Thursday, November 14, 2013

मन्ना डे: एक सगळ्यांचा एक माझा

मन्ना डे गेला.

बातमी कळल्यावर लगेच लिहिण्याची ऊर्मी आली नाही, हे कबूल करायला हवं. पण इतके दिवस गेल्यावर हेसुद्धा कबूल करायला हवं की नाही लिहिलं, तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. एका कर्तव्याला चुकलो, असं खुटखुटत राहील. तेव्हा लिहिणं भाग आहे.

इंटरनेटच्या जमान्यात माहिती यूँ मिळते. मन्ना डे १९४२ पासून गातो आहे. म्हणजे तो रफी, मुकेश, तलत, किशोर या सगळ्यांना बर्‍यापैकी सीनियर आहे. मन्ना डेची अर्ध्याहून अधिक गाणी धार्मिक-आध्यात्मिक-भाष्यकारक; हिंदी सिनेमाच्या परिभाषेत सांगायचं तर ’भिकार्‍याची गाणी’ आहेत. पण मला इथे मन्ना डेच्या एकूण कारकीर्दीचा आढावा घ्यायचा नाही आहे. (तरी, तलत-रफी-मुकेश जसे शेवटी शेवटी बेसूर, अमधुर होऊ लागले, तसं मन्ना डेचं झालं नाही. तो जोपर्यंत गायला, तोपर्यंत गाण्याला न्याय देत राहिला, हे आवर्जून नोंदवावंसं वाटतं.) मला मन्ना डे - म्हणजे मन्ना डेचा आवाज - कोण होता, हे चाचपडून बघायचं आहे. ’तरुण नसलेला आवाज’ हे त्याचं ब्रँडिंग का झालं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे.

आपण पार्श्वगायकांची चर्चा करत आहोत. पडद्यावर नायक - किंवा आणखी कोणी - तोंड हलवतो आणि त्याला मागून आवाज पुरवतो, तो पार्श्वगायक. असं जरी असलं, तरी आवाजाला काहीतरी व्यक्‍तिमत्त्व असतंच. म्हणजे, ’ये जिंदगीके मेले’, ’आयेभी अकेला’ आणि ’चल अकेला’ या तीनही गाण्यांची जात एकच असली तरी गायक वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांचा भावही बदलतो. कसा? तर रफीला ’ये जिंदगीके मेले’ (मेला - नौशाद) गाताना ऐकताना ’जगण्याविषयी इतकं कडवट होण्याइतकं वाईट या रगेल पुरुषाला काय भोगावं लागलं असेल?’ असा प्रश्न सुचतो. ’या हळव्या जिवाला असं म्हणायची पाळी आली, यात काय आश्चर्य?’ हा प्रश्न तलतचं ’आयेभी अकेला’ (दोस्त - हंसराज बहल) ऐकताना सुचेल. आणि ’खरंच; कित्ती खरं सांगतो आहे हा!’ असा समरस भाव मुकेशच्या आवाजातलं ’चल अकेला’ (संबंध - ओ पी नय्यर) ऐकताना मनात उमटेल.

मन्ना डेचं ’कालका पहिया घूमे भैया लाख तरहे इन्सान चले, लेके चले बारात कभी तो कभी बिना सामान चले’ (चंदा और बिजली - शंकर जयकिशन) ऐकताना काय वाटतं?

असं वाटतं, हे शब्द याच आवाजासाठी घडले. हा आवाज या, असल्या शब्दांचीच वाट पहात होता.

शास्त्रीय संगीतातली गाणी सगळ्यांनी गायली. तलतचं ’मैं पागल मेरा मनवा पागल’ (आशियाना - मदन मोहन) हे गाणं केदार रागातलं आहे, हे कळल्यावर वाटतं, ’असेना. नायकाची व्याकुळता किती प्रत्ययकारी झाली आहे या गाण्यात!’ रफीचं ’नाचे मन मोरा’ (मेरी सूरत तेरी आँखे - सचिन देव बर्मन) हे कसं तेजस्वी आहे! भैरवी खूप आहे हिंदी सिनेमात; पण भैरवीत असलं तेज विरळा. मुकेशचं ’आँसू भरी है ये जीवनकी राहें’ (परवरिश - दत्ताराम) हे गाणं कल्याण रागातलं आहे, हे कळून काय फरक पडतो? नेमस्त मुकेशचं टिपिकल हरलेपण. किशोरचं ’वो शाम कुछ अजीब थी’ (खामोशी - हेमंत कुमार) हे गाणंसुद्धा कल्याण रागातलंच आहे. शर्ट धुवून त्यावरचा मळ काढून टाकावा, तसा एरवीचा छचोरपणा दूर करून कशी मनातली हुरहूर व्यक्‍त करतो आहे किशोर!

मन्ना डेचं रागेश्रीमधलं ’कौन आया मेरे मनके द्वारे’ (देख कबीरा रोया - मदन मोहन) ऐकताना काय होतं?

असं वाटतं, हे खरं शास्त्रीय गायन. या आवाजामुळे ही सतार, ही आरोह-अवरोहात फिरणारी चाल, यांना किंमत प्राप्‍त होते आहे.

रफी रगेल आहे, जेव्हा दुःख, प्रेम, देशभक्‍ती, मैत्री असलं काहीही रफीच्या आवाजात व्यक्‍त होतं, तेव्हा ते एका तगड्या पुरुषाचं दुःख, प्रेम, वगैरे असतं. मुकेशच्या बाबतीत ते एका सरळ, सत्यवचनी माणसाचं असतं. तलत हळवा, व्याकुळ आहे. आणि किशोर उपरोधिक, जगण्याकडे एक खेळ म्हणून बघणारा. अर्थात यातल्या प्रत्येकाच्या बाबतीत अपवाद आहेत (म्हणूनच ते थोर आहेत); पण त्यांची नॉर्मल प्रकृती ही अशी आहे. मन्ना डेने ’देख कबीरा रोया’त ’कौन आया’ गायलंय, ते मुळी एका नायकाला गायक ठरवण्यासाठीच. या सिनेमात  आणखी एक जण असतो शायर. तो गातो, ’हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया’. ही चालसुद्धा शास्त्रीयच आहे आणि गोड, सुरेल आहे. पण ते गाणं तलत गातो. आणि त्या गाण्याचे शब्द उर्दू वळणाचे आहेत. परिणामी गाणं शायरी म्हणून ऐकू येतं. ’कौन आया मेरे मनके द्वारे’चे शब्द देशी तर आहेतच, त्यांच्यात प्रेम असलं तरी विरह, व्याकुळता, असलं काही नाही. ते ठळकपणे शास्त्रीय संगीत ठरतं.

आणि ते गाणं मन्ना डे गातो.

मन्ना डेमुळे ते ’शास्त्रीय’ म्हणून डिफाइन होतं. तलतच्या आवाजामुळे शायरीला उठाव येत असेल; पण तलत ’शायरपणा’चं व्यवच्छेदक लक्षण नाही. मन्ना डे शास्त्रीयतेचं आहे.

नौशादने जवळपास सगळी गाणी शास्त्रीय संगीतात दिली आणि नौशादने मन्ना डेचा आवाज क्वचित वापरला, यावरून मन्ना डे आणि शास्त्रीय संगीत यांचं समीकरण नाही, असं म्हणावं का? नाही! कारण एकदा चाल शास्त्रीय संगीतात बसवली, की गाण्यातले भाव व्यक्‍त करायला रफी जास्त उपयुक्‍त ठरतो! उलट, शब्द काही असोत, शास्त्रीय गायन अशी ओळख स्पष्ट व्हायला मन्ना डे बरा पडतो.

आणखी एक तुलना करून बघूया. आता तलत बाहेर. विनोदी, बहुधा आचरट गाणी. ’सर जो तेरा चकराये’ (प्यासा - एस डी बर्मन) हे गाणं जॉनी वॉकरच्या तोंडी असलं आणि त्यात खास त्याच्या तोंडचे ’मालीश, चंपी मालीश’ असे उद्‍गार असले तरी ते गाणं साहीरने लिहिलेलं, जनता जनार्दनाची मानसिकता व्यक्‍त करणारं गाणं आहे. रफीनेही ते मोकळेपणाने गायलं आहे, आचरटपणा करत नाही. अर्थात, रफीनेही ’हम काले हैं तो क्या’ (गुमनाम - शंकर जयकिशन) सारखी वाकडे तिकडे हेल काढणारी गाणं म्हटली आहेतच. ’डॅनी केप्रमाणे यॉडलिंग करणार्‍या किशोर कुमारने फारच लवकर एक विदुषक, सर्कशीतला जोकर, अशी स्वतःची प्रतिमा बनवून जोपासल्यामुळे त्याने असंख्य आचरट ढंगाची गाणी म्हटली (त्यातल्या काहींना ’गायली’ म्हणावंसं वाटत नाही). तसल्याच प्रकारच्या सिनेमात त्याने कामंही केली. पण त्याने तसलं प्लेबॅक क्वचित दिलं असेल. आणि मन्ना डे? ’किसने चिलमनसे मारा’ (बात एक रातकी - एस डी बर्मन), ’प्यारकी आगमें तन बदन जल गया’ (जिद्दी - एस डी बर्मन), ’फुल गेंदवा न मारो’ (दूजका चांद - रोशन), ’गोरी तोरी बाँकी’ (आधी रातके बाद - चित्रगुप्‍त), ’मेरे भैंसको डंडा क्यूं मारा’ (पगला कहींका - शंकर जयकिशन) असली तद्दन आचरट गाणी त्याने जॉनी वॉकर, मेहमूद, आगा आणि वेड लागलेला शम्मी कपूर यांच्यासाठी गायली आहेत. एका बाजूने ही शास्त्रीय संगीतातली गाणी आहेत; तर दुसरीकडून बालबुद्धी पब्लिकला वेडगळ चाळे दाखवून हसवणारी गाणी आहेत. एकदा धंद्याला बसलं, की निवड करायला फारसा वाव नसतो, तरी ही गाणी मन्ना डेच्या कीर्तीत भर घालत नाहीत, हे नक्की.

