Showing posts with label marathi cinema. Show all posts
Showing posts with label marathi cinema. Show all posts

Saturday, January 28, 2023

वाळवी: ‘उद्याचा’ चित्रपट?

 १.

वाळवी आवडला. अगदीच. परेश मोकाशी अपेक्षाभंग करणार नाही, असं वाटत होतं; नाही झाला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ जसे लक्ष घालून काढलेले चित्रपट होते, तसाच हासुद्धा आहे.

चार पात्रांचा चित्रपट आहे. आणखी पात्रं आहेत, पण गोष्ट त्यांची नाही. गोष्ट चार पात्रांची. एक पात्र सोडून बाकी तीन ‘नॉर्मल’ वागतात, बोलतात. चौथं पात्र काहीसं तऱ्हेवाईक आहे. तीन नॉर्मल पात्रांच्या आयुष्यात असं काहीतरी होतं ज्यामुळे त्यांना वेगळं, ॲब्नॉर्मल वागावं लागतं. पण तो एक संदर्भ सोडल्यास जगण्यातल्या सर्व प्रसंगी त्यांचे प्रतिसाद नॉर्मलच आहेत. परंतु पाय घसरावा आणि घसरण थांबवता येऊ नये, असं त्यांचं होतं. प्रॉब्लेम असा आहे की चारांपैकी कोणाशीही समरस होऊन चित्रपट बघत पुढे सरकणाऱ्या कथानकात सामील होणं प्रेक्षकाला शक्य होत नाही. तटस्थ राहून, घडणाऱ्या घटनांपासून लांब रहात त्रयस्थपणे चित्रपट बघणं अपरिहार्य ठरतं. हे बहुसंख्यांच्या पचनी पडत नसावं. कोणीतरी हिरो असतो, कोणी हिरॉइन असते (किंवा एखादं तिसरं पात्र आडून निवेदकाची भूमिका बजावतं) आणि त्याच्या वा तिच्या जागी स्वत:ला कल्पून गोष्ट छान एन्जॉय करता येते, अशी सोयीस्कर रचना ‘वाळवी’ची नाही. सर्वसाधारण प्रेक्षकासाठी ही मोठीच अडचण ठरत असावी.

चित्रपटात हिंसा आहे. पण आशयाचा भर हिंसा दाखवण्यावर नसून पात्रांच्या वर्तनावर आहे. ज्यांनी टॅरान्टिनोचे चित्रपट पाहिले असतील, त्यांना सहज होऊन जाणारी हिंसा बघताना अडचण येऊ नये. चित्रपट महोत्सवामध्ये पहायला मिळणारे चिनी, कोरियन चित्रपट तर भडक हिंसा चवीचवीने दाखवत रहातात. तसं ‘वाळवी’त काही नाही. खरं तर आजकालच्या गुन्हेगारी चित्रपटांमध्ये किंवा युद्धपटांमध्ये खूप माणसं मरत असतात. त्यांचे मृत्यू ‘घटना’ नसतात. ती मरत रहातात आणि चित्रपट पुढे सरकत रहातो. हे लक्षात घेता ‘वाळवी’मधल्या हिंसेला किमान भावनिक आक्षेप असू नये.

पण मारधाड सिनेमातली हिंसा खटकत नाही, ती करणाऱ्याविषयी प्रेक्षकाच्या मनात अढी निर्माण होत नाही, याला सज्जड कारण आहे. जेव्हा मारणारा ‘आपल्या बाजूचा’ असतो आणि तो शत्रूपक्षातल्यांचं निर्दाळण करत असतो, तेव्हा ती हिंसा क्षम्यच नाही, समर्थनीयसुद्धा असते. दसऱ्याला रावण जाळतात, त्याला हिंसेचा उत्सव कुणी म्हणत नाही! मरणारे अगदी रावण नसून नुसते चेहरा नसलेले सैनिक असतील, तरी चालतं. मग तर एका मशीनगनने डझनावारी मृत्यू घडवले तरी भावना दुखावत नाहीत. व्हीडिओ गेममध्ये हेच तर असतं. याच्या उलट प्रकारदेखील चालतो. म्हणजे खलनायकाने, त्याच्या साथीदारांनी नायकपक्षातल्या कोणाला मारणे, छळणे, इजा करणे. इथे त्या हिंसेमुळे प्रक्षोभ निर्माण होतो; पण त्या ‘अन्याया’चं क्षालन करण्याच्या निमित्ताने पुढे जी हिंसा उसळणार असते, त्यासाठी केलेली ती प्रेक्षकाच्या मनाची तयारी असते. चमत्कारिक वाटेल; पण ही हिंसा प्रक्षोभ निर्माण करत असली, तरी नैतिक पातळीवर अस्वस्थ करत नाही!

हे दोन्ही नसेल तेव्हा मात्र गोची होते. ओळखीच्या पात्राची हत्या दुसऱ्या ओळखीच्याच पात्राने केली आणि दोघांपैकी कुणीच दुष्ट, समाजकंटक, विकृत नसलं की कसा प्रतिसाद द्यायचा, हे कळत नाही. यासाठी एकतर चित्रपटासारखी कलाकृती आस्वादताना पूर्ण तटस्थ होणं जमलं पाहिजे किंवा हिंसा या मानवी कृतीकडे चिकित्सक नजरेने बघता आलं पाहिजे. या नैतिक पेचावर मात करता आली तर ‘वाळवी’ हा चित्रपट धमाल आहे. (मी पाहिला तेव्हा थिएटरात पन्नासेक प्रेक्षक होते आणि त्यातले बहुसंख्य वेळोवेळी खदाखदा हसत होते.)

चित्रपटाचं नाव अगदी यथार्थ आहे, असं चित्रपट संपताना अवश्य वाटतं; पण हे बरोबर आहे का? संपताना काय वाटतं, याचा उपयोग काय? पुस्तकाचं मुखपृष्ठ, बातमीचा मथळा यांनी वाचकाचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. तसं झालं तरच बातमी, पुस्तक वाचलं जाणार. आणि वाचून झाल्यावर त्याबद्दल बरंवाईट मत बनणार. ‘वाळवी’ या नावामधून प्रेक्षक आकर्षिला जात असेल, असं वाटत नाही.

२.

