला चालायला सुरुवात केली आणि गेले तीन महिने ते चालत आहेत. महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमधून ती पुढे मध्य प्रदेशात जाईल. महाराष्ट्रात राहुल गांधी एकूण ३८२ किलोमीटर चालतील. यात्रा काश्मीरमध्ये श्रीनगरला संपेल, जिथे भारताचा तिरंगा फडकवण्याचा त्यांचा इरादा आहे. पाच महिन्यांमध्ये एकंदर साडेतीन हजार किलोमीटर चालण्याचा संकल्प राहुल गांधींनी केला आहे.

अगदी कन्याकुमारीपासून त्यांच्याबरोबर सव्वाशे साथी चालताहेत, ज्यांची निवड खास राहुल गांधींनी केली आहे. हे सगळे जण श्रीनगरपर्यंत जाणार आहेत. यांच्याशिवाय जागोजागी स्थानिक काँग्रेस पुढारी आणि कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे सभासद, उत्साही तरुण, यात्रेच्या उद्दिष्टांशी सहमत असलेले कुठल्याही क्षेत्रातले कुणीही काही काळ सोबत चालताहेत. एवढं मोठं अंतर चालणे हे किती अवघड काम आहे हे कळणारे, यात्रा म्हणजे नेमकं काय आहे, याविषयी कुतूहल असणारे कितीतरी लोक यात्रामार्गाच्या दुतर्फा उभे राहून माहोल अनुभवत आहेत. यांच्याबरोबर कालपर्यंत ‘पप्पू’ म्हणून हेटाळणी झालेल्या राहुल गांधी यांनी हे अवघड काम कसं अंगावर घेतलं आहे आणि त्यांना ते किती झेपतं आहे, ते कसे चालत आहेत, हे प्रत्यक्ष बघायला आलेलेसुद्धा अनेक आहेत.

या यात्रेचा मार्ग विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांना स्पर्श न करता जातो आहे. यात्रेची वेळही निवडणुकीला सोयीस्कर नाही. यात्रेचा उद्देश या निवडणुकांवर थेट प्रभाव टाकण्याचा नाही, हे उघड आहे. यात्रा जाणार असलेल्या राज्यांमधल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारीच्या प्रचारार्थ भाषण देण्याची इच्छासुद्धा दिसत नाही. महाराष्ट्रात नांदेड आणि शेगाव या दोन ठिकाणी राहुल गांधींचं भाषण आहे. तसे ते प्रत्येकच मुक्कामी बोलतात. पण कमी बोलतात आणि जास्त ऐकतात. जेव्हा बोलतात तेव्हा पक्षाचा प्रचार केल्यासारखं बोलत नाहीत. या यात्रेमुळे काँग्रेसची स्थिती सुधारण्याची शक्यता जरी असली तरी राहुल गांधींच्या बोलण्यात प्रचारकी थाटापेक्षा देशाच्या गंभीर अवस्थेवर भाष्य करण्याचा भाग जास्त असतो. ते कमी बोलत असल्याने आपोआपच स्थानिक नेत्यांना स्वत:च्या वक्तृत्वाला आवर घालावा लागतो. एकूणच भाषणबाजी कमी होते.

मात्र, जे कोणी राहुल गांधींना भेटतात, त्यांचं बोलणं ते गंभीरपणे ऐकून घेतात. आई सोनिया गांधींसारखे राहुल गांधीदेखील बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर देतात, असं मत लोकांच्यात पक्कं होऊ लागलं आहे.

यात्रेने महाराष्ट्रात, म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात प्रवेश केला तिथपासून, म्हणजे ७ तारखेपासून तीन दिवस मी यात्रेच्या आसपास होतो. यात्रेचं वातावरण अनुभवणं, यात्रेत सहभागी झालेल्यांशी संवाद साधणं, यात्रा बघायला आलेल्यांशी बोलणं मला करायला मिळालं. यात्रेच्या या तीन दिवसांच्या अनुभवावरून एकूण यात्रेविषयी, राहुल गांधींविषयी, यात्रेच्या आयोजनाविषयी आणि अखेरीस यात्रेच्या फलिताविषयी निर्णय दिल्यागत मतप्रदर्शन करणं बरोबर होणार नाही. पण जी काही मतं झाली ती मांडली तर वावगं ठरू नये.

मी का गेलो? मला निखिल वागळेने विचारलं आणि मी तात्काळ ‘हो’ म्हणालो. म्हणजे माझ्या जाण्याचं श्रेय निखिलचं. तरीही माझी इच्छा होती, यात्रेला जाण्यामधून मला काहीतरी मिळेल, असं वाटत होतं म्हणून मी गेलो, हेसुद्धा खरंच. देशाची सद्यस्थिती गंभीर आहे आणि दिवसेंदिवस ती बिघडत चालली आहे, असं माझ्यासारख्या अनेकांना वाटत आहे. ही यात्रा निवडणूकलक्ष्यी नाही, देशस्थितीकडे लक्ष वेधणारी आहे, असं वाटल्याने आणि मग यात्रा खरोखर कशी आहे, हे स्वत: जाणून घेण्यासाठी मी गेलो. अर्धवट कुतूहल म्हणून, काही प्रमाणात यात्रेशी सहमत होतो म्हणून.


१.

 राहुल गांधींना देगलूरला पोचायला उशीर झाला. तेवढा वेळ आम्हाला यात्रेच्या मार्गावर जमलेल्यांशी बोलायला मिळाला. बोलल्याबरोबर एक गोष्ट फाडकन स्पष्ट झाली: देशाची काळजी वाटणे ही नंतरची गोष्ट आहे, लोकांना स्वत:विषयीच चिंता वाटते आहे.

काही तरुण भेटले. एक जण म्हणाला, मी एमफार्म आहे. हैद्राबादची अमुक कंपनी आम्हाला पिळून घेते. वर्षाला तीन लाखाचं पॅकेज देतात; पण तीन वर्षांचा बाँड लिहून घेतात. तीन लाखाचे वर्षाने साडेतीन होतील, मग चार होतील; पण दुसरी नोकरी घेतली तर दुप्पट होईल पॅकेज. एमफार्मला बाकी काही ओपनिंगच नाही. स्वत:चं औषधाचं दुकान काढलं तरच काही कमाई होऊ शकते. देगलुरात औषधांची दीडशे दुकानं आहेत! पण दुकान काढायचं तर भांडवलापासून बरंच काही लागतं.

दुसरा म्हणाला, मी सिव्हिल इंजिनियरिंग केलं. पण तिथे काहीच स्कोप नाही हे लक्षात आल्यावर आयटीत शिरलो. आता मला पंधरा लाखांचं पॅकेज आहे; पण माझ्या सिव्हिलमधल्या मित्राला त्यापेक्षा खूपच कमी मिळतात. ही विषमता कमी झाली पाहिजे.

बाजूला थोड्या मोठ्या वयाचा एक जण उभा होता. तो म्हणाला, राहुल गांधी येणार म्हणून इथल्या हॉस्पिटलचा रस्ता विटांचे तुकडे टाकून सपाट केला. कारण हॉस्पिटलशेजारी राहुल गांधी शिवाजी पुतळ्याला हार घालणार! अगोदर तो रस्ता आपण आता उभे आहोत, तिथे आहे तसा खडबडीत होता. राहुल गांधींनी दर सहा महिन्यांनी देगलूरला यावं, म्हणजे इथले रस्ते नीट होतील! पंधरा दिवसांतून एकदा आले तर गावच स्वच्छ होऊन जाईल!

आणखी एक जण म्हणाला, ते येणार पण गावात जाणार नाहीत. नाक्यावरच्या पुतळ्याला हार घालून बाहेरच्या बाहेर निघून जाणार. ते गावात आले, तर जास्त बरं होईल.

काही मुसलमान बायका भेटल्या. म्हणाल्या, इथे येण्यापूर्वी आम्ही प्रार्थना करून आलो. त्यांना विचारलं, कसली प्रार्थना? उत्तरल्या, राहुल गांधींचा पक्ष निवडून यावा म्हणून प्रार्थना केली!

पुढे एक शेतकरी तरुण भेटला. तो म्हणाला, आम्ही सोयाबीन घेतो. पण भाव मिळत नाही. चार महिन्यातून एकदा माझ्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होतात, हे खरं आहे; पण त्यांचा काही उपयोग नाही. ते न मिळता सोयाबीनला भाव मिळाला, तर जास्त बरं होईल.

तो असंही म्हणाला, मी २०१४ला पहिल्यांदा मतदान केलं. तेव्हाच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा खूप राग आला होता म्हणून मोदींना मत दिलं. २०१९मध्ये वाटलं, या सरकारला अजून पुरेसा वेळ मिळालेला नाही, अजूनही ते काहीतरी चांगलं करतील; म्हणून पुन्हा मोदींनाच, म्हणजे भाजपला मत दिलं. आता देणार नाही. ते मोठ्या गोष्टी करतात, पण शेतकऱ्याच्या भल्याचं काही करत नाहीत.

