Friday, August 10, 2012


निमित्त: राजेश खन्ना


खूप खूप वर्षं झाली. बारीकशी आठवण आहे; पण स्पष्ट स्मरते आहे. कॉलेजला चाललो होतो. एक वर्गमित्र भेटला. नुकतीच कानी पडलेली, पहिल्या सूर्यकिरणात पाकळीवरचा दवबिंदू लख्खकन चमकावा आणि त्याने उजाडल्याची हर्षभरित वर्दी द्यावी, अशी भासलेली एक चाल मी गुणगुणत होतो. वर्गमित्र गंभीर प्रकृतीचा होता. शास्त्रीय संगीतातला होता. माझं गुणगुणणं ऐकून त्याचे डोळे उजळले. "काय मस्त चाल आहे, नाही!" तो उद्‍गारला. मीही तेव्हा ’जुन्या’, म्हणजे १९५९ अगोदरच्या हिंदी गाण्यांमध्ये पूर्ण बुडालो होतो. त्याला आणि मला, दोघांना भावून जातं म्हटल्यावर मी खूणगाठ बांधली, ’मेरे सपनोंकी रानी’ हे आणखी एक लोकप्रिय गाणं रहाणार नाही; ते मोठं होणार.

झालंच ते मोठं. किशोर कुमार नावाचा सूर्योदय झाला. मास हिस्टेरियाचं पहिलं उदाहरण ठरणारा राजेश खन्ना नावाचा पहिला सुपरस्टार जन्मला. आज ’आराधना’ बघताना कळतं की नाही, माहीत नाही; पण तेव्हा त्यातली गाणी, किशोरचा आवाज, राजेश खन्नाचं प्रसन्न, दिलखुष व्यक्‍तिमत्त्व या सगळ्याने तरुणांचा ताबाच घेतला. वातावरणातली उदासीनता जणू गायब झाली आणि सर्वत्र उत्साह सळसळू लागला. हिंदी चित्रपटातल्या असल्या घडामोडी आणि देशातलं राजकीय, आर्थिक-सामाजिक वातावरण यांचा थेट संबंध लावून दाखवता येतो. १९६९ साल हे इंदिरा गांधींच्या प्रेरणेने काँग्रेसमधल्या ’तरुण तुर्कां’नी काँग्रेसमधल्या जुनाट धेंडांना धक्का देऊन काँग्रेस फोडण्याचं, बँकांचं राष्ट्रीयीकरण होण्याचं, संस्थानिकांचे तनखे बंद होण्याचं आणि ’गरिबी हटाव’ हा नारा उदयाला येण्याचं वर्ष होतं. लावणार्‍यांनी संबंध लावावा!

राजेश खन्नाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर भरपूर लिहून आलं. मेल्यानंतर एकदा, फक्‍त एकच वेळ मृत्यूलोकात डोकावण्याची मुभा मरणार्‍याला असायला हवी. स्वतःवर विलक्षण प्रेम करणार्‍या राजेश खन्नाला किती बरं वाटेल! मी त्या बरं वाटण्यात थोडी भर घालू इच्छितो. त्याच्या ज्या सिनेमांवर वाचायला मिळालं नाही, त्यांची दखल घेतो.

सफर, इत्तेफाक आणि बहारोंके सपने. सफर अगदी रोमँटिक सिनेमा होता. आनंद, नमकहराम यांच्याप्रमाणे इथेही राजेश खन्ना मेला होता. पण सगळ्यांनी (शर्मिलाने सुद्धा तिला जमेल तितका) अंडरप्ले करणारा अभिनय केला होता. फिरोज खानची चांगली म्हणावी अशी भूमिका त्यात होती. आम्ही कॉलेजातली मुलं तर त्यातल्या राजेश खन्नावर पागलच झालो. चित्रकार. ’जीवनसे भरी तेरी आँखे मजबूर करे जीनेके लिये’ हे साधंसुधं आणि हिंदी सिनेमातल्या सहजसोप्या शब्दरचनेला न जुळणारं गाणं जो तो गुणगुणत होता. गुरु शर्ट तेव्हाच आला की काय? अत्यंत नाटकी घटनांचा हा सिनेमा अ-भडक सादरीकरणामुळे पसंत पडला.

