Friday, January 25, 2013

हे अमानुष राजकारण


करन थापर या पत्रकाराची (इंग्रजीत आदरार्थी अनेकवचन नाही. आणि तृतीयपुरुषी उल्लेखाचं मराठी भाषांतर एकवचनी करण्याची प्रथा पडून गेली आहे. परिणामी इंग्रजीच्या माध्यमातून परिचित होणारे सर्व परदेशी राज्यकर्ते, साहित्यिक, वैज्ञानिक, वगैरे ’ती हिलरी’, ’तो पामुक’, ’तो आइन्स्टाइन’ झाले आहेत.  त्यातलाच एक करन थापर. देशी असला तरी. बाकी कसला आशय या एकवचनात नाही.) तुम्हाला किती माहिती आहे? हिंदुस्तान टाइम्समध्ये दर रविवारी त्याचं सदर असतं. बहुधा सीएनएन आयबीएन या चॅनेलवर तो थोरामोठ्यांच्या मुलाखती घेतो. एकदा तो मला फार आगाऊ, आक्रमक वाटला म्हणून त्याच्या मुलाखती बघणं मी सोडून दिलं. पण परदेशी राष्ट्रदूतांपासून देशी राजकारण्यांपर्यंत थोर थोर लोक त्याच्या कार्यक्रमात येतात आणि त्याच्या आक्रमकतेला तोंड देतात; म्हणजे त्याचा राजधानीत मोठा दबदबा आहे, हे निश्चित.

याचा एक अर्थ त्याची विश्वासार्हता उच्च दर्जाची आहे, असाही होतो.

गेल्या रविवारच्या, म्हणजे २० जानेवारीच्या हिंदुस्तान टाइम्समधला त्याचा कॉलम वाचून मला बसलेला धक्का सर्वांशी शेअर करायचा आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी दोन भारतीय सैनिकांना ठार करून त्यांच्या देहाची विटंबना केल्याचं वृत्त वर्तमानपत्रांशी आणि न्यूज चॅनेल्सशी संबंध येणार्‍या सर्वांना ठाऊक आहेच. ही गोष्ट जुनी झाली. त्यानंतर सैनिक पत्नीला झालेला शोक आपण पाहिला; वर्तमानपत्रांमधून संताप व्यक्‍त करणारे लेख, अग्रलेख आले; अनेक हिंदी-इंग्रजी आणि मराठी वाहिन्यांवर यावर चर्चा झाली. आणि या सर्व चर्चांमध्ये, लेखांमध्ये मुख्य विचार हाच होता, की अशा अमानुष कृत्याला आपण काय प्रत्युत्तर देणार? केवळ निषेध करून गप्प बसणार की पाकिस्तानी सेनेला जरब बसवणार? काश्मिरातल्या नियंत्रण रेषेवर तणाव वाढवणे, हाच पाकिस्तानी सेनेचा हेतू आहे; कारण १. त्यांना अमेरिकेकडून अफगाणिस्तानात सवलती उकळायच्या आहेत, २. त्यांना लोकनियुक्‍त राज्यकर्त्यांवर कुरघोडी करायची आहे, ३. त्यांना पुन्हा एकदा सेनेचं महत्त्व पाकिस्तानी जनतेपुढे मांडायचं आहे, ३. त्यांना राज्यकर्त्यांना सेनापतींपुढे झुकवायचं आहे, वगैरे. आता, राजकारण आलं, की त्यात डावपेच आले, सापळे आले; त्या सापळ्यात न सापडता त्या डावपेचांवर मात करणं आलं. पण या सगळ्यापलिकडे जाऊन या अमानुष कृत्याला तोडीस तोड जवाब देण्याची निकड आपल्या सगळ्या पत्रकारितेत मांडली गेली. पाकिस्तानला असा सणसणीत धडा शिकवावा की अंतर्गत समस्यांवरून जनतेचं लक्ष उडवण्यासाठी वा अन्य कोणत्या कुटील हेतूंपायी भारतीय सैनिकांवर हात उचलण्याचं धैर्य त्यांना होऊच नये. भारतीय जनता पक्षाच्या सुषमा स्वराज तर म्हणाल्या, त्यांनी एक डोकं कापलं, आपण दहा कापली पाहिजेत! (आणि यावर श्रीवत्सने ट्वीटही केलं की पाकिस्तानने एक विकेट काढली, तर आपण दहा काढल्या पाहिजेत!) ट्विटरवरचा उथळपणा (आणि सुषमाबाईंचाही पोच नसलेपणा) सोडून देऊ; पण देशभर उसळलेल्या संतापाच्या प्रतिक्रियेमुळे आपल्या पंतप्रधानांना उशिराने का होईना, पाकिस्तानला इशारा द्यावासा वाटला, की दोन देशांमधले संबंध इत‍उप्पर सर्वसामान्य राहू शकत नाहीत.

अफझलखान जेव्हा शिवाजीला धरायला निघाला, तेव्हा थेट शिवाजीच्या दिशेने रोख न धरता त्याने देवळं फोडायला सुरुवात केली. तुळजापूर भवानीचं देऊळ फोडलं. अपेक्षा अशी की, राग अनावर होऊन आणि धर्मरक्षणासाठी काहीतरी करण्याचा दबाव येऊन या हिंदू राजाने डोंगराळ मुलखातून बाहेर यावं आणि अफझलखानाच्या बलाढ्य सेनेपुढे बकरा बनावं. पण शिवाजी इतका हुशार, की त्याने अफझलखानालाच सैन्यासकट जावळीच्या दाट जंगलात यायला लावलं आणि त्याचा काटा काढला. (आणि तसं करताना अफझलखानाच्या ब्राह्मण वकिलाला ठार करून स्वतःच्या हिंदुत्वाचा अस्सल अर्थही स्पष्ट केला.) शिवाजीच्या नावाने राजकारण करण्यापलिकडे शिवसेनेचा अणि महाराजांचा संबंध नसल्यामुळे हे उदाहरण त्यांना सांगण्यात अर्थ नाही.