बेकारी, महागाई यांनी चिंतित झालेले बरेच जण भेटले. लक्षात असं आलं की ‘देशामधील वातावरण’ अशा विशाल दृष्टिकोनातून विचार करणारे आणि त्यातून भारत जोडो यात्रेकडे आकर्षित झालेले फार थोडे लोक आहेत. बहुतेकांना आपापल्या जगण्याची भ्रांत आहे. दिवसेंदिवस स्थिती बिघडत चाललेली आहे, हे जाणवून हे लोक अस्वस्थ झाले आहेत. हिंदू-मुसलमान, प्राचीन परंपरा यांचं त्यांना आकर्षण वाटत नाही. उलट, यातून काहीच साध्य होत नाही, हे आता त्यांच्या लक्षात येऊ लागलं आहे. सध्याच्या सरकारवर ते नाराज आहेत आणि आपोआप राहुल गांधींकडून त्यांना आशा वाटते आहे.

यांच्या नाराजीमधून भाजपची मतं कमी होतील का? काँग्रेसची मतं वाढतील का? मनातल्या भावनांचं रूपांतर मतदानाच्या आकड्यांमध्ये होईल का?

२.


 यात्रेचे सर्वसाधारणपणे तीन भाग दिसले. पहिला भाग राहुल गांधी आणि त्यांनी निवडलेले त्यांचे मोजके सहकारी. यांची विश्रांतीची, पहुडण्याची जागासुद्धा वेगळी. तिथे इतरांना प्रवेश नाही. त्यांना वेगळे पास दिले होते.

पण राहुल गांधींच्या नजरेने कुणाला टिपलं आणि त्यांनी त्याला वा तिला जवळ बोलावलं तर भेट होऊ शकते. एखाद्याने भेटीची तीव्र इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा आतल्या गटापर्यंत पोचली तरी भेट घडून येऊ शकते. एक जण होती, जी म्हणत होती, माझे आजोबा इंदिरा गांधींना भेटले होते. माझ्या वडिलांनी राजीव गांधींची भेट मिळवली होती. मला राहुल गांधींना भेटायचंच आहे! तिला भेटायला मिळालं. राहुल गांधींबरोबर तिचा फोटो निघाला आणि पुढची यात्रा ती उत्साहाने चालत राहिली. म्हणजे राहुल गांधींची भेट अवघड असली तरी अप्राप्य नव्हती. भेटल्यावर ते मोकळे वागत होते, कुण्या राजपुत्राने, विश्वगुरुने सामान्य प्रजेवर उपकार केल्यासारखा भाव त्यात नव्हता.

तरीही जे कुणी मोठ्या आशेने आले होते, ते सहजपणे राहुल गांधींना भेटू शकत नव्हते, हेसुद्धा खरं. सर्वसामान्यांशी त्यांचा संवाद आणखी जास्त प्रमाणात व्हायला हवा होता, असं वाटून गेलं. यात्रा म्हणजे समूहाने चालणे. अशा वेळी ज्या कुणाला थोड्याफार प्रमाणात यात्रेशी समरस व्हावंसं वाटत आहे, आणि त्या समरसतेच्या भावनेचं कृतिशील रूप म्हणून यात्रेबरोबर चालायचं आहे; त्यांना ते समाधान मिळवून देण्याचा काहीतरी प्रतिकात्मक मार्ग असायला हवा होता. म्हणजे, दोन मुख्य गटांमागून चालणाऱ्याला एखादा बिल्ला जरी छातीवर लावायला मिळाला असता, तरी त्याला वा तिला यात्रेत सामील झाल्याचं, यात्रेच्या उद्दिष्टांसाठी काहीतरी सांकेतिक कृती केल्याचं समाधान मिळालं असतं. यात्रेशी, पर्यायाने राहुल गांधींशी आणि मग आपोआप काँग्रेसशी तो जोडला गेला असता! तसंच, जिथे जिथे राहुल गांधी थांबत होते तिथे तिथे स्थानिकांपैकी नीट बोलता येणाऱ्यांना त्यांची भेट मिळाली तरी मोठा परिणाम होऊ शकतो, असं वाटतं.

दुसरा भाग होता, मीडियावाल्यांचा, काही काळ सोबत चालणाऱ्यांचा. आम्ही हा पास मिळवला होता. त्यामुळे विश्रांती घ्यायला किंवा दिवसभराची चाल पूर्ण झाली म्हणून यात्रा थांबली की आम्हाला तिथे जायला मिळत होतं. तिथल्या लोकांशी बोलायला मिळत होतं. उरलेल्यांची व्यवस्था काहीशी सैल होती, पण होती. यापेक्षा महत्त्वाचं ठरलं ते वातावरण. हे कसं ठरतं, हे सांगता येत नाही. कोणी घोषणा देत नव्हतं की तिथे प्रेरणादायक गाणी गात नव्हतं की भाषणं देत नव्हतं. तरी वातावरण भारलेलं होतं. इथे काहीतरी वेगळं, काळाच्या पटावर लक्षणीय ठरेल असं काहीतरी चाललं आहे, असं वातावरण होतं.

हे काय असतं? आपण इतिहासाचे साक्षी होत आहोत, असं वाटण्यामागे स्वत:च्या मनातल्या इच्छेचे पडसाद असतात, हे खरं; पण त्याची साथ येते का? एकाची लागण दुसऱ्याला होते का? कारण हालचालीत काहीसा जास्त उत्साह होता. तिथे नुसतं असण्यात आपण काहीतरी योगदान देत आहोत, असं होत होतं. या


वातावरणात मोठी भर टाकली ती ७ तारखेला रात्री झालेल्या मशाल मिरवणुकीने. हातात मशाली घेऊन लोक चालत होते, वेगाने चालत होते, चालताना घोषणा देत होते; सगळ्यांच्या पुढे चक्क एक बँड होता. हे दृश्य अत्यंत प्रभावी होतं. मिरवणुकीच्या दुतर्फा लोक उभे होते, आम्हीसुद्धा त्यातच होतो. राहुल गांधींचा चालण्याचा वेग चांगलाच होता. त्यांच्याबरोबर रहाण्याची धडपड करणाऱ्या नेतेमंडळींची तिरपीट उडत होती. मिरवणूक एक क्षण थबकत नव्हती. अगोदरच भारलेल्या वातावरणाला या मशाल मिरवणुकीने विद्युतभारितच केलं.

बघणाऱ्यांच्या, मिरवणुकीत भाग घेणाऱ्यांच्या, या सगळ्या प्रकाराला साक्षी असणाऱ्यांच्या मनात या वातावरणाने जो ठसा उमटवला, तो किती काळ राहील? तो रहावा, त्याच्या प्रभावातून देशात घडणाऱ्या घटनांचा रंग बदलावा  आणि एक वेगळं राजकीय वळण घ्यावं, यासाठी काँग्रेस काय करणार आहे? भारत जोडो यात्रेविषयी आकर्षण वाढत चाललं आहे. संघाच्या विषारी प्रचाराने राहुल गांधींविषयीचं मत कलुषित केलं होतं, त्याचा मागमूस राहिलेला नाही. उलट, आज जर कुणी त्यांच्याविषयी कुचेष्टेच्या सुरात बोलू लागला, तर त्या बोलणाऱ्याच्या हेतूमधल्या शुद्धतेबाबत लोक शंका घेऊ लागले आहेत. राहुल गांधींनी वातातरणाला जाग आणली आहे. कितीही म्हटलं, तरी ते खूप जास्त लोकांना भेटू शकत नाहीत, खूप जास्त लोकांशी संवाद साधू शकत नाहीत. चालणाऱ्या माणसाला ते शक्य नाही. म्हणून आता पुढची जबाबदारी यात्रा समर्थकांची, काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. या भारलेल्या वातावरणाचा फायदा घेण्याची काही योजना आहे का?

३.

तिथे भेटलेल्यांमध्ये स्थानिक नेतृत्वाविषयीची नाराजीसुद्धा स्पष्टपणे व्यक्त झाली. ‘आम्हाला बघून हे गाडीची काचसुद्धा खाली करत नाहीत, आता मोठे रस्त्यावरून चालतायत!’ राहुल गांधींना काँग्रेसला ऊर्जितावस्था आणायची असो की देशातल्या सामाजिक राजकीय वातावरणात परिवर्तन घडवून आणायचं असो; काँग्रेसमधली आजची नेतेमंडळी त्यात सर्वात मोठा अडथळा ठरणार आहेत. नेतृत्वामधलं सामर्थ्य लोकसंग्रहातून येतं, हे त्यांना माहीत नाही का? जनतेत असा समज आहे की या नेत्यांचा सर्वसामान्यांशी संपर्क तुटला आहे, जमिनीवर उतरून काम करणं ते विसरून गेले आहेत. हा समज खोडून काढणं कठीण आहे; कारण मंडळी जुन्या, सरंजामी मनोवृत्तीत पूर्ण मुरलेली आहेत. देगलूर ते नांदेड मार्गात राहुल गांधींचं स्वागत करणारी जी पोस्टर्स होती, त्यांवर अशोक चव्हाणांबरोबर त्यांची मुलगीसुद्धा झळकत होती! पुढे काही पोस्टर्सवर खतगावकरांची सून होती. या बायकांनी राजकारणात येऊ नये, असं नाही; पण रस्ताभर मुखडा झळकण्याचा मान त्यांना मिळतो तो घराण्याची परंपरा चालू ठेवण्यातूनच. अशोक चव्हाणांनी त्यांचे पिताजी शंकरराव यांचे इंदिरा, राजीव यांच्याबरोबरचे फोटोसुद्धा लावले होतेच. ते कदाचित राहुल गांधींवर छाप टाकण्यासाठी असावेत.आमच्या घरात राज्याच्या नेतृत्वाची जुनी परंपरा आहे, हे दाखवण्यासाठी असावेत.