इत्तेफाक. एका रात्रीत घडतो. पात्रं दोन. राजेश खन्ना आणि नंदा. पोलिसांच्या ताब्यातून की वेड्यांच्या हॉस्पिटलातून पळालेला तो तिच्या बंगल्यात घुसतो. भल्या मोठ्या बंगल्यात ती एकटी. हा वेडसर. तिच्या नवर्‍याचा खून झालेला. वगैरे. बारीक तपशील आठवत नाहीत. आठवतं ते हे की सिनेमात एकही गाणं नव्हतं. भरीव नंदा सिनेमाभर घट्ट साडीत. आणि कसलीही वेडीबागडी लकब न पांघरता डोक्याने सटकलेला दिसणारा राजेश खन्ना. हा वेडा नसावा, अंगावर कोसळलेल्या परिस्थितीमुळे बिघडलेला असावा, असा संशय येत रहातो. सिनेमाभर सस्पेन्स आणि ताण बर्‍यापैकी टिकून रहातो. शेवट तर मस्तच. बरं वाटलं होतं की एक टॉपचा हिरो असला अनग्लॅमरस रोल करतो.

बहारोंके सपने तर ब्लॅक अँड व्हाइट होता. गिरणीकामगारांवर होता. जुन्या, नया दौर, उजाला, वगैरे सिनेमांच्या पठडीतला होता. यातही राजेश खन्ना मरतो. पण सिनेमात नायक-नायिका बागेत जाऊन एकही प्रेमगीत म्हणत नाहीत. यातली गाणी वेगळीच होती. आर डी बर्मनची प्रायोगिकता. ’आजा पिया’ हे गाणं खटकत चालतं. ’चुनरी संभाल गोरी’ हे समूह गीत. मन्ना डे आणि लता. मला सतत मधुमतीतल्या ’बिछुआ’ची आठवण येत रहायची आणि राग यायचा. ’क्या जानू सजन’ या गाण्यात तर लता गात असताना मागे लताच्याच आवाजातली आलापी!

यातला गिरणी कामगाराचा मुलगा आवडला. बेकार. चटकन डोक्यात राख घालून घेणारा. संपूर्ण सिनेमाप्रमाणे राजेश खन्नाही साफ अनग्लॅमरस.

मी राजेश खन्नाचा फॅन नव्हतो (तेव्हा डोक्यात जुनी गाणी आणि राज-दिलीप-देव यांचा माहोल असे). तरी आराधनासकट दो रास्ते, बंधन, आपकी कसम असे मुमताजबरोबरचे आणि वर उल्लेख केलेले त्याचे सिनेमे मी पाहिले. नंतर त्याची स्टाइल खटकू लागली. पुढे जंजीर, दीवार आले आणि राजेश खन्ना पाचोळा होऊन उडून गेला. मला दुःख झालं नाही. पण नंतर नंतर वाढत्या प्रमाणात कृतक होत गेलेल्या या सुपरस्टारबद्दल एक आपुलकी वाटत राहिली. एका मुलाखतीत ’टिना मुनीम आणि तुम्ही किती जवळ आहात’ अशा किंवा तत्सम प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, ’आम्ही एकच टूथब्रश वापरतो!’ यातली उद्धट फिरकी आवडली आणि लक्षात राहिली. तेव्हाची आघाडीची फिल्मी पत्रकार देवयानी चौबळ ऊर्फ देवी खूप आठवली. तिची आणि त्याची घट्ट मैत्री होती. डिंपलला मुलगी झाली, तेव्हा तिचं नाव काय ठेवणार, हे ती सांगणार होती. नाव ठरलं होतं ’चिनार’. पण तेवढ्यात चिनार नावा़ची सिगारेट आली आणि मुलीचं नाव बारगळलं. कसं वाटलं असतं ट्विंकलला चिनार म्हणायला?

असो. हिंदी चित्रपटसृष्टीतला तो एक मैलाचा दगड. दुरून दिसणारा. एक तरुण घाबरून म्हणाला, "जुने, म्हातारे जातात; पण राजेश खन्ना जातो म्हणजे मृत्यू आपल्यापर्यंत येऊन पोचल्यासारखं वाटतं यार!" या उद्‍गारांमध्ये त्याला मोठी श्रद्धांजली आहे, असं वाटतं.