पण शिवाजीने राजकारण म्हणून वा युद्धातला डावपेच म्हणूनदेखील कधी कुठल्या मशिदीला धक्का लावला नाही. भारतीय सैन्य या बाबतीत शिवाजीचा वारसा चालवत आहे; पाकिस्तानी सैन्यापेक्षा आपल्या सैन्याचा व्यवहार, वर्तन जास्त सुसंस्कृत आहे, असं मी गृहीत धरून चाललो होतो. आणि डोक्यात राख घालून न घेता पाकिस्तानी सेनेला जरब बसवायलाच हवी, असं मानत होतो.

करन थापर म्हणतो, हे गृहीत चूक आहे! आणि तो एक नाही, दोन नाही, तीन घटना सांगतो आहे. आणि त्यात भारतात सर्वात जास्त विश्वासाहता असलेला पेपर ’हिंदु’; (राडिया टेप्स प्रकरणात डाग लागला असला तरी) टीव्ही मीडियावरची धाडसी, रोखठोक आणि प्रामाणिक पत्रकार म्हणून नाव असलेली बरखा दत्त आणि तशीच विश्वासार्ह पत्रकारिता करणारी हरिंदर बावेजा, यांची साक्ष काढतो आहे. या तीन घटनांपैकी एक २००१ सालची, दुसरी कारगिल युद्धावेळची आणि तिसरी चक्क गेल्या वर्षीची आहे. तीनही छापून आलेल्या आहेत. तीनही वेळी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांची मुंडकी कापून आणली आहेत आणि आपल्या इथे मिरवली आहेत. तीनही वेळा भारतीय सेनाधिकार्‍यांनी या कृत्यांवर सारवासारव न करता त्याला पुष्टी दिल्याचं वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

तीन धक्के बसले. एक धक्का, ’आपणही असं करतो,’ हा. दुसरा धक्का ’हे आपल्या माहितीत आलंच नाही, हे कसं काय,’ हा. आणि तिसरा धक्का असा की ’माहितीने संपृक्‍त असणार्‍या इंग्रजी-मराठी पत्रकारितेतही पाकिस्तानचा त्वेषपूर्ण धिःकार करताना, या घटनांचा संदर्भच नाही? शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसुद्धा, यांना जनतेच्या भावना भडकावून राजकारण करायचं आहे. काहीही करून सत्ता मिळवायची आहे. पण पत्रकार आणि भाष्यकारही तितकेच बेजबाबदार? की अज्ञानी?

पण सरसकट बोल लावू नये. कदाचित तारतम्य बाळगण्याची उदाहरणं छापील वा टीव्ही पत्रकारितेत झाली असतील. आणि मीच दुर्लक्ष केलं असेल. असेलही.

करन थापरची भाषा सबुरीची आहे. ’हिंदु’ने त्यांना मिळालेल्या माहितीची स्वतंत्रपणे खात्री करून घेतली नाही, म्हणून गेल्या वर्षीच्या ताज्या घटनेबद्दल तो शंका व्यक्‍त करतो. तरीही ’हिंदु’ला माहिती मिळाली, ती सेनाधिकार्‍यांकडूनच; ज्यांना जबाबदारीची पूर्ण जाणीव असते, असंही नोंदवतो. असो. या मागच्या घटनांमुळे पाकिस्तानने कुरापत काढली आहे, हे खोटं ठरत नाही. पण आपण यात नैतिकता आणू नये, आपले सैनिकही महात्मा गांधींचे पूजक नाहीत, हे तितकंच खरं ठरतं. मग प्रश्न राहिला, तो पाकिस्तानी कृत्त्याच्या टायमिंगचा. राजकारणाचा. डावपेचांचा. ज्यात हा डाव खेळणार्‍या पाकिस्तानी धुरंधरांनी भारतीय जनतेची मानसिकता आणि इथल्या जनतेच्या मानसिकतेवर प्रभाव टाकणारे राजकारणी, पत्रकार, भाष्यकार यांचा अडाणीपणा + संधिसाधूपणा यांचंसुद्धा नीट मोजमाप घेतलं! आणखी एक. आपण केलेल्या असल्या कृत्यांमागे राजकारणी वा सामरिक डाव होता की नव्हता? कृत्य जर एकच असेल, तर पाकिस्तानला आणि भारताला वेगवेगळा न्याय का लावावा?

1 comment:

  1. उन्माद भयंकर असतो आपल्याकडे..
    भारतीय मुसलमानांना डिवचण्यासाठी इकडची गैर मुस्लिम मंडळी ( मोजके डावे/ गांधीवादी / सर्वोदयी वगैरे वगळून) पाकिस्तानवर दुगाण्या झाडत असतात. आपली पत्रकार मंडळी त्यात सर्व प्रकारची इंधने ओतत असतातच. या पूर्वीच्या तीन घटनांना कोणी प्रसिद्धी दिली होती काय?
    मी समजा मुसलमान असतो तर काय वाटले असते मला .. माझ्या ऑफिसात , ट्रेन मध्ये मला हळूच वेगळे काढले जाते.मला समजते ते. खूप कोंडल्यासारखे होत असावे.
    मग घेत्तोमध्ये / माझ्या वस्तीत गेले की मला सुरक्षित वाटते.

    ReplyDelete