‘वाळवी’ बघताना ‘अंदाधुन’ची आठवण आली. एकामागोमाग एक घटना घडत जातात आणि एक नाट्य वेगाने उलगडताना गुंतागुंत वाढत जाते. ‘अंदाधुन’ इतकी गुंतागुंत ‘वाळवी’त नाही. ‘वाळवी’ ची पटकथासुद्धा ‘अंदाधुन’ इतकी वेगवान नाही. पण घटना पटापट समोर मांडत त्यांच्यात प्रेक्षकाला खिळवून पुढे काय होणार, या प्रश्नाच्या गुंत्यात त्याला अडकवण्याचं तत्त्व तेच आहे. अशा वेळी ‘अमुक ठिकाणी तपशील चोख नाही, तमुक बारकावा चुकीचा आहे’; असे आक्षेप इथेही घेणं बरोबर नाही. दिग्दर्शक जे मांडतो आहेत, त्यानुसार पुढे जात गोष्टीची मजा घेण्यातच सिनेमाची गंमत आहे. ‘वाळवी’ची पटकथा ‘वॉटरटाइट’ नाही. काढायचीच तर खुसपटं काढता येतील. पण ते मुद्याला सोडून असेल. गोष्ट रहस्याची नाही, गोष्ट प्रेमाची नाही, नवशिक्या गुन्हेगारांची नाही. गोष्ट एका कृतीमुळे अटळ घटनांच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणसांची आहे. ती जर गंभीरपणे मांडली असती, तर सगळे तपशील, बारकावे महत्त्वाचे ठरले असते आणि त्यांच्या सूक्ष्म तपासणीला सामोरं जाणं चित्रपटाला भाग पडलं असतं. पण जे नाही, त्याची बळजबरी कशाला? चित्रपटाची मांडणी खास परेशटाइप क्रेझी ह्यूमरची आहे. इथे त्या ह्यूमरचा रंग गडद आहे, एवढंच. जे आहे तेच बघावं आणि त्यातच चित्रपटाचं गमक शोधावं.

चित्रपटातले संवाद विशेष लक्षणीय आहेत. म्हणजे, एखाद्या प्रसंगातलं नाट्य अधोरेखित करणारे आहेत. या चटपटीत संवादांविना प्रसंग कदाचित उठावदार झाले नसते. शब्दांमुळे नाट्याला धार येते! आणि असं असूनही हा ‘बोलपट’ नाही. बडबड करत नाही. एडिटिंगसुद्धा सीन रेंगाळू देत नाही. पटकथा खुलासे करत बसत नाही. यामुळे काही प्रेक्षकांचा आकलनाचा गोंधळ उडून नेमकं काय चाललं आहे, हेच कळत नाही, असं होऊ शकतं. पण त्यामुळे आस्वादाला बाधा येत नाही. (फार तर चित्रपट पुन्हा बघण्याची इच्छा होईल. ते चांगलंच की!)

चित्रपटात गाणं नाही, हे थिएटरमधून बाहेर पडताना आठवतं. म्हणजेच गाणं असतं, तर व्यत्यय आला असता! पार्श्वसंगीतसुद्धा प्रसंगांना उठाव देण्यापुरतं आहे. चित्रपटाची ‘थीम सांगण्या’चा अविर्भाव त्यात नाही. पार्श्वसंगीताची पट्टीदेखील वरची लागलेली नाही आणि संगीतामुळे घटना, संवाद यांच्यापासून लक्ष विचलित होत नाही.

अभिनय हे ‘वाळवी’चं खास अंग. चित्रपटात जरी एकही प्रसंग वास्तवाशी, संभाव्यतेशी फारकत घेणारा नसला तरी कथानकाचे पाय सर्ववेळ जमिनीला लागलेले नाहीत. अशा वेळी अभिनयाची जातकुळी निश्चित करण्याला महत्त्व येतं. यात शिवानी सुर्वे हिने रंगवलेलं पात्र सर्वात ‘स्मार्ट’ आहे, लेखनातच तिला लक्षवेधी वन लायनर देण्यात आले आहेत.  तिचा वावर, तिची नजर आणि सर्वात भारी तिचे उद्‌गार, यांनी एकेक प्रसंग जिवंत होतात. कथानक पुढे नेण्याला या पात्राचा सर्वात मोठा हातभार लागतो. हिच्या खालोखाल अनिता दाते. जे घडतं, त्याला हीसुद्धा कारणीभूत आहे. पण अनिताचे सीन्स तुकड्या तुकड्यात येतात. पण त्या तुकड्यांमध्ये तिच्याशी संबंध येणाऱ्यांच्या जगण्याला वळण देण्याची तिची क्षमता लक्षात येते. शिवानीचं पात्र आणि अनिताचं पात्र, हे या चित्रपटाल्या पटकथेतले दोन ध्रुव आहेत. किंवा दोन चाकं आहेत. बिचारे दोन पुरुष त्या चाकांच्या बेलगाम गतीत भिरभिरत जातात.

चित्रपट बघताना हसू येत असलं तरी तो काही लॉरेल-हार्डीचा निरागस विनोद नाही. तो चार्ली चाप्लिनचा कारुण्याची खोली असलेला विनोदही नाही. किंवा आचरट अविर्भाव आणि पडापड यांमधून रंगणारी स्लॅपस्टिक कॉमेडीसुद्धा नाही. जे समोर येतं, त्यातली भीषणता ‘एका थ्रिलरमधला थरार’ यात गुंडाळली जाऊ नये; ती भीषणता समोर येणाऱ्या घटनांमध्ये नसून तुमच्या आमच्या सारख्या माणसांच्या मनात आहे, हे ठसवण्यासाठी योजलेलं माध्यम म्हणून तो विनोद आहे. स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे यांनी त्यांच्या भूमिकांचं बेअरिंग चांगलं सांभाळलं आहे. स्वप्निलची चाल आणि सुबोधचा एकूण वावर पात्रांचा नॉर्मलपणा ठसवत रहातो. घटना गंभीर पण माणसं सर्वसाधारण, या विरोधाचं भान स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे या दोघांच्या वावरात आहे. याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शकाचं!


 

‘वाळवी’ हा चित्रपट इतिहासात स्थान बनवून बसणारा चित्रपट नाही. त्यात तांत्रिक कमकुवतपणा आहे, प्रेक्षकाला अंतर्मुख करून टाकणारा, हादरवून टाकणारा अनुभव नाही, पात्रांपासून दूर नेताना कुठल्या दाहक सत्याचं निकटदर्शन देण्याचा अविर्भाव नाही. पण जे नाही, त्यापेक्षा जे आहे, त्याकडे बघता ‘वाळवी’ हा चित्रपट नि:संशय लक्षणीय आहे. परेश मोकाशी या दिग्दर्शकाच्या एकूण कलानिर्मितीत सकारात्मक भर टाकणारा आहे. तो बघितला तर उद्या कितीतरी निमित्ताने होणाऱ्या चर्चेत त्याचा उल्लेख करता येईल, त्यातले प्रसंग आठवून सांगावेसे वाटतील.