त्रास होतो. रफी, किशोर यांनी असला आचरटपणा केला तर त्रास होत नाही कारण त्यांच्या आक्रमक, आगाऊ प्रतिमेत त्याला जागा आहे. नायकाला रफीचा आवाज दिला म्हणून सोबत कॉमेडी करणार्‍या मेहमूदला मन्ना डेचा आवाज दिला, हे काही पटत नाही. नायकपणात कमी पडत असला तरी मन्ना डेला रुबाब नाही, असं मुळीच नाही. मन्ना डेच्या रुबाबाचं बेस्ट उदाहरण म्हणजे ’ना तो कारवाँकी तलाश है’ (बरसातकी रात - रोशन). ही कव्वाली सुरू करणारा तो मस्त मिशावाला नट आहे; काय रुबाब आहे त्याला! तसल्या रुबाबदार कव्वालाला हरवताना रफीच्या आवाजात दणदणीत शब्द आणि चाल पेश करणं रोशनला भागच होतं. ’तलाश’ (एस डी बर्मन) मधल्या ’तेरे नैना तलाश करे जिसे’ या गाण्याला चेहरा दिलाय शाहू मोडकने. सिनेमात या गाण्याचं
प्लेसिंग खास आहे. त्या खासपणाचं चीज मन्ना डे आणि शाहू मोडक, दोघेही करतात. ’तीसरी कसम’ (शंकर जयकिशन) मध्ये राज कपूरची गाणी जरी मुकेश गात असला तरी क्रिशन धवनच्या तोंडच्या ’चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजडेवाली मुनिया’ची मजा और आहे. ’बुढ्ढा मिल गया’तल्या (राहुल देव बर्मन) ’आयो कहाँसे घनश्याम’ची गंमत? (या आरडीने तर ’भूत बंगला’ या मेहमूदच्या चित्रपटात ’आओ ट्विस्ट करे’ हे त्या काळातलं ट्रेण्डी गाणं मन्ना डेला दिलं. आणि माझ्या आठवणीनुसार त्या वर्षी ते वार्षिक बिनाका गीतमालेत आखरी पायदानवर गेलं होतं! मन्ना डेचं आणखी कुठलं गाणं गेलं?)

तर मन्ना डेच्या वजनदारपणाचा फायदा संगीतकारांनी उचलला आहे. त्याच संगीतकारांनी त्याला पोरकटपणा करायला लावण्यामागे सिनेमावाल्यांची कोणती कम्पल्शन्स असतील कोण जाणे. तशी ’आकाशवाणी’वाली किंवा जीवनावर भाष्य करणारी गाणी मन्ना डेने उदंड म्हटली आहेत. ’निरबलसे लडाई बलवानकी’ (तूफान और दिया - वसंत देसाई), ’कस्मे वादे प्यार वफा’ (उपकार - कल्याणजी आनंदजी), ’इन्सानका इन्सानसे हो भाईचारा’ (पैगाम - सी रामचंद्र), ’जिंदगी कैसी है पहेली’ (आनंद - सलील चौधरी) ही काही उदाहरणं. (यात मराठीसुद्धा आहे. ’कालचक्र हे अविरत फिरते’ हे ’दोन घडीचा डाव’मधलं गाणं मन्ना डेने अस्खलित मराठीत म्हटलं आहे. त्याचे मराठी उच्चार एकदम साफ. ’अ आ आई म म मका’ आठवतं?)

सलील चौधरी आणि मन्ना डे ही एक बरी जोडी आहे. ’हरियाल सावन ढोल बजाता आया’ आणि ’धरती कहे पुकारके’ ही लताबरोबरची ’दो बिघा जमीन’मधली दोन ग्रेट  द्वंद्वगीतं. ’ऐ मेरे प्यारे वतन’ हे काबुलीवालातलं पठाणी बाजाचं चटका लावणारं गाणं. ’जा तोसे नही बोलू कन्हैया’ ही ’परिवार’मधली करकरीत मन्ना डे आणि मखमली लता यांची अफलातून जुगलबंदी. वा!

पण एक मुद्दा उरतो. सुरेलपणापलिकडे मन्ना डे गाण्यात काय घालत होता? त्याचे उच्चार स्पष्ट होते. ’सुर ना सजे’ (बसंत बहार - शंकर जयकिशन) मध्ये तो ’स्वरकी साधना’च्या पुढे नीट ’परमेश्वरकी’ म्हणतो. पण हिंदी सिनेमाच्या नायकात जसं आपोआप डोळ्यांना दिसणारं काही तरी झेड एलिमेंट असावं लागतं, तसंच प्लेबॅक सिंगरच्या आवाजात जादा काही तरी लागतं. आणि ते मन्ना डेकडे नव्हतं.

आणि आता उरला मुद्दाम शेवटी ठेवलेला बेस्ट मन्ना डे. शास्त्रीय संगीत आणि भिकार्‍यांची गाणी यात दादा असलेल्या मन्ना डेला जर कोणी नायक, रोमँटिक नायक बनवलं असेल, तर ते - अहो आश्चर्यम्‌ - शंकर जयकिशनने. एक काळ होता जेव्हा मला जर कोणी विचारलं असतं, ’हिंदी सिनेमाच्या अथांग सागरात सर्वात जास्त आवडत्या अशा कुठल्या एका गाण्याचं नाव तू घेऊ शकशील?’ तर एक क्षणही न थांबता मी उत्तरलो असतो, "होय. ’ये रात भीगी भीगी’ हे ते गाणं." आजही ’ये रात भीगी
भीगी’ (चोरी चोरी - शंकर जयकिशन) मला आवडतंच; पण तेव्हा मला ते परिपूर्ण वाटायचं. ती घुमणारे टोल वाजत होणारी सुरुवात, मग ते उचंबळणारे व्हायोलिनचे सूर, त्यात वरच्या पट्टीत घुसणारा मन्ना डेचा आवाज आणि मग या अद्‍भुत वातावरणाला कापत जाणारी लताची तान! यापेक्षा भारी काही असूच शकत नाही जणू! रात्र आहे, सोबत आहे, हुरहूर आहे, उद्याच्या इच्छापूर्तीची अंधुक आशा आहे, या सगळ्यावर संयमाचा नाजुक पण सध्या पक्का, असा पदर आहे -- आणि या स्वप्नवास्तवाला जिवंत करणारे शैलेंद्रचे शब्द आहेत. तो राज कपूर आणि त्याची ती उद्धट देहबोलीची मनमोकळी नर्गिस. मी ’चोरी चोरी’ पाचेक वेळा पाहिला. हे गाणं गोची करायचं. राज कपूर पहायचाय, नर्गिसवर नजर  लावून बसायचंय आणि असं असताना ’ये रात भीगी भीगी’चे सूर वाजले की माझे डोळेच मिटायचे. असं वाटायचं, सगळी संपूर्ण इन्द्रियगोचरता केवळ कानांच्यात एकवटावी आणि ’ये रात भीगी भीगी’च्या सुरांनी सगळा काळ-अवकाश भरून जावा.

’चोरी चोरी’त राज कपूरला फक्‍त मन्ना डेचा आवाज आहे. तीन मस्त ड्यूएट्स आहेत. (आणि ’हिल्लोरी’!) सोलो मात्र नाही. सोलो आहे, ते फक्‍त ’श्री ४२०’ मध्ये (विषय राज कपूरपुरता आहे सध्या). ते ’दिलका हाल सुने दिलवाला’ बडबडगीतासारखं आहे. गाणंभर त्या ठेक्यावर मन्ना डेचा आवाज असा काही फिरलाय नाचलाय की पटतं, इथे हाच. मुकेशला नसतं जमलं हे. (’मेरा नाम जोकर’मध्ये मुकेशचं ’जाने कहाँ गये वो दिन’ जुन्या शंकर जयकिशनची आठवण करून देत असलं, तरी मन्ना डेचं ’ए भाय जरा देखके चलो’ हेसुद्धा नसतंच जमलं मुकेशला.) ’प्यार हुवा इकरार हुवा’ तर इतिहासात अमर झालेलं गाणं. त्यावरही मन्ना डेचा स्टँप. त्या अगोदर आवारा. त्यात लताच्या पातळ पातळ तीक्ष्ण तीक्ष्ण आवाजातल्या ’तेरे बिना आग ये चांदनी’ मध्ये अनेक वाद्यांच्या धुडगुसात वाजणारा मन्ना डेचा आवाज. मग ’सीमा’. ’तू प्यारका सागर है’ मधला तो संथ, जड, गंभीर, बलराज सहानीला शोभणारा आवाज. पुढे ’उजाला’. ’अब कहाँ जाये हम’. शंकर जयकिशनमध्ये मन्ना डे बहरलाय. लताबरोबर त्याची द्वंद्वगीतं तर गोळीबंद आहेतच; आणि ’मुड मुडके ना देख’चं काय? नादिराच्या तिखटपणाला फिट बसणारा आशाचा आवाज आणि तिच्याबरोबर तितक्याच आक्रमकपणे गाणारा मन्ना डे.

केवढं ऋण आहे त्याचं माझ्यावर! कसं नाही लिहायचं त्याच्यावर? तरी ’बसंत बहार’, बूट पॉलिश’ राहिले. ’देवदास’मधलं ’आन मिलो’ राहिलं. ’परिणीता’मधलं ’चली राधे रानी’ राहिलं. दत्तारामची मन्ना डे-लता द्वंद्वगीतं राहिली. ’चुंदरिया कटती जाये रे’ राहिलं. आणि सगळ्यात मोठं असं ’ऐ मेरी जोहरा जबीं’ (वक्‍त - रवी) कसं राहिलं? थोडा मध्यमवयाकडे झुकलेला बलराज सहानी कसा फिट्ट बसतो नाही, मन्ना डेच्या आवाजाला!