राहुल गांधींना हे कळत नसेल का? त्यांच्यासोबत कन्याकुमारी ते श्रीनगर चालण्यासाठी त्यांनी निवडलेले सव्वाशे जण उद्याचे काँग्रेस नेते आहेत का? एवढं अंतर चालण्याचा मनसुबा राखणारे मनाने शरिराने तरुण तर निश्चित असणार. म्हणजेच तरुणांच्या इच्छा आकांक्षा ओळखणारे, तरुणमनाने विचार करणारे असणार. पण त्यांना प्रस्थापित करायचं असेल तर सध्याच्या नेतृत्वाला कसं काय बाजूला सारणार?

४.

पण अशोक चव्हाणांनी काही हजार लोकांच्या विश्रांतीची, झोपण्याची, खाण्यापिण्याची सोय उत्तम केली होती. जेवणाची जबाबदारी व्यावसायिक एजन्सीकडे होती. त्यांचा स्टाफ प्रत्येकाला हवं नको विचारत होता. पदार्थ चमचमीत होते. जिलबी, मूगडाळ बर्फी यांसारख्या स्वीट डिशेस होत्या. नंतर पहुडण्यासाठी गाद्या घातल्या होत्या. तिथे चक्क मोबाईल चार्ज करण्याचे पॉइंट्ससुद्धा होते! यासाठी स्थानिक काँग्रेसवाल्यांनी, म्हणजे बहुधा अशोक चव्हाणांनी खर्च केला होता आणि तयारीकडे जातीने लक्ष दिलं होतं. अर्थात, यात राहुल गांधींबरोबर असणाऱ्या त्यांच्या सल्लागारांचादेखील मोठा हात होता.


यावरून असा समज होऊ शकतो की राहुल गांधींची पदयात्रा म्हणजे ऐषारामी प्रकार असावा. तसं म्हणता येणार नाही. राहुल गांधी वेगाने चालतात. रोज सरासरी पंचवीस किलोमीटर चालतात. पंचवीस किलोमीटर हे फार मोठं अंतर नाही. चालण्याची थोडीफार सवय असलेला दिवसभरात तेवढं सहज जाऊ शकतो. पण राहुल गांधी गेले तीन महिने रोज तेवढं चालत आहेत! आणखी तीन महिने रोज तसंच चालणार आहेत! उपोषणाचं नाटक करता येतं. भिंतीवर खिडकी रंगवून शाळेत गेल्याचं नाटक करता येतं. मांडी घालून डोळे मिटून फोटो काढून घेतला की गुहेत ध्यान केल्याचंसुद्धा नाटक होऊ शकतं. पण चालण्याचं नाटक करता येत नाही! तिथे खरंच चालावं लागतं. राहुल गांधी ना कुठे लपू शकत, ना त्यांच्या वतीने दुसरं कुणी चालतंय, असं होऊ शकत. ते लोकांच्या गराड्यात असतात. त्यांच्या चालण्यात प्रचंड उत्साह दिसून येतो. चालताना ते लोकांशी बोलतात, गप्पा मारतात. नंतर पत्रकार परिषदा घेतात. यात कुठेही ते थकलेले, मरगळलेले, झोपाळलेले दिसत नाहीत.

आणि हे सगळ्यांच्या लक्षात येतं. त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो. लोक अचंबित होतात. इतर नेत्यांची दमछाक होताना पाहून करमणूक होत असली तरी राहुल गांधींविषयी आदरच वाटतो. आज, या घटकेला देशात दुसरा कुठला मोठा नेता इतका चालू शकतो? चालताना बोलू शकतो? या माणसाबद्दल जनतेला आदराबरोबर आपुलकी, जिव्हाळा वाटू लागला आहे. त्यामुळे राहुल गांधी जे बोलतात, त्याकडे लक्ष द्यावंसं लोकांना वाटू लागलं आहे. उलटा प्रचार काहीही म्हणो, यात्रेमुळे लोकांचा ओढा राहुल गांधींकडे प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वाढतो आहे.

५.

या जनभावनेचा लाभ काँग्रेसला घेता येईल का? यात्रेच्या मार्गावर येणारे लोक ही भावना बरोबर घेऊन आपापल्या गावी, घरी जातील. तिथेही हे लोण पोहोचेल. पण त्यापलीकडे? यात्रेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असे कुठून कुठून आलेले लोक आम्हाला भेटत होते. सगळ्यांना जसं कुतूहल होतं, तसंच राहुल गांधींनी हे जे चालवलं आहे, त्याला पाठिंबा दर्शवण्याची, त्यातून स्वत:ला अनुकूल अर्थ शोधण्याची इच्छाही त्यातल्या बहुतेकांना होती. भाजप आणि संघ यांनी देशाचं जे वाटोळं करायला घेतलं आहे, त्या प्रक्रियेला थोपवण्याची सुप्त शक्ती या यात्रेतून उमलू शकेल, असा आशावाद त्यांच्या मनी होता. ठीक आहे, आलेले सगळे एक प्रकारे अनुकूलच होते. पण न आलेले? त्यातले काही विरोधक असणारच. पण न आलेल्यात बहुसंख्या इतर अवधानांमुळे येऊ न शकलेल्यांची असणार. कारण या यात्रेने भारतभरातल्या सर्वच लोकांना चाळवलं आहे. त्यातल्या काहींना, विशेषत: मीडियाला दहशतीपायी झोपण्याचं सोंग घ्यावं लागत आहे, हे खरं; पण इतर कितीतरी लोकांना यात्रेविषयी उत्सुकता आहे. त्यांच्यापर्यंत हा आशावाद नेणे, त्यांना यात्रेच्या उद्देशात सामील करून घेणे हे काँग्रेस कार्यकर्त्यांचं काम आहे. हे काम ते करतील का?

यात्रेच्या या सगळ्या अनुभवांमध्ये एक महत्त्वाची भर घालायला हवी. आम्ही जिथे गेलो, तिथे निखिलला लोक ओळखत होते. त्याच्याबरोबर सेल्फी काढत होते. त्यांच्यात तरुणांची संख्या प्रचंड होती. आयबीएन लोकमतची, मॅक्स महाराष्ट्रची, निखिलच्या एकूण पत्रकारितेची आठवण ते आवर्जून काढत होते. त्यातला न आवडलेला भाग सांगून मोकळे होत होते. हे मला आशादायक वाटलं. निखिल वागळे हा कुणी सिनेस्टार किंवा सीरियलस्टार नाही. त्याचा मुखडा सर्वज्ञात आहे म्हणून हे तरुण त्याच्याकडे येत नव्हते. निखिल एका बाजूने एका विशिष्ट विचारसरणीचा प्रतिनिधी आहे. त्यापेक्षा जास्त तो निर्भीड पत्रकारितेचं प्रतीक आहे. ‘तुमच्यासारखं आता कुणी बोलत नाही हो,’ अशी हळहळ सतत ऐकू येत होती. हे तरुण नांदेडपुरते मर्यादित नव्हते. ते महाराष्ट्रभरातले होते. निखिलच्या रोखठोक बोलण्याला, त्याच्या उघड आणि खणखणीत भाजपविरोधाला इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये पाठिंबा असेल, असं मला वाटत नव्हतं. एक प्रकारे निखिलने आणि त्याच्यासारखी पत्रकारिता करणाऱ्यांनी तरुण मनांची नीट मशागत केली आहे! उन्नती सगळ्यांनाच हवी आहे; पण सगळेच साधनशुचितेविषयी बेफिकीर नाहीत! सार्वजनिक नीतीमत्तेविषयी चाड असलेले तरुण पुष्कळ आहेत! महानगरी मध्यमवर्गातल्या मध्यमवयीन सदस्यांमध्ये दिसणारं सडेल मनोवृत्तीचं चित्र प्रातिनिधिक नाही!