Friday, August 3, 2012


मृणाल गोरेच्या निमित्ताने


  माझ्या आईचा जन्म १९२६ सालचा. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ती २१ वर्षांची होती. म्हणजेच, स्वातंत्र्यलढा, बेचाळीसची चळवळ, वगैरे अनुभव तिने हळव्या, संस्कारक्षम वयात घेतले. सहाजिक जेपी, अच्युतराव, अरुणा असफ‍अली हे लोक तिचे आयडॉल. त्यांच्याबद्दल ती भरभरून बोलायची. ती अभ्यासू, महत्त्वाकांक्षी नव्हती आणि लढ्यात पुढाकार घेणं तिला सुचलंही नाही. पण गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिने शाळा सोडली. आईचा मार खाल्ला; पण शाळा सोडून लाठ्या खायला गेली. (नंतर पुन्हा शाळेत ऍड्मिशन घेतली पण मॅट्रिक राहिलं ते राहिलंच!)

तिच्या कौतुकाचा आणखी एक विषय होता: समाजवादी पुढारी बायका. राष्ट्र सेवा दलात गेल्यामुळे त्या सगळ्या बायांचा उल्लेख ती एकेरी करत असे. अहिल्या, प्रमिला, सुधा आणि मृणाल, असा. सगळ्यांशी कधी तरी तिची भेटही झाली असणार. शक्य आहे, त्यांनी कधी काळी एकत्र कामही केलं असेल. त्यांना भेटायची इच्छा कधी तिने व्यक्‍त केली नाही, की त्यांच्याशी असलेला खरा खोटा संबंध वापरून कुठे प्रौढी मिरवली नाही. त्यातही तिला जास्त कौतुक हे, की यातल्या बहुतेक बाया सीकेपी आणि त्यांनी जातीबाहेर लग्नं केली! मृणालचं तर विशेष कौतुक. बंडू गोरेशी लग्न करते म्हणाल्यावर म्हणे कोणी कुचेष्टेने म्हणालं, हिला मेडिकल झेपत नाही म्हणून अर्धवट सोडून लग्न करायला निघाली. तर मृणालने जिद्दीने पुढची परीक्षा अत्यंत उत्तम मार्कांनी पास होऊन दाखवली आणि मग शिक्षण सोडून बंडूबरोबर चळवळीत उतरली!

मृणाल गोरेची प्रतिमा माझ्या मनात ही अशी, ग्लॅमरस आहे. तिने पाणीवाली बाई म्हणून जे अचाट कर्तृत्त्व दाखवलं, ते माझ्या जाणिवेत नाही. ’नागरी निवारा’ हे नाव तर मला कडू वाटतं. वर्षानुवर्षं झगडून, नोकरशाहीशी कायद्याची बाचाबाची करून तिने आणि बाबुराव सामंतांनी हजारो सर्वसामान्यांना अत्यंत स्वस्तात घरं मिळवून दिली आणि घर मिळताच तिथल्या मराठी माणसांनी तिला, तिच्या पक्षाला मत द्यायचं बंद केलं! तिच्या आदर्शवादाची गरज संपली, आणि त्यांना सौदेबाज शिवसेना जवळची झाली.

पुन्हा मागे जाऊ. समाजवाद्यांच्यात फूट पडल्यावर माझे वडील प्रजा समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते झाले तर मृणाल समाजवादी पक्षात गेली. त्यामुळे तिच्याविषयीच्या आपुलकीला माझ्या अपरिपक्‍व मनात एक बारीक अढी होती. आणीबाणी येईपर्यंत ती अढी जाण्याएवढा मी वाढलो होतो. आणीबाणीला ’दुसर्‍या स्वातंत्र्याचा लढा’ असं काही जण म्हणतात. माझा मित्र नंदू धनेश्वर तुरुंगात होता. अरुण केळकर बिहारला गेला होता. मी चळवळ्या कधीच नव्हतो. सुबोध जठार तुरुंगातल्या, भूमिगत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी नेमाने पैसे गोळा करत असे, तेव्हा त्याने मागितले की मी देत असे. शक्य होईल तिथे भांडत असे. बाकी आपण सार्वजनिकपणे काय करावं हे मला समजत नव्हतं. अरुण एकदा दादरला भेटला आणि आम्ही कॅफे स्विमिंग पूलवर बसलो. तेव्हा अनेकांनी त्यालाच काय, मलाही ओळख देण्याचं टाळलं हे मला जाणवलं. अरूणसारख्या कृतिवीरांविषयी मला आदर वाटे, पण भावनेच्या भरात स्वतः काही करणं खुळचट वाटे.