असो. रफीसारखा पुरुषी, तलतप्रमाणे उत्कट, मुकेशसारखा सत्यवचनी, किशोरसारखा उत्फुल्ल, वात्रट नसला तरी मन्ना डे काही एका लेखात आख्खा मावणारा गायक नव्हताच.

Sunday, September 15, 2013

एका देवाची उत्क्रांती

गणपती हा माझा आवडता देव होता. गणपती येण्याच्या आदल्या दिवशी मी, माझा भाऊ, माझा काका आणि एखाद्दुसरा मित्र, असे रात्री उशीरापर्यंत जागूनडेकोरेशनकरायचो. आमच्या दहा बाय दहाच्या खोलीतली पुष्कळ जागा त्या डेकोरेशनमध्ये जात असे. रमणकाकाला डेकोरेशनची भारी हौस होती. डेकोरेशन हा शब्द त्याचाच. तो ठरवायचा त्याप्रमाणे आम्ही करायचो. गणपतीच्या चेहर्‍यावर उजेड पडेल असा फोकस, वरून दोन्ही बाजूंनी येणार्‍या विविध आकाराच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मागे कधी फिरतं चक्र, कधी आरसा, असा सारा थाट असायचा. चाळीच्या दुसर्‍या माळ्यावर आमच्याच गणपतीचं डेकोरेशन सर्वात भारी असायचं. अर्थात, खालच्या कर्णिकांचं आमच्यापेक्षाही भारी असायचं. पण त्यांचा गणपतीच मोठा, दहा दिवसांचा असायचा. आमचा गौरीबरोबर जाणारा. श्रावण महिन्यात केव्हातरी रणदिव्यांचं पोस्टकार्ड यायचं. जोडकार्ड. दादा उत्तर पाठवायचे. गणपती आणायला दादांबरोबर अनेकदा मीच जात असे. सोबत प्रधानांकडल्या विश्राम, धोंडू, गोविंदा, लक्ष्मण यांपैकी एक गडी. हे मजल्यावर बर्‍याच घरी काम करत असले, तरी ते प्रधानांचे गडी यात त्यांच्यासकट कोणाला शंका नव्हती.





गणेशचतुर्थीला दादांबरोबर पलिकडल्या दादरच्या खांडके बिल्डिंगमधल्या रणदिव्यांच्या दुकानात गेलो, की तिथे नाक्यापासूनच लोकांची झुंबड असायची. कोपर्‍यावर ताशेवाल्यांचे दोन चार गट दणादण टिपर्‍या हाणत स्वतःची जाहिरात करत उभे असायचे. त्यांच्यामुळे कानात तोंड घालून बोललं तरी ऐकू जाणार नाही, इतका आवाज आसमंतात भरलेला असायचा. आम्ही कधी ताशेवाले घेतले नाहीत. हातातल्या झांजा जोरजोरात वाजवत आणि तोंडाने ’बाप्पा मोरया’च्या घोषणा देत आम्ही घरी यायचो. आमच्या घरी लहानमोठ्या झांजांचे तीनेक जोड होते. आणि एक जोडी टाळांची. टाळांचा ठणठणाट थोरच पण त्या खोलीत एकाऐवजी टाळांचे दोन जोड वाजू लागले की कान किटत. आरतीतले शब्द ऐकू येईनासे होत. ते मला आवडत नसे. पण टाळ-झांजांचा गजर, आरत्यांचा आरडाओरडा, खांडके बिल्डिंगपाशी असणारा कानाचे पडदे फाटतील असा आवाज, हे सारं मला प्रिय होतं. फारच.

गणपती दिसायला नितांत सुंदर. प्रसन्न. चाळीत, आसपास, नातेवाइकांकडे, असा मी अनेक गणपती पहात होतो. नुसता नमस्कार करून प्रसाद घेत नव्हतो, मूर्तीचं निरीक्षण करत होतो. मला आमच्या घरची मूर्तीच सर्वात सुंदर वाटत असे. दुपारी कोणी आलेलं नसलं, की मी पलंगावर बसून गणपतीकडे पहात रहायचो. गणपतीचं रूप मला इतकं प्रिय होतं, की पुढे इंटरसायन्सला असताना एका मित्राच्या पाखंडी बडबडीमुळे विचारात पडून जेव्हा देवबीव आपल्याच मनाचे खेळ आहेत, हा साक्षात्कार मला झाला; तेव्हा स्वतःच्या नास्तिकतेची ’सीटी’ (confirmatory test. ही केमिस्ट्री प्रॅक्टिकलमध्ये असायची.) घेणं मला गरजेचं झालं आणि ’गणपतीची मूर्ती बघूनही आपल्या मनात श्रद्धा जागली नाही, तर आपला देवावरचा विश्वास नक्की उडाला’ असं मी ठरवलं. त्यानंतरही मी डेकोरेशन करण्यात काकाला मदत करत राहिलो, गणपती मला सुंदर दिसत राहिला, आवडतही राहिला; पण या सोंडवाल्या ढेरपोट्या देवाच्या आकर्षणाचं हे काय रहस्य आहे, असं कुतूहलही उत्पन्न झालं.

त्यानंतर आजतागायत मला कधीही देवाची गरज भासलेली नाही. कोणत्याही प्रकारच्या कठीण प्रसंगी देवाचा धावा करावासा वाटलेला नाही. कुठल्याही कूट प्रश्नासमोर जाताना किंवा अनवट उत्तराचा थांग लावताना कधीही देवाचा भोज्या करावासा वाटलेला नाही. कुणाला गाणं येतं, कुणी डावरा असतो, तसा मी पूर्ण नास्तिक आहे.

पण याने सांस्कृतिक अडचणी सुटत नाहीत. आता मला देवाच्या नावाने दुसर्‍यांना त्रास देणे अजिबात चूक, गुन्हेगारी कृत्य वाटतं. पण मग लहानपणी मलाच गल्लीत हनुमान जयंतीच्या वा नवरात्राच्या निमित्ताने लागणारा लाउडस्पीकर हवासा होता त्याचं काय, असा प्रश्न उभा होतो. मग सुचतं, ’पण मी वाढलो की नंतर. वय वाढल्यावर माणसाची समज वाढायला हवी की नको?’ परवा मामाकडे गेलो असताना शेजारच्या गुजरात्यांनी प्रथमच गणपती आणला. ताशांचा प्रचंड गजर करत. रीतभात विचारावी तसं त्या बाईने मामीला काळजीने विचारलं, आता रात्रभर हे ताशे वाजवत ठेवायचे ना? नशीब विचारलं. ठेवले असते वाजवत, तर? पलिकडल्या सुधारित झोपडपट्टीवाल्यांनी पहाटे चार ते पाच ’खबरदार कुणी झोपेल तर’ असा पण केल्यासारखी गाणी वाजवली, तेव्हा कुठे विचारलं?

देव अमान्य झाल्यावर फक्‍त वर वर सोपं होतं. आता, मामाच्या शेजारच्या सुधारित झोपडीवाल्यांचीच गोष्ट. "जय देवी जय देवी महिषासुरमथिनी हो धैषासुरमथिनी ..." हा धैषासुर कोण? पुढे. "आरती ओवाळू भारती ओवाळू .." ही भारती कोण? "जय मंगलमूर्ती"च्या पुढे "श्री मंगलमूर्ती" किंवा "जय श्री शंकरा"च्या पुढे "स्वामी शंकरा" कुठल्या आरती संग्रहात आहे? एकदा श्रद्धा सोडली, की बुद्धीतून उत्तर शोधणं आलंच. सुचतं असं की आपली तर थोर मौखिक संस्कृती. लिहिलेलं सोडून मुखाचा शब्द अनुसरणारी. खरं तर ’शब्द’ नाहीच; ध्वनी अनुसरणारी. भटजी म्हणतो, करतो, सांगतो, त्याला ’होय महाराजा’ म्हणत जाणारी. आणि हा अडाणचोटपणा ही झोपडीवाल्यांची मक्‍तेदारी मुळीच नाही.
या करवादण्यातून प्रश्न सुटतो का? तर, मुळीच नाही. लोकांनी आवाज करू नये, आरतीच्या नावाखाली अर्थशून्य बकवास करू नये, यासाठी काय करावं? त्यांचं लोकशिक्षण करावं, हे मला मुळीच मंजूर नाही. एक तर हे सगळं श्रद्धेत येतं. त्यात कसलं आलंय शिक्षण? नास्तिकाला विचाराल, तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक शून्य. दोन्ही विवेकाला नाकारणार्‍या. आपली ती श्रद्धा, दुसर्‍याची अंधश्रद्धा. - आणि यात लबाडी नाही की सिनिसिझम नाही. हे खरंच आहे.

सुचणं नंबर दोन: श्रद्धा तेवढी खरी, कृती दुय्यम. एक जण कचर्‍यापासून काहीही हातून सोडताना ’गंगार्पणमस्तु’ म्हणत असे, तर तो मेल्यावर स्वर्गाला गेला, अशी एक कहाणी आहे. का गेला? तर तो काय देतो, यापेक्षा त्याची भावना मोठी. ती शंभर टक्के निर्मळ असल्याने त्याच्या कृतीला पुण्याचं मोल आलं आणि त्याला स्वर्गप्राप्‍ती झाली. मग तशाच निर्मळ भावनेने म्हटलेल्या चुकीच्या आरत्या फळ देऊन जाणारच.