योगेंद्र यादव यात्रेबरोबर आहेत. पण त्यांनी स्वत:वर एक अधिकचं काम घेतलं आहे. जिथे जिथे यात्रा थांबते, तिथे तिथे स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्या बैठकी योगेंद्र यादव भरवत आहेत. या भेटीतून स्थानिक अडचणी, अपेक्षा यांचा अंदाज घेत आहेत. यातून लोकांना आज काय हवं आहे, याचा खूप मोठा डेटा त्यांच्याकडे जमा होतो आहे. योगेंद्र यादव हा शिस्तीने काम करणारा मनुष्य आहे, ज्याच्या स्वच्छ चारित्र्याविषयी आणि प्रामाणिक हेतूंविषयी कोणालाही संशय नाही. लोकांना एका उद्देशाची जाणीव करून देत असताना या यात्रेतून लोकांकडूनही संदेश मिळवला जातो आहे.

६.

या यात्रेचं फलित काय असेल?

भारत जोडो यात्रेद्वारे राहुल गांधी भारतात क्रांती घडवून आणणार, असं कुणालाही वाटत नाही. काँग्रेसच्या मतांमध्ये, लोकसभा-विधानसभा यामधल्या जागांमध्ये किती फरक पडेल, याचा नीट अंदाजसुद्धा या घडीला बांधता येणार नाही. सर्वसाधारण जनमानसात अस्वस्थता निर्माण होऊन भाजपच्या मताधिक्यात घट होईल, हे नक्की. पण ती घट किती असेल, देशाच्या राजकारणाला वळण देण्याइतकी वजनदार असेल का, हे प्रश्न अजून बराच काळ अनुत्तरित रहाणार आहेत. शिवाय राहुल गांधींनासुद्धा कसली घाई असल्याचं भासत नाही. हळू हळू पसरत जाणाऱ्या जललहरींप्रमाणे हे वातावरण, ही अस्वस्थता देशभर पसरेल की काही काळ खळबळ निर्माण करून विरून जाईल; भाजपची चाणक्यनीती सातत्याने ज्या भावनाप्रक्षोभाच्या लाटा सोडत असते त्यांच्यात नष्ट होईल, हे तरी कुठे कुणाला माहीत आहे?

एक जण म्हणाला, तेच खरं: काही नाही तरी सध्या देशात असलेलं दहशतीचं वातावरण कमी झालं आणि लोक त्यांचा असंतोष मोकळेपणाने व्यक्त करू लागले, तरी या यात्रेने खूप काही साध्य केलं, असं म्हणावं लागेल. कारण मग राजकारणाला योग्य दिशा तरी मिळेल आणि मग जे व्हायचं ते होईल.

Sunday, November 6, 2022

कुल्फी, दिवाळी २०२२. वर्ष १, अंक १.

 


१.

ॲलन शॉ यांनी केलेलं मुखपृष्ठ पांढऱ्या रंगात आहे. अंकाचं, विशेषत: दिवाळी अंकाचं कव्हर पांढऱ्या रंगात नसतं. हे आहे. त्यामुळे हा अंक इतर अंकांच्या गर्दीत उठून दिसत असेल. पांढऱ्या पार्श्वभूमीवर हलक्या रंगात छोटी छोटी चित्रं आहेत. काही खरे, काही काल्पनिक प्राणी आहेत. एक मुलगा-मुलगी जोडी आहे. बरीच मजा मजा आहे. रेषेचं वळण मारिओचं नाही, तपशिलांची गर्दीसुद्धा मारिओइतकी नाही; पण चित्रात रमून जाऊन नवनवीन गंमती सापडत रहाव्यात, हे जसं मारिओच्या चित्रात होतं, तसंच इथे होतं. पांढऱ्या कॅनव्हासवरच्या जणू जलरंगातलं हे चित्र मनात प्रसन्न भाव जागवतं. ज्यांच्यासाठी हा अंक काढला आहे, त्या लहान मुलांना ते पसंत पडायला हवं.

 आख्खा अंक रंगीत आहे. भरपूर चित्रं आहेत. आणि चित्रांची शैली एकसारखी नाही. कधी खडूने काढल्यासारखी, कधी ब्रशने रेखाटलेली; लहान मुलांची, ‘चाइल्ड आर्ट’ म्हणावी अशी चित्रं आहेत. मोठ्यांनी काढलेलीसुद्धा आहेत; पण त्यात ‘चित्रं बाळांच्या पसंतीसाठी आहेत,’ ही जाणीव अजिबात सुटलेली नाही. एकही चित्र वास्तव प्रमाणाला धरून नाही, ‘हुबेहूब’ नाही. प्रत्येक चित्रात भाव व्यक्त करण्याला महत्त्व आहे. चित्रांमधली सगळी पात्रं भारतीय आहेत; पण भारतातल्या भारतात किती वैविध्य आहे! ते सगळं इथे व्यक्त झालं आहे. अंक चाळताना डोळ्यात भरत आहे. पानंसुद्धा स्वच्छ पांढऱ्या कागदाची, जाड आहेत; पिवळी, न्यूजग्लेझ, न्यूजप्रिंटची नाहीत. दोनच कॉलम राखलेले आहेत, तीन कुठेही नाहीत; कवितांना पुरेशी मोकळी जागा दिलेली आहे. फाँट मोठा आहे, प्रसन्न आहे. त्यात फार प्रयोग केलेले नाहीत.

यावरून अंकाच्या मांडणीकडे लक्ष दिलेलं आहे, हे कळतं. अंक तयार करताना त्याच्या रूपाविषयी विचार झाला आहे, हे लक्षात येतं.

अंकातला मजकूरसुद्धा विचारपूर्वक निवडलेला दिसतो. संपादकीयामध्ये ‘‘कुल्फी म्हणजे ‘गंगा-जमनी तहजीब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीयपणाचा आविष्कार’’ या शब्दांमध्ये भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. रेमो, नवसू, रवी, फिरोज, वनेश, राया या नावांवरून अंकात ‘आंतरभारती’ साकारली आहे, हे समजतं. इथे इतर भारतीय भाषांमधून भाषांतरित केलेल्या गोष्टी आहेत, जी ए कुलकर्णींचा बिम्म आहे, नंदा खरे यांचा अंताजी आहे, चक्क वरुण ग्रोवर हा कवी-लेखक आहे आणि पावरा भाषेतले संवादसुद्धा आहेत.

यावरून हा अंक म्हणजे एका उदात्त, ध्येयवादी दृष्टिकोनातून निघालेला बोअर प्रकार असेल, असा समज होण्याची शक्यता आहे; पण तसं नाही. जे आहे, ते रंजक आहे. बालमनाला रमवणाऱ्या, त्यांचं कुतूहल जागवणाऱ्या गोष्टी आहेत. काही त्या बालकाच्या तोंडून सांगितलेल्यादेखील आहेत. सांगणारे माधुरी पुरंदरे यांच्यापासून राजीव तांबे यांच्यापर्यंत बालवाङ्मयातले नामवंत आहेत. मोबाइलवर सुरू होणाऱ्या आणि खेळाडूला गेममध्येच खेचणाऱ्या खेळाच्या गोष्टीचं पहिलं प्रकरण आहे; तर ‘ढग मोजले आहेत का कधी?’ यात कल्पनेच्या भराऱ्या मुळीच नाहीत, असंही आहे. बालकांना करावेसे वाटतील, असे प्रयोग आहेत आणि त्याबरोबर भाषा शिकणं म्हणजे काय हेसुद्धा आहे. गोष्टीचा भाग म्हणून क्यूआर कोडचा उल्लेख असण्याइतकं वर्तमानाचं भानही आहे! इतके विविध विषय यात आहेत, की पहिल्याच अंकात एवढी उंच उडी घेतल्यावर पुढे तशी उंची सतत गाठता येईल का, असा प्रश्न पडावा!

लहान मुलांसाठीचं वांङ्मय म्हणजे निव्वळ अद्‌भुत गोष्टी; राजे-राण्या, उडणारा गालिचा, घोडदौड, वगैरे, असा एक समज आहे. यापेक्षा वेगळं काही असलं तरी ते मुलांना हसवणारं, त्यांची करमणूक करणारं, असंच हवं, असाही कल दिसतो. हा अंक मग त्यातला नाही, हे सांगावंसं वाटतं. मुलांना वाचनाची गोडी लावून नवनवीन विषयांची त्यांना ओळख करून देऊन, थोडं जास्त शहाणं करण्याचा उद्देश यात आहे. या अंकाकडे अगोदर पालकांनी, मोठ्या भावंडांनी लक्ष द्यायला हवं आणि अंक लहानग्यांसमोर येईल, असं बघायला हवं. तेवढं केलं की पुढचं ‘कुल्फी’ बघून घेईल, हे नक्की!

आपल्या घरातल्या बालकाने हुशार, शहाणं व्हावं असं कोणाला वाटत नाही? मग असं वाटणाऱ्या प्रत्येकाने ‘कुल्फी’ विकत घेऊन घरातल्या मुलाच्या हाती द्यावा, अशी जोरदार शिफारस मी करतो.

२.