३.

आता थोडं या लिखाणाच्या शीर्षकाविषयी.

याला ‘उद्याचा सिनेमा’ असं का म्हणायचं?

स्वानुभवापासून सुरुवात करतो. आमच्या जुन्या घरी ज्या सुताराने उपलब्ध जागेबरहुकूम फर्निचर बनवून दिलं; तो अगदी नम्र, हळू आवाजात बोलणारा, लाजाळू म्हणावा असा तरुण पुरुष होता. आमच्या घराबरोबर त्याने  परिचयातल्या कितीतरी घरी असंच फर्निचर बनवून दिलं. पूर्ण विश्वासू माणूस. त्याच्यावर घर सोपवून बाहेर जायला कोणाला काही वाटलं नाही. त्यामुळे त्याने त्याच्या बायकोचा खून केला, ही गोष्ट पचवायला सर्वांना जड गेलं. बायकोचा खून करून त्याने तिचा मुडदा स्वयंपाकघरातल्या ओट्याच्या खाली लपवण्याचा प्रयत्न केला. पण ते उघडकीला आलं आणि तो काही वर्षं तुरुंगात गेला. आमच्यातला एक जण त्याला अगोदर खटला चालू असताना आणि नंतर तुरुंगात भेटूनही आला. त्याचा चेहरा डोळ्यांसमोर आणला; त्याचा वावर, त्याचं बोलणं यांची आठवण काढली की हा माणूस खून करू शकेल, हे खरंच वाटत नाही. पण खून तर त्याने केलाच. त्याचा साधाभोळा चेहरा आणि त्याने रागाच्या भरात केलेला बायकोचा खून या दोन गोष्टी एकत्र आणताना मानवी मनाच्या आकलनाच्या कल्पना थोड्या ताणाव्या लागल्या.

तो तुरुंगातून बाहेर आला आणि गावी गेला याला आता खूप वर्षं झाली. आता खून करून प्रेताचे तुकडे करून बॅगेत भरले आणि दूर जंगलात टाकून दिले (किंवा तंदूरमध्ये जाळून टाकले, किंवा आणखी काही) अशा बातम्या पेपरात वाचण्याची नजरेला सवय झाली. असं करणारे भाषा, धर्म, शिक्षण, कमाई असल्या कुठल्याच रकान्यात सोयीस्करपणे मावत आहेत, असं नाही. (मारणारा मुसलमान असल्यावर घटनेला धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी वापरण्याचं हिडीस राजकारण सोडून देऊ.) मागे मुंबईत असा प्रकार झाला तेव्हा माझ्या संपर्कातले काही जण त्यांना ओळखणारे निघाले. ते हादरले होते. नीट नोकरी, व्यवसाय करणारे, सर्व विषयांवर आपल्यासारख्याच प्रतिक्रिया देणारे, आपल्यासारखेच दिसणारे वागणारे हे लोक असलं काही कसं करू शकतात, हे त्यांना उमजत नव्हतं.

‘वाळवी’मध्येसुद्धा एकेका पात्राच्या स्वभावातली सामान्य वैशिष्ट्यं जेव्हा निस्संकोच व्यक्त होतात तेव्हा त्यातून क्षणिक हसू आलं तरी लगेच दचकायला होतं. प्रसंग काय आणि हे आपले नॉर्मल वागताहेत! अशा भयंकर वेळी सगळी सगळी अवधानं विसरली जायला हवीत. अंगावर येऊन कोसळलेल्या दारुण संकटानेच मन भरून जायला हवं. थरकाप उडायला हवा. पण त्या पात्रांचं तसं काहीच होत नाही. ते अस्वस्थ होतात, संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करतात; पण ते करताना त्यांची डोकी ठिकाणावर असतात. त्यांच्या विचारप्रक्रियेतलं लॉजिक डळमळीत होत नाही. चित्रपटाच्या प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं नाही आणि सारासार विवेक जागा ठेवला, तर चित्रपटाचा आस्वाद कठीण होईल.

पण अगदी नॉर्मल भासणारे असलं कृत्य करतात, हे तर वास्तव आहे! इतकंच नाही, गर्दीचं रूपांतर झुंडीत करून त्यांना घाऊक हिंसा करण्यासाठी उत्तेजन मिळताना आपण पहातो आहोत. अमेरिकेत कुणीतरी माथेफिरू उठतो आणि ऑटोमॅटिक बंदूक चालवून डझनभर निष्पाप जीवांची हत्या करतो आणि अशा घटना तिथे अपवादात्मक म्हणता येणार नाहीत, इतक्या सातत्याने घडत असतात. आपल्या देशाची स्थिती फार वेगळी नाही. झुंडींनी केलेली हिंसा तर आपल्याला आता धक्कादायकसुद्धा वाटत नाही. आणि मग भीती वाटू लागते की सामाजिक हिंसेला तर मान्यता मिळते आहे; मग त्याच प्रकारची हिंसा व्यक्तिगत पातळीवर होण्याकडे प्रवृत्ती व्हायला अजून किती वेळ आहे? 

चित्रपट ही आधुनिक लोककला आहे. समाजात जे घडतं, त्याचे पडसाद चित्रपटात लगेच पडतात. ‘वाळवी’ बघून जर मराठी प्रेक्षकाला अस्वस्थ वाटत असेल, ‘हे असलं तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्यात इतक्या सहजतेने होताना दाखवता कामा नये,’ अशी प्रतिक्रिया त्याच्या मनात उमटत असेल; तर हा चित्रपट सामाजिक भावस्थितीचं प्रतिबिंब दाखवत नाही, असं म्हणणं भाग आहे. पण तेवढंच नाही. तो भविष्याची चाहूल घेतो आहे का? आज सामाजिक हिंसा आपण मान्य केली आहे; उद्या तशीच हिंसा वैयक्तिक पातळीवर होऊ लागली तर आपण त्या स्थितीचा असाच सहज स्वीकार करू का? त्या ‘उद्या’चा आरसा तर ‘वाळवी’ आपल्यासमोर धरत नाही? वाळवी समाजवास्तूलाच तर लागलेली नाही?