यावर मला सुचणारं प्रत्युत्तर वाकड्यात जाणारं आहे. कोणी तरी लिहिलेल्या आरत्या उत्क्रांत होत शब्दापलिकडे गेल्या, ’श्रद्धामय’ झाल्या; असं जर असेल, तर गणपती हा विद्येचा देव उत्क्रांत होत आवाजाचा, सार्वजनिक वर्गणीचा, चाळीस आणि पन्नास फुटी धूड मुर्त्यांचा, डान्सिंग लाइट्सच्या बटबटीत मखराचा आणि हजारो रुपयांचा क्षणात धूर आणि कचरा करून टाकणार्‍या फटाक्यांचा मठ्ठ देव झालेला आहे. त्याच्याशी मला काहीही सांस्कृतिक देणंघेणं नाही. गणपतीवरून असलेले श्लील अश्लील विनोद मी इथे सांगणार नाही; पण मांडव उभारण्यासाठी रस्त्याला भोकं पाडायला प्रवृत्त करणार्‍या, बहुजनांच्या भक्‍तिभावनेला अतिआक्रमक बनवून काही जणांच्या मानसिक शांततेला नष्ट करायला कारणीभूत होणार्‍या, एरवी कामाच्या धावपळीत असलेल्या या शहराच्या वाहतुकीला पांगळं बनवणार्‍या या तथाकथित देवाला मनात घाण घाण शिव्या घालण्यापासून मला कोणी अडवलंय?

पण तरीही प्रश्न सुटला असं झालं का? जो मुळातच नाही, त्या देवाला घातलेल्या शिव्या नुसत्या माझ्या मनाच्या अंतराळात भटकणार. माझ्या त्राग्याचं प्रतीक, एवढं सोडून त्यांना काहीच अर्थ प्राप्‍त होणार नाही. कधी वाटतं, हे टिळकांचं पाप. ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्या घरीच असायला हवा. गावोगावी जत्रा आणि उरूस भरतात, ते परंपरेने. ती बरीवाईट परंपरा किमान धार्मिक नाही. साथ आल्यासारखे जे गणपती वाढत चाललेत; तसं उरूस, जत्रांचं होत नाही. समूहाचं रूपांतर जमावात करून त्यांच्यात धर्मवेडाचा उन्माद ठासून भरण्यात उरूस, जत्रा कमी पडतात.


काय माहीत? कदाचित गणपतीच्या कटकटींनी गांजलेल्या माझ्या मनाच्या या वाह्यात वावड्या असतील. पण कधी हे गणपती विसर्जित होतात आणि माझ्या शहराचं चलनवलन नॉर्मलपदी परततं, असं मला होत आहे.

Wednesday, July 17, 2013

पूर्व किनार्‍यावरचा ओदिशा



ओदिशा. मराठीत अजून ओरिसा. ही ब्रिटिशांची देणगी. मीरत, पूना, बॉम्बेप्रमाणे. पण ओरिसाचं ओदिशा करायला या लोकांनी खूप वेळ लावला. इथल्या बहुतेक गाड्यांचे नंबर OR ने सुरू होतात. OD ने सुरू होणार्‍या गाड्या कमी दिसतात.

इथे एकूण गाड्याच कमी दिसतात. दोनचाक्या जास्त. कोणार्कहून चिलिका लेकला जाताना जी काही वाहनं दिसली – आडवी आली; त्यात दोनचाक्यांची संख्या सर्वात जास्त. मग तीन चाकी (ज्यांना इथेही ऑटोरिक्षा म्हणतात, उत्तरेप्रमाणे नुसतं आटो, आटो म्हणत नाहीत; जरी इथे फुटकळ सायकलरिक्षा दिसत असल्या तरी) आणि मग चार चाकी. त्या चार चाकी वाहनांच्यात बहुतेक सगळ्या पिवळ्या नंबर प्लेटच्या प्रायव्हेट टॅक्स्या. खाजगी तुरळक. निष्कर्ष: ओदिशात गाडीधारी सुखवस्तूंची संख्या कमी आहे. इथे गरिबी आहे.

या निष्कर्षाला एका बाजूने गावागावात दिसणारे खांद्यावर पंचा वा उपरणं टाकून उघडे फिरणारे पुरुष जरी दुजोरा देत असले, तरी संपूर्ण ओदिशा मुक्कामात मोजून एकही बैलगाडी दिसलेली नाही, त्याचं काय?

असो, असो. हे मी उड्या मारत चाललो. सुरुवातीपासून सुरू करू.

हा आपला अगाध, अफाट भारत देश, इथे जन्म घेणे ही साजरी करण्यासारखी गोष्ट. कारण हिमाच्छादित शिखरं, हत्ती लपेल इतकं उंच गवत, वाळवंट, समुद्रातून उगवणारा आणि समुद्रात मावळणारा सूर्य, चहा-कॉफीचे मळे, पर्जन्यवृक्षांची सदाहरित जंगलं, पलिकडला तीर क्षितिजापार असणार्‍या नद्या यातलं काहीही याचि देही याचि डोळां बघण्यासाठी भारतीय नागरिकाला व्हिसा लागत नाही! हे असं मनात निनादत असताना आपण अजून समुद्रातून उगवणारा सूर्य बघितलेला नाही, हे डाचत होतं. एकदा चेन्नईला गेलो पण मरीना बीचवर पोचेपर्यंत अंधार पडला आणि रात्रीची गाडी पकडायची होती. ओदिशाला जाताना हे मनात जास्त होतं. जरी जगन्नाथाची यात्रा हे निमित्त करून गेलो तरी. मी जगन्नाथाची यात्रा बघायला पुरीला जाणार आहे, हे कळल्यावर बहुतेकांनी मला नाउमेद करायलाच सुरुवात केली.

“फार गर्दी असते.”

हो ना. दहा लाख लोक जमतात आणि रथ ओढतात, हेच तर बघण्यासारखं आहे!

“उन्हाळा असतो, उकाडतं, घाम येतो.”

याचं मुंबईकराला काय?

“लांब आहे. ओरिसा मागास आहे, तिथे सोयी नसतील.”

हे काय भलतंच? गडचिरोलीसुद्धा ’मागास’ आहे. दोन वर्षं सुखात घालवली मी तिथे.

तर निघालो. सोबत एक भाऊ. जाताना अर्थातच ट्रेनने. कारण देश बघत बघत जायचं. जमीन बदलते, भाषा बदलते, लोकांचे पेहेराव, 
घरांची रचना, डोंगरांचे आकार बदलतात. मस्त वाटतं. किती गोष्टी आपण गृहीत धरून चालत असतो, हे कळत जातं. जग किती मोठं आहे, आपल्यापुरता विचार किती छोटा आहे, हे उमजत जातं.

हे जर प्रवासवर्णन असेल, तर वर्ण्य घटनांची सुरुवात मुंबई सोडण्याअगोदर, लोटिटला झाली. रात्री सव्वाबाराची गाडी. इकडच्या तिकडच्या तारखेचा घोळ न करता सर्व सामानासहित, पावसात न भिजता आम्ही सव्वा अकराच्या सुमारास कुर्ला टर्मिनस ऊर्फ लोटिटला हजर झालो. इ-तिकीट काढल्यावर रेल्वे एसएमएस पाठवते. तिकीट वेटिंग किंवा आरेसी असेल, तर चार्ट बनल्यावर एसेमेसने बोगी नं, सीट नं कळवते; पण गाडी वेळेवर सुटणार की नाही, हे कळवत नाही. आमची गाडी ’लेट’ नव्हती; ’रिशेड्यूल’ झाली होती. सव्वाबाराच्या ऐवजी पहाटे चारला सुटणार होती. म्हणजे, झोपेचं पार खोबरं व्हायचं होतं. यात मनाची समजूत घालणारा एक मुद्दा होता: समजा, कळलं असतं की गाडी चार तास उशीराने सुटणार आहे. तर काय तीन बीन वाजता निघणार होतो की काय? आणखी फार तर तासभर उशीर केला असता.

पण ही गाडी मस्त आहे. सुटल्यावर पहिला हॉल्ट मनमाड! नाशिकसुद्धा नाही. मग भुसावळ, मग बहुधा बडनेरा आणि चौथं स्टेशन नागपूर. इथपर्यंत मी अनेकदा आलेलो आहे. पुढे माझ्यासाठी ’अबुझ माड’ – अज्ञात प्रदेश! तर जाणिवेचं क्षेत्र विस्तारणारी पहिली थप्पड इथेच बसली. अहमदाबाद, बडोद्यापासून बहुतेक सर्व मोठ्या स्टेशनांच्या अगोदर एक ’पायरी’वजा स्टेशन येतं, हे लक्षात आलेलं होतं. त्यामुळे नागपूरअगोदर अजनी येतं, हे पटलं होतं. पण नागपूरनंतर इतवारी येतं हे माहीत नव्हतं! मग सुचलं, नागपूर’नंतर’ हा काय प्रकार? नागपूरकडे प्रवास मुंबईहून, नागपूरच्या पश्चिमेकडून सुरू व्हावा, असा निसर्गनियम आहे की काय? कोलकात्याहून निघाल्यास नागपूरच्या अगोदरचं छोटं स्टेशन इतवारी ठरलं असतं, नाही का! कसे मुंबईकेंद्रित विचार करत होतो आपण! अमेरिकनांना अमेरिकेबाहेरचं जग माहीत नसतं, याला का नावं ठेवायची मग?

लवकरच महाराष्ट्र सोडून आम्ही छत्तीसगडात प्रवेश केला.  रायपूर आलं. एसीतून बाहेर येऊन प्लॅटफॉर्मवर उतरलो. तर एक वास आला. वास अमुक किंवा तमुक वस्तूचा, पदार्थाचा नव्हता. वास हवेचा होता. आसमंतात भरून राहिलेला होता. गाईच्या शेणामुतासारखा होता. पण  ओंगळ नव्हता. मी मुंबईत खूप फिरलो आहे. कुर्ल्याहून चालत जोगेश्वरीला गेलो आहे. मला ओंगळ  वासाचं काय? कानपुरात रस्ता चुकून एका अशा ठिकाणी गेलो, की मी मधून चालत होतो आणि दोन्ही बाजूला नुकतीच सोललेली, अजून रक्‍ताचे लाल ओघळ न सुकलेली कातडी टांगलेली होती. कानपूरची गंगा तर अत्यंत घाण होती. तिथे  माझ्या मनात विचार आला होता, कानपूरपेक्षा वाईट वासाचं, गलिच्छ ठिकाण कुठलं असेल? आणि उत्तरही लगेच सापडलं: मुंबई. तीसेक वर्षांपूर्वी मी फतेगडहून मुंबईला घरी येताना माझी गाडी पहाटे पाच साडेपाचला दादरला पोचत असे. तेव्हा सकाळच्या मुंबईची ओळख रेल्वेलाइनशेजारी प्रातर्विधीला बसलेले लोक, अशी होती. माझ्या परिचयाचा एक जण या एका कारणासाठी गोव्याहून मुंबईला अजूनही बसने येतो. सकाळी मुंबईत शिरताना नाकात शिरणारा तो भयानक वास नको म्हणून. रायपूरच्या वासाला नाक मुरडणारा मी कोण?