 

पंचवीस-तीस वर्षांपूर्वी आम्ही मित्रांनी ‘आजचा चार्वाक’च्या अनुभवाने हुरूप येऊन ‘अबब हत्ती’ नावाचं बालकांसाठी असलेलं मासिक चालवलं होतं. चालू करताना आमच्यासमोर अमुक एका बालनियतकालिकाचं मॉडेल नव्हतं. उलट, आम्ही आमच्या विचाराने आणि उमेदीने ‘हत्ती’त अनेक प्रयोग केले. ‘अभ्यास बिभ्यास’ असा एक विभाग केला ज्यात रोजच्या जगण्याशी विज्ञान कसं, कुठे जोडलेलं आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी माध्यमातली मुलं मराठी वाचत नाहीत, परिणामी त्यांचा मराठी पर्यावरणाशी, मराठी संस्कृतीशी संबंध सैल होतो; म्हणून ‘हत्ती’त चक्क इंग्रजी गोष्टी दिल्या. शब्दकोड्यांऐवजी अंककोडी दिली, ज्यातल्या चौकोनात अक्षरं न भरता आकडे भरावे लागत आणि उभ्या आडव्या चौकोनांसाठी आकडे सुचवणारे सुगावे असत. ‘चित्रकविता’ दिली, जेथे शब्दांना जोडून चित्रं असत, ‘हत्ती’साठी भारत सासणे, दुर्गा भागवत, चंद्रकांत खोत, भाऊ पाध्ये, निखिल वागळे, नंदा खरे, रमेश रघुवंशी, विश्वनाथ खैरे अशा कितीतरी साहित्यिकांनी लिखाण केलं होतं. ‘हत्ती’त न चुकता विनोद असत, व्यंगचित्रं होती, बारीक माहिती होती, मजा होती. आमची मजा होती.

लहान मुलांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती मोठी होतात. त्यामुळे ‘बालवाचकां’साठी असलेल्या नियतकालिकाला वार्षिक वर्गणीदार मिळाले तरी आजीवन सदस्य तत्त्वत:च मिळू शकत नाहीत. लहान मुलांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जशी ती मोठी होतात, तसा त्यांच्या ‘डोक्याचा आकार’ झपाट्याने बदलतो. मोठ्याचं तसं नसतं. मोठ्यांच्यासुद्धा विविध रुची असतात; पण तशा लहान मुलांनाही असतात, त्यांनादेखील विविध विषयात रस असू शकतो. पण नुकतं वाचायला शिकलेल्या बालकासाठी जोडाक्षरविरहित मजकूर तयार  करावा लागतो; इथपासून बारा चौदा वय झालेल्यांचं बाहेरच्या जगाविषयी कुतूहल जागं झालेलं असतं. त्यांना एका बाजूने मोठं होण्याची घाई असते आणि त्यातल्या काही पैलूंची घोर भीतीदेखील वाटू लागलेली असते. कायद्याच्या नजरेतून तर अठरा वर्षांखालचे ते सगळे बाल. हा विस्तार फार ऐसपैस रुंद आहे. त्यामुळे ‘लहान मुलांसाठी नियतकालिक’ असं म्हणून पूर्ण अर्थबोध होत नाही. कोणती लहान मुलं? किती वयाची? कोणत्या सांस्कृतिक वातावरणातून आलेली? कोणत्या माध्यमातून शिकणारी? अशा प्रश्नांची उत्तरं निदान स्वत:ला निश्चित माहीत असल्याशिवाय बालांसाठी काही साहित्य निर्माणच करता येणार नाही.

ही समस्या नुसत्या साहित्यसंकलनाची, साहित्यनिर्मितीची नाही; मार्केटिंगचीसुद्धा आहे. टार्गेट वाचकसमाजानुसार नियतकालिकाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरेल. जाहिराती मिळवण्याचा रोख ठरेल. इतकंच नाही, अंकातल्या मजकुराची मांडणी ठरेल, चित्रं ठरतील, रंगसुद्धा ठरतील. अंकाची ‘भाषा’ (म्हणजे मराठी/इंग्रजी नव्हे; सोपी/विचारात पाडणारी), परिसर (सांस्कृतिक, भौगोलिक, भाषिक), संकल्पना (कोणत्या संकल्पनांशी खेळायचं, कोणत्या संकल्पनांचा परिचय करून द्यायचा), लॉजिक (गणिताला किती जागा, किती महत्त्व? वाचकाच्या डोक्याला किती ताण द्यायचा?) या घटकांचा विचार सदा जागा हवा आणि असला उपक्रम सुरू करण्याअगोदर पूर्ण झालेला हवा.

आणि या सगळ्याचा एक सबगोलंकार लाडू करण्याइतकं घातक काही नाही. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या हट्टाची परिणती सगळ्यांनाच खट्टू करण्यात होऊ शकेल.

‘अबब हत्ती’ काढणं ही आमची हौस होती. चार वर्षं काढला. जाहिराती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो दुबळा होता. अंक विकणे, वसुली करणे, अंक वेळेवर काढणे, यातल्या कशाकडे आम्ही द्यायला हवं होतं तेवढं लक्ष दिलं नाही. पण अगोदर म्हटल्याप्रमाणे ती आमची हौस होती. आमचे पैसे होते. मजा केली, हौस भागवली. नो रिग्रेट्स!

समोर ‘कुल्फी’ आल्यावर हे सगळं पुन्हा जागं झालं. ‘कुल्फी’ची निर्मितीमूल्यं देखणी आहेत. विषयांची निवड त्याहून चिकित्सक आहे. त्यावरून ‘कुल्फी’ ही निव्वळ कोणाची तरी हौस आहे, असं वाटत नाही. एका बाजूने सकस साहित्य देत, बालकांवर सुसंकार करत त्यांचं रंजन करावं; असा गंभीर, सज्जड विचार ‘कुल्फी’मागे जाणवतो. त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी जाणवते. मराठी सोडून इतर भाषांमध्ये कोणाचा काय अनुभव आहे, याचा अभ्यास झाला असेल; मराठीतच सध्या बालवाचकाची मन:स्थिती - त्याहीपेक्षा बालकांच्या मातापित्यांची मन:स्थिती - काय आहे, कागदावर लिहिलेलं वाचण्यात एकूण समाजाला किती रस उरला आहे, अशा अनेकानेक पैलूंचासुद्धा विचार झाला असेल. कुणी नवीन काही करू गेलं, त्यामागे बांधिलकी असल्याचं जाणवलं; की दुसरं काही नाही तरी वडिलकीच्या नात्याने उत्तेजन द्यावंसं वाटतं. ‘कुल्फी’ या पायरीच्या वर आहे, असं वाटतं. म्हणून उत्तेजनाच्या पुढे जाणं सुचतं.

Saturday, October 29, 2022

ऋषी सुनक की रिशी सुनक?

१.

आतापर्यंत किती देशांच्या प्रमुखपदी विराजमान होण्याचा मान भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळाला आहे?

ब्रिटन हा काही पहिला देश नाही. फिजी या देशात भारतीय वंशाचे लोक पुष्कळ आहेत. इतके, की तिथे त्यांच्यापैकी एक पंतप्रधानही झाला. मॉरिशसचंसुद्धा तसंच आहे. मलेशियाची गोष्टसुद्धा वेगळी नाही. अर्थात, या तीनही ठिकाणी ब्रिटिशांनी उसाच्या मळ्यात किंवा आणखी कुठे मजुरी करण्यासाठी भारतातून माणसं नेली आणि ती तिथली झाली. वेस्ट इंडीजमधल्या देशांमध्येसुद्धा असे ‘तिथले झालेले’ अनेक भारतीय आहेत. रोहन कन्हाय किंवा कालीचरण ही क्रिकेटपटूंची नावं जशी भारतीय वाटतात, तसंच नोबेल विजेता नायपॉलसुद्धा भारतीय वंशाचाच आहे. पण अजून बार्बाडोस किंवा अँटिग्वा किंवा तिथेच आणखी कुठे भारतीय वंशाची व्यक्ती देशाच्या प्रमुखपदी बसल्याचं ऐकिवात नाही. होईल!

ब्रिटनच्या शेजारी आयर्लंड नावाचा देश आहे, जिथे लिओ वराडकर नावाचा मनुष्य राष्ट्रप्रमुख झाला होता. ‘वराडकर’ या नावाचं नातं भारताशीच काय, महाराष्ट्राशीसुद्धा लागतं! पण वराडकरांचं नाव फार कोणी घेताना दिसत नाही. आपण गे असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि आयर्लंडसारख्या कॅथॉलिक देशाचा (आणि जगातला चौथा) गे राष्ट्रप्रमुख ते झाले. पण यामुळे भारतीय लोक त्यांचं नाव घेत नाहीत, हे कारण नसावं.

पाकिस्तानचं काय? आपण भारतीय वंशाबद्दल बोलत असू, तर जिनांपासून भुत्तोंपर्यंत राष्ट्रप्रमुखांचा वंश भारतीयच होता. जिना मुंबईकर होते, भुत्तो पुण्याला शिकायला होते. पण भारतीय वंश, वगैरे चर्चा करताना मुसलमान पूर्णपणे वगळायचे, असा संकेत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचं कोणी बसल्याचा उल्लेखही होत नाही.