 

‘वाळवी’ या चित्रपटाचा रोख हे प्रश्न प्रेक्षकापुढे उभे करण्याकडे आहे, असं जाणवत नाही. पण सध्याच्या सामाजिक वातावरणाकडे काळजीने बघणाऱ्याची या प्रश्नांपासून सुटका नाही.

Monday, August 31, 2015

मराठी चित्रपटनिर्मिती आता वरच्या यत्तेत गेली?


'डबल सीट' नावाचा मराठी चित्रपट पाहिला. 



लहानशी कथा आहे. ’मुंबईतलं कनिष्ठ मध्यमवर्गातलं  नवीन लग्न झालेलं मराठी जोडपं घर घेऊ बघतं तर काय होतं’ इतकीच. यात कोणी खलनायक नाही. समस्या सोडवायला देव अवतरत नाही की कोणी देवदूतासारखा माणूस मदतीचा हात देत नाही. सगळी गोष्ट माणसांची. माणसांची सुखंदुःखं, रागलोभ आणि माणसांनी शोधलेले सुटकेचे रस्ते. झालंय काय, ठो ठो पिस्तुलबाजी, जबरी मारामारी, नजर फिरवणारा पाठलाग; नाही तर कुटील कटकारस्थानं, अचाट संकटं आणि घनघोर गैरसमज यांचा मारा टीव्हीवरून सतत अंगावर घेण्याची सवय झाल्यामुळे पडद्यावर काय सामोरं येणार, याच्या नॉर्मल अपेक्षाच नॉर्मलपणा ओलांडून गेल्या आहेत. परिणामी नवीन काहीही बघताना ’आता काहीतरी होणार! आता "ढँण!" असं संगीत वाजून आकाश कोसळणार!’ अशी उत्सुकता मनाला ताणून धरत रहाते. रंजन करून घेताना ’तणाव’ हीच  स्थिती असणं इतकं अंगवळणी पडलंय, की साध्या सरळ माणसांची गोष्ट बघण्यात प्रॉब्लेम होतो! म्हणून ’डबल सीट’ बघून मस्त फ्रेश वाटतं.


आणि मग विचार करताना लक्षात येतं की या ’साध्या सरळ’ कथेचं सादरीकरण सरधोपट नाही. त्यात खूप बारकावे आहेत. लक्षात य़ावी अशी खबरदारी घेतलेली आहे. उदाहरणार्थ, मुक्‍ता बर्वे ही ताकदीची अभिनेत्री आहे. वंदना गुप्ते डायलॉगबाजी करण्यात उस्ताद आहेत. संदीप पाठक लोकप्रिय विनोदी नट आहे. आणि अंकुश चौधरी तर आघाडीचा हीरो आहे. पण यातल्या एकालाही (वा अन्य कुणाला) ’वा! क्या सीन तोडा है!’ असा उद्‍गार वसूल करणारी जागा दिलेली नाही! चित्रपटात भावना उचंबळण्याला वाव आहे पण भावनोद्रेकाला ठसठशीतपणे पेश करणारा एकही प्रसंग नाही. सगळे कलाकार असा संयम दाखवत आहेत, म्हणजे हे दिग्दर्शकीय धोरण आहे. मराठी मेनस्ट्रीम सिनेमात हे दुर्मिळ आहे.


लग्न होऊन सासरी आलेली नवी नवरी मुक्‍ता चहा देते तो प्रसंग. ती बावरलेली, unsure दिसते. बरोबर आहे; घर, माणसं नवीन आणि आता हेच कायमचं आपलं होणार म्हटल्यावर बावरायला होणारच. तिचं असं, तर चहा घेणार्‍यांचं लक्ष चहापेक्षा टीव्हीवर चाललेल्या सीरीयलमध्ये जास्त गुंतलं आहे!  तिच्या बावरलेपणाबरोबर मुंबईच्या चाळीतल्या संस्कृतीचा एक पैलूसुद्धा प्रेक्षकासमोर येतो. ही नवी सून पुढच्याच सीनमध्ये तोंड उघडून एका शेजारणीला पार पॅक करून टाकते. हुशारी दाखवत स्वतःचा पॉलिसी विकण्याचा उद्योग यशस्वीपणे दामटते! म्हणजे, नव्या नव्या संसारात बावरली असली तरी ही मुलगी बर्‍यापैकी खमकी आणि कृतिशील आहे, अशीसुद्धा खूणगाठ प्रेक्षक मारतो. सीनमधून एका वेळी अनेक संस्कार साधणारी अशी रचना आपसूक होत नाही, ती कष्टसाध्यच असते. त्यामागे योजनाच असते.


आई-वडील-दोन भाऊ आणि आता मोठ्या भावाची बायको, असं पाच जणांचं कुटुंब; चाळ, चाळीतले तरुण आणि इतर; गावच्या मुलीच्या नजरेतून दिसणारी मोहनगरी मुंबई, या पसार्‍यात मुख्य कथानकाला समांतर आणखी प्रवाह असू शकतात. त्यातून contrast मांडता येतो आणि त्यातून कथानकातल्या, व्यक्‍तिचित्रणातल्या गोष्टी अधोरेखित करता येतात. हा धोपटमार्ग या चित्रपटाने टाळला आहे. थेटपणे वा आडून मुख्य कथानकाला पुष्टी देत नाही, असा प्रसंगच यात नाही.  नायकाच्या वडिलांचा व्यवसाय रेसच्या घोड्यांना प्रशिक्षण देणे, हा आहे. इतका वेगळा व्यवसाय असूनही पटकथा त्या दिशेने एक पाऊलही टाकत नाही. नायकाच्या पैसेवाल्या मित्राचं काम नायकाला अस्वस्थ करून विशिष्ट दिशेने प्रेरित करणे, इतकंच आहे. पोलीस मित्र नायकाला झोपडी विकत घेण्याच्या फसव्या मार्गाला जाऊ देत नाही. आवडती टीव्ही स्टार भेटते, घराच्या जाहिरातीवर तिचाच फोटो असतो; पण ती कथानकात घुसत नाही. चाळीतली फटाकडी तरुणी संडासाच्या रांगेत उभी असताना पळून जाते पण तिच्या कोर्ट मॅरेजला स्वतःच्या सासूसकट साक्षीदार होण्याइतका धीटपणा आता नायिकेत आला आहे, ही सूचना करण्यापलिकडे तिचंही काही काम नाही. अगदी मुंबई दाखवण्याचा मोहदेखील एका गाण्यापलिकडे टाळलेला आहे. एक प्रकारे, redundancy, वायफळ जागा असं काही नाहीच!