एक कळलं नाही; IRCTC वर तिकिटं मिळाली, ती एक आरेसी आणि एक वेटिंग, अशी होती. आमच्या सहा बर्थच्या भागात रायपूर गेलं तरी आम्ही दोघेच! अपरात्री केव्हा तरी बाकीच्या चार बर्थवर चौघे येऊन झोपले. सकाळी मला जाग आली, तर बाकी सगळे डाराडूर. मग मी मस्तपैकी दाढीबिढी केली आणि सहा वाजता चहा प्यायला. बरोबर थोडं काम नेलं होतं, ते टायपिंग करत बसलो. लेट सुटलेली गाडी वेळेवर चाललेल्या स्थानिक गाड्यांना रस्ता देत रेंगाळत चालली होती. चार तासांपैकी दीडेक तास मेकअप केला होता, तो गमावून आणखी थोडी लेट झाली. भुवनेश्वर येईपर्यंत माझं काम संपलं आणि ते लगेच मेलही करून टाकलं. माझे वडील हातात ट्रान्झिस्टर धरून उलटा सुलटा करताना मला आठवतात. अचंबा व्यक्‍त करत मला म्हणाले, कुठे काही जोडलेलं नाही आणि लांब कुठे वाजत असलेली गाणी ऐकवतो, बातम्या देतो! त्यांना ट्रान्झिस्टरचं नवल, मला डेटा कार्डचं. मला तेव्हा ट्रान्झिस्टर सामान्य वाटत होता, आजची तरुण पिढी मलाही हसत असेल.


रेल्वे प्रवास संपला.

Sunday, June 2, 2013

एकुलती एक


’एकुलती एक’ हा चित्रपट पाहिला.

तो आवडला की नाही, हे इथे सांगायचं नाही, की त्याचं परीक्षण करायचं नाही. ’एकुलती एक’ मधल्या काही गोष्टी खास वाटल्या, त्या सांगायच्या आहेत.

हा चित्रपट सचिन पिळगावकरने निर्माण केला आहे. चित्रपट एक बाप आणि त्याची मुलगी, यांच्या भोवती फिरतो. बापाची भूमिका सचिनने, तर मुलीची भूमिका सचिनची मुलगी श्रीया हिने केली आहे. श्रीयाचा हा पहिलाच चित्रपट म्हटल्यावर बापाने मुलीला लाँच करण्यासाठी चित्रपट काढला, असं म्हणणं वावगं ठरू नये. यात काही विशेष नसून हा चित्रपटसृष्टीचा नियमच आहे.

या चित्रपटाचा वेगळेपणा असा, की ही मुलगी ’मी सुंदर नाही,’ असं म्हणते! गंमतीत नाही, तर गंभीरपणे, मनापासून म्हणते! असं कधी झालेलंच नाही. प्रत्येक पुत्र वा पुत्री सर्वगुणसंपन्न, अत्यंत सुंदर, सर्वात लोकप्रिय असाच असतो वा अशीच असते. चित्रपटातली सर्व पात्रं त्याच्या वा तिच्या नुसत्या दर्शनाने घायाळ होत असतात. किंवा भारावून जात असतात. किंवा मंत्रमुग्ध होत असतात. आणि ही मुलगी म्हणते, मी सुंदर नाही! हे कसं काय?

गंमत अशी, की ती सुंदर असणे – नसणे हा चित्रपटाचा मुद्दाच नाही. त्यामुळे ती सुंदर नसून काहीच बिघडत नाही. कथानकाला कसलं वळण मिळत नाही की कोणाच्या वर्तनात ती सुंदर नसण्याने फरक पडत नाही.

पण म्हणूनच या विधानामुळे ती मुलगी - आणि हा चित्रपट - मॅचुअर वाटतात ना! जो परिणाम साधण्यासाठी त्याला वा तिला कुठून कुठून ग्लॅमर चिकटवण्याचा, बहुतेकदा आचरट म्हणावा असा प्रयत्न होत असतो, तसल्या प्रकारचा परिणाम असा सहज घडून येतो. माझ्यासारखा प्रेक्षक आपोआप तिच्या - आणि चित्रपटाच्या - बाजूचा होऊन जातो! (जब we मेट’ मध्ये करीना चित्रपटात शिरते, तीच ’इतनीभी सुंदर नही हूँ मैं’ असं म्हणत. तिथेच चित्रपटाने माझा गळा पकडला!)

आणि ही मुलगी, जिच्या बापाने तिला लाँच करण्यासाठी तिच्याभोवती फिरणारा चित्रपट बनवला, ती इतकी सहज वावरते, साधी वाटते; की ’ही नाचतेय, अभिनय करून दाखवतेय, तर्‍हेतर्‍हेचे कपडे घालून मिरवतेय,’ असं मनात येतच नाही. श्रीयाचा वावर पूर्ण सराईत आहे. आणि अजिबात आगाऊ नाही. (आता हा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी तिचा पुढचा चित्रपट बघणं भाग आहे.)

पुढे. चित्रपटाला सांगण्यासारखं काही कथानकच नाही. मुख्य पात्रांची ओळख करून दिल्यानंतर त्यांच्यात काही गैरसमज, संकट, संघर्ष, स्पर्धा, असलं काहीही होत नाही. चित्रपटाला व्हिलन नाही की व्हँप नाही. आणि तरीही तो रटाळ होत नाही! पात्रांच्यातल्या तणावाने सीन उचलून धरला आहे, असं मोजून एकदा होतं. इतर वेळी तसं नसूनदेखील बोअर होत नाही.

संवादांची भाषा एकदम आजची आहे. आणि सहज आहे. चांगल्या म्हणवलेल्या मराठी चित्रपटांचं एडिटिंग मार खातं. त्यामुळे चित्रपटाच्या प्रवाहात गचके बसत रहातात. तसं इथे होत नाही. एडिटिंग नावाचा प्रकार असतो, हे जाणवूही नये, इतकं ते शांत आणि सफाईदार आहे.

आवर्जून सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट. अशोक सराफचं काम उत्तम आहे, यात काय सांगायचं? सांगायचंय ते सुप्रियाबद्दल. तिला फार थोडं फूटेज आहे. चित्रपटात तिची एंट्रीसुद्धा उशीरा आहे. पण तिने असं काही बेअरिंग पकडलंय, की तिचं पात्र चित्रपटातलं महत्त्वाचं पात्र आहे, असं प्रेक्षकाच्या मनावर ठसतं. इतक्या थोडक्या स्पेसमध्ये असा परिणाम साधणे, हे अभिनयकौशल्य थोरच होय.

पुरे. आणखी लिहीत गेलो, तर परीक्षण होईल. तेवढा काही हा चित्रपट लक्षणीय नाही.


Thursday, May 23, 2013

IPL: चोरोंका राजा रुपैया!



क्रिकेटच्या इतिहासात डब्लू जी ग्रेस, व्हिक्टर ट्रंपर, रणजी, ब्रॅडमन, असे जे कोणी महानातले महान खेळाडू होऊन गेले, त्यात सर्वात जुना ग्रेस. या सगळ्यांच्या आहेत, तशा ग्रेसच्याही आख्यायिका आहेत. त्यातल्या एकीत असं घडतं की तो बॅटिंग करायला येतो आणि पहिल्या बॉलवर त्याची बेल उडते. तर हा पठ्ठ्या तात्काळ बेल जागेवर ठेवून पुन्हा बॅटिंग करायला उभा! अंपायर अर्थातच आक्षेप घेतो. तेव्हा ग्रेस उत्तरतो, ’लोक माझी बॅटिंग बघायला आलेत; तुझं अंपायरिंग बघायला नाही.’

ग्रेसचं तेव्हा खरं होतं आणि आज T20 च्या जमान्यात तर जास्तीच खरं आहे. लोक T20 च्या सामन्याला जातात, ते दोन संघांमधला क्रिकेटिंग संघर्ष बघायला नाही. ते जातात  फटक्यांची आतषबाजी पहायला. धावत जाऊन सीमारेषेवर पकडलेल्या कॅचचा किंवा तसलाच दुसरा कसला थरार अनुभवायला. जसं की एक ओव्हर उरलीय आणि ६ – १० – २० रन्स पाहिजेत आणि १ – २ – ४ विकेट उरल्यात आणि रन्स होतात किंवा होत नाहीत किंवा एका ओव्हरमध्ये चार चार विकेटच पडतात किंवा नको तेव्हा नो बॉल पडतो आणि होत्याचं नव्हतं होतं किंवा ... एकूण काहीतरी सनसनाटी, थरारक, उन्मादक, बेहोष करणारं घडतं. पैसा वसूल!

थेट पूर्वीच्या फ्रीस्टाइल कुस्त्यांसारखं. किंवा सिनेमातल्या शेवटच्या फाइटसारखं. निकाल काय लागणार हे माहीत असूनदेखील प्रेक्षकाचं चित्त धरून ठेवून त्याला सुखसंवेदनेत धुंद, बेहोष करणे, हेच त्यातलं दिग्दर्शकीय कौशल्य असतं. ही सुखसंवेदना बालिश असते, या आरोपात तथ्य नाही. ती सगळ्यांची गरज असते. प्रमाण कमी-जास्त असेल, पण गरज सर्वांचीच असते.