असो. तर, असं सगळं मागे घडून गेलं असताना ब्रिटन या देशाच्या बाबतीत इतकी चर्चा का व्हावी?

या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. पण ते कागदावर मांडणं गडबडीचं आहे.

ब्रिटन या देशाने एकेकाळी भारतावर राज्य केलं होतं. अगोदर ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर राणी व्हिक्टोरिया (आणि नंतर पाचवा, मग सहावा जॉर्ज आणि शेवटी दुसरी एलिझाबेथ) यांनी भारतावर सत्ता गाजवली.  नुसती गाजवली नाही, या देशाच्या जवळपास सर्व व्यवहारांवर ब्रिटिशांनी ठळक छाप बसवली. त्यांनी भारतात रेल्वे आणली, पोस्टाची सेवा सुरू केली, कायदे बनवून त्यांची पुस्तकं तयार केली, शिक्षणव्यवस्था घडवली, वगैरे वगैरे. ब्रिटिशांनीच जमीनदारी सुरू केली आणि एक प्रकारच्या रयतेच्या पिळवणुकीला अधिकृत स्वरूप दिलं. त्यांच्या गिरण्यांमध्ये तयार होणाऱ्या कापडाला भारताची बाजारपेठ मिळावी म्हणून त्यांनी इथला कापडउद्योग मारला. उलट, त्यांना सोयीच्या अशा कापसाची लागवड होण्यास उत्तेजन दिलं. वगैरे वगैरे.

मग ब्रिटिशांनी भारताला आधुनिकतेशी ओळख करून देऊन उपकार केले की प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट करून अन्याय केला? ब्रिटिशांना उपकारकर्ते मानून त्यांचं गुणगान करावं की त्यांनी केलेल्या अन्यायासाठी त्यांचा राग धरावा? दोन्हींमध्ये तथ्य आहे. एक बारीक गडबड अशी आहे, की एकाच तोंडातून दोन्ही व्यक्त होत असल्याचं सापडण्याची शक्यता या देशात फारच मोठी आहे. आणि तोंडाने केलेल्या बडबडीपेक्षा कृतीला जास्त वजन द्यायचं, तर भारतीयांना ब्रिटिशांपुढे न्यूनगंड वाटतो, असं खुशाल म्हणता येतं. ब्रिटिशांकडून मान मिळाल्यावर त्याचं खूप जास्त मोल त्यांना वाटतं. प्रिन्स चार्ल्स येतो आणि मुंबईच्या डबेवाल्यांचं कौतुक करून जातो, तेव्हाच इथल्या उच्चभ्रू नियतकालिकांमध्ये डबेवाल्यांच्या व्यावसायिक सफाईवर स्टोऱ्या येऊ लागतात. आपलं संशोधन लॅन्सेटमध्ये छापून येण्यात आपला मोठा सन्मान झाला, असं इथल्या डॉक्टरला वाटतंच वाटतं. टाटांनी लँडरोव्हर विकत घेण्याचा अभिमानच काय, गर्व मोटारगाड्यांच्या क्षेत्रातल्या भारतीयाला वाटतो.

म्हणूनच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी एक भारतीय वंशाचा मनुष्य विराजमान होणे, हा राष्ट्रीय चर्चेचा विषय होतो. भारतीय अस्मितेला त्यातून अतीव सुख होतं. एकेकाळी आमच्यावर राज्य करणाऱ्या देशाचा प्रमुख आमच्यापैकी एक होतो, ही गोष्ट भारतीय अस्मितेला विलक्षण सुख देऊन जाते. मग त्याचे वडील केनियातून तिकडे गेले होते आणि केनियात गेलेले त्याचे आजोबा मूळ ज्या गावचे होते, ते गाव पाकिस्तानात आहे, या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही. उलट, त्याचा धर्म हिंदू आहे, त्याची बायको चक्क इन्फोसिसच्या नारायण मूर्तींची मुलगी आहे, यामुळे त्यांना होणाऱ्या सुखात भर पडते.

ऋषी सुनक (की रिशी सुनक? या प्रश्नाकडे आपल्याला लवकरच वळायचं आहे) ब्रिटनचे पंतप्रधान होण्याकडे ‘इकडून’ बघण्याऐवजी ‘तिकडून’ बघितलं तर काय दिसतं?

तर असं दिसतं की ब्रिटन हा एक उदारमतवादी देश आहे. तिथले मूलनिवासी वर्णाने गोरे असले आणि त्यांचा धर्म (राजघराणं सोडून) प्रॉटेस्टंट ख्रिस्ती असला तरी तिथे राहणारा, त्या भूमीला आपली मानणारा आणि त्या भूमीच्या भल्यातच स्वत:चं भलं मानणाऱ्या कोणाही माणसाला - मग तो वेगळ्या धर्माचा का असेना - ते ‘आपला’ मानतात. त्यांच्या देशाच्या प्रमुखपदी त्याला बसवताना त्यांना असुरक्षित, अस्वस्थ वाटत नाही. कारण तो समाज उदारमतवादी आहे. ‘वेगळ्या’ माणसाला सामावून घ्यायला ते बिचकत नाहीत.

लंडनचा महापौर असाच ‘पाकिस्तानी’ आहे. नव्या मंत्रीमंडळातले मंत्रीसुद्धा केवळ गोरे नाहीत.

यातून ब्रिटन या देशाचा, ब्रिटीश नागरिकांच्या मनी रुजलेला उदारमतवाद तर दिसून येतोच; त्यापुढे आणखीही काही दिसून येतं. अशा बाहेरून येऊन तिथल्या झालेल्या लोकांमुळे ब्रिटनचं भलंच होतं, हे त्यांनी जाणलं आहे. उजवी गुणवत्ता असलेले लोक जगभरातून येतात, ब्रिटनला आपली भूमी मानतात आणि मग त्यांना ब्रिटनच्या भल्यातच स्वत:चं भलं दिसू लागतं, ही गोष्ट उदारमतवादाबरोबर ब्रिटीश जनतेच्या आत्मविश्वासाविषयीदेखील काहीतरी सांगून जाते. ‘ते’ येतील आणि हळूहळू त्यांची बहुसंख्या होईल आणि मग आपल्यावर ते राज्य करू लागतील आणि आपण आपल्याच घरी दुबळे, दुय्यम होऊ; असलं काही ब्रिटीश लोकांना होताना दिसत नाही. आपल्या समाजाला थोडा वेगळा रंग मिळाला, तर त्यातून आपलं काही बिघडत नाही, असं वाटण्यात त्यांचा समंजसपणा आणि स्वत:विषयीचा प्रगाढ आत्मविश्वास दिसून येतो. यात स्वार्थ आहे, पण तो चार पायऱ्या वरचा स्वार्थ आहे. वर्ण आणि धर्म यांच्या वर उठलेला स्वार्थ आहे.

यात त्यांचा गौरव आहे.

अमेरिकेची स्थिती थोडीशीच वेगळी आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा देश युरोपातून गेलेल्या लोकांनी काबीज केलेला, वसवलेला आणि नावारूपाला आणलेला देश आहे. शेतात काम करायला त्यांनी अफ्रिकेतून माणसं उचलून नेली आणि गुलाम केली. पिढ्यानपिढ्या तिथे राहिलेले हे एकेकाळचे आफ्रिकन लोक आता स्वत:ला ‘आफ्रिकन-अमेरिकन’ मानायला तयार नाहीत. ते म्हणू लागले आहेत, जसे गोरे लोक इटालियन-अमेरिकन किंवा आयरिश-अमेरिकन नाहीत, नुसते ‘अमेरिकन’ आहेत; तसेच आम्हीसुद्धा नुसते अमेरिकनच!

पण अमेरिकेतही उदारमतवाद रुजतो आहे. बराक ओबामा हे त्यांचे पहिले ‘काळे’ अध्यक्ष. ओबामा यांचं मधलं नाव ‘हुसेन’ असल्याचा विरोधी प्रचार जरी झाला तरी त्यामुळे ओबामांची निवड टळली नाही. तिथल्या बहुसंख्य नागरिकांना काळ्या आणि हुसेन ओबामाच्या हाती देशाची सूत्रं सोपवण्यात अडचण वाटली नाही.

हे देश उदारमतवादी खरे; पण इथून (किंवा कुठूनही) तिथे जाणाऱ्यांचं काय? ते का जातात?

ते स्वत:च्या उन्नतीसाठी जातात. तिथे गेल्यामुळे आपलं भलं होईल, कायमचं तिथे राहण्यात आपल्या मुलाबाळांचंसुद्धा हित आहे; असं ठामपणे वाटतं म्हणूनच जाणारे तिथे जातात. त्यांना गुणवत्ता हवी असते, यांना सुबत्ता. दोघांच्या गरजा, इच्छा या देशबदलातून पूर्ण होतात. दोघेही सुखी होतात. एका देशाचा ‘रंग’ थोडा बदलू लागतो पण त्यात त्या समाजाला काही वावगं वाटत नाही.

इथे थोडं थांबू.

 २.