मग आणीबाणी उठली आणि निवडणुका जाहीर झाल्या. तो काळ मात्र रोमांचकारक होता. शिवाजी पार्कच्या जेपींच्या सभेला जमलेली अफाट गर्दी, बँकेत युनियनने आंदोलन सुरू करताच त्याला केलेला जोरदार विरोध, ’त्या हरिभाऊ गोखल्याला पाडा!’ अशी पु ल देशपांड्यांनी केलेली भाषणं, इंडियन एक्स्प्रेसने उघडलेली काँग्रेसविरोधी मोहीम ... वातावरण एकदम इलेक्ट्रिक होतं.

मग निवडणूक पार पडली. दादरची मतमोजणी रुपारेल कॉलेजमध्ये चालू होती. पहिल्या बुलेटिनची वेळ झाली तेव्हा मी गेटबाहेर होतो. दुपारची वेळ. काही शे माणसं गोळा झाली होती. लाउडस्पीकर खरखरला. कोणीतरी उमेदवारांची नावं आणि त्यांना मिळालेली मतं सांगू लागलं. अहिल्या रांगणेकरची मतं सांगून झाली: बहात्तर हजार. दोन तीन नावांनंतर आर डी भंडारे यांची मतं जाहीर झाली; छप्पन हजार. त्याच क्षणी संपूर्ण जमावातून उत्स्फूर्त आनंदाचा उद्‍गार उमटला. त्या उद्‍गारात हर्ष होता, थोडा उन्माददेखील होता. मी चकित झालो. माझ्या मनातली भावना गर्दीतल्या सगळ्यांच्या मुखातून! मला ते पार अनपेक्षित होतं. मग रात्रभर मी सतीश तांबेबरोबर दादर ते अंधेरी चालत भटकलो. सगळे रस्ते माणसांनी भरले होते. सगळ्यांचे चेहरे उजळले होते. आनंदी आनंद गडे! आम्ही स्वातंत्र्यलढा अनुभवला नाही; पण दुसर्‍या स्वातंत्र्याचा अनुभव अवश्य घेतला!

इंदिरा, संजय दोघेही हरले. मुंबईतल्या, कोकणातल्या सगळ्या जागा जनता पक्षाला मिळाल्या. एक्स्प्रेसच्या पहिल्या पानावर मध्यभागी मृणाल गोरेचा फोटो. ट्रकवर उभी आणि लोकांना हात करते आहे. काय तो फोटो होता. रंगीत नसलेल्या त्या फोटोतल्या तिच्या त्या आडव्या हातात रुबाब होता, आत्मविश्वास होता, आत्मसामर्थ्याची जाणीव होती. मी त्या फोटोच्या पूर्ण प्रेमात पडलो. आणीबाणीला, इंदिरेच्या दडपशाही राजवटीला गारद केल्याचा जो भाव त्या फोटोतल्या तिच्या त्या आडव्या धरलेल्या हातात व्यक्‍त होत होता, त्यात मला माझ्या हृदयात उचंबळलेल्या आनंदाचं मर्म फ्रीज झालेलं दिसलं. अनेक वर्षं तो वर्तमानपत्री फोटो मी जपला होता. त्या फोटोचं आकर्षण जराही कमी झालं नाही. पुढे केव्हा तरी घर बदलताना तो हरवला. मग स्मृतीतून देखील वजा झाला.
 
मृणालताईंच्या निधनाची बातमी वाचताच हे सगळं आठवलं. आई, आणीबाणी आणि तो फोटो. आणि हो, नागरी निवारा.