आणि जो कुणी समाजाची असली गरज पूर्ण करतो, त्याला समाज पुरेपूर मोबदला देतो; हा सामाजिक व्यवहारांचा मूलभूत नियम आहे. मोजपट्टी लोकप्रियतेची असो की पैशाची; निकष हाच. भूक लागल्यावर खायला मिळण्यात बेहोष करणारं सुख, रोमांचक थरार नाही. मादक पदार्थात आहे. जुगारात आहे. म्हणून तिथे जास्त पैसा आहे. IPLमधून असल्याच कसल्यातरी गरजेची वा मागणीची पूर्तता होत असते. म्हणून IPL सामन्यांना प्रचंड गर्दी होते. ईडन गार्डनसारखा नव्वद हजार माणसं बसवण्याची क्षमता असलेला स्टेडियम भरून जातो (आणि टीम जिंको वा न जिंको, शाहरुख खान प्लसमध्येच जातो). रस्त्यावरच्या दुकानातल्या टेलिव्हिजनसमोर जमाव जमतो. तीन तासात केवढं नाट्य! तो गेल दे दनादन बॉल लांब लांब भिरकावत असतो. फिल्डिंग करणारे जीव तोडून धावत असतात. त्यांनी फेकलेल्या बॉलवर रन आउट होऊ नये म्हणून फलंदाज (बायका क्रिकेट खेळायला लागल्या आणि ’बॅट्समन’चे जेंडर न्यूट्रल ’बॅटर’ झाले.) सूर मारून क्रीज गाठायचा प्रयत्न करतात. काय ती नो बॉलनंतरची फ्री हिट! काय तो अधून मधून होणारा टाइम आउट! काय ते गौरव कपूर, कपिल देव, सिद्धूचं झंपक झंपक झपॅक! पैसा वसूल!

सिनेमातली फाइट कधी चालत्या ट्रेनच्या टपावर, कधी कड्यावर असते. कधी भन्नाट वेगाने चाललेल्या मोटारींमधून लोक एकमेकांवर गोळीबार करतात. बाँब फेकतात. अशा स्टंट्सच्या वेळी डबल वापरतात. ज्यांचे मुखडे आणि मसल्स प्रेक्षकांना प्यारे असतात, ते नाही भाग घेत अशा दृष्यांच्या चित्रिकरणात. वेगळेच कुणी तरी आपला जीव धोक्यात घालत असतात.

आणि हे सर्वांना माहीत असतं.

आणि तरीही कुणाच्या आस्वादाचा बेरंग होत नाही. हे खरं नाही, हे नाटक आहे; ही जाणीव रसभंग करत नाही. कारण नाटकच तर बघायचं असतं! अगदी थेट फ्रीस्टाइल कुस्त्यांसारखं.

मग हे फिक्सिंग फिक्सिंग काय चाललं आहे? त्या श्रीशांतने, विंदूने कोणाचं काय घोडं मारलंय? IPL हे क्रिकेट आहे, ते नाटक नाही, असं कोण खुळा समजत आलाय?

क्रिकेट आणि T20 यांच्यात साम्य आहे, हे खरं. क्रिकेटलाच वळवून वाकवून T20 ची निर्मिती करण्यात आली आहे. ५० षटकांच्या एक दिवसीय क्रिकेटमुळे या नवनिर्मितीला प्रेरणा मिळाली. चिवटपणा, स्टॅमिना, हवामानाचा परिणाम आणि विकेटची होणारी वा न होणारी खराबी हे घटक एक दिवसाच्या सामन्यात बाद झाले; पण जीवनाच्या वाढत्या वेगात  पाच पाच दिवस चालणारा सामना तसा कालबाह्यच होत चालला होता / आहे. पण म्हणून वीस षटकांमध्ये दहा विकेट्स, हे गणित न पटण्यासारखं आहे. नवा बॉल आहे म्हणून फास्ट बोलर, जुन्या बॉलसाठी स्पिनर, असल्या गोष्टी तर नष्टच झाल्या. चेंडूला फ्लाइट देऊन फलंदाजाला मोहात पाडणे आणि त्याला थोड्या धावा खिलवून त्याचा बकरा करणे, हे परवडेनासं झालं. (इरापल्ली प्रसन्ना कधी T20ची कॉमेंटरी करेल काय!)  फॉरवर्ड शॉर्टलेग ही फील्डिंग पोझिशन T20ला माहीत नाही.

पण असा वाद तरी कशाला घालायचा? षटकार हा काय क्रिकेटिंग स्ट्रोक आहे? हनुमान नाहीतर भीम, असल्या लोकांचा तो फटका. एका मजबूत दांडूने एक मोठासा बॉल ताकद एकवटून उंच आणि दूर भिरकावण्याच्या अमेरिकन बेसबॉलमध्ये शोभणारा. बोलरला विचलित करण्यासाठी किंवा निकराच्या प्रसंगी शिस्त धाब्यावर बसवून धोका पत्करण्यासाठी उचलला चेंडू, तर समझे. पण इथे तर पाउसच षटकारांचा. त्यांची गणती. जणू शक्तीचे प्रयोग चालल्यासारखं सर्वात लांब गेलेल्या फटक्याला बक्षीस. क्रिकेटच्या आस्वादकाला दिवसाकाठी डझनावारी षटकार बघणं ओंगळ वाटेल.

त्या चीअरलीडर बाया. T20 सुरू झालं, तेव्हा रोज रात्री पार्टी असायची. चीअरलीडर बायांना तिथे हजर असण्याची अटच होती. त्यांचं दुसरं काम काय? एका बाईने आरोप केला, जो बोलावेल त्याच्याबरोबर आम्ही झोपावं, अशी अपेक्षा असते; तर तिला तात्काळ हाकलून दिली. तिच्या आरोपाची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता! (कुणी बाईनाहीम्हणते, म्हणून काही खेळाडू संतापून तमाशा करत, असंही ऐकिवात आहे!) पार्टीला बडे बडे लोक असत. प्रत्येक खेळाडूला पार्टीला येण्याची सक्त सूचना असे. (मोजून दोन खेळाडूंनी ती सूचना पाळली नाही, म्हणतात: सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड.) मंदिरा बेदी आठवते? तेव्हापासून एक तरी टंच बाई असतेच बोलायला. किंवा टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी बघायला.

एवढंसुद्धा नको. T20च्या जाहिराती आठवा. ’हे क्रिकेट आहे,’ असं त्यांत लांबून तरी सुचवलेलं असतं का? गेल्या वर्षी ऑफिशियली सर्कशीतले, जत्रेतले खेळ दाखवण्यात आले. यावर्षी झंपक झंपक! भरघोस पैशांच्या मोबदल्यात शरीर हलवणारे कपिल देव, सिद्धू यांसारखे नाच्ये. द्रविड आणि पाँटिंग अजून बाटली उघडल्याच्या आवाज तोंडातून काढण्यापर्यंत आलेत; पुढच्या वर्षी सुनील गावस्करसकट त्यांचीही ढुंगणं हलायला लागतील, काही सांगता येत नाही

मर्यादित षटकांच्या सामन्यांमधून निवृत्त झालेला सचिन IPL का खेळतो?  तो काय पुढच्या T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे की काय? बहुधा नाही. मग IPL ला काय सोनं लागलंय? पैशाचं? की गर्दीचं? की नीता अंबानीच्या आदेशाला नाही म्हणता येत नाही?

हा काहीतरी धर्मबुडवेपणा चाललेला आहे, याला आवरा; असं इथे सुचवायचं नाही. मुद्दा इतकाच आहे, की “हे क्रिकेट नव्हे, हा तमाशा आहे, याकडे गंमत जंमत म्हणूनच बघा, ही एक गंभीरपणे मनावर घेण्यातली स्पर्धा आहे, असा विचार चुकूनही मनात आणू नका,” असं तुम्हाआम्हाला पटवण्याचा इतका आटापिटा चाललेला असताना खरं म्हणजे, IPL हा कुणाच्या तरी सुपीक मेंदूतून निघालेला पैसे कमावण्याचा मस्त धंदा आहे, यात शंका असू नये. खेळणारे खूष, बघणारे खूष, संघमालक खूष, माजी खेळाडू खूष, प्रायोजक खूष, चॅनेलवाले खूष! कोणाला हरायचंच नाही, सगळेच प्लस!

राहिला मुद्दा बेटिंगचा. तुम्हाला मटका माहीत आहे? रतन खत्री मटका चालवत असे. रात्री साडेआठ आणि साडे अकरा वाजता मटक्याचा आकडा जाहीर होत असे. त्यातले तपशील राहू देत; पण तेव्हाही खेळणारे म्हणत की कुठल्या आकड्यावर किती पैसे लागलेत, हे बघून आकडा ठरवला जातो; जेणेकरून वळण (म्हणजे बेटिंग) घेणारे घाट्यात जाणार नाहीत. तरीही ज्यांना हे पूर्ण मान्य होतं तेसुद्धा मटका खेळतच. स्टेशनजवळच्या पत्त्यांच्या क्लबपासून व्हेगसपर्यंत शेवटी क्लबवालाच प्लस होतो, हे महावचन कुठल्या जुगार्‍याला माहीत नाही? म्हणून कोणी खेळायचं थांबलंय का?

अर्थ असा की बेटिंग हा केवळ तांत्रिक गुन्हा आहे. पेपरातच छापून आलं आहे की बेटिंगच्या साइट्सवर स्पष्ट नोटीस असते, की अमुक अमुक देशांमध्ये बेटिंगला कायद्याची मान्यता आहे; तिथल्याच नागरिकांनी बेटिंग करावं! उद्या त्यातल्या एखाद्या देशाने बेटिंगवर बंदी घातली, तर तिथे सर्रास चालू असलेली गोष्ट लगेच गुन्हा ठरेल. आणि समजा भारतात बेटिंगला मान्यता देणारा कायदा ’पूर्वलक्षी प्रभावाने’ (असं झालंय) पारित झाला; तर श्रीशांत आणि कंपनीला सोडून द्यावं लागेल. बेटिंग करणे आणि घेणे म्हणजे खून आणि बलात्कार नव्हेत की त्याला ऑनर किलिंग म्हणा की विवाहाने दिलेला अधिकार म्हणा, तो गुन्हाच ठरावा.