नशीब काढण्यासाठी, जगण्यातले कष्ट कमी करण्यासाठी स्थलांतर करण्याची रीत नवी नाही. प्राचीन काळापासून हे होत आलं आहे. आणि प्राचीन काळापासून ‘कुठे’ जायचं, या प्रश्नाला एक ठळक उत्तर ‘सिंधु नदीच्या दक्षिणेकडचा प्रदेश’, म्हणजेच हिंदुस्तान (हे नावच मुळी सिंधुवरून तयार झालं आहे), हे आहे. जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वी बुद्धांच्या शिकवणुकीचे ग्रंथ मिळवण्यासाठी आलेल्या चिनी फाहियानपासून एक हजार वर्षांपूर्वी आलेल्या इटालियन मार्को पोलोपर्यंत अनेकांनी हिंदुस्तानातल्या सुबत्तेची वर्णनं लिहून ठेवली आहेत. मार्को पोलोने म्हटलं आहे, ‘‘मी पॅरिस पाहिलं, मी रोम पाहिलं; पण पाटलिपुत्र या शहराइतकं भव्य शहर माझ्या पाहण्यात नाही.’’ असल्या प्रवाशांनी केलेल्या नोंदींमुळे आपल्याला त्या काळातल्या भारतीय सुबत्तेविषयी लेखी पुरावे सापडतात. या देशाच्या सुबत्तेबद्दल काय सांगावं? सातशे वर्षांपूर्वी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन पोचलेल्या पोर्तुगीज पाहुण्याला निरोप देताना तिथल्या राजाने ज्या भेटी दिल्या, त्या भेटींनी जहाज भरून गेलं आणि त्यांचं मूल्य पोर्तुगालच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त होतं!

तर या प्रदेशाची कीर्ती दूरवर पसरली होती आणि कुठून कुठून लोक इथे येत गेले. दोन मार्गांनी. एक, उत्तर सीमेवरच्या खैबर खिंडीतून. आणि दोन, समुद्रमार्गे पश्चिम किनाऱ्यावर. आपल्याला इतिहासात केवळ खैबर खिंडीतून आलेल्या ‘आक्रमकां’विषयी सांगितलं जातं. शक आले, कुषाण आले, ग्रीक आले, तुर्क आले, अफगाण आले, मोगल आले, वगैरे. आपल्याला हे सांगितलं जात नाही की भारतात अरब मुसलमान प्रथम आले ते व्यापारी म्हणून. भारतातली सर्वात जुनी मशीद महम्मद पैगंबराच्या हयातीत बांधली गेली. केरळमध्ये. हे व्यापारी आले, इथे राहिले, त्यांच्या वंशजांनी इथल्याच राजांकडे नोकऱ्या पत्करल्या, वगैरे. खैबर खिंडीतून आलेला पहिला ‘आक्रमक’ गझनीचा महमूद असावा. हा केरळातल्या व्यापाऱ्यांच्या नंतर चारशे पाचशे वर्षांनी आला.

इथे येणारे आक्रमक होते का?

एक म्हणजे, तेव्हा देश, राष्ट्र ही संकल्पना जन्मालाच आलेली नव्हती. आणि भारतात, हिंदुस्तानात तर जागोजाग वेगवेगळी राज्यं होती. चंद्रगुप्त, अशोक, अकबर, औरंगजेब अशा मोजक्या राजांनी या प्रदेशाच्या मोठ्या भागाला व्यापून टाकणारी साम्राज्यं स्थापली. एरवी आपापसात लढणारी, कधी गुण्यागोविंदाने नांदणारी वेगवेगळी राज्यंच. त्यामुळे ‘भारतावर आक्रमण केलं,’ असं म्हणणं बरोबर होणार नाही.

दुसरं असं की यातलं कोणीच परत गेलं नाही! म्हणजे, तीनशे वर्षांपूर्वी इराणच्या नादिरशहाने दिल्ली लुटून नेताना कोहिनूर नेला; ते सोडलं तर इथून बाहेर संपत्ती नेण्याचा प्रकार झाला नाही. जो आला, तो इथला झाला. सगळे इथले झाले. इथल्या मातीत मिसळले. इथल्या लोकांचे डीएनए तपासले तर या सगळ्या तथाकथित आक्रमकांच्या खुणा त्यात सापडतील. मुळात आर्य बाहेरूनच आले आहेत, हे विसरून कसं चालेल? (संघाच्या राजकारणाला ‘बाहेरून आलेले आर्य’ ही कल्पना गैरसोयीची ठरते म्हणून ते काहीतरी वेगळं मांडतात. आणि ‘आदि’वासींना वनवासी म्हणतात!)

याला ढळढळीत अपवाद अर्थात युरोपियन गोऱ्यांचा. ब्रिटिशांचा. त्यांनी या देशाला कधीही ‘आपला’ म्हटलं नाही. भारत ही त्यांची वसाहत होती आणि भारतातून त्यांनी आवाढव्य लूट नेली. इतकी, की अठराव्या शतकापर्यंत, म्हणजे जेमतेम तीनचारशे वर्षांपूर्वीपर्यंत जागतिक व्यापारामध्ये ज्या भारताचा हिस्सा पंचवीस टक्के होता, त्या भारताला ब्रिटिशांनी भिकेला लावलं.

पण तरीही भारतात जाणे, तिथे राहणे या प्रतिष्ठेच्या गोष्टी होत्या. व्हिक्टोरिया राणीच्या गळ्यातल्या ब्रिटीश साम्राज्याच्या रत्नहारातला सर्वात देदीप्यमान हिरा भारत, हा होता.

इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की हे जे कोणी या देशात येत गेले, त्यांचं इथल्या लोकांनीदेखील स्वागतच केलं! त्यांना सामावून घेतलं. अलिबागच्या किनाऱ्याला लागलेल्या ज्यू लोकांना जसं ‘शनिवार तेली’ नाव दिलं, तसं. गुण्यागोविंदाने एकत्र राहण्यात भारतीयांना प्रॉब्लेम नव्हता आणि बाहेरून आलेल्यांनी इथल्या संस्कृतीत, वैभवात भरच टाकली. इथलं संगीत, इथलं स्थापत्य, इथली राज्यव्यवस्था, इथली भाषा, इथली पाककला, सगळ्या सगळ्यामध्ये या हजारो वर्षं ‘बाहेरून’ येत गेलेल्यांची छाप आहे.

मग तेव्हाचा भारत, किंवा हा ‘सिंधु नदीच्या पलीकडचा प्रदेश’, आजच्या युरोप-अमेरिका यांच्यासारखा होता, असं म्हणायला हरकत नाही. काहीच फरक नाही. नशीब काढायला, संपत्ती मिळवायला लोक इथे येत गेले, कोणीही परत गेले नाहीत, आले ते इथलेच झाले, इथल्या लोकांच्यात संस्कृतीत मिसळून गेले; इथल्या समाजाला, संस्कृतीला विविध रंग मिळत गेले आणि अचाट वैविध्याने नटलेला हा देश तयार झाला! हेच, हेच आज युरोप-अमेरिकेत (किंवा आता ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला) जाणाऱ्यांचं इप्सित असतं. त्यांना इथे परत यायचं नसतं. तिथल्या समाजात मिसळून जाता जाता आता कॅनडा, अमेरिका यांसारख्या देशांमधल्या अधिकाराच्या जागा इथून गेलेले पटकावू लागले आहेत. इथे पिढ्यानपिढ्या घालवलेल्यांसाठी जसा हा देशच त्यांचा झाला आहे; तसंच तिथे गेलेल्यांचं होताना आपण बघत आहोत. एक चूक मात्र करत आहोत. तिथे जाऊन तिथले झालेल्यांकडून या देशाशी लिप्ताळा ठेवण्याची अपेक्षा करत आहोत. जे सर्वस्वी चूक आहे. कन्हैयाचा कन्हाय झाला, तो पुन्हा कन्हैया होणार नाही. विद्याचा विडिया झाला, तो भारतात येऊन निरिक्षणं लिहील; पण त्याचं इमान तिथेच राहील.

मग रिशीला ऋषी म्हणण्याचा आटापिटा कशाला? धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, असं मनाशी धरून बसलेल्यांना हे सांगायला हवं की राष्ट्र बदलण्यासाठी धर्म बदलण्याची गरज नसते! सुनक महाशय उद्या पितांबर नेसून शिवलीलामृत म्हणते झाले, तर ते इथल्या भावनाकुल लोकांना स्वस्तात पटवण्यासाठी असेल; ते त्यांच्या देशाशी असलेलं इमान एक टक्कासुद्धा सोडणार नाहीत. मोदीराज्यात अदानी जसे जगातले दोन नंबरचे श्रीमंत हस्ती झाले, तसं नारायण मूर्तींना ब्रिटनमध्ये धंदा वाढवून होता येणार नाही!