हा चित्रपट निर्दोष आहे, असं म्हणायचं कारण नाही. आणि मला इथे परीक्षण करण्याची जबाबदारीही घ्यायची नाही. ही ’आर्ट फिल्म’ नाही. हा वर्तमानातल्या सर्वसाधारण मराठी सिनेप्रेक्षकाला उद्देशून काढलेला ’मेनस्ट्रीम’ सिनेमा आहे. म्हणूनच तर त्यातल्या निवेदनात सफाई आणण्यासाठी केलेले प्रयत्न डोळ्यात भरतात. तंत्र वा आशय, दोन्ही बाबतीत प्रायोगिकतेचे पंख लावून कलेच्या आकाशात भरारी घेतल्याचा दावा करू न बघणार्‍या या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये घेतलेली मेहनत / दक्षता पाहता ’मराठीत आता दर्जेदार, कलात्मक चित्रपट निर्माण होऊ लागलेत,’ या विधानाच्या पलिकडे जाऊन ’मराठी चित्रपटनिर्मिती आता वरच्या यत्तेत गेली आहे,’ असं म्हणावंसं वाटतं. ’टाइमप्लीज’ या पहिल्या चित्रपटात नायक-नायिकेसकट इतर व्यक्‍तिरेखांना कंगोरेदार, मिश्र नैतिकतेच्या पेश करण्याचं आव्हान पार पाडल्यावर या दुसर्‍या चित्रपटात सघन सादरीकरणाची जबाबदारी पेलून दाखवल्यामुळे दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याकडून यापुढे याहीपेक्षा उंच उडीची अपेक्षा रहाणार आहे. आणि त्यांचा एकूण कल चाकोरीत बंदिस्त न रहाण्याकडे असावा, असं मानायला जागाही आहे.


Monday, April 27, 2015

कोर्ट: एक ’आंतरराष्ट्रीय’ मराठी सिनेमा



कोर्ट पाहिला. समोर घडणार्‍या गोष्टीपलिकडे बरंच काही सांगणारे चित्रपट इथे फार निघत नाहीत. ’एलिझाबेथ एकादशी’ तसा होता. ’कोर्ट’देखील आहे. पण क्रांतिकारक म्हणावा, इतका वेगळा आहे.

अगोदर माझी सिनेमा बघण्याची पद्धत काय आहे, हे सांगणं इथे आवश्यक आहे. कोणत्याही कलाविष्काराप्रमाणे चित्रपट कलावंत ’कला’ या त्याच्या माध्यमाद्वारे माझ्याशी संवाद साधतो आहे, असं मी मानतो. हा संवाद अर्थातच एकतर्फी असतो. कलावंत काहीतरी सांगत असतो आणि मी ते ग्रहण करत असतो. आणि कलाकृती, ही एकमेव अभिव्यक्‍ती त्या एकतर्फी संवादाला सिद्ध करत असते. कलावंताच्या मनातील आशय कलाकृतीमधून मूर्तरूप घेतो.

कलाकृती ही जरी कलावंताची निर्मिती असली, तरी निर्मिती पूर्ण झाल्याबरोबर ती स्वायत्त होते. मग कलाकृतीमधून ज्याप्रमाणे कलावंताला अभिप्रेत असलेला आशय व्यक्‍त होतो; तसंच त्या कलावंतावरील संस्कार, त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्याची कलाभाषेची जाण, वगैरे गोष्टीसुद्धा व्यक्‍त होतात. त्यामुळे कलावंताला काय म्हणायचं आहे आणि कलाकृती काय सांगते आहे, या दोन गोष्टी तंतोतंत एकरूप असतीलच, असं नाही.

एक आस्वादक म्हणून माझ्यासमोर कलाकृती असते. ती काय म्हणते आहे, हे मी जाणून घेत असतो. त्यालाच मी कलास्वाद म्हणतो. कलावंताची वेगळी मुलाखत घेऊन त्याच्या कलेतील घटकांचा नेमका आशय समजावून घेणे, हे माझ्या मते कलास्वादाच्या बाहेर आहे. (म्हणजे ते चूक आहे वा तसं करू नये, असं मुळीच नाही!)

याचा एक परिणाम असा होतो की माझ्या कलास्वादाला माझ्या आकलनशक्‍तीच्या, माझ्या संदर्भचौकटीच्या मर्यादा पडतात. मग ’तू जरी अमुक म्हणत असलास, तरी तो कलावंत वेगळा, तमुक खुलासा देतो आहे,’ असं मला सुनावलं जाण्याची शक्यता निर्माण होते. पण त्यामुळे मी आणि त्या विशिष्ट कलावंताची कलानिर्मिती वा एकूणच कला, यांमधल्या नातेसंबंधावर परिणाम होत नाही.  माझ्या आकलनशक्‍तीचा विकास, संदर्भचौकटीचा विस्तार, या माझ्या कुवतीनुसार, गरजेनुसार होत जाणार्‍या प्रक्रिया आहेत.

आता खरंच ’कोर्ट’.

चित्रपटात प्रसंग संपल्यावर कॅमेरा तसाच राहणे, पात्रं निघून गेली तरी कथानकाशी संबंधित नसलेल्या घटना त्या स्थळी घडताना दिसत राहणे, असं बर्‍याचदा होतं. आणि अशावेळी कॅमेरा बहुधा वाइड अँगलने काहीशा अंतरावरून घटना न्याहाळत असतो. मग दृष्य रस्त्याचं असेल, कोर्टाचं असेल किंवा हॉटेलच्या वा इमारतीच्या आतलं असेल. जणू ’दृष्यचौकट’ याच वास्तवाकडे लक्ष वेधायचं आहे. काही काळ तिथे कथानक घडत असतं; ज्याच्या बरोबर आपण  रहाणार असतो, त्यातून साकारणार्‍या कहाणीचा माग घेणार असतो. पण कहाणी अमुक इकडे गेली, तिच्यातून अमुक असं तात्पर्य निघालं; तरी ते दुय्यम होय. ज्या चौकटीत कहाणी आकार घेत आहे, तिची जाणीव सुटता कामा नये!