स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंग. माझा अजिबातच विश्वास नाही की या प्रकाराची टीम ओनर्सना, बीसीसीआयच्या दिग्गजांना काही कल्पना नव्हती. सहा चेंडूंमध्ये चौदा धावा देण्याची किंमत जिथे साठ लाख असू शकते, तिथली एकूण उलाढाल काय असेल! येवढा पैसा इथून तिथे फिरतोय आणि धुरंधर राजकारण करणार्‍यांना माहीत नाही?

एकूण, IPL च्या मॅचेसमध्ये आणि बेटिंगमध्ये कोणी कोणाला फसवत नाही की लुबाडत नाही. एका पेपरने छापलं, “एक अब्ज लोकांची फसवणूक!” IPL चं मार्केटिंग इतकं जबरी आहे, की देशभर त्याची हवा पसरते; तरी एकदम अब्जाची भाषा करणे म्हणजे बेडकाला बैल होण्याचं स्वप्न पडण्यासारखंच आहे. असो. जिथे सगळा चोरांचा, जुगार्‍यांचा, दोन नंबरच्या पैशाचा बाजार आहे; तिथे या खिशातले पैसे त्या खिशात गेले तर गहजब कशासाठी? उलट, बेटिंगला, सामन्यांना, तिथल्या नाच्यांना, आणि पर्यायाने खेळणार्‍यांना अजिबात महत्त्व न देणे, यातच शहाणपणा आहे, कर्तव्यपालन आहे. कशाला त्या XXXXXना प्रतिष्ठा द्यायची?

बाय द वे, पेपरात आणि न्यूज चॅनेल्सवर श्रीशांत आणि कंपनीची नावं गाजू लागण्याअगोदर कोणाची नावं, का गाजत होती; आठवतंय?

Saturday, April 27, 2013

शमशाद: ’हिला पटवून धन्य व्हावं!’


मला कान तसा उशीरा आला आणि जसा आला, तसा मी लताच्या आवाजात पूर्ण बुडालो. तेव्हा नाकातोंडात गेलेलं पाणी अजून नीटसं निघालेलं नाही. परिणामी मला कायम वाटत आलं आहे की वेडा होऊन गाणी ऐकण्याच्या काळात मी आशा, गीता, शमशाद यांना समरसून एन्जॉय करू शकलो नाही. थोडा अपवाद नूरजहानचा. शमशादला तर नायिकेचा आवाज म्हणून स्वीकारणं जडच गेलं. त्यात शमशाद सुरुवातीला ऐकली, ती नौशादची. ’बैजू बावरा’ आणि ’दीदार’. दूर कोई गाये आणि बचपनके दिन भुला न देना. दोन्ही लता-शमशाद ड्युएट्स. काय काय सुचायचं. ’बचपनके दिन भुला न देना’ हे गाणं बालवयातले नर्गिस आणि दिलीप कुमार गातात. घोड्यावर बसलेले तबस्सुम आणि परिक्षित सहानी. मोठी झाल्यावर नर्गिसचा आवाज फुटतो आणि लताऐवजी ती शमशादच्या आवाजात गाऊ लागते. दिलीप कुमारचाही आवाज फुटतो आणि शमशादचं रूपांतर रफीमध्ये होतं!

या संस्काराला ’किस्मत’मधल्या कजरा मुहबतवालाने हातभार लावला. या गाण्यात बबिता पुरुषाच्या वेषात आणि विश्वजित बाईच्या वेषात आहे. बबिताच्या तोंडचे शब्द जरी पुरूषाचे असले तरी तिला आवाज दिला आहे आशाने. आणि बाईच्या भावना व्यक्‍त करणारा विश्वजित गातो शमशादच्या आवाजात. संगीतकार जणू सांगतो आहे, आशाचा आवाज बघा कसा स्त्रीला शोभेसा नाजुक, लाडिक आहे; तर शमशादचा आवाज मर्दानी आहे. स्त्रीवेषातल्या पुरुषाला शोभेलसा आहे.

ओ पी नय्यरला खरंच असं वाटत होतं का? मुळीच नाही. ’किस्मत’ १९६८ चा. त्याच्या दहा वर्षं अगोदर आलेल्या ’नया दौर’मध्ये सुद्धा शमशाद-आशा यांचं द्वंद्वगीत आहे, रेशमी सलवार कुरता जालीका. या गाण्यातले शब्दही बाईचे आणि बुवाचे आहेत. मात्र चित्रपटात नाचणार्‍या दोन्ही बायाच आहेत. आणि पुरुषाच्या वेषात नाचणारी बाई आशाच्या आवाजात, तर बाईच्या वेषात नाचणारी बाई शमशादच्या आवाजात गातात. दोन्हींपैकी एकही नायिका नसताना. म्हणजे, दहा वर्षात ओ पी लतामुळे निर्माण झालेल्या धारेला लागला! कारण बाईचा आवाज किनरा हवा, हा संस्कार निःसंशय लताचाच.

म्हणून तर शमशादला नायिकेचा आवाज म्हणून स्वीकारायला जड गेलं. आणि ओ पी नय्यरने जणू या विचाराला फूस लावली. कभी आर कभी पार हे ’आरपार’मधलं टायटल साँग असेल शमशादने गायलेलं; पण ते नायिका श्यामाच्या तोंडी नाही. कहींपे निगाहें कहींपे निशाना हे नाही. ’सीआयडी’तलं बूझ मेरा क्या नाम रे नाही. लेके पहला पहला प्यारमधला शमशादचा आवाज नायिका शकीलाला नाही. शकीला तोंड उघडते, तेव्हा आशाचा आवाज ऐकू येतो.

असं करता करता जेव्हा ’जुन्या’ गाण्यांच्या विश्वात आत आत गेलो आणि मागचे संदर्भ सुटले, तसे कान मोकळे झाले आणि अमीरबाई, जोहराबाईपासून एकेका आवाजाची आपापली वेगळी लज्जत घेताना मजा येऊ लागली. मग खुर्शीदचं घटा घनघोर अत्यंत आवडतं झालं. इतकं की पावसाळ्याच्या सुरुवातीला सिलोनवर ते ऐकायला उतावळा होऊ लागलो. कभी न बिगडे किसीकी मोटर रस्तेमें मधली धापा टाकणारी सुरैया गुदगुल्या करू लागली. दूर कोई गाये हे गाणं लताचं नसून शमशादचं आहे, असं मनात आलं. मनके अंदर हो प्यारकी अग्नी या तिच्या कडव्यात शमशाद जी उफाड्याने गाते, अभीसे है ये हालच्या आगेमागे जे वळसे घेते, ते कानात साठू लागले. त्या पार्श्वभूमीवर त्यातलं लताचं मेरे अंगना लाजका पहरा मिळमिळीत भासलं. ’अंदाज’मध्ये लता नौशादसाठी प्रथम गायली. तेव्हाच्या रीतीप्रमाणे लतानेही ’अंदाज’मध्ये जाड आवाज काढला आहे. तेव्हा त्यातल्या डरना मोहबत करलेमध्ये शमशादच्या सफाईसमोर लताची सुप्‍त ताकद तेवढी जाणवून घ्यावी. लता झाली तरी ती विष्णूचा अवतार नव्हे की जन्मापासूनच तिला स्वसामर्थ्याची पूर्ण जाणीव असावी. ’अंदाज’च काय, नौशादच्याच पुढच्या ’बाबुल’मध्ये सुद्धा तिचा नवोदितपणा गेलेला नाही. पंछी बनमेंमध्ये मंदबुद्धी हातवारे करणार्‍या नर्गिसला तिचा सखी हाथोंसे हॉय म्हणणारा आवाज एकदम जुळतो. आणि किसीके दिलमें रहना था म्हणताना पातळ, किनर्‍या आवाजाला वजन येतं. या गाण्यात बसायी थी कोई मेहेफिल मधला लताचा ’ह’ खणखणीत आहे, शमशादचा गुळगुळीत आहे!

’बाबुल’ची नायिका नर्गिस की मुनव्वर सुलताना? नौशादचं काही कळत नाही. ’बाबुल’मध्ये नर्गिस लताच्या आणि मुनव्वर सुलताना शमशादच्या आवाजात गातात; तर ’दीदार’मध्ये नर्गिसला शमशादचा आणि निम्मीला लताचा आवाज आहे. ’दीदार’ची नायिका काय निम्मी? कदाचित नर्गिसचा आवाज लहानपणी लताचा होता आणि नंतर फुटला, असं ठरल्यावर नौशादचा इलाज राहिला नसेल. पण त्याचमुळे शमशादच्या उंच चढलेल्या खणखणीत आवाजात चमनमें रहके वीराना ऐकताना समोर नर्गिस दिसते. शमशाद आणि नायिका एकत्र पहाण्याचा सर्वात स्ट्राँग संस्कार या गाण्याने केला.