रिशी सुनक यांच्याशी सलगी अवश्य करावी, त्यांना अहमदाबादला नेऊन झोपाळ्यावरही बसवावं पण त्यातून त्यांच्या भावना कितपत हेलावतील, याची शंका आहे. इथे येऊन इथले न झालेल्यांमध्ये ब्रिटिशांचा नंबर पहिला आहे, हे लक्षात ठेवायला हवं!

Friday, June 17, 2022

छावणी: विद्रोहाचा एकसुरी पण जळजळीत हुंकार


 प्रेमानंद गजवी हे नाव मराठी नाट्यक्षेत्राला चांगल्यापैकी परिचित आहे. त्यांच्या मांडणीबाबत मतभेद होऊ शकतात; पण त्यांच्या बांधिलकीविषयी नाही. त्यांच्या वयाला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या ‘छावणी’ या दीर्घांकाचा प्रयोग बघण्याची संधी मिळाली. प्रयोग लक्षणीय वाटला. का वाटला, ते सांगण्याचा हा प्रयत्न. मी जे पाहिलं, मला जे प्रतीत झालं, त्याची संगती लावण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रेमानंद गजवी लिखित आणि रंगचिंतक मंजुल भारद्वाज दिग्दर्शित ‘छावणी’ हे नाटक म्हणजे मी म्हणतो तेच, असा माझा दावा नाही.

१. १.      प्रयोगात सर्व पात्रं एका जागी उभं राहून आपापले संवाद म्हणतात. कधी ते एकमेकांशी बोलतात, तर कधी प्रेक्षकाकडे अर्धवट वा पूर्ण वळून आपापलं म्हणणं ऐकवतात. दोघांनाही माहीत असलेल्या गोष्टी तपशिलात जाऊन एकमेकांना सांगण्याचा ढोबळपणा जो मराठी नाटकाच्या सुरुवातीला बऱ्याचदा असतो, तो इथे अनेकदा आहे. पात्रांची, त्यांच्यातल्या संबंधांची माहिती एके काळी सूत्रधार प्रेक्षकांना पुरवत असे; आता बिनसूत्रधाराच्या सादरीकरणामध्ये पात्रं स्वत:च हे काम करतात. प्रतिभेला अजिबात ताण न देता पार्श्वभूमी सांगण्याची जबाबदारी चटकन पार पाडता येते.

‘छावणी’मधला वेगळेपणा असा की रंगमंचाची लांबी रुंदी अजिबात न वापरता खणखणीत आवाजात आणि चढ्या सुरात भाषण दिल्यागत सर्व काही प्रेक्षकांना ऐकवलं जातं. या शब्दांमधून ‘संवाद’ कमी घडतो, संभाषणही जेमतेमच होतं. होते ती विचारांची, युक्तिवादांची देवघेव. किंवा एका विशिष्ट भूमिकेची आव्हानात्मक मांडणी. यातून नाटक ‘वैचारिक’ आहे, असं बजावलं जातं. एरवीच्या नाटकांमध्ये रंगमंचावर समोर येणाऱ्या सहज हालचाली टाळल्यामुळे आणि ‘उच्च रवातील’ सुस्पष्ट उच्चारांमुळे शब्दांमधल्या आशयाकडेच प्रेक्षकाचं लक्ष खेचलं जातं. प्रत्यक्ष पात्रं कमी महत्त्वाची होऊन जातात.

मराठीत शुद्ध वैचारिक नाटकं आली नाहीत, असं मुळीच नाही. ‘उद्‌ध्वस्त धर्मशाळा’ हे सर्वात ठळक उदाहरण. ‘…धर्मशाळा’मध्ये अशा तऱ्हेचा आवेश नाही. पण तिथल्या वैचारिक संघर्षाचा इथे अभाव आहे. एका भूमिकेचे विविध पैलू विशद करण्यासाठी फुटकळ आक्षेप घेतले जातात, इतकंच. आवेशामुळे ती भूमिका प्रेक्षकाला गर्जना करून बजावली जाते. यातून या विचाराची मांडणी प्रचारकी थाटाची होते. ती मांडणी मान्य असणाऱ्याला बळ देणारी होते. तटस्थ मानसिकतेसमोर वैचारिक घुसळण मांडली जाण्याचा प्रयत्न होत नाही.

२. २.      ‘छावणी’ म्हणजे नक्षलवाद्यांची जंगलातली छावणी. समोर येणारे सर्व कमांडो बायका आहेत. त्यांची प्रमुखही बाईच आहे. पुरुष कमांडोंचे उल्लेख आहेत; पण दर्शन नाही. एक लक्षणीय पुरुषपात्र आहे; पण कमांडो असलेल्या बायका सतत लढ्याचा, हिंसेचा उच्चार करत असताना हा पुरुष समन्वयाची भाषा करतो! यातून नाटकाला काय अभिप्रेत असावं? की हा लढा भूमीचा आहे, म्हणजे बाईला जवळचा आहे, तिला निर्वाणीची भूमिका घेण्याला भाग पाडणारा आहे, असं? नाटकातला प्रश्न थेट जगण्याची, जीव बचावण्याशी संबंधित आहे म्हणून बाईला शस्त्र उचलणं अपरिहार्य झालेलं आहे,असं? की जगण्याच्या लढाईत / आधुनिक काळात / व्यक्ती म्हणून पहाता बाई आणि पुरुष हा भेद अनावश्यक ठरला आहे, असं?

३.  ३.   यात चक्क शंकराचार्य हे एक पात्र आहे. एका हिंदू धर्मपीठाचा प्रमुख, या नात्याने तो त्याची भूमिका मांडतो. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली जाते; पण तो उत्तरादाखल जरी शौर्याचे डायलॉग मारत नसला, तरी स्वत:ची भूमिका सोडत नाही. नाटकाच्या वैचारिक प्रकृतीशी हे सुसंगतच आहे: भीतीपोटी एक भ्याड व्यक्ती होऊन तो ‘शंकराचार्य’ या विचाराशी बेईमान होत नाही, की भ्रष्ट होत नाही.

४.      ४. नाटक उघडपणे विद्रोही आहे. एके काळी, जेव्हा मुंबई-महाराष्ट्रावर काँग्रेसचं निरंकुश राज्य होतं, त्या काळी, मुंबईत कामगारांच्या आंदोलनांमध्ये कम्युनिस्ट, सोशालिस्ट दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून ‘‘… जो सरकार निकम्मी है, उसे हमे बदलनी है’’ अशी घोषणा मोठ्या आवेशाने दिली जाई आणि लोकनियुक्त सरकार पाडण्याचं आवाहन म्हणजे राष्ट्रद्रोह, अशी समजूत नसल्याने घोषणा देणाऱ्यांवर कारवाई होत नसे. हे नाटक या घोषणेच्या दोन पावलं पुढे जातं. सरकारच नव्हे, तर साऱ्या व्यवस्थेलाच टक्कर देऊ बघतं. आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी हिंसेचा पुरस्कार करतं. राष्ट्र या मूल्यापेक्षा, समाजस्थैर्य या मूल्यापेक्षा आत्मप्रतिष्ठा हे मूल्य मोठं असल्याचं ठामपणे मांडतं. आत्मप्रतिष्ठेला माणुसकी या वैश्विक मूल्याशी जोडतं.

विवेकानंदांनीच राष्ट्रापेक्षा माणुसकी मोठी, असं म्हटलं आहे हे विसरून चालणार नाही.

५.      ५. नाटकाच्या अगदी अखेरच्या भागात ‘नक्षलवादातून राष्ट्राचे तुकडे होण्याचा धोका’ मांडला जातो. आणि त्याला ‘संविधान’ हे उत्तर असल्याचं सांगितलं जातं. या काहीशा गुळमुळीत उल्लेखामधून नाटकभरातल्या प्रखर विद्रोहाचा प्रभाव पातळ होत नाही. या उल्लेखामुळे नाटकात नक्षलवाद विरुद्ध आंबेडकरवाद असा विरोध मांडल्याचा आभास निर्माण होतो; पण तसंही नाही. नाटकात चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे; तिथलं जंगल, तिथले आदिवासी आणि नक्षलवादी असे उल्लेख असले तरी नक्षलवादी तात्त्विक भूमिका सुस्पष्टपणे समोर येत नाही. पात्रांचं बाह्य रूप सामान्यजनांच्या मनातल्या नक्षलवादी प्रतिमेला जवळचं आहे, इतकंच. त्याचबरोबर आंबेडकरवाद किंवा संविधानातील तरतुदी यांचंसुद्धा विवेचन आढळत येत नाही. जे समोर येतं, ते नक्षलवादाचा मार्ग नाईलाजाने स्वीकारणाऱ्या आंबेडकरी दलित जनतेच्या विद्रोही भावनेला दिलेलं प्रातिनिधिक रूप.

एकूण, स्वत:ला आंबेडकरी मानणाऱ्यांच्या अस्मितेला शब्दकळेच्या माध्यमातून जोरदार पाठबळ देण्याचं काम हे नाटक, या नाटकाचा हा प्रयोग यांच्याकडून होतं. या परिघाबाहेरच्या मनाला आवाहन करण्याचा इरादा कुठेही व्यक्त होत नाही.