एक कोर्ट असतं. तिथे न्यायाधीश, सरकारी वकील, आरोपीचा वकील, कारकून, वगैरे लोक काम करत असतात. तिथे खटले चालतात आणि उलट (आणि अर्थातच सुलट) तपासण्या होतात, साक्षींच्या नोंदी होतात, वगैरे. यातला एकेक जण आपापल्या घरी रहात असतो. त्याचं त्याचं एक विश्व असतं. ती विश्वं सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिक बाबतीत एकमेकांपेक्षा अगदी वेगवेगळी असतात. या वेगवेगळ्या विश्वांना एकमेकांशी जोडणारा दुवा म्हणजे कोर्ट. प्रत्येकाचं जगणं या पोटसिस्टिमा आणि कोर्ट ही त्या पोटसिस्टिमांना एकत्र आणणारी जणू विशाल सिस्टीम. असं ते ’कोर्ट’.

आणि हे लोक तिथे पोट भरण्यासाठी नोकरी करतात. बँकेतल्या कारकुनाने जशी बेरीज करताना बेरजेतले आकडे म्हणजे रक्कम होय, हे विसरून जावं; तसंच या लोकांचं होतं. सरकारी वकील बाईला आरोपीवरील आरोप सिद्ध करण्याचं काम नेमून दिलं आहे. ते काम निष्ठेने करताना कायदा, पुरावे, साक्षी या सगळ्याच अर्थ ती स्वतःच्या कामाला सुसंगत असाच लावते. इतकंच नाही, ’कशाला लांबण लावायची, काय दहा वर्षांसाठी डांबायचं ते डांबा आणि संपवून टाका,’ असं सहज म्हणून जाते. तो एक माणूस आहे, आपण आपल्या कामात यशस्वी होण्याचा अर्थ एक माणूस काही वर्षं खितपत पडणे, असा होईल; हे तिला सुचत नाही.

न्यायाधीशही वेगळा नाही. तोसुद्धा एकूण कामकाजाकडे तशाच निर्विकारपणे पाहतो. सरकारी वकील बाई बाहेर जे जीवन जगते; त्यात जसा कोर्टाचा, कोर्टातील कामकाजाचा काहीही संदर्भ नसतो, तसंच न्यायाधीशाच्या जगण्यातही कोर्टरूमच्या आतील घटना बेदखल असतात. डुलकी घेत असताना त्याला दचकून जागं करणार्‍या मुलांना शिक्षा देताना तो नेमका आवाज करू न शकणार्‍या मुक्या मुलाच्या कानशिलात वाजवतो! तसं करताना वा तसं केल्यावर त्याच्या मनात ’न्यायभावना’ जागी होत नाही. बाहेरचा माणूस बाहेर राहतो आणि कोर्टातला न्यायाधीश कोर्टात.

(इथे ’असा असतो न्याय!’ असं म्हणण्याला वाव आहे. इतकंच नाही, ’थोबाडीत मारण्याचा अन्याय करून न्यायदेवता पुन्हा झोपी जाते,’ असंही नाट्यपूर्ण विधान इथे केलं तरी ते चूक ठरणार नाही. पण मला कोर्टाबाहेरचा माणूस पूर्ण वेगळा असणे, बाहेर कंगोरेदार व्यक्‍तिमत्त्वं असणारी माणसं व्यवस्थेच्या आत कार्यरत असताना भावनाशून्य असतात, हा आशय जास्त मोठा दिसतो.)

काय असतात त्यांची ’नॉर्मल’ आयुष्यं? न्यायाधीश लठ्ठ पगाराच्या नोकर्‍यांविषयी उपदेश करतो. न्यूमरॉलॉजी आणि अंगठीतले खडे यांचं समर्थन करतो. सरकारी वकील बाई कायदा हातात घेण्याचा प्रचार करणारं, भडक, उथळ नाटक बघते. कष्टकरी, गरीब लोकांमध्ये जागृती निर्माण करू पाहणार्‍या आरोपीचा वकील श्रीमंत गुजराती असतो. त्याचे आईवडील त्याच्यामागे लग्नाचा लकडा लावतात. त्याचा मित्र म्हणून घरी आलेला सरळ सरळ ’खालच्या वर्गातला’ दिसत असताना त्याच्याशी जराही वावगं वागत नाहीत (याच संस्कारांमधून हा सामाजिक जाणिवेचा वकील झाला का? पण एक लाख रुपयांचा जामीन भरणारा हा वकील कोर्टाच्या सिस्टीमसमोर अगदी पडतं घेतो. तरी त्यातल्या त्यात याच पात्राच्या निकट चित्रपट जातो. कुठल्याशा पंथाचे लोक त्याला काळं फासतात हे दाखवतो आणि मग त्याला रडतानाही दाखवतो.)

पिकनिकला जाऊन भेंड्या खेळणे ही न्यायाधीशाची मौजेची कल्पना, नाटक पाहणे ही सरकारी वकील बाईची; तर पबमध्ये मित्रमैत्रिणींसोबत बियर पिणे, ही गुजराती वकिलाची.

कोर्टातला खटला आणि या तिघांचं जगणं यात किती तफावत आहे! आरोपी शाहीर आहे. एका ठिकाणी सामाजिक अन्यायाची उदाहरणं देऊन मग ’आम्हाला कलाकार न म्हणण्याची कृपा करा’ या उद्‌वेग व्यक्‍त करणार्‍या शब्दांवर गाणं संपवल्यावर त्यामागोमाग पंधरा वर्षांखालील मुलींचा अंग हलवत नाच सुरू होतो गरिबांनी जीव द्यावा, अशी ही व्यवस्था आहे, असं गायल्याबद्दल त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खटला भरला जातो. त्याला शेदीडशे वर्षांपूर्वीच्या पारतंत्र्यातल्या कायद्याची जोड दिली जाते. म्हणून विचारावंसं वाटतं, हा चित्रपट म्हणजे अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध कडवटप प्रतिक्रिया आहे का?

यात एक इन्स्पेक्टर आहे, ज्याने या प्रकरणाचा तपास केलेला आहे. माणूस अजिबात गुर्मीवाला नाही. अदबशीर वागतो. कोर्टात आणि त्याच्या चौकीतही. पण काम चोख करतो. कोणतं काम? जनजागृती करणार्‍याला जनतेपासून वेगळं करण्यासाठी प्रयत्न करणे, हे काम. ’इन्स्पेक्टर उद्धट असो की नम्र; तो शेवटी त्याच व्यवस्थेचा भाग आहे आणि ती व्यवस्था गरिबाला नाडणारी आहे,’ असं म्हणतो का हा चित्रपट?