ओपी नय्यरचं जे झालं, ते इतर संगीतकारांचं खूप अगोदर झालं. उदाहरणार्थ नौशाद. ’बाबुल’, ’दीदार’ अशा चित्रपटांमध्ये दोन नायिकांना दोन आवाज देताना नौशादने लता आणि शमशाद यांच्यात कोणाला वर-खाली लेखलं नाही. पण ’जादू’मध्ये? एकाच नलिनी जयवंतला दोन आवाज. लो प्यारकी हो गयी जीत गाताना लता आणि जब नैन मिले नैनोंसेरूपकी दुष्मन पापी दुनिया गाताना शमशाद. आणि पुढे ’अमर’मध्ये मधुबाला आणि निम्मी, दोघींनाही लताचाच आवाज. कसा प्रवास आहे! ’जादू’ हा नलिनी जयवंतचा उत्सव आहे. आणि ’जादू’तली गाणी उडती, पश्चिमी ढंगाची आहेत. लो प्यारकी हो गयी जीत गाणं चांगलं आहे; पण रूपकी दुष्मनची बेहोषी त्यात नाही. मारे अखियाँ हे शब्द एकदा खाली आणि एकदा वर, ही शमशादची खमंग गंमत ऐकूनच कळेल. इथल्या नलिनी जयवंतच्या मनमोकळ्या देहबोलीला शमशाद न्याय देते; लता नाही. लताच्या बाबतीत नौशादचा एकूणच प्रॉब्लेम असावा. चावट चालींची, उच्छृंखल गाणी काय त्याने दिली नाहीत? पण लताच्या आवाजातलं एक आठवत नाही. नौशादची लता कायम साफ, शुद्ध, सरळ. लो प्यारकी हो गयी जीतच्या पुढे त्याची मजल जात नाही. अनिल विश्वासला बरं जमलं नाचे रे गोरी जिंगू सारख्या गाण्यांमध्ये.

त्या, एकोणीसशे पन्नासच्या आगे मागे काळात शमशादचं अपील सणसणीत असावं. ’परदेस’मधलं मेरे घुंगरवाले बाल (गुलाम महम्मद) आणि ’आवारा’तलं एक दो तीन (शंकर जयकिशन), दोन्ही गाणी पडद्यावर कक्कू गाते. आवाज शमशादचा. तोच बेहोष, मनमुक्‍त भाव. या गाण्यांमधले, विशेषतः घुंगरवाले बालमधले, सूर कमी ऐकू येतात; त्यातली अनावर उच्छृंखलता कानातून थेट हृदयात शिरते. चाल गाता गाता पलिकडे कुठल्याकुठे फिरायला जाऊन, ज्याला जिप्सी म्हणावं असं भावदर्शन शमशाद लीलया घडवते. असं वाटतं, तिची आणि फॉर्मातल्या किशोरची जोडी बरी जमली असती. पण किशोर फॉर्मात आला तेव्हा कुणी या दोघांना एकत्र आणलं नाही. किशोर-शमशादचं बेस्ट ड्युएट अर्थात ’नया अंदाज’मधलं मेरे नींदोंमें तुम. पुन्हा हे गाणं किशोरपेक्षा शमशादचंच. किशोरला तेव्हा वजन आलं नव्हतं. आणि ’नया अंदाज’मध्ये शमशादच्या आवाजात मीनाकुमारी गाते हे चालून गेलं. याला एक कारण म्हणजे मेरे नींदोंमें तुम हे गाणं दिसतं त्यापेक्षा जास्त ऐकू येतं. किशोर दिसतो आणि ऐकूही येतो; पण गाण्याच्या मालकी हक्काचे शेअर्स मीनाकुमारीकडे किरकोळ आहेत, शमशादकडे जास्त.

आणि ओपीकडे सर्वात जास्त. शमशादची गोडी ओपीनेच लावली. नौशाद तसा चालवाला माणूस. ओपी किंवा अनिल विश्वासबरोबर जसं गाणार्‍याचं अंतरंग खुलून येतं, तसं नौशादबरोबर होत नाही. शमशादचा रगेलपणा ओपीच्या एकेका गाण्यात कसा उचंबळून येतो. बूझ मेरा क्या नाव रे गाताना त्या रे ला ती काय मस्त आत वळवते. हे शमशाद लीलया करते. करताना जराही योजून केल्यासारखं होत नाही. कजरा मोहबतवालामध्ये नाही का हाय रे मैं तेरी कुरबान मधला शेवटचा कसा तिच्या आवाजात फडफडून जिवंत होतो! लेके पहला पहला प्यार या गाण्यात रफी, शमशाद आणि आशा, तिघे आहेत. तुमनेभी देखा होगा उसको सितारों, आओ आओ मेरे संग
मिलके पुकारो, अशा विरहिणीच्या शब्दांना साजेसा आवाज आशा लावते; पण तेव्हाच्या लतामय वातावरणात आग लावून देणार्‍या ओ पी नय्यरच्या जादूचं रहस्य ज्या रसरशीत ताजेपणात होतं, तो विरहभावामध्ये नव्हता. तो होता, मुखडेपे डाले हुवे जुल्फोंकी बदली, चली बलखाती कहाँ रुक जाओ पगली अशा अवखळपणात. तो जसा रफीत जागा होत होता, तसाच शमशादमध्ये जिवंत होत होता. ओपी-शमशाद हे एक प्रकरणच आहे.

’बहार’.’जुनी’ वैजयंतीमाला शिंकली तरी ती नाचातली मुद्रा असते, इतकी ती नृत्यमय आहे.  नाचणे म्हणजे आनंद, नाच हेच जीवन, हे जणू तिचं जगण्याचं पहिलं तत्त्व असावं. आणि तिला ’बहार’मध्ये आवाज कोणाचा, तर आत्मनिर्भरतेचा प्रत्यय देणार्‍या शमशादचा. पण ’बहार’मधल्या वैजयंतीला स्वतःतल्या जादूचा साक्षात्कार झालेला नव्हता. त्यामुळे सैंया दिलमें आना रे, दुनियाका मजा लेलो, या गाण्यांमध्ये शमशादने तिचं काम चोख केलेलं असलं तरी पडद्यावर गाणी अपेक्षेइतकी रंगत नाहीत. म्हणजे, वैजयंती नाचते, छान दिसते, ठीक; पण या दोघींच्या रसायनाकडून अपेक्षाच जास्त निर्माण होतात, त्याचं काय? ’बहार’वाल्या एसडीचंच ’शबनम’मधलं गाणं ये दुनिया रूपकी चोर वैजयंतीला मिळायला हवं होतं. कामिनी कौशल नाही पटत. बंगाली, गुजराती, मराठी, अशा पॅन इंडियन भाषांमधल्या या गाण्यात वैजयंतीने काय धमाल केली असती.

एवढं झाल्यावर सांगावं लागतं की शमशादला चेहेरा कुणी दिला असेल, तर तो निगार सुलतानाने. ’नमूना’तल्या टमटमसे झाको ना रानीजी ची मजा सी रामचंद्रची आहे. पतंगामधल्या मेरे पिया गये रंगूनवरही त्याची छाप आहेच. (शमशादबरोबर आवाजच मुळी ’चितळकर’ आहे!) पण इथली निगार ’दिसते’. शमशादच्या भरदार आवाजापुढे झाकोळून जात नाही. आणि खटकतही नाही. निगार काही थोराड, पुरुषी नाही. नीट बाई आहे. पण तिच्यात विलक्षण तोरा आहे. जो नर्गिसमध्येसुद्धा सापडतो. थोडासा गीताबालीत दिसतो. सुचित्रा सेनमध्ये तो भरपूर आहे. प्रत्येकीचा वेगळा आहे, निगारचा तोरा ’शमशादी’ आहे! आणि शमशादच्या आवाजातली लखलखीत धार नजरेत उतरवणारी तेजस्वी निगार बघायची असेल, तर अर्थात ’मोगले आझम’. तेरी मेहेफिलमे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे हे गाणं कोणाकरता बघावं? कोणाकोणाकरता बघावं! दिलीपचा मुघल राजपुत्राचा रुबाब, स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वाला
प्रियकरावर ओवाळून टाकलेल्या प्रेमिकेचा अप्रतिम अभिनय करणारी मधुबाला आणि प्रेम, मैत्री, कशाहीपेक्षा अस्मिता जास्त प्रिय असल्याचं शब्दांविना जाणवून देणारी निगार. गाणं लीजण्ड होतं, ते असं. मोगले आझममध्ये ग्रेट गाणी आहेत; श्रवणीय आहेत, प्रेक्षणीय आहेत. पण मला तेरी मेहेफिलमें पुन्हा पुन्हा बघताना, ऐकताना जास्त आनंद मिळालेला आहे.

शमशादच्या आवाजाचं, गायकीचं हे वैशिष्ट्य म्हणावं का? आत्मविश्वासातून आलेला मोकळेपणा. शरीर फोडून बाहेर उसळणारा उत्साह. जिचं मन जिंकणं हे एक आव्हान आहे आणि जो पुरुष तिचं मन जिंकेल, त्याचा स्वतःवरचा विश्वास उदंड वाढेल; अशा स्त्रीत्त्वाचं प्रतीक. आपल्या संस्कृतीतल्या बाईत, मुलीत हे – किमान त्या काळात – कमीच असल्यामुळे या आवाजाला नंतरच्या, लता-आशाच्या काळात आक्रमकपणाचं लेबल चिकटलं. एक गोष्ट खरी, बडी मुशकिलसे दिलकी बेकरारीको करार आया, के जिस जालिमने तडपाया उसीपर मुझको प्यार आया (’नगमा’ – नाशाद) या शब्दांना शमशादच्या गळ्यातून बाहेर येताना वरकड आशय प्राप्‍त होतो. हे जे काही प्यार आया प्रकरण आहे, ते सहजासहजी घडलेलं नाही. आणि तो जो कोण जालिम आहे, त्याने हे सीरियसली घेतलं नाही, तर गंभीर प्रसंग ओढवेल, असं सुचत रहातं.

लता आडवी आल्यामुळे आज शमशादचा विचार ’एका आत्मनिर्भर स्त्रीचा बेगुमान उद्‌गार’ असा होत नाही. पण ते तसं जाणवत रहात असणारच. म्हणून त्याचं वर्तमान इंटरप्रिटेशन काही तरी भलतंच होतं. आणि दुसर्‍या कुठल्याही गायिकेपेक्षा शमशादने गायलेल्या गाण्यांची उत्तान रिमिक्स रूपं अवतरत रहातात. समाजाच्या कानांवरचा लताचा फिल्टर विरत जाईल, तशी शमशाद नव्याने मोठी होईल!