ज्याने आत्महत्या केली, असं आरोपात म्हटलं आहे, त्याची बायको साक्ष देते. तिचा चेहरा दगडी आहे. ती खोटं, गुळमुळीत बोलत नाही; पण एका शब्दात उत्तरं देऊन पुढे खुलासे अजिबात करत नाही. हे मी आदिवासींमध्ये पाहिलं आहे. आणि त्यांची शब्दसंपत्ती तुटपुंजी असते, हे त्यामागचं कारण नाही. त्यांना ही व्यवस्था आपली वाटतच नाही. इथल्या व्यवस्थेमधल्या एखाद्या प्रेमळ, सहानुभूतिदार व्यक्‍तीशी फार तर तोंडी संवाद होईल; मनामनांचा होणार नाही ही खात्री त्यांना असते. ज्याप्रमाणे अदबशीर इन्स्पेक्टरसुद्धा अहितच करणार; तसाच व्यवस्थेच्या आतली व्यक्‍ती वरवरच कन्सर्न दाखवणार. त्यामुळे ते त्यांच्यातल्या नसलेल्या व्यक्‍तीशी औपचारिक सभ्यपणा दाखवतात; पण मन उघडं करत नाहीत. आरोपीचा वकील मृताच्या पत्नीला घरपर्यंत लिफ्ट देतो आणि गाडी चालू झाल्यावर सीट बेल्ट लावायला सांगतो! त्यात त्याचं चूक नाही, तो शहरी जगण्यातली दक्षता घेत असतो. पण त्यातून दोघांच्या जगण्यातलं, दोघांच्या ’कन्सर्न्स’मधलं अंतर अधोरेखित होतं. मग तिने त्याच्याकडे काम मागण्याचा अर्थ औपचारिक उपचार पाळणे, इतकाच उरतो.

खुनाचा आरोप असलेला शाहीरसुद्धा बोलत नाही. त्याच्या गाण्यांमध्ये, सादरीकरणामध्ये कळकळ जाणवते; पण कोर्टात वा इतर कुठे ती कळकळ वा तिच्याबरोबर येणारा क्षोभ व्यक्‍त होत नाही. तो क्रांतिकारी विचारांची पुस्तकंसुद्धा लिहितो आणि छापून घेतो. वकिलाने जामीन भरला, हे कळल्यावर कृतज्ञतेने गदगदत नाही; हे पैसे परत कसे करता येतील, याचा विचार करू लागतो.

हा मनुष्य पूर्णपणे कर्मयोगी आहे. तो जरी ’सनदशीर’ मार्गांचा पुरस्कर्ता असला (संपूर्ण चित्रपटात कुठेही त्याचा कसल्याही प्रकारच्या हिंसक पर्यायाकडे कल असल्याचा, त्या पर्यायाला जवळ करणार्‍यांशी संपर्क असल्याचा सूचकही उल्लेख नाही. आहेत ते केवळ आरोप. फुटकळ पुराव्यांच्या तकलादू आधाराने केलेले आरोप.) आणि आपला संदेश गाऊन, पुस्तकं छापून प्रसारित करत असला तरी ’हाती शस्त्र घ्या’ असं तो कधी सुचवत नाही. गाण्यातूनही तो जीव द्या, असंच सांगतो! व्यवस्थेविरुद्ध हिंसेची चिथावणी देण्याचा जोड आरोप जरी ओघाओघाने त्याच्यावर होत असला, तरी मुख्य खटला आत्महत्येला प्रवृत्त करण्यावरून आहे!

चित्रपट जरी दोन वकील आणि न्यायाधीश,यांच्या जगण्याकडे काहीसं जवळून  निरखून पहात असला तरी मृताची पत्नी, आरोपी शाहीर यांच्या जगण्याच्या खोलात शिरत नाही. तिच्या रहाण्याच्या जागेपाशी किमान जाणं होत: शाहिराच्या बाबतीत तेही नाही. त्याचे कार्यक्रम तेवढे दिसतात. त्याचा सहकार्‍यांशी होणारा संवादही दिसत नाही. का?
कारण शाहीर, मृत सफाई कामगार आणि त्यांचं जग, हा मुळी चित्रपटाचा फोकसच नाही. संख्येने ते मोठे असले तरी प्रस्थापित समाज’चौकटी’च्या ते बाहेर आहेत. आणि चित्रपट चौकटीच्या आत जे घडतं वा घडत नाही, त्यावर लक्ष केंद्रित करतो. शेवटी सगळं होऊन गेल्यावर चौकट रिकामी होते, कोर्टरूमची दारं खिडक्या लावल्या जातात, दिवे बंद होतात आणि काळोख होतो. त्यानंतर जणू ’न्यायव्यवस्थेवरील टिप्पणी’चा उपसंहार म्हणून न्यायाधीश त्याच्या सग्यासोयर्‍यांबरोबर निवांत मौजमजा करताना दिसतो.

इतक्या कोरडेपणाने, भाष्याविना तपशील दाखवत, भावना ठळक करण्यासाठी पार्श्वसंगीताचा वापर करण्याचा मार्ग पूर्ण टाळत हा चित्रपट प्रचलित व्यवस्थेवर अत्यंत दाहक भाष्य करतो.

एक म्हणता येईल की लोक मराठी, गुजराती बोलतात तेव्हा इंग्रजी सबटायटल्स येतात; पण इंग्रजी भाषणाच्या वेळीदेखील सबटायटल्स इंग्रजीच रहातात! यातून निघणारा अर्थ दोन प्रकारे मांडता येईल. एक, चित्रपट इंग्रजीतून आस्वाद घेणार्‍यांसाठी, घेऊ शकणार्‍यांसाठी बनवला आहे, ज्या वर्गाविषयी सहानुभूती दाखवतो, त्यांच्यासाठी नाही. हे जरी खरं असलं, तरी जे दिसतं, त्यामागचा आशय कुणाही संवेदनशील मनाला भिडणारा आहेच. म्हणजे, जो मरतो त्याच्या मृत्यूची जबाबदारी व्यवस्था स्वतःवर घेत नाही.  त्याचं काम व्यवस्थेचा भाग आहे; पण त्याच्या जिवाला कवडीमोल मानत व्यवस्था स्वतःचे दाखवण्यापुरते असलेले नियम पाळत नाही. उलट, त्याच्या मृत्यूची जबाबदारी अशा एकावर लादते, जो नेमका  व्यवस्थेबाहेरच्या तसल्याच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी झटत असतो.

इंग्रजी सबटायटल्सबद्दलचं हे म्हणणं असंही मांडता येईल की या चित्रपटाचा रोख रुंद आहे, स्थलकालदेशाच्या सीमा ओलांडणारा आहे. यातून पुन्हा असं ध्वनित होतं की सदा वाइड अँगलने विस्तारित दृष्य दाखवणार्‍या या चित्रपटाचा विषय भारत, मुंबई, मराठी लोक, इथली न्यायव्यवस्था नसून जगभरची प्रस्थापित व्यवस्था, हा आहे!

यात संगीत नाही पण साउंड उत्तम आहे, यात प्रमुख तीन पात्रं सोडली, तर बाकी सार्‍या भूमिका व्यावसायिक नट नसणार्‍यांनी केल्या आहेत, यात सॉफ्ट कट जवळपास नाही, दिग्दर्शकाने ’क्राफ्टिंग’ नाकारण्याचा प्रयत्न केला आहे, दिग्दर्शकाचं लहान वय हेच त्याचं सामर्थ्य ठरलं की काय, वगैरे तांत्रिक बाबींमुळे कसा काय कमी जास्त परिणाम साधला गेला आहे, हे सोदाहरण सांगणं तज्ज्ञांचं काम आहे. चित्रपट या माध्यमात मला तेवढी गती नाही.

पण माझ्या कलास्वादाला असलेल्या मर्यादा रुंदावण्यासाठी ’कोर्ट’ पुन्हा बघणं मला आवश्यक वाटतं.

Sunday, June 2, 2013

एकुलती एक


’एकुलती एक’ हा चित्रपट पाहिला.

तो आवडला की नाही, हे इथे सांगायचं नाही, की त्याचं परीक्षण करायचं नाही. ’एकुलती एक’ मधल्या काही गोष्टी खास वाटल्या, त्या सांगायच्या आहेत.

हा चित्रपट सचिन पिळगावकरने निर्माण केला आहे. चित्रपट एक बाप आणि त्याची मुलगी, यांच्या भोवती फिरतो. बापाची भूमिका सचिनने, तर मुलीची भूमिका सचिनची मुलगी श्रीया हिने केली आहे. श्रीयाचा हा पहिलाच चित्रपट म्हटल्यावर बापाने मुलीला लाँच करण्यासाठी चित्रपट काढला, असं म्हणणं वावगं ठरू नये. यात काही विशेष नसून हा चित्रपटसृष्टीचा नियमच आहे.

या चित्रपटाचा वेगळेपणा असा, की ही मुलगी ’मी सुंदर नाही,’ असं म्हणते! गंमतीत नाही, तर गंभीरपणे, मनापासून म्हणते! असं कधी झालेलंच नाही. प्रत्येक पुत्र वा पुत्री सर्वगुणसंपन्न, अत्यंत सुंदर, सर्वात लोकप्रिय असाच असतो वा अशीच असते. चित्रपटातली सर्व पात्रं त्याच्या वा तिच्या नुसत्या दर्शनाने घायाळ होत असतात. किंवा भारावून जात असतात. किंवा मंत्रमुग्ध होत असतात. आणि ही मुलगी म्हणते, मी सुंदर नाही! हे कसं काय?

गंमत अशी, की ती सुंदर असणे – नसणे हा चित्रपटाचा मुद्दाच नाही. त्यामुळे ती सुंदर नसून काहीच बिघडत नाही. कथानकाला कसलं वळण मिळत नाही की कोणाच्या वर्तनात ती सुंदर नसण्याने फरक पडत नाही.

पण म्हणूनच या विधानामुळे ती मुलगी - आणि हा चित्रपट - मॅचुअर वाटतात ना! जो परिणाम साधण्यासाठी त्याला वा तिला कुठून कुठून ग्लॅमर चिकटवण्याचा, बहुतेकदा आचरट म्हणावा असा प्रयत्न होत असतो, तसल्या प्रकारचा परिणाम असा सहज घडून येतो. माझ्यासारखा प्रेक्षक आपोआप तिच्या - आणि चित्रपटाच्या - बाजूचा होऊन जातो! (जब we मेट’ मध्ये करीना चित्रपटात शिरते, तीच ’इतनीभी सुंदर नही हूँ मैं’ असं म्हणत. तिथेच चित्रपटाने माझा गळा पकडला!)

आणि ही मुलगी, जिच्या बापाने तिला लाँच करण्यासाठी तिच्याभोवती फिरणारा चित्रपट बनवला, ती इतकी सहज वावरते, साधी वाटते; की ’ही नाचतेय, अभिनय करून दाखवतेय, तर्‍हेतर्‍हेचे कपडे घालून मिरवतेय,’ असं मनात येतच नाही. श्रीयाचा वावर पूर्ण सराईत आहे. आणि अजिबात आगाऊ नाही. (आता हा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी तिचा पुढचा चित्रपट बघणं भाग आहे.)

पुढे. चित्रपटाला सांगण्यासारखं काही कथानकच नाही. मुख्य पात्रांची ओळख करून दिल्यानंतर त्यांच्यात काही गैरसमज, संकट, संघर्ष, स्पर्धा, असलं काहीही होत नाही. चित्रपटाला व्हिलन नाही की व्हँप नाही. आणि तरीही तो रटाळ होत नाही! पात्रांच्यातल्या तणावाने सीन उचलून धरला आहे, असं मोजून एकदा होतं. इतर वेळी तसं नसूनदेखील बोअर होत नाही.

संवादांची भाषा एकदम आजची आहे. आणि सहज आहे. चांगल्या म्हणवलेल्या मराठी चित्रपटांचं एडिटिंग मार खातं. त्यामुळे चित्रपटाच्या प्रवाहात गचके बसत रहातात. तसं इथे होत नाही. एडिटिंग नावाचा प्रकार असतो, हे जाणवूही नये, इतकं ते शांत आणि सफाईदार आहे.

आवर्जून सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट. अशोक सराफचं काम उत्तम आहे, यात काय सांगायचं? सांगायचंय ते सुप्रियाबद्दल. तिला फार थोडं फूटेज आहे. चित्रपटात तिची एंट्रीसुद्धा उशीरा आहे. पण तिने असं काही बेअरिंग पकडलंय, की तिचं पात्र चित्रपटातलं महत्त्वाचं पात्र आहे, असं प्रेक्षकाच्या मनावर ठसतं. इतक्या थोडक्या स्पेसमध्ये असा परिणाम साधणे, हे अभिनयकौशल्य थोरच होय.

पुरे. आणखी लिहीत गेलो, तर परीक्षण होईल. तेवढा काही हा चित्रपट लक्षणीय